राष्ट्रपती पदाची निवडणूक पुढील वर्षात आहे. जेमतेम दहा ते अकरा महिने बाकी असताना, आता विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण या चर्चांनी तोंड वर काढले आहे. त्यात पुन्हा एकदा शरद पवारांचे नाव येत आहे. शरद पवार यांच्याबाबतीत जशी पंतप्रधानपदाची चर्चा होते त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदाचीही चर्चा होते. त्यांना राष्ट्रपती व्हायचं आहे, अशी चर्चा अधूनमधून तोंड वर काढत असते. त्यात बुधवारी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाची घेतलेली भेट आणि त्यानंतर शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार घोषित करण्याच्या चर्चेला तोंड फुटले; पण काही झाले, तरी शरद पवार ही निवडणूक लढवणार नाहीत हे नक्की. शरद पवार राष्ट्रपती फक्त भाजपच्या पाठिंब्याने होऊ शकतात, त्याला त्यांनी मान्यता दिली तरच ते ही निवडणूक लढवतील किंबहुना ती बिनविरोधच होईल; पण भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत, ते लढणार नाहीत आणि जिंकणारही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. फक्त भाजपमध्ये पवारांना राष्ट्रपती करण्याची ताकद आहे, विरोधकांमध्ये नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासंदर्भातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती, तसेच त्यांचं कौतुकही केलं होतं. यामुळेच या स्नेहपूर्ण संबंधांचा उपयोग शरद पवार यांना राष्ट्रपती होण्यासाठी होईल, असे तर्क लावले जात होते. आता प्रशांत किशोर यांच्या हालचालींवरूनही राष्ट्रपतीपदासाठी तयारी सुरू असल्याची चर्चा केली जात आहे. स्वत: शरद पवार यांनी याबाबत कोणतंही वक्तव्यं केलं नाहीये. किंबहुना प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेली भेट ही राजकीय नव्हती, असं पवारांनी स्पष्ट केल्याचंही वृत्त आहे; पण तरीही पवारांच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या चर्चा सुरू असतानाच नाना पटोले यांनी मराठी माणूस राष्ट्रपती झाला, तर आम्हाला आनंदच होईल; मात्र केंद्र पातळीवर राष्ट्रपती निवडीबाबत काही प्रक्रिया सुरू आहे की नाही याची कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं अनाठायी आहे.
मराठी व्यक्ती त्या पदावर बसत आहे या कारणासाठी भाजप-सेना युती असूनही सेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. अर्थात शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपबरोबर युतीमध्ये असताना पाठिंबा दिला होता. हे असलं, तरी शरद पवार ही निवडणूक भाजपच्या पाठिंब्याशिवाय लढणार नाहीत हे नक्की. याचे कारण आपल्या पंचावन्न वर्षांच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही पराभव चाखलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झालेले आहेत. विधानसभा असो वा लोकसभा प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झालेले आहेत. ज्यावेळी आपण विजयी होणार नाही, अशी खात्री त्यांना असते तेव्हा ते निवडणूकच लढवत नाहीत. २०१४ला शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण २०१९ला ते निवडणूक लढवू शकले नाहीत, कारण मोदींची लाट कायम आहे हे त्यांनी ओळखले आणि राज्यसभेवर जाणे पसंत केले. माढा लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केल्यावर मोहिते पाटील गट विरोधात आहे, मेळाव्यालाही कोणी हजर नाही हे लक्षात घेतल्यावर त्यांनी काढता पाय घेतला आणि राज्यसभा नक्की केली. त्याचप्रमाणे पुणे लोकसभा मतदारसंघाचीही चाचपणी केली; पण पुणेकर आपल्याला स्वीकारणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी राज्यसभा पसंत केली, कारण आपण कधी पराभव स्वीकारलेला नाही त्यामुळे आता अखेरच्या टप्प्यात पराभूत होणे हे योग्य नाही, असा विचार करून त्यांनी लोकसभा लढवली नाही. त्यामुळेच जर भाजपचा पाठिंबा नसेल, तर आपण राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकू शकत नाही याची खात्री पूर्णपणे असल्याने शरद पवार ही निवडणूक लढवणार नाहीत. भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून ते उमेदवारी स्वीकारू शकतात आणि जिंकूही शकतात. त्यामुळे शरद पवारांना प्रशांत किशोर नाही, तर मोदी राष्ट्रपती करू शकतील हे वास्तव नाकारून चालणार नाही.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या घरी भाजपविरोधी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात कोणती चर्चा झाली हेच स्पष्ट झाले नाही. या बैठकीत तिसºया आघाडीची चर्चा झाली की, शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारीची चर्चा हे स्पष्ट झाले नव्हते. सध्याची देशातील विधानसभांमधील आणि संसदेतील स्थिती पाहता भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक फारशी कठीण नाही. त्यामुळे पवार हे प्रशांत किशोर आणि काँग्रेसवर अवलंबून न राहता एकमताने सर्वपक्षांकडून सन्मानाने बिनविरोध राष्ट्रपती होता आले तर पाहतील, नाहीतर विरोधात ते जाणार नाहीत. पडण्याकरता लढण्याची भाषा पवार करत नाहीत, तर जिंकण्यासाठी लढायचे असे त्यांचे तत्व असल्याने जिथे जिंकण्याची शक्यता आहे तिथेच ते पाय टाकतात.
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. प्रशांत किशोर यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही. तिसरी आघाडी करणे किंवा विरोधी आघाडी करणे हे समीकरण प्रशांत किशोर यांच्या हातात नाही. २०१४पर्यंत मोदींचे हस्तक आणि २०२१ला दीदींचे हस्तक होऊन विजयाचे शिल्पकार अशी ख्याती मिळवली असली, तरी पवारांना आपल्या हातातील बाहुले बनवणे हे प्रशांत किशोर यांना कधीच जमणार नाही. आपली किंगमेकरची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रशांत किशोर ही खेळी खेळत असले, तरी पवार थेट मोदींना भेटून आपण इच्छुक असल्याचे सांगतील आणि बिनविरोध राष्ट्रपती होतील; पण हे सगळं भाजप आणि मोदींच्या हातात आहे, अन्य कोणाच्या नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा