बुधवार, १४ जुलै, २०२१

स्वबळ

 


केंद्रातून, राज्यातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून भाजपला हद्दपार करण्याचा विडा विरोधी पक्षांनी उचलला आहे. कोरोना, बेरोजगारी, लॉकडाऊन, महागाई हे विषय घेऊन भाजपला जेरीस आणायचे आणि भाजपविरोधात जनमत तयार करायचे म्हणून विरोधक चांगलेच कामाला लागले आहेत. अर्थात भाजप विरोधात जाण्यासाठी सर्व पक्षांनी आघाडी करायचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर तो प्रयोग सगळीकडे करण्याची कल्पना विरोधकांमध्ये रूजली; पण तरीही प्रत्येक पक्षाला आघाडीपेक्षा आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची काळजी आहे. कार्यकर्ता बांधून ठेवण्याचे वेध आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून सातत्याने स्वबळाची भाषा होत आहे. आता तर पाठीत आमच्या आघाडीतून कोणीतरी खंजीर खुपसत असल्याची भाषा काँग्रेसकडून होताना दिसते आहे. त्यातच सोमवारपासून शिवमोहिम सुरू करून शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे आवाहन शिवसेना नेतृत्वाने केलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वबळाचीच भाषा महत्त्वाची वाटत आहे, परंतु आघाडीत असलेल्या पक्षांना स्वबळाची भाषा परवडेल का किंवा ती किती सोपी आहे याकडे लक्ष दिलेच पाहिजे. स्वबळ दाखवण्याच्या नादात शनिवारी काँग्रेसने आपला गाडा हाकायला काढला आणि महागाई विरोधात लढताना ते बळ इतकं वाढलं की, गाडाच मोडून पडला आणि कार्यकर्ते व त्यांचे नेते खाली कोसळले. असं कुठं तोंडावर पडायला लावणारं स्वबळ नाही ना याचा विचार केला पाहिजे.


त्यामुळेच भाजपविरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचा अनेक पक्षांचा सध्या प्रयत्न दिसत असला, तरी या एकत्रित येण्यामध्ये आपली ताकद किती मोठी होईल हाच प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होतोय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांना सत्तेची गरज असल्याने ते काही झाले, तरी सरकार पडू देणार नाहीत. एकत्र सरकारमध्ये असूनही परस्परांवर टीका करण्याचे अधिकार प्रत्येकाने शाबूत ठेवलेले आहेत. अर्थात हा फॉर्म्युला युतीच्या काळात शिवसेनेने रूजला आहे. सरकारमध्ये असूनही शिवसेनेने २०१४ ते २०१९मध्ये भाजपवर टीका करण्याचे सोडले नव्हते. आमचे मंत्री खिशात राजीनामे ठेवून आहेत, असे सांगून अखेरपर्यंत एकत्रित राहिले. २०१७च्या महापालिका निवडणुका परस्पर विरोधात लढले, तरी राज्य सरकारमध्ये भाजप-शिवसेना एकत्रच होते. सरकारमधून शिवसेना बाहेर पडली नव्हती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सेना आणि काँग्रेस परस्पर विरोधात लढले, तरी त्याचा परिणाम राज्यातील आघाडी सरकारवर होणार नाही हे नक्की.

युती आणि आघाड्यांचे राजकारण सध्या देशभरात सुरू असले, तरी प्रत्येक राजकीय पक्षाला आपापली स्वबळाची सत्ता हवी असते. गेल्या काही वर्षांत कोणा एका पक्षाला राज्याची वा देशाची सत्ता मिळवणे कठीण झाले होते; मात्र भाजपने गेल्या लोकसभेत आणि तृणमूल काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून पुन्हा एकदा स्वबळाची ताकद दाखवून दिली आहे.


त्यानंतर अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वांनी आता आपण भाजपचा सामना करू शकतो, ही किमान भावना स्वपक्षात बोलून दाखवली आणि तशी तयारी करण्याची रणनीती कार्यकर्त्यांसमोर ठेवली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपने त्यांच्या अनेक जुन्या मित्रांना दुखावले आहे. शिवसेना, अकाली दल असे काही पक्ष दुरावल्याने भविष्यात काही राजकीय समीकरणे साधायची असल्यास आपल्यासोबत काही मित्रपक्ष असणे गरजेचे वाटू लागले आहे. राजकारणात कोणीही कधीही एकाधिकारशाही गाजवू शकत नाही, याची जाणीव भाजपतील एका गटाला नक्कीच आहे. त्यामुळे भाषा स्वबळाची असली, तरी एकमेकांना धरून राजकारण करायचे. सत्तेचा हात सोडायचा नाही; पण परस्पर विरोधात लढायचं आणि सोयीने एकत्र यायचे ही रणनीती आजकाल यशस्वी होताना दिसते आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद ही फुगवलेली किंवा सूज आलेली आहे. नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक हे मूळचे राष्ट्रवादीचे; पण त्यांचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये गेल्यामुळे ते भाजपचे झाले. ही ताकद भाजप विचारांची नाही, तर ती गणेश नाईक यांची आहे. असाच प्रकार बहुतेक महापालिकांमध्ये आहे. त्यामुळे भाजपला रोखणे तसे फार अवघड आहे, असे नाही. तरीही स्वबळाची भाषा केल्याने भाजपचा मार्ग सोपा होत जाणार आहे हे नक्की. मुंबई, ठाणे इथे भाजप हा शिवसेनेपुढे आव्हान निर्माण करेल हे नक्की. मागच्या पाच वर्षांत ज्या प्रकारे पिंपरी-चिंचवड, पुणे या महापालिका भाजपने हस्तगत केल्या ते पाहता मुंबईवर ते ताकद लावणार हे नक्की. अशा परिस्थितीत स्वबळाची भाषा करणाºया पक्षांना त्यांना रोखणे अवघड जाईल हे तितकेच सत्य आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा देत आघाडीला आव्हान देण्याची भाषा केली. त्यावरून आघाडी बिघडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेल्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा अधिकच तीव्र केला होता; मात्र त्यांना दिल्ली दरबारी बोलवून त्यांना पक्षश्रेष्ठींकडून तूर्तास स्वबळाची ठिणगी नको, असा सल्ला देण्यात आला. असे असले, तरी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यात एकत्र असलेले तिन्ही पक्ष स्वबळाची जोरदार तयारी करत आहेत. गेली पावणे दोन वर्षे आपला देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. याही स्थितीत पक्षांचे राजकारण होऊ नये असे सांगितले जात असले, तरी एकमेकांवरील कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. त्यात सध्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक वारंवार पुढे ढकलणे आणि वनमंत्रीपदाच्या मोबदल्यात त्याचा सौदा करण्याची होत असलेली भाषा ही आघाडीत ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. स्वबळावर लढण्यासाठी कोणते, तरी निमित्त शोधावे लागते ते निमित्त सध्या शोधण्याचे या पक्षांकडून प्रयत्न होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: