३१ जुलै स्वर्गीय गायक मोहम्मद रफींचा स्मृतीदिन. आज त्यांना जाऊन ४ दशकं उलटली, तरी त्यांची लोकप्रिता तसूभरही कमी झालेली नाही. प्रत्येकाला गायक म्हणून रफी व्हायचं असतं. इतक्या त्या गायकीला उच्च पदावर त्यांनी नेऊन ठेवले. मृत्यूनंतर आपल्याकडे स्वर्गात गेला, असे म्हणतात; पण हा गायक ही सृष्टी सोडून जाताना स्वर गात गेला अशा प्रकारे स्वर्गात गेला.
मोहम्मद रफी भारतीय चित्रपटातील एक सुप्रसिद्ध महान गायक होते. त्यांना भारतीय उपमहाद्वीपाच्या शतकातील श्रेष्ठ गायकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद रफी यांची पवित्र आणि सौम्य आवाजातील गाणी आणि देशभक्तीवर गीतांसाठी अजरामर झाली आहेत. त्यासोबतच त्यांनी अनेक प्रसिद्ध रोमँटिक गीत, कव्वाली, गझल आणि भजन गायले आहेत. जी श्रोत्यांच्या मुखावर आजवर आहेत. चित्रपटातील अभिनेत्यात समरस होऊन त्यांचा आवाज जणू त्याच कलावंतांचा वाटायचा. १९५० ते १९७०पर्यंत त्यांनी ३००पेक्षा जास्त चित्रपटांत गीते गायिली.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्यांची एक विशेष ओळख आहे, जी त्यांनी स्वत:च्या बळावर कमावलेली आहे. त्यांच्या नावे ६ फिल्मफेअर अवॉर्ड आणि १ राष्ट्रीय अवॉर्ड आहे. १९६७मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. रफीचे गाणे ऐकताना ते रेडीओवर जरी ऐकले, तरी ते कोणत्या अभिनेत्यासाठी गायले असेल त्याचा चेहरा समोर येतो, इतके त्याचे गाणे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांशी एकरूप होणारे होते. त्यामुळे प्रत्येक अभिनेत्याला मोठा करणारा गायक अशीच त्याची ख्याती होती.
मोहम्मद रफी यांनी हिंदीसोबत अनेक भाषांमध्ये मिळून ७४०० गीते गायली आहेत. त्या भाषांमध्ये आसामी, कोकणी, भोजपुरी, ओडिया, पंजाबी, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नड, गुजराती, तेलगु, मैथिली, ऊर्दू यांचा समावेश आहे. भारतीय भाषांशिवाय इंग्लिश, फारशी, अरबी आणि डच भाषांमध्ये पण त्यांनी गीत गायले आहे. त्यांचे सर्व संगीत आजही श्रवणीय आहे. गिनिज बुक आॅफ रेकॉर्डच्या नोंदीनुसार मोहम्मद रफींच्या नावावर २८ हजार गाण्यांची नोंद आहे.
मोहम्मद रफी हे हाजी अली मोहम्मद यांच्या ६ पुत्रांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचा परिवार मुख्यत्वे कोठला येते आहे. हे अमृतसर जवळ एक गाव आहे. घरासमोरून रोज जाणाºया एका फकिराचे गाणे ऐकून त्यांना गायनाची प्रेरणा मिळाली. १९३५मध्ये रफी लाहोर, पाकिस्तान येथे गेले. तेथे भट्टी गेट गल्लीजवळ त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहम्मद दिनू हे केशकर्तनालयाचे काम करत. त्यांच्या मित्राने रफीची प्रतिभा पाहिली आणि त्यांना गायनासाठी प्रेरित केले. त्यानंतर मोहम्मद रफी १९४४मध्ये मुंबई येथे आले. तेथे आल्यावर गायनातील बारीक गोष्टींचे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान आणि पंडित जीवनलाल मट्टू, तसेच फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी मोहम्मद रफी यांनी लाहोर येथे एका संस्थेमध्ये गायन केले होते.
भारतीय आॅल इंडिया रेडीओ स्टेशन लाहोरने त्यांना गायनासाठी आमंत्रित केले होते. १९४५ साली चित्रपट गाव की गोरी मधून त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नोशाद यांच्यासोबत हिंदुस्तान के हम हैं मधील काम फारच कौतुकास्पद असे ठरले. त्यानंतर चित्रपट लैला-मजनू मधील तेरा जलवा जिसने देखामध्ये त्यांनी प्रथम कामही केले.
१९४९पासून त्यांच्या चित्रपटसृष्टीचा प्रवास खºया अर्थाने सुरू झाला. चांदनी रात, दिल्लगी, दुलारी चित्रपटांमध्ये गीत गायले. संगीतकार नौशाद शामसुंदर, हुस्नलाल, जी. एम. दुर्वांनी यांच्यासाठी त्यांनी गायन केले. १९४८मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे सुनो सुनो दुनिया वालो, बाबूजी की अमर कहानी हे गीत श्रोत्यांनी फार पसंत केले. पंडित नेहरूंनी त्यांना आपल्या घरी बोलवून हे गीत ऐकले होते.
१९४८ रोजी प्रथम स्वतंत्रता दिवसानिमित्त त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून एक मेडल मिळाले होते. मोहम्मद रफी यांनी दोन विवाह केले. त्यांचा पहिला विवाह बेगम बशीरसोबत झाला होता. भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या पत्नीने भारतात राहण्यास नकार दिला, परंतु ते भारतात राहिले. त्यांना या पत्नीपासून एक मुलगा सईद होता. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांची एकूण चार मुले व तीन मुली आहेत. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ३१ जुलै, १९८० रोजी रात्री १०:२५ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी त्यांचे शेवटचे गाणे फिल्म आसपाससाठी गायले होते. ज्याचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. मोहम्मद रफी यांचा अंतिम संस्कार जुहू मुस्लीम कब्रस्तानमध्ये केला गेला होता. त्यावेळी तेथे १० हजार लोक उपस्थित होते. पाऊस असतानाही लोकांनी तेथे हजेरी लावली होती. त्यांना सन्मान देण्यासाठी भारत सरकारने दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता.
२०१०मध्ये रफी यांच्या मकबºयाजवळ सिनेसृष्टीतील महानायिका मधुबाला यांचा मकबरा बांधला गेला. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिवस साजरा करण्यासाठी त्यांचे असंख्य चाहते तेथे दरवर्षी जमा होतात. त्यांच्या मकबºयाजवळ एक नारळाचे झाड लावण्यात आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात गाण्यांना फार महत्त्व होते. या काळात रफीच्या आवाजाने अनेक नायकांना नायक म्हणून ओळखले गेले. रफीच्या गाण्यांसाठी त्यांचे चित्रपट गाजले, लोकप्रिय ठरले. यामध्ये प्रदीप कुमार, भारत भूषण अशा अभिनेत्यांचा उल्लेख करावा लागेल. पण दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, देवानंद यांचाही आवाज होऊन रफीची एक ओळख तयार झाली होती. दोस्तीसारख्या चित्रपटातून तरुण वयातील मुलांना दिलेला आवाज, तर अफलातून आहे. आपल्याकडे साधारणपणे लहान मुलांना आवाज देताना तो आजपर्यंत गायिकांचा दिला जायचा; पण दोस्तीतील सुशील कुमार, सुधीर कुमार हे थोडे मोठे होते. त्यांना शोभेल असा आवाज देण्याचे काम रफीने केले आणि त्यातील सगळी गाणी अजरामर झाली. चाहुंगा मैं तुझे सांज सबेरे, आवाज मैं ना दुंगा, तेरी दोस्ती हैं मेरा प्यार या गाण्यांची जादू आजही तितकीच कायम आहे. त्यानंतरच्या पिढीतील सर्व कलाकारांना रफीच्या आवाजाने ओळखले गेले होते. विशेषत: अलीकडच्या काळात ऋषी कपूरसाठी रफीचा आवाज खूपच सूट होत होता. लैला-मजनू, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही आणि कर्जमधील गाणी ऐकल्यावर ऋषी कपूरच डोळ्यांसमोर यायचा, ही रफीच्या गाण्याची खासीयत होती.
रफीने सर्वच संगीतकारांबरोबर काम केले; पण ओपी नय्यर आणि रफी, आशा हे त्रिकुट सुवर्ण काळात फारच गाजले. रफी आणि त्यांचे प्रत्येक गीत यावर एक स्वतंत्र लेख होईल; पण आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने इतकेच की, स्वर गात गेलेला हा खरा कलाकार.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा