गुरुवार, २९ जुलै, २०२१

एकजूट महत्त्वाची

 अग्रलेख


राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून कोसळणाºया मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे हाहाकार उडाला असून, चिपळूण, खेड, महाडला महापुराचा वेढा बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोकण जलमय झाले आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुराने दाणादाण उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात ४८ तासांत तब्बल ३०० मिमी तुफानी वृष्टी झाल्याने चिपळूणसह परिसरातील ७ गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. हजारो घरे पाण्याखाली गेली असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. बचावकार्य युद्धस्तरावर सुरू झाले आहे. मदतकार्यासाठी एनडीआरएफची पथके बोटींसह पाठविण्यात आली आहेत. कोकणासह नाशिक जिल्ह्यात आणि विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही धो-धो पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने लोकांच्या मनात धास्ती भरली आहे. महापुराचे चढलेले पाणी उतरणार कधी आणि पुरात अडकलेल्यांची सुटका होणार कधी, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. सरकार योग्य प्रकारे मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही या क्षणी मदतीसाठी धावत आहेत. आपापल्या परिने योग्य ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी हा प्रश्न राजकारणाचा न करता एकजुटीने हातात हात घालून मदतीला उतरण्याची गरज आहे. गुरुवारी दरड कोसळण्याच्या प्रकारानंतर केंद्राने आपली मदत तातडीने पोहोचवली, तसेच राज्यानेही त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण सरकारच्या नावाने ओरड करण्याचा प्रयत्न करू नये, असे वाटते.


प्रत्येक गोष्ट सरकारनेच करायची असते, असे नाही. सरकारला आपणही मदत करायची असते, असा विचारही करायला हवा. कोणतेही संकट सरकार लादत नसते. सरकार चालवणारी माणसेच आहेत. त्यामुळे विनाकारण शासन, प्रशासन यांच्या नावाने ओरड करणे टाळले पाहिजे. विनाकारण टीका करणेही टाळले पाहिजे. संकटाच्या परिस्थितीत एकजुटीने सर्वांनी तोंड देणे महत्त्वाचे आहे. आम्हीच पहिल्यांदा मदतीला धावून आलो, असा डांगोरा कोणी कृपा करून पिटू नका. ही ती वेळ नव्हे. आज महाराष्ट्रावर आलेले पावसाचे, अतिवृष्टीचे, जलप्रलयाचे, दरडी कोसळण्याचे, भूस्खलनाचे जे काही संकट आले आहे ते नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याला सर्वांनी एकजुटीने तोंड देणे हेच खरे आहे.

कोकणात पावसाने २५ जणांचे बळी घेतले असून, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरड कोसळल्याने ३६ जणांना प्राण गमवावे लागले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाटण तालुक्यातही दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. तेथे १५ जणांचा मातीच्या ढिगाºयाखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईमध्येही पाऊस आपले रौद्र रूप दाखवत आहे. या अभूतपूर्व घटनेची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. शनिवारी ते घटनास्थळाला भेटही देऊन पूरग्रस्तांचे, पिडीतांचे सांत्वनही करून आले आहेत. घटना घडत असताना ते स्वत: पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: मंत्रालयात दाखल झाले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संकटाला राज्याने सामोेरे जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. तथापि, मदतीसाठीचे सरकारी हात तोकडे पडू लागले आहेत. अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्थांनी सेवाभावी वृत्तीतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज भासू लागली आहे. अतिवृष्टी बहुतांश महाराष्ट्राला झोडपून काढत असली, तरी कोकणावरचे संकट अधिक गहिरे आहे. गेली दोन-तीन वर्षे कोकणाला निसर्गाचे एका पाठोपाठ एक फटके बसत असून, चिपळूण व परिसराला तुफान पावसाने दिलेला तडाखा भयंकरच आहे. अहोरात्र सरकार, मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून काम करत असताना, अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे की, आपण सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे.


विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दिल्लीत असलेल्या खासदारांनी यावेळी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून संकटाची कल्पना दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही लागेल ती मदत करू, असा विश्वास दिला. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यात यावरून सतत चर्चा होत होती. केंद्राकडून एनडीआरएफ, तीनही लष्करी दले मदतीसाठी तातडीने धावून आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही चांगल्या हालचाली केल्या आणि वेळेवर मदत पाठवली. हेच भारतातील चांगल्या लोकशाहीचे, सुंसंस्कृतपणाचे लक्षण आहे. या परिस्थितीचा, या परिस्थितीत राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना आता कोणीच डगमगायचे कारण नाही.

सर्वसामान्य माणसांपासून विरोधकांपर्यंत आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार धरत असतो. दोष देत असतो. टीका करत असतो; पण जेव्हा सरकार चांगले काम करते, मदतीसाठी धावाधाव करते, तेव्हा त्या चांगल्या कामाचेही कौतुक करण्याचे मोठेपण प्रत्येकाकडे असले पाहिजे. या अतिवृष्टीच्या काळात मदतीसाठी सरकारने केलेली धावाधाव योग्य अशीच आहे. जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा तेव्हा सर्व जण हातात हात घालून मदतीला धावतील, असेच प्रयत्न सरकार करत असते. त्यामुळे या परिस्थितीचा कोणालाही गैरफायदा घेण्याची अजिबात संधी मिळता कामा नये. त्यासाटी एकजूट ही महत्त्वाची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: