झी मराठी वाहिनीचा टीआरपी दिवसेंदिवस घसरताना दिसतो आहे, तर सोनी मराठी ही वाहिनी सध्या वेगाने प्रेक्षकांना खेचताना दिसत आहे. सोनी मराठीवर कौन बनेगा करोडपती, अजूनही बरसात आहे, गाथा नवनाथांची या मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे गाजत आहेत. कलर्स वाहिनीची धुरा जय जय स्वामी समर्थ या मालिकेने सांभाळली आहे; पण आज झी मराठीवर मात्र अतर्क्य मालिकांनी कहर केला आहे. त्यामुळे प्रेक्षक दिवसेंदिवस तिकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
मागच्या आठवड्यात येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काय वाटेल तो धुडघूस घातलेला दाखवला आहे. मुळात अंबरनाथ आणि मलबार हिल, मुंबई हे तळ्यात-मळ्यात खेळावं इतके जवळ असल्याचे दाखवले आहे. दोन मिनिटांत कोणतेही पात्र मुंबईतून अंबरनाथमध्ये येते हेच अतर्क्य आहे. त्या मालिकेच्या दिग्दर्शक, लेखकाला सांगावेसे वाटते की, एकदा अंबरनाथ ते मुंबई सीएसएमटी, असा प्रवास करून बघ आणि किती वेळ ट्रेनने लागतो ते समजेल; पण मालविकाने हाकलले की, मोहित दुसºया मिनिटाला मनोवेगाने अंबरनाथमध्ये कारस्थानं करायला येतो.
नलूनं ओमला दिलेला टास्क पूर्ण होऊ नये आणि स्वीटूशी ओमचे लग्न होऊ नये, म्हणून ओमनं जो भाजीचा ठेला टाकला आहे, तो उध्वस्त करण्याचे काम मालविका मोहितवर सोपवते. मोहित दोन गुंड मंडईत घेऊन येतो आणि सगळं उध्वस्त करतो. कोणी त्यांना अडवत नाही. हे सहसा होत नाही. व्यापारी मंडळी एकमेकांना मदतीला धावतात. मुंबईतून तो जादू कुत्रा लोकलप्रवास करून अंबरनाथमध्ये ओमला भेटायला येतो. रस्त्यावरची भटकी कुत्री अशा बाहेरच्या कुत्र्याला सहज शिरकाव करून देतात का?
ओम ज्या खोलीत राहत आहे, त्या खोलीच्या मालकाला मालविका बोलावून घेते आणि ओमला घराबाहेर काढायला सांगते. त्यासाठी ७० हजार रुपये त्याला लाच देते. त्यानंतर ओमला घरातून बाहेर काढले जाते. ओम मुंबईला परत जात नाही, दुसरी खोली त्याला मिळत नाही, स्वीटूच्या घरी रहायला जात नाही. रस्त्यावर राहून त्याचे रूटीन सगळे कसे व्यवस्थित चालले आहे, हे कुठेच पटणारे नाही.
सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे चिल्याला नोकरी लागल्यावर तो पहिल्याच दिवशी लोकलने कामावर निघाला आहे. त्याचा पाठलाग मोहित करतो आणि लोकलच्या दारात तो उभा आहे हेपाहून त्याच्या हाताला पिन टोचतो आणि चालत्या लोकलमधून ढकलून देतो. हे किती भयानक आहे. कथानकाशी काहीही संबंध नसलेले हे दृश्य का दाखवले आहे? मुळात रेल्वेत मुंबई लोकलमध्ये चरसी, गर्दुल्ले, फटका गँग यांची अगोदरच दहशत असताना, अशा तºहेने हाताला पिन टोचून हात सोडून दरवाजातून खाली पाडायची ही शक्कल कशासाठी दाखवली? तो भाग आक्षेपार्ह आहे.
नलूने घातलेल्या अटीप्रमाणे २५ हजार रुपये जमल्यावर ओम आणि स्वीटूचे मंडईत जे मिठ्या मारण्याचे प्रकार दाखवले आहेत ते योग्य नाही. दोघंही प्रेमात बुडाले आहेत; पण मर्यादांचे उल्लंघन करणारे नाहीत, अशा व्यक्तिरेखा असताना हे सार्वजनिक ठिकाणी मिठ्या मारण्याचे दाखवलेले प्रकार अशोभनीय असेच आहेत. मालविकाने त्या मोहितला ओमच्या जागेवर सीईओ म्हणून नेमला आहे. त्याला जोड्यापासून सगळं उचलायला लावते आहेच; पण धडाधडा त्याला थपडा मारते आहे. तोही निर्लज्जासारख्या थपडा खातो आहे. कोणी इतका लाचार जगू शकतो का? रॉकी एक गुडघ्यात मेंदू असलेला भोळसट दाखवला आहे; पण मोहित कसा काय इतका मार खाऊ शकतो? काहीही दाखवण्याचा हा प्रकार चालला आहे.
याशिवाय सोमवार ते बुधवार असलेल्या चला हवा येऊ द्या या मालिकेत आता हसू येईनासे झाले आहे. हसताय ना हसायलाच पाहिजे, अशी सुरुवात झाली, तरी ते दिलखुलासचा जो प्रकार आहे तो अत्यंत इरिटेटेड होतो आहे. त्यात निलेश साबळे सगळ्या कलाकारांना इतकं अंडरएस्टीमेट करताना दिसतात की, तो प्रकार विनोदाचा न राहता अपमानित करणारा राहतो. तुला डायलॉग नाहीत, पेमेंट मिळणार नाही. तीन-तीन महिने पेमेंट मिळत नाही, असे संवाद वारंवार घेऊन झी मराठीकडून या कलाकारांना वेळेवर मानधन दिले जात नाही हे दाखवण्याचा जो प्रकार केला जात आहे, ते झी मराठीसाठी बदनामकारक आहे. अशा प्रकारांना वाहिनीनेच आळा घातला पाहिजे. विनोदापेक्षा एकमेकांना अपमानित करण्याचे प्रकार हे कधीकधी हिडीस वाटतात. तो दिलखुलास हा भाग अतिशय बेकार आहे; मात्र यातील काही प्रहसनं निश्चित कौतुकास्पद अशीच आहेत. यातले याच आठवड्यातले घरात शूटिंगला आलेल्या कलाकारांचे प्रहसन छान होते. त्याची संहिता पण दमदार होती. यात खूप दिवसांनी कुशल बद्रिके, भाऊ कदम यांच्यातील जुगलबंदी पहायला मिळाली. श्रेया बुगडेनी, तर नटीचं काम अफलातूनच केले; पण याच भागात झी टीव्हीवर हिंदीत येणाºया एका कॉमेडी शोचे प्रमोशन करताना दाखवले आहे. फराह अख्तर आणि तिची टीम नवीन शो घेऊन येत आहे. त्या टीमपुढे मात्र मराठी कलाकारांच्या मर्यादा स्पष्ट करण्याचे काम केले ते चुकीचे होते. डॉयलॉग पाठ नाहीत, पेमेंट वेळेवर मिळत नाही, अशा तºहेच्या कॉमेंट्स टाकून आपले वैचारिक दारिद्र्याचे विनाकारण प्रदर्शन झाले. असे विनोद इथे अपेक्षित नाहीत. विनोदासाठी कोट्या, कुरघोड्या असल्या पाहिजेत; पण त्या मार्मिक असल्या पाहिजेत. कोणाचीही कुचेष्टा होणारी कमेंट विनोद नाही निर्माण करत. असे पंच फारसे चालतही नाहीत. फक्त समोर बसलेले कलाकार, प्रेक्षकच खोटे-खोटे हसतात ते अत्यंक केविलवाणे वाटते. असे अतर्क्य प्रकार थांबले पाहिजेत.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा