मंगळवार, २० जुलै, २०२१

काटकसर


‘काय ही उधळपट्टी? आम्ही अगदी काटकसरीनं संसार केला हो, पण आजकालची पिढी नुसती पैशांची उधळपट्टी करत आहे.’ वत्सलाबाई शेजारणीशी बोलत होत्या. अर्थात आजची पिढी म्हणजे सून आणि मुलाच्या या कागाळ्या होत्या. शेजारीण सुशिलाबाईही या आतल्या अंतर्गत धुसफुशीची माहिती मिळाल्याने मनातल्या मनात सुखावल्या होत्या. आता पुढचा आठवडा वत्सला काकूंचे त्यांच्या सुनेशी कसे पटत नाही हे सगळीकडे सांगायला त्यांना आयताच विषय मिळाला होता. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती काढण्यासाठी सुशिलाबार्इंनी विचारलं, ‘तुमच्या सुनबार्इंची काय परिस्थिती आहे?’

‘झालं... सगळं रामायण सांगितलं अन् पुन्हा विचारताय रामाची सीता कोण म्हणून? अहो सुशिलाबाई, माझ्या सुनेच्या उधळपट्टीचेच मी सांगते. अहो जीव तुटतो हो माझा अगदी. मुलगा दिवसभर काम करतो. ही बया नुसती उधळपट्टी करते. आज काय बर्गर मागव, उद्या काय पिझ्झा मागव... ते झोमेटो अन् टोमॅटोवाले वेळीअवेळी कधीही पार्सल घेऊन येतात. पाचपाचशे रुपये एकावेळी? त्या पाचशे रुपयात मी चार दिवसांचा स्वयंपाक केला असता, पण हिला काही करायला नको.’ वत्सलाबाई भडाभडा बोलल्या.


‘पण तुमची सून नोकरी करते ना? मुलापेक्षा जास्तच कमावते असं ऐकलंय. मग तिनं खर्च केला म्हणून कुठं बिघडलं?’

सुशिलाबाईनं वत्सलाबार्इंच्या जखमेवरच मीठ चोळलं. तशा उसळून वस्तलाबाई म्हणाल्या, ‘अहो, पण आजकाल घरीच असते. ते याक वर्क फ्रॉम होम की काय ते... मग घरातला स्वैपाकपाणी करायला काय हरकत आहे? साºया बारा तास त्या लॅपटॉपपुढे बसून असते. भूक लागली की मागवायचं पार्सल. आम्ही नाही हो कधी असली थेरं केली. नाश्ता, जेवण घरातच बनवायचो आम्ही. कधी बाहेरचं म्हणून खाल्ले नाही. हॉटेल लांबच राहिलं. रांधा वाढा आणि उष्टी काढा यातच आम्ही चेपून गेलो होतो अगदी.’


या सगळ्या चर्चा वत्सलाबार्इंची सून आतून ऐकत होती. तिला त्याचा बिल्कूल राग आला नव्हता. ती कौतुकानं हसून आपल्या सासूचे पराक्रम पाहत होती. हा दोन पिढ्यांमधल्या अंतराचा, विचारांचा फरक होता. अशा सासवांशी भांडून उपयोग नसतो, तर त्यांना प्रेमानं समजवायचं असतं यावर तिचा विश्वास होता. कोरोनामुळं वर्क फ्रॉम होम करत आहोत आपण. याचा अर्थ आपण घरात रिकामे बसलो आहोत असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे घरची सगळी कामं करावीत अशी त्यांची अपेक्षा आहे, पण त्यांना समजावण्याची गरज आहे. गेल्या दोन महिन्यांत असे प्रसंग सातत्याने होत होते. वत्सलाबाई रोज कुणाला ना कुणाला या तक्रारी करत सुनेच्या चहाड्या सांगत होत्या. अगदी दुधवाल्यापासून ते कामवालीबाईपर्यंत सगळ्यांशी हे बोलून झालं. त्यामुळं सुनेला हे आता असह्य झालं. तिनं एकदिवशी आपल्या नवºयाला हे सांगितलं. ‘राज, मी आईच्या चहाड्या किंवा तक्रार करते आहे असे नाही, पण गेले दोन महिने हे असं त्या सातत्याने वागत आहेत. त्यांना कसं समजावू मी? मला फोन कॉल्स असतात, व्हिडीओ मीटिंग असतात, आॅनलाईन वर्क असते, कंपनी यूएसची असल्याने तिथल्या वेळेप्रमाणे मला मीटिंग अ‍ॅटेंड कराव्या लागतात. यात मला स्वयंपाक आणि घरातल्या कामाला वेळ नाही मिळत. त्यामुळे बाहेरून मागवण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी मी काय करायला पाहिजे? घरकामाला, वरकामाला बाई ठेवली आहे आपण. आर्इंनाही त्रास नको म्हणून मी स्वयंपाकात लक्ष घालू देत नाही. नाहीतर त्यांना वाटायचं मला स्वैपाकीण म्हणून कामाला जुंपलं जातंय. आता हा खर्च अटळ आहे. त्याला त्या उधळपट्टी म्हणतात, पण मी कामच करतेय ना?’

राजनं सगळं ऐकून घेतलं. शांतपणे म्हणाला, ‘कविता, आमच्या आईबाबांचं आयुष्य पायजम्याचा अळू करून खाण्यात गेलं. कधी पैसा पहायला मिळत नव्हता. त्यामुळे हा होत असलेला खर्च तिच्या डोळ्यावर येतो, पण आपण काहीतरी उपाय करून तिची समजूत काढूया.’


‘पायजम्याचं अळू? हा काय प्रकार आहे?’ कविता जोरजोरात हसायला लागली. तसा राज म्हणाला, ‘अगं आमचे बाबा एक पायजमा शिवायचे. दोन वर्ष तो पायजमा वापरायचे. मग दोन वर्षांनी त्या पायजम्याला गुडघ्यापर्यंत कापून त्याच्या अंडरपँट केल्या जायच्या. खालच्या भागाच्या पिशव्या शिवायच्या. हे कपडेही जीर्ण झाले की त्याची चिंधी करून रोज एक चिंधी बंब पेटवायला वापरायची. त्या बंबातून आलेल्या राखेने भांडी घासायची. भांडी घासलेलं खरकटं पाणी परसातल्या अळवाच्या खड्ड्यात जायचं. त्यावर वाढलेल्या अळवाची भाजी सगळेजण मिटक्या मारून खायचे. त्याला आम्ही पायजम्याचं अळू म्हणतो.’

कविताला आपण उगाचच हसलो असं वाटलं. पूर्वीच्या माणसांसारखी आपण काटकसर करूच शकत नाही, पण आपण उधळपट्टीही करत नाही. याचा सुवर्णमध्य कसा काढायचा? यावर आपण राजला मध्ये नको घ्यायला. नाहीतर माझ्यापासून मुलगा तोडला असा समज त्या करून घेतील. मागच्या पिढीतील लोक गैरसमज पटकन करून घेतात. त्यामुळे यावर आपणच उपाय योजायचा असं ठरवून ती राजला म्हणाली, ‘राज, मी तुला तक्रार सांगितली नाही, घटना सांगितली आहे, पण तू यावर काहीही रिअ‍ॅक्ट होऊ नकोस किंवा आईना काही बोलू नकोस.’


सकाळी उठल्यावर ती थेट स्वयंपाकघरात गेली. चहा केला आणि चहाचा कप घेऊन वत्सलाबार्इंकडे गेली. ‘आई सांगा कसा झालाय चहा... तुमच्या इतका चांगला नाही जमणार, पण मनापासून केलाय.’ आयता चहा मिळाल्यानं वत्सलाबाई खूश झाल्या. चहा पिता पिता त्या म्हणाल्या, ‘अगं तुला आज काम नाही का?’

‘नाही आई... मी नोकरी सोडली आहे. राजीनामा पाठवला आहे. मला या नोकरीमुळं घरातलं काही काम करता येत नाही. तुमच्याकडं ना यांच्याकडं लक्ष देता येत. त्यामुळे मीच ठरवलंय की आता घराकडं लक्ष द्यायचं. हां... यामुळं घराचा सगळा भार यांच्यावर पडेल. एक माणसाच्या पगारावर सगळा खर्चाचा बोजा येईल, पण आपण काटकसर करून संसार करू. आपले चोचले कमी करू, पण घरातील सगळी आनंदी असतील तर ठिक. म्हणून मी हा निर्णय घेतलाय. माझ्या हातानं तुम्हाला स्वयंपाक करून खायला घालायची माझी इच्छा आहे. पोळीवाली, स्वयंपाकाच्या बाईच्या हातचं खायचाही कंटाळा आला आता.’


वत्सलाबाई एकदम चपापल्या. त्या म्हणाल्या, ‘अगं असा घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. मेलं आमचं आयुष्य काटकसरीत गेलं. कसली हौस नाही केली की मौज केली नाही, पण तुम्ही नका हो आपला जीव मारून जगू. तू तुझी नोकरी चालूच ठेव. बाईच्या हातात पैसा असेल तरच तिला किंमत आहे. नवºयाच्या हातून पैसे येतील आणि मी भागवीन या परस्वाधीन जगण्यात अडकू नकोस. उलट तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग, मी माझ्या हातानं करून तुला खायला घालीन, पण नोकरी सोडू नकोस. मला तरी काय काम आहे दुसरे? फुकट कुटाळक्या करण्यापेक्षा तुम्हाला काय पायजे ते सांगा. मी करून खायला घालीन, पण या काटकसरीच्या संसारात गुरफटू नका.’

कविताची मात्रा लागू पडली होती. वत्सलाबार्इंना कविताची किंमत समजली होती. त्यामुळे त्यांनी नंतर कधीही काटकसर आणि उधळपट्टीचा विषय कोणाशी काढला नाही. न भांडता हा काटकसरीचा संसार सावरला होता.


प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा

9152448055 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: