गेल्या महिन्यापासून सोनी मराठी टीव्हीने एकापेक्षा एक सरस मालिका देत आपला टीआरपी वाढता ठेवला आहे. त्यात २१ जून पासून सुरू झालेली गाथा नवनाथांची या मालिकेचा उल्लेख करावा लागेल. क्रिमिनल्स या गुन्हेगारी जगताचा वेध घेणाºया मालिकेपाठोपाठ आध्यात्मिक अशी मालिका दररोज सायंकाळी साडेसहाला दिवेलागणीला सुरू झाल्यामुळे सासू-सुनांच्या कटकटीच्या मालिकांमध्ये गुंतून राहिलेली संध्याकाळ थोडी पवित्र करण्याचे काम सोनी मराठीने केले आहे. त्यात या मालिकेने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.
नाथ संप्रदाय हा संपूर्ण देशभर पसरलेला आहे, पण त्याचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. कोणत्याही भक्ती संप्रदायाचा पाया हा नाथ संप्रदाय आहे. आपला वारकरी संप्रदाय हा पण नाथ संप्रदायातून आलेला आहे. त्या नवनाथांची गाथा या मालिकेतून अत्यंत नैसर्गिक आणि भव्य दिव्य स्वरूपात दाखवली जात आहे. नवनाथांवर मालिका करणे सोपे नाही. एक तर यात चमत्कार आणि ट्रीक सिन्स भरपूर आहेत. त्यामुळे ही मालिका निर्माण करणे सोपे काम नव्हते. अत्यंत खर्चिक अशी ही मालिका आहे, पण हे शिवधनुष्य पेलत एक चांगली मालिका सोनी टीव्हीने दिलेली आहे.
भगवान शंकर पार्वतीला गुप्त ज्ञान सांगत असताना समुद्रातील एक मासा ते ऐकत असतो. पार्वतीला झोप लागलेली असते, पण हुंकार येत असल्याने तिसरे कोणी तरी ऐकतोय याची जाणीव महादेवांना होते, इथून या मालिकेला सुरुवात होते. त्यानंतर त्या माशाच्या पोटात कवी नारायण जन्म घेणार आहेत आणि नाथ संप्रदायाची स्थापना करण्याचे काम सुरू झाल्याचे संकेत शंकरांना मिळतात. ही क्लीष्ट असलेली कथा अत्यंत सहज-सोपेपणाने या मालिकेतून पोहोचवली आहे. छोट्या पडद्यावरील पौराणिक मालिकांमधील अभिनेता अशी ख्याती मिळवलेल्या नकुल घाणेकरने यात शंकराची भूमिका केलेली आहे. नाथ संप्रदायातील पहिले आणि प्रमुख नाथ असलेल्या मच्छिंद्रनाथांची भूमिका जयेश शेवाळकरने केली आहे, तर सुरभी हांडे हिने पुन्हा एकदा सप्तश्रृंगी देवीच्या रूपात प्रेक्षकांना दर्शन दिले आहे. अनिरुद्ध जोशीने मच्छिंद्रनाथांचा शिष्य आणि चिरंजीव असलेल्या गोरक्षनाथाची भूमिका केलेली आहे.
मच्छिंद्रनाथांच्या जन्मापासून अत्यंत सुंदर चित्र या मालिकेने दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. किनाºयावर येऊन मासा मोठे अंडे घालतो. नंतर बगळे ते अंडे खाण्यासाठी येतात आणि त्यातून एक दिव्य बालक प्रकट होते. हे सगळे एका कोळ्याच्या समोर घडते आणि निपुत्रिक असलेला तो कोळी आकाशवाणी झाल्यावर त्या बालकाला आपले अपत्य म्हणून पालनासाठी घरी नेतो. अत्यंत भव्य असे जहाज, मासेमारीसाठी लागणाºया सुंदर बोटी, समुद्रापासून आत असलेला समुद्र किनारचा कोळीवाडा, त्यातील भव्य दिव्य अशी घरे हे सगळं अप्रतिम असं आहे. यात दाखवलेली घरे ही केरळ दक्षिण भारतातील आहेत. अत्यंत निसर्गाने रम्य अशा परिसरातील चित्रीकरण डोळ्यांना सुखद आनंद देणारे असे आहे. मच्छिंद्राच्या बाललीला पाहूनही प्रेक्षकांना आनंद मिळतो. जहाजातून बाल मच्छिंद्राने समुद्रात उडी घेणे, माशांना भेटणे, त्याच्या काळजीने वडिलांनी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढणे, त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे, आई-वडिलांचे प्रेम मिळवणे हे अत्यंत सहजपणे दाखवले आहे. गावातला भगत देवाला माशांना नैवेद्य देतो हे पाहून बाल मच्छिंद्राने त्याला विरोध करणे, मासे खाऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे, गावाची नाराजी पत्करून विरोध करणे, वडिलांनी पकडलेले मासे पुन्हा समुद्रात सोडून देणे या लीला छान दाखवल्या आहेत.
दत्तात्रयांनी स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर गृहत्याग करताना आपण या कोळी लोकांची संस्कृती बदलू शकत नाही, मासे खाण्यापासून त्यांना रोखू शकत नाही म्हणून निघून जाणे आणि बद्रीनाथला जाऊन घोर तपश्चर्या करणे हे अतिशय सरळ आणि सोपेपणाने दाखवले आहे. तपश्चर्येनंतर दिशाबंधन करून ज्ञानप्राप्तीसाठी दत्त आणि शंकरांनी दिलेली दीक्षा आणि नाथ संप्रदायाच्या स्थापनेचा हेतू स्पष्ट करणे फार महत्त्वाचे होते. मूळ शैव आणि वैष्णव असे पंथ. शंकर आणि विष्णूची लोक भक्ती करत होते. हे दोन्ही एकच आहेत, पण शाक्त्य शक्तीची पूजा करणारा संप्रदाय निर्माण झाल्यानंतर या शाक्त उपासकांनी प्राप्त केलेल्या शक्तीचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली. अंधश्रद्धा पसरवण्यास सुरुवात केली. पशुहत्या, बळी असले प्रकार सुरू केले. हे थांबवण्यासाठी प्रेमभाव निर्माण करणारा, भक्ती संप्रदाय निर्माण करणारा मार्ग म्हणजे नाथांचा संप्रदाय हे तत्त्वज्ञान यातून अत्यंत साधेसोपेपणाने सांगितले आहे, मात्र कुठेही कसलीही कमतरता भासत नाही. यातील ट्रीकसीन उत्तम असे आहेत. छायाचित्रण, चित्रीकरणाची स्थळं अत्यंत सुंदर अशीच आहेत.
या आठवड्यात मोठ्या मच्छिंद्रांची एन्ट्री झालेली आहे. अत्यंत तेजस्वी मच्छिंद्रनाथांची भूमिका जयेश शेवाळकर यांनी छान केलेली आहे. दत्तात्रयांनी सांगितल्याप्रमाणे सप्तश्रृंगीला मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न कररून घेतले आहे. नाग, अश्वत्थ वृक्षावरील भैरव, वेताळ आदी शक्तींना प्रसन्न करून घेतले आहे. या भ्रमणात मच्छिंद्रनाथांना हा संप्रदाय वाढवण्याचा आदेश आलेला आहे. त्याप्रमाणे आता गोरक्षनाथांचा जन्म होऊ घातलेला आहे. एका निपुत्रिक दाम्पत्याला तेजस्वी पुत्र होईल असा आशीर्वाद देऊन मच्छिंद्रनाथांनी विभूती दिली आहे, पण मनात शंका, शेजारणींनी घातलेली भीती यामुळे सरस्वती विभूती शेणात टाकून देते. त्या गोबराच्या साठ्यात एक तेज तयार झालेले आहे. हे सर्व अत्यंत रम्य असे दाखवले आहे. चित्रीकरणाच्या स्थळांपासून यातील एकूण एक पात्र हे अत्यंत नैसर्गिक आणि छान वठलेले आहे. अर्थात, मूळ नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा आधार पाहिला तर हा गोरक्षनाथांचा जन्म हा बंगाल प्रांतात कुठे तरी झाल्याचे दाखवले आहे, पण मालिकेत सगळे महाराष्ट्रात, दाक्षिणात्य कोळ्यांच्या वातावरणात दाखवले आहे, पण तेवढे स्वातंत्र्य आणि मर्यादा ठीक आहेत. बाकी मालिका पहिल्या १८ भागांत तर उत्तम दर्जाची झाली आहे. पुढील कथानके, चमत्कार आणि तंत्र असल्यामुळे अधिक रंजक होईल यात शंकाच नाही. गाथा नवनाथांची आणि कोण होणार मराठी करोडपतीने अन्य वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग खेचला आहे, हे नक्की.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा