मंगळवार, १३ जुलै, २०२१

चला सुटला...


आज घरात सगळे आनंदात होते. दीड वर्षानी अजयला कामावर जाण्याची संधी मिळाली होती. कोरोनामुळे बाहेर पडता येत नसल्यामुळे पहिली नोकरी सुटली होती. अथक प्रयत्नांनंतर त्याला नोकरी मिळाली होती. आता त्याला बºयापैकी पगार मिळेल आणि घरचं सगळं ठिक होईल म्हणून सगळे जण आनंदात होते.


खूप दिवसांनी अजय लवकर उठला होता, सगळं आवरलं, जेवणाचा डबा घेतला आणि मोठ्या आनंदात तो कामासाठी बाहेर पडला होता. अजय हा एक मराठी सामान्य कुटुंबातला तरुण होता. जास्ती काही अपेक्षा नव्हत्या; पण आपण आणि आपलं कुटुंब व्यवस्थित असावं. लग्न करावं आणि नोकरी करून आनंदात जगायचे या विचारात तो जगत होता. जगण्यासाठी एखादी बºयापैकी नोकरी असावी, अशी माफक अपेक्षा होती. बाकी सरकारी नोकरी मिळणं, तर शक्यच नव्हतं. कारण सरकारी नोकºया उपलब्ध असतात कुठं? असल्याच तर त्यात आरक्षण आलं, टक्केवारी आली, कोटा आला यात कसल्याच गटात बसत नसल्यानं खुल्या गटातील सामान्य तरुणांना आपली वाट आपणच शोधायची असते. त्यांना नसतो कोणी राजकीय मदत करणारा, ना कैवार घेणारा. अशा कुटुंबातला असल्यामुळे खाजगी नोकरीत धन्यता मानून जगणारा सामान्य माणूस; पण गेल्या दीड वर्षापासून सगळं बंद झालं अन् हा घरात. कंपनीत वर्कफ्रॉम होमची सुविधा नाही. त्यामुळे त्याला आपला पहिला जॉब सोडावा लागला होता. तो राहायला अंबरनाथ आणि जॉब मुंबईत. बसमधून जाणे परवडत नव्हते आणि शक्यही नव्हते. लोकल प्रवास बंद होता. त्यामुळे तो पहिला जॉब त्याचा सुटला आणि घरात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. सगळं सेव्हींग संपलं होतं. वडिलांच्या मागे आईनं वाढवलं होतं. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. त्यामुळे सगळी पुंजी संपली होती. याच्या एकट्याच्या पगारावर घर चालत होतं; पण कोरोनानं सगळं हिसकावून घेतलं होतं.

त्यामुळे अथक प्रयत्नांनंतर त्याला नोकरी लागली, तेव्हा घरातलं वातावरण आनंदी झालं. त्या आनंदातच तो कामावर गेला होता; पण रात्री उशीर झाला तरी तो घरी आला नाही. त्यामुळे सुशिलाबाई थोड्या चिंतेत होत्या. अर्थात चिंता करायचं कारण नव्हतं कारण कामाचा पहिलाच दिवस होता. समजून घेण्यात वेळ गेला असेल, असं समजून त्या आत बाहेर करत होत्या. तेवढ्यात फोन वाजला अन् सुशिलाबार्इंनी तो उचलला. पलीकडून आवाज आला, ‘हा देशमुखांचा फोन आहे का?’


‘हो मी सुशिला देशमुख बोलतेय... आपण कोण?’

‘अजय देशमुखांना तुम्ही ओळखता का?’, पलिकडून विचारणा झाली. तशा सुशिलाबाई सावध झाल्या आणि घाबरून विचारत होत्या, ‘हो... माझा मुलगा आहे तो... का? काय झालं?’


‘मी रेल्वे पोलीसमधून बोलतोय... इन्स्पेक्टर धुमाळ.. त्यांची डेड बॉडी आमच्या ताब्यात आहे. ती घेण्यासाठी या.’ फोन कट झाला.

काय घडलंय हे पण सुशिलाबार्इंना समजेना. डेड बॉडी सापडली? अजयची? रेल्वे रुळावर? काय झालं असेल नक्की? या विचारात त्यांना रडूपण फुटेना. आयुष्यात इतकी संकटं झेलली होती की, आता मुलाची डेड बॉडी ताब्यात घ्या, असा आलेला हा फोन त्या दु:खाचा कडेलोट होता; पण ही बातमी समजूनही त्यांना रडायला येईना, जोरदार ओरडावे आणि रडावे, आपला आक्रोश सगळ्या जगाला समजावा, असा विचार मनात असतानाच त्या डोक्याला हात लावून मटकन खाली बसल्या.


शेजारी पाजारी कसं समजलं माहिती नाही; पण एकाएकी दारापुढे गर्दी जमू लागली. मख्खपणे बसलेल्या सुशिलाबार्इंकडे सगळे बघत बसले. बाईला वेड तर लागलं नाही ना? धक्का बसून मुकी तर झाली नसेल ना? मुलगा गेला; पण तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही. कोणी म्हणत होतं, तिला रडवलं पाहिजे नाही तर काही तरी वेगळं होईल.

सगळे कुजबुजत होते. ‘तुम्हाला कसं कळलं?’ सुभाषनं शेजाºया काकांना विचारलं. तसं काका म्हणाले, ‘सोशल मिडीयावर हा व्हीडीओ खूपच व्हायरल झाला.’


‘हो मी पण बघितला... पण तो असं काही करेल असं नव्हतं वाटलं. मला अजून आठवतंय तो काय म्हणत होता. त्याने फक्त रेल्वे अधिकाºयांना पास मागितला. त्यांनी दिला नाही. तिकीट मागितलं. तेही दिलं नाही. त्यामुळे कामाचा पहिला दिवस असल्यामुळे कामावर जाणे आवश्यक होते. म्हणून तो विदाऊट तिकीट लोकलमध्ये बसला. परळ स्थानकात त्याला अडवले. त्याने तिकीट नाही म्हटले. मी तिकीट काढणार होतो; पण तुम्ही दिले नाही. फक्त सरकारी कर्मचाºयांना तिकीट मिळेल म्हणतात. आता तुमच्या नशिबाने तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली. मला नाही मिळाली. माझी तक्रार नाही. कसंतरी जगतोय ना आम्ही? खाजगीत नोकरी मिळवली. आज पहिलाच दिवस आहे. तिथे पोहोचणे आवश्यक आहे; पण ते तुम्हाला तुमच्या सरकारला अत्यावश्यक वाटत नाही. त्यामुळे मला पर्यायच नव्हता. माझ्या खात्यात जेमतेम शेदोनशे रुपये आहेत. दंड भरायलाही पैसा नाही. आता तुम्ही अडवल्यामुळे कामावर मी वेळेवर जाऊ शकत नाही त्यामुळे जॉब तर जाणार आहेच माझा; पण हे मी सगळं माझ्या मोबाईलवर शूट करणार आहे. काय सामान्यांवर या सरकारने परिस्थिती आणली आहे हे समजले पाहिजे. यासाठी हा माझा व्हिडीओ सर्वांनी व्हायरल करा. जास्तीत जास्त व्हायरल करा.’ सुभाषच्या डोळ्यासमोर क्लीप तरंगत होती. जमलेल्या सगळ्यांनी ती पाहिली होती. अनेकांनी व्हायरलही केली होती. पण त्याचा उत्तरार्ध काय असेल, हे कोणालाच माहिती नव्हते.

कामापर्यंत पोहोचू शकलो नाही. या व्यवस्थेनं पोहोचू दिलं नाही याचं शल्य अजयच्या मनात होतं. सामान्य माणसांना जगण्याचा अधिकारच नाही. हे निष्क्रिय सरकार स्वत:च्या तुंबड्या भरत आहे. घरात बसून आहे. त्यांनी पंचवीस पिढ्यांची संपत्ती जमवली आहे; पण सामान्यांची हातावर पोटं आहेत याची जाणिव त्यांना नाही. त्यामुळे आता इथून पुढे प्रामाणिक आणि सामान्य माणसांना जगण्याचा अधिकारच नाही. असा विचार करत समोरून येणाºया लोकल खाली अजयनं स्वत:ला झोकून दिलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; पण अजय ओरडलाही नाही. आपला जीव गेला तरी चालेल; पण आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून सामान्य माणूस पेटून उठेल या भावनेनं त्यानं आपलं बलिदान दिलं.


सुशिलाबाई शांत होत्या. शेजारच्या काकू आल्या. त्यांच्याजवळ बसल्या. ‘काकू रडा हो थोडं... येऊ दे पाणी डोळ्यातून. खूप वाईट गोष्ट झाली आहे. नाहीतर तुम्हाला त्रास होईल.’

पण सुशिलाबार्इंनी डोळ्यात पाणीही येऊ दिलं नाही. त्या गंभीरपणे म्हणाल्या, ‘चला सुटला बिचारा... नाहीतरी सामान्य माणसांच्या मरणावर अश्रू ढाळावेत असं आहे काय? श्रीमंतांची कुत्रीही मिरवणुकीने सरणावर जातात; पण सामान्यांच्या मरणाला काहीच किंमत नाही. आज मराठी माणसाला या सागरात राज्यकर्त्यांनी आपल्या नाकर्तेपणाने बुडवले आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत ती काय? चला सुटला तो. आता मी मरायला मोकळी. नका कोणी दु:ख करू. फक्त एकच आहे, आता रडायचं नाही, लढायचं. त्या निष्क्रिय राज्यकर्त्यांना सामान्य माणूस आहे, म्हणून तुम्ही आहात हे दाखवले पाहिजे. तोपर्यंत असे अनेक अजय मेले, तरी चालतील; पण कोणीही त्याची डेड बॉडी आणायची नाही. सांगा सरकारला किती अशा डेड बॉडीजवर अंत्यसंस्कार करतात तेच पहायचे आहे आता. चला सुटला...


प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा

9152448055\\

4 july

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: