अग्रलेख
केंद्रीय मंत्रिमंडळात दोन दिवसांपूर्वी झालेल्या विस्तार आणि फेरबदलानंतर सर्वच राजकीय पक्षांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षांमध्ये नेमका काय फरक आहे. काँग्रेस हा मुख्य पक्ष पकडला तर कोणत्याही बिगर भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यावर कोणाला डच्चू दिला, कोणाला वगळले, कोणाची उचलबांगडी केली, कोणाला अर्धचंद्र दिला, इथपासून ते हकालपट्टीपर्यंत माध्यमांमधून चर्चा होते, पण भारतीय जनता पक्षात तसे नसते. इथे भाजपच्या मंत्र्यांनी नव्या चेहºयांना संधी देण्यासाठी आणि स्वत: ते खुर्ची रिकामी करत असतात, कारण त्यांना पुढील निवडणुकांसाठी पक्षकार्यासाठी जायचे असते. भाजपमध्ये व्यक्तिस्तोम नसते, तर विचारधारा असते. त्यामुळेच दिग्गजांचे राजीनामे अत्यंत शिस्तीत आले, कोणाची नाराजी वगैरे इथे घडत नसते. पक्षवाढीसाठी हे फार महत्त्वाचे आहे. राज्यातील डझनभर महापालिका निवडणुका आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मोदी सरकारने राज्य कारभाराची जबाबदारी नव्या व्यक्तींकडे सोपवून ओरिजनल भाजपेयी चेहरे हे पक्षवाढीसाठी बाहेर पडणार आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
शपथविधीच्या काहीच तास आधी देशाचे आरोग्य, शिक्षण, पर्यावरण तसंच माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी राजीनामे दिले. मोदी सरकारमधील एकूण १२ मंत्र्यांना काढून टाकण्यात आलं आहे, पण त्यांचा वापर असा ज्या प्रकारे केला जाणार आहे ते पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.
भाजपची ही राजकीय व्यावहारिकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसºया कार्यकाळातील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे. यामध्ये एकूण ४३ मंत्र्यांचा सहभाग असून, १५ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी जूनमध्ये सर्व मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. सर्वांच्या कामकाजाचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोणकोणत्या मंत्र्यांना काढून टाकायचं, हे निश्चित केलं होतं हे फार महत्त्वाचं आहे. अन्य पक्षात गडबड झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, घोटाळा केला म्हणून मंत्रीपद काढून घेतलं जातं, पण भाजपमध्ये तसे होत नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे. पक्षहित, सरकारचे हित, राष्ट्रहित अशा सर्वभावनांनी हे बदल केले जातात. या सरकारमधला एकही मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने गेलेला नाही तर अन्य जबाबदारी घेण्यासाठी ही आसनं रिकामी केली आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
कोविड साथीदरम्यान भारताच्या आरोग्य मंत्रालयाची धुरा सांभाळणाºया हर्षवर्धन यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाचा कायापालट करण्यात आला आहे. कोविड साथीदरम्यान लोकांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं, जे नुकसान सहन करावं लागलं, तसं काही आता होणार नाही, असं लोकांना दाखवण्याची सरकारची इच्छा आहे. आरोग्य मंत्र्यांना काढून टाकण्यात आल्यामुळे सरकारवर असाही आरोप होतो आहे की, साथीदरम्यान सरकारने योग्य उपाययोजना केल्या नाहीत आणि लोकांचे जीव वाचवण्यात सरकारला अपयश आलं, पण जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. जोपर्यंत लस आली नव्हती तोपर्यंत ते कार्यक्षम म्हणूनच ओळखले जात होते. लसीच्या वाटपात होत असलेल्या असमतोलामुळे त्यांच्यावर टीका झाली, पण त्याचा काही परिणाम होणार नाही. नवीन मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिक्षण मंत्र्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आलं. मूळचे उत्तराखंडचे असणारे रमेश पोखरियाल निशंक केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर भारतातील पहाडी इलाक्यांचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्याच कार्यकाळात भारताचं नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं, पण आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी त्यांना मोकळं केलं आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ट्विटरशी संघर्ष करणाºया रविशंकर प्रसाद यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. ट्विटरसंदर्भातील वादामुळेच रविशंकर प्रसाद यांना पद गमवावं लागलं असू शकतं, पण रविशंकर प्रसाद हे सभ्य चेहरा म्हणूनच ख्यात असल्याने त्यांना जागा रिक्त करावी लागली ती नव्या चेहºयांना संधी देण्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही पदावरून हटवलं आहे. याची दोन कारणं असावीत, असं म्हटलं जात आहे. एक- पर्यावरण मंत्रालयाने फार काही काम केलेलं नाही आणि दोन- प्रकाश जावडेकर यांचं पक्षांतर्गत समर्थन रोडावलं आहे, पण तरीही प्रकाश जावडेकर हे ग्राऊंडरूटवरून काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आगामी काळात पक्षवाढीसाठी त्यांचे दौरे आणि भूमिका महत्त्वाची ठरू शकते. सर्वसामान्य आणि अन्य पक्षातून आलेल्या चेहºयांना संधी देत भाजपने आपल्या जुन्या नेत्यांना प्रचारासाठी बाहेर काढले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणुकांमध्ये मंत्रिमंडळ उतरले असे भासू नये म्हणून अनेक प्रभावी नेत्यांना बाजूला करणे हा खांदेपालटाचा प्रकार आहे. पक्षवाढीसाठी घरटी भेटीगाठी घेणे, मेळावे घेणे, छुपा प्रचार करणे ही भाजपची खासियत आहे. राज्यातही बुधवारी कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश झाला, पण त्यापूर्वी त्यांनी तीन महिने संपर्क अभियान राबवले होते. मुंबईतील १ लाख परप्रांतीय कुटुंबांना भेट देणारी त्यांनी मोहीम राबवली होती. ही अर्थातच भाजपची रणनीती होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीयांना आपल्याकडे खेचण्यासाठी केलेली ही मोहीम होती. ती फत्ते झाल्यानंतर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे झालेला मंत्रिमंडळातील फेरबदल आणि नवे पक्षप्रवेश हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहेत हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा