मंगळवार, २० जुलै, २०२१

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा

 दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्यक्षात न घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. खरं तर नेहमी आधी बारावीचा मग दहावीचा निकाल लागतो; पण गेल्या दोन वर्षांत शिक्षण क्षेत्रात फारच उलथा पालथ झाल्यामुळे ना कोणती टर्म समजत आहे, ना कोणते शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू झाले याचा अंदाज येत आहे. क्रमिक अभ्यासक्रमात बराचसा भाग वगळून थोडक्यात शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे एकूणच शिक्षणाचा बोºया वाजलेला आहे.


खरं तर आज शिक्षण क्षेत्र प्रचंड विस्तारले आहे. कालानुरूप अनेक बदल घडून आले आहेत. काही परिणामकारक सिद्ध झाले आहे, तर काही कुचकामीही ठरले आहेत. बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मान्य केले, तर भविष्यात आणखी बदल करावे लागणार आहेत, जे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतील. कोरोना हा प्राणघातक विषाणू आला नसता, तर आज जे बदल आपण अनुभवतो आहोत, ते कदाचित अनुभवास आलेही नसते. कोरोना विषाणूने जसे मानवी जीवनात संक्रमण घडवून आणले आहे, तसेच संक्रमण शिक्षण क्षेत्रातही घडून आले आहे आणि त्याची उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी काही काळ आपल्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. कदाचित कोरोना आला नसता, तरीही आॅनलाईन शिक्षण आले असते आणि हा बदल घडला असता; पण बारावीबाबत जो काही निर्णय आहे त्याची उत्सुकता नक्कीच आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावीच्या परीक्षेला आत्यंतिक महत्त्व आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जरी वेगळ्या प्रवेश परीक्षा घेतल्या जात असल्या, तरी उच्च शिक्षण घेण्यासाठी बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश देताना बारावीत मिळालेले गुण हे अवश्य विचारात घेतले जातात. त्यामुळे बारावीची परीक्षा ही एक मोठी कसोटीही मानली जाते. कोरोनामुळे यंदा बारावीची परीक्षा झालीच नाही; पण पुढल्या वर्षी जी परीक्षा घेतली जाणार आहे, तिचे प्रारूप आणि स्वरूपच बदलण्यात आले आहे. प्रस्तावित परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. आता ही पद्धती किती प्रभावी ठरेल आणि काय परिणाम होतील, हे येणाºया काळात कळेलच. त्यामुळे कोरोना महामारी येवो अथवा अन्य कुठला साथरोग; बारावीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घ्यायची की, आभासी प्रणालीच्या माध्यमातून पार पाडायची, मूल्यांकन आधीच्या वर्गातल्या कामगिरीच्या आधारावर करायचे की, आणखी वेगळ्या पद्धतीने, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचारमंथन सुरू ठेवले पाहिजे. देशातली अनेक महाविद्यालये अशी आहेत की, ज्यामध्ये बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. अशा महाविद्यालयांवर प्रचंड दबाव असतो.


प्रवेशासाठी मोठ्या संख्येत अर्ज येतात आणि विद्यार्थी संख्या अतिशय मर्यादित असते. अशा वेळी बारावीत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीला फार महत्त्व प्राप्त होत असते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी जरी प्रवेश परीक्षा होत असल्या, तरी अन्य अनेक जे अभ्यासक्रम आहेत, त्यासाठी प्रवेश परीक्षा नव्हे, तर बारावीत मिळालेले गुण विचारात घेतले जातात. काही महाविद्यालयांचा जो कट आॅफ असतो, तो पाहून तर आश्चर्याने बोटे तोंडात घालण्याची वेळ येते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचे महत्त्व कायम आहे. आपल्याकडे सगळी चांगली महाविद्यालये ही मोठमोठ्या शहरांमध्येच असल्याने लहान-लहान गावांमधील विद्यार्थ्यांचा कल हा शहरांकडेच असल्याचे जाणवते. त्यामुळे शहरांवरील ताण वाढतो; शिवाय शहरात आपल्या पाल्याला शिकायला पाठवायचे म्हणजे पालकांच्या खिशावरील आणि डोक्यावरील ताणही तेवढाच वाढतो. आपल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा; आपले भवितव्य उज्ज्वल व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते आणि ते स्वाभाविकही मानले पाहिजे. पण, स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी आवश्यक गुण मिळविणारे आणि बेताची आर्थिक परिस्थिती असणारे विद्यार्थी व त्यांचे पालक आर्थिक आणि अन्य प्रकारचा ताण सहन करू शकत नाहीत आणि त्यामुळे असे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. शहरांमधील स्पर्धेत एखाद्याचाच नंबर लागतो आणि इतर शेकडो विद्यार्थी वंचित राहतात. त्यामुळे आपल्या समाजात जी विषमता निर्माण होते, ती पुढे समाज आणि देशासाठीही घातक सिद्ध होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे भवितव्य, शहरांवर येणारा अतिरिक्त ताण या व अशा अनेक बाबींचा विचार करून सरकारने प्रत्येक जिल्हा स्थानी उच्च व दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षण संस्था सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यायला हवा. त्याचप्रमाणे निकाल देताना किंवा परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची विषमता निर्माण होईल, असे वातावरण तयार होता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल.

शिक्षणाचा कायाकल्प करण्याची क्षमता आपली आपल्यालाच निर्माण करायची आहे. भारतात प्रत्येक राज्याचे शिक्षण मंडळ आहे. सीबीएसईसारखे अखिल भारतीय शिक्षण मंडळही आहे; मात्र, प्रत्येकाचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि मूल्यांकनाची पद्धतीही वेगळी आहे; पण उच्च शिक्षणासाठी देशभरातले सगळे विद्यार्थी समान पातळीवर स्पर्धेला सामोरे जातात. यात अनेक विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात. खरे तर हे अन्यायकारक आहे. कुठेतरी हे थांबले पाहिजे. देशभर एकसमान शिक्षण प्रणाली लागू करीत सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली गेली, तर कुणावरही अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: