१९८२ मध्ये अर्धसत्य नावाचा एक चित्रपट आला आणि एक खलनायक एका रात्रीत रूपेरी पडद्यावरचा हीरो झाला. रामा शेट्टी या भूमिकेने सदाशिव अमरापूरकरने गाजवलेला खलनायक तत्कालीन खलनायकांना आपल्या स्पर्धेत आलेला फार मोठा कलाकार असल्याचा साक्षात्कार झाला, पण तरीही जमिनीवर राहणारा कलाकार म्हणूनच सदाशिव अमरापूरकरांची ओळख होती.
सदाशिव अमरापूरकर हे काही त्यांचे खरे नाव नव्हते. त्यांचे खरे नाव गणेशकुमार नरवाडे हे होते. अहमदनगर जिल्ह्यातील अमरापूर या गावातील गणेशने अमरापूरकर हे नाव धारण केले. केवळ मराठीच नाही, तर हिंदी-मराठी-ओरिया-हरियाणी-भोजपुरी-बंगाली-गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे सदाशिव अमरापूरकर हे अभिनेते होते.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या आळंदीला राहणाºया आत्याबरोबर त्यांनी तीन-चार वेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायी यात्रा केली होती. त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे असले, तरी नाटकांतील भूमिकांसाठी त्यांनी सदाशिव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘पेटलेली अमावास्या’ या एकांकिकेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती. इस्टेटीकरिता बापाला घाबरवून भुतांचा वावर असल्याचे कथानक असलेली ही एकांकिका १९७० च्या दशकात तुफान गाजली होती. त्यानंतर जवळपास महाराष्ट्रातील अनेक स्पर्धांमधून ही एकांकिका सादर केली होती.
अभिनयाबरोबरच सामाजिक भान जपणारा कलाकार ही अमरापूरकरांची ख्याती होती. सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाºया संस्था-संघटनांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती. मार्च २०१४ मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती, पण आपल्या ध्येयापासून ते डगमगले कधीच नाहीत.
त्यांनी अनेक नाटकांतून लक्षात राहील असा अभिनय केला. यामध्ये ‘छिन्न’, ‘ज्याचा त्याचा विठोबा’, ‘यात्रिक’, ‘लग्नाची बेडी’, ‘हॅन्ड्स अप’, ‘हवा अंधारा कवडसा’ या नाटकांचा समावेश आहेच, पण विजय तेंडुलकारांच्या कन्यादान नाटकात त्यांनी केलेली भूमिका ही फारच सुंदर होती. याशिवाय ‘अतिरेकी’ नाटकात त्यांनी फक्त माळ्यावर लपून बसून संपूर्ण स्टेज व्यापून टाकले होते.
पण रंगभूमीशिवाय त्यांनी पडद्यावर जेव्हा एन्ट्री घेतली तेव्हा भल्याभल्यांना धडकी भरेल अशा भूमिका केल्या. मिळेल ती भूमिका करताना समोर कोण कलाकार आहे याची कधीच चिंता त्यांना नसायची. कारण त्यांच्या भूमिकेतून आत्मविश्वास व्यक्त व्हायचा. अमिताभ बच्चन यांच्यासमोर ‘आखरी रास्ता’मध्ये केलेली त्यांची एक चांगली भूमिका होती. याशिवाय सदाशिव अमरापूरकर यांनी बॉलीवूडमध्ये केलेल्या भूमिकांमध्ये विशेष उल्लेखनीय भूमिका म्हणून ‘सडक’ या महेश भट्ट यांच्या चित्रपटातील रानी ही भूमिका. त्यांनी साकारलेली हिजड्याची भूमिका पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. खलनायक जितक्या खंबीरपणे रंगवला तितक्याच विनोदी भूमिकाही त्यांनी रंगवल्या होत्या. अनिल कपूरच्या ‘बुलंदी’ चित्रपटात त्यांनी केलेली लंपट विनोदी भूमिका आणि परेश रावलबरोबरची जुगलबंदी जबरदस्त होती.
दे मार चित्रपटापासून ते कौटुंबिक चित्रपटापर्यंत सगळ्या निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि आपली भूमिका लक्षात राहील अशी साकारली होती हे विशेष. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘हम साथ साथ है’ या कौटुंबिक चित्रपटातही सदाशिव अमरापूरकर असतात आणि रामसेंच्या भयपटातही त्यांचे दर्शन होते. अमिताभ बच्चन, धर्मंेद्र, अनिल कपूर, संजय दत्त, गोविंदा, चंकी पांडे या कलाकारांबरोबरही हा कलाकार खलनायक म्हणून चमकतो आणि आपले भूमिका आणि अभिनयातील वैविध्य जपतो हे विशेष, पण बॉलीवूडमध्ये कलात्मक चित्रपट असलेल्या अर्धसत्यमधून एन्ट्री करून व्यावसायिक चित्रपटांमध्ये स्थिरावण्याचा त्यांचा प्रवास निश्चितच आश्चर्यजनक असाच आहे.
‘आखरी रास्ता’, ‘आँखे’, ‘आन्टी नंबर १’, ‘इश्क’, ‘ऐलान-ए-जंग’, ‘कुली नंबर १’, ‘गुप्त’, ‘छोटे सरकार’, ‘नाकाबंदी’, ‘सडक’, ‘हुकुमत’, ‘बुलंदी’ अशा तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटांतील अमरापूरकरांच्या या भूमिका लक्षात राहतील अशाच आहेत. त्याचप्रमाणे मराठीतील विशेष गाजलेल्या चित्रपटामध्ये त्यांच्या ‘झेडपी’ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करणाºया धर्मभास्कर वाघ या माणसाच्या जीवनावरील सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट. यातील धर्मभास्कर वाघची भूमिका त्यांनी जबरदस्त केली होती. याशिवाय जन्मठेप या चित्रपटात दरोडेखोराची भूमिका त्यांनी केली होती. आई पाहिजे या चित्रपटात चरित्र अभिनेत्याची भूमिका करून लक्ष वेधून घेतले होते. अशोक सराफ-रंजनाच्या गाजलेल्या खिचडी चित्रपटात रघुनाथकाकाची खलनायकाची भूमिका अमरापूरकरांनी गाजवली होती.
‘२२ जून १८९७’ या १९८० साली आलेल्या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका सदाशिव अमरापूरकरांनी केली होती. रँडचा खून करणाºया चाफेकर बंधूंना आशीर्वाद देणारे लोकमान्य टिळक यात त्यांनी रंगवले होते.
हा माणूस एक ध्येयवेडा होता. हातात घेतलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणारा होता. त्यांना शिसपेन्सिलीने चित्रे काढण्याचा छंद होता. एका जपानी शेती शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचून त्यांनी शेती करायचे ठरविले. त्यासाठी अमरापूरकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशी अर्धा एकर शेतजमीन विकत घेतली होती. तेथे त्यांनी शेताच्या कडेला अनेक झाडे लावली. तीन वर्षे पीक जळून गेल्यावरही प्रयत्न न सोडता ते भुईमुगाची नैसर्गिक शेती करत राहिले आणि चौथ्या वर्षी त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले. कोणतीही गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते, पण न कंटाळता प्रयत्न केले पाहिजेत हे त्यांच्या जगण्याचे तत्त्व होते. पहिल्या प्रयत्नात यश मिळणार नाही, पण कष्ट करणाºया माणसाला यश मिळतेच या स्वभावाने ते काम करत राहिले आणि आपली कारकीर्द त्यांनी गाजवली.
प्रफुल्ल फडके/द स्क्रीन
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा