मंगळवार, २० जुलै, २०२१

मोदी-पवार भेटीचे चर्चा चर्वीचरण


अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि सुमारे तासभर चर्चा केली. या भेटीमुळे सगळ्यांच्या विशेषत: माध्यमांच्या भुवया इतक्या उंचावल्या की, ही भेट म्हणजे जणू काही फार मोठी आपत्ती आहे, आश्चर्य आहे, खूप मोठी घडामोड आहे, असा आव आणून दिवसभर त्यावर मंथन केले गेले. लगेच त्याचा संबंध महाराष्ट्रात काही राजकीय उलथा पालथ होणार का, इथपासून ते फडणवीस भेटले, राजनाथ सिंह भेटले आता काहीतरी नक्कीच गडबड होणार, असं वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. हे किती पोरकट आणि आचरपटणाचे होते. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून का बघितले जाते?


शरद पवार हे खासदार आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना भेटून आपली मते मांडणे, काही कामे करून घेणे हा कामाचा एक भाग आहे. त्याची एवढी चर्चा आणि बातमी कशासाठी करायची? नुसते भेटले भेटले भेटले; पण ते कशासाठी भेटले यावर काही भाष्य नाही. शेवटी शरद पवारांना ट्विट करून सहकार कायद्यासंबंधी आपण पत्र देण्यासाठी भेटलो, असे जाहीर करावे लागले. सरकार आणि विरोधी नेत्यांनी परस्परांना भेटणे पाप आहे का? ते काही शत्रू नाहीत, परस्परांचे हे कधी समजणार आहे या माध्यमांना? प्रत्येक गोष्टीची बातमी कशासाठी केली जाते? पवार घरातून बाहेर पडले. ठाकरे घराच्या बाहेरच पडले नाहीत. राऊत पवारांना भेटले. अजित पवार मुंबईला आलेच नाहीत. राणे दिल्लीला गेले. फडणवीस नागपूरला गेले. या काय बातम्या आहेत? ते कशासाठी गेले, त्यांनी काय केले हे सांगा; पण इकडे गेले, तिकडे गेले, वाटेत कुठे उतरले. विमानतळावर कोण भेटले. कुणाच्या घरी गेले. कुणाच्या घरी गेलेच नाहीत. या चर्चांना काहीही अर्थ नाही. हा पोरकटपणा वाहिन्यांनी थांबवला पाहिजे.

या वाहिन्यांमुळे शरद पवारांचे दिल्लीतील घर एकाएकी राजकीय पॉवर हाऊस बनले. राजकीय विश्लेषकांची पतंगबाजी सुरू होऊन पवारांच्या राजकीय भूतकाळाची उजळणी केली जाऊ लागली. एकूण काय तर नियमित होणारी बैठक, भेट फक्त जागा बदलून मोदींच्या निवासस्थानी झाली आणि तिने माध्यमांमध्ये मोठी जागा व्यापली. हे सगळं अनाठायी आहे. सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनात कशावर बोलायचे, काय मुद्दे असतील यावर चर्चा होणे अपेक्षित असते. त्यासाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटले, तर त्याचा केवढा कालवा केला गेला. जणू काही आभाळ कोसळलं, फार मोठं पाप घडलं असाच आव या वाहिन्यांनी आणला. म्हणजे वसंत कानेटकरांनी आपल्या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडी टाकलेल्या संवादाप्रमाणे, ‘मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना?’ असे विचारावेसे वाटते. विरोधकांनी, सरकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांना भेटूच नये काय?, असा आभास हे निर्माण करतात. नेमकी बातमी, अचूक बातमी, ठाम मत, उघडा डोळे असे दावे करायचे आणि अचुकपणे चुकीचे काहीतरी दाखवायचे हे तंत्र निर्माण करून चव्हाटा किंवा गावातली चावडी जमवल्यासारख्या चर्चा करत राहायचे.


मोदी-पवार भेटले की, लगेच त्या अंजली दमानिया बार्इंच्या पोटात गोळा उभा राहिला. अगोबाई भेटले का? मग महाराष्ट्राचे वाटोळे झालेच आता, अशी टिप्पणी करून त्या मोकळ्या झाल्या. कशासाठी अशा टिप्पण्या केल्या जातात? या नेत्यांना आपण कामासाठी निवडून देत असतो. त्यांनी काही जनतेच्या कामासाठी, काही नियोजनासाठी भेटीगाठी घेणे हे क्रमप्राप्त असते. त्याचा एवढा गजहब कशासाठी केला जातो? पवार-मोदी भेटले, पवार-ठाकरे भेटले, नाना दिल्लीला गेले, याशिवाय बातम्या दिसत नाहीत का यांना? कोरोनाच्या निर्बंधांमुळे लोकांचा रोजगार गेला, उपासमार होते आहे, लोकल बंद, बससेवा नसल्यामुळे श्रमिकांचे होणारे हाल, शैक्षणिक नुकसान, वैद्यकीय भ्रष्टाचार, लोकांची होणारी लूट, परप्रांतियांकडून होणारी मराठी माणसाची लूट हे काहीच दिसत नाही का? जनहिताचे प्रश्न सोडून साप साप म्हणून दोरी धोपटत बसण्याचे प्रकार या वाहिन्यांनी सुरू ठेवले, तर त्याला काय अर्थ आहे? हे प्रकार थांबले पाहिजेत.

लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चर्चा, भेटीगाठी होणे आवश्यक असते. प्रत्येकवेळी सगळ्या चर्चा सभागृहातच होतात असे नाही. सभागृहाबाहेरही काही चर्चा होत असतात. त्या चर्चांना साधक बाधक असे समजून त्यातून काही काम उभे राहणार असेल, तर अगोदरच त्याची चर्चा कशासाठी बाहेर फोडली जाते? अनावश्यक दांडोरा पिटून दिवसाच्या दिवस भेटले भेटले, म्हणून जणू काही पेटले पेटले, असा आव आणायचा. अशा बातम्यांना काहीही अर्थ नसतो. म्हणजे पवार-मोदी भेटले याचा अर्थ काही राजकीय उलथा पालथच झाली पाहिजे, अशी अपेक्षा निर्माण करून बातमी दाखवयाची. आता हे दोघे एक होणार आणि जणू काही महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार. मग त्यावर शिवसेनेला काय वाटते, काँग्रेसला काय वाटते याचा अंदाज घेत बसायचा. यातून काही साध्य होत नसते; पण सशाच्या पाठीवर झाडाचे पान पडते आणि तो आभाळ कोसळले पळा पळा म्हणत धावू लागतो. ससा घाबरून पळतोय म्हणून लांडगा, कोल्हा, हरिण हे सगळे प्राणी पळा पळा... आभाळ कोसळलंय पळा पळा म्हणून आसºयाला गुहेत जातात आणि वाघाच्या तोंडची शिकार होतात. तसला काहीतरी प्रकार यातून घडतो. हे प्रकार थांबले पाहिजेत.


- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

91524498055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: