महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतीशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.
व्यासांचे कौरव-पांडव या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये, म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उध्वस्त झाली असेल, त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले, तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते.
गीतेच्या प्रारंभी जी अर्जुन-विषादाची वेदना प्रगटते, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेला उपदेश आहे. व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांना आपली धर्मिक आणि सांस्कृतिक परंपरा त्यामुळेच अतिउच्च स्थानी सन्मानाने बसविते.
म्हणौनि भारतीं नाहीें तें न्हवे चि लोकीं तिहीें एणें कारणें म्हणिपे पाहीें व्यासोच्छिष्ट जगत्रय॥ असे ज्ञानोबा म्हणतात. व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. सर्व ज्ञानांचे मूळ असल्यामुळेच त्यांना गुरू म्हटले जाते. त्यांच्या स्मरणातून आपल्या सद्गुरूची पूजा केली जाते. आपली गुरू परंपरा फार मोठी आहे. भगवान शंकर त्यांचे शिष्य विष्णू त्यांचे शिष्य ब्रह्मा अशी ती सुरू होते.
त्यानंतर भगवान श्री राम, भगवान श्रीकृष्ण हे देवावतार असूनसुद्धा गुरूअंकित आहेत. जो सकल जिवास चांगले शिकवितो. सुसंस्कार देतो तो गुरू. सत् म्हणजे सत्य परमात्म्याची भेट घालून देणारा, त्याला सद्गुरू म्हणावे. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू भेटतील; पण आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो. सद्गुरूपेक्षाही मोठा श्रीगुरू असतो. ज्ञानोबा माऊलींना एकनाथ महाराज श्रीगुरू म्हणूनच संबोधतात. एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वेर््े
याही पुढे गुरूची एक पायरी असते. ती म्हणजे जगद्गुरू. आद्य शंकराचार्य, तुकोबाराय आणि श्रीकृष्ण परमात्मा यांना जगद्गुरू ही उपाधी आहे, कारण ते सगळ्या जगाचे गुरू ठरलेले आहे. असा जगद्गुरू परमात्मा साक्षात भगवंत हा अर्जुनाजवळ होता आणि गंमत अशी की, अर्जुन वेड्यासारखे श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्रश्न करू लागला, कारण अर्जुनाकडे अहंकार उरला होता. उरलेला अहंकारच त्याचा मुखातून देवालाच ज्ञान शिकवू पाहात होता. वास्तविक पाहाता भगवान श्रीकृष्णाने धर्म, न्याय, नीती, नियम यांचा वस्तुपाठ अगदी लहान वयातच जगताला दाखवून दिला होता. देवकी आणि वसुदेवासाठी तो बाळकृष्ण झाला. कुमारींच्यासाठी तो गोकुळी गेला होता. लहान असतानाच पूतनेचा वध केला. गर्वाने फुगलेल्या इंद्रदेवाचा गोवर्धन उचलून अहंकार घालविला. लेकीबाळींना, मुलंमाणसांना त्रास देणारा कालिया त्याच्या डोक्यावर थयथय नाचून लहानपणीच यमसदनास पाठविला. गोकुळ नगरीवर आलेले संकट घालविण्यासाठी बारा गाव अग्नी प्राशन केला. बह्मदेवास वेड लावण्यासाठी गोमातेचं वासरू बनला. अत्यंत लहान वयातच कंस मामासारख्या अनेक राक्षसांना त्याने यमसदनास पाठविले. याच श्रीकृष्णाने गोकुळ नगरीत समाजकारण केले. मथुरेला जाऊन पक्के राजकारण केले, तेही समाजहितासाठी आणि द्वारकेत मात्र पूर्णपणे धर्मकारणच केले, कारण तिथे तो धर्माचा राजा होता व राजाचा धर्म पाळणारा म्हणूनच तो द्वारकाधीश झाला. हे सगळं अर्जुनाला माहीत होतं. तो बालपणापासूनच अर्जुनाचा जिवलग होता. युक्तीच्या सगळ्या गोष्टी देवाला माहिती होत्या. त्याने महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले, कारण युद्धामुळे होणारा संहार त्याला माहीत होता. तो टाळावा यासाठी तो प्रयत्नशील होता. हे युद्ध आप्तइष्टातच होऊन दोन्हीही बाजूंचे नुकसान होणार होते. या सर्व गोष्टींचा अनुभव श्रीकृष्णाला होता; पण तरीदेखील देवाला काहीच कसे कळत नाही. तो मला माझ्याच गुरूंच्या विरुद्ध लढायला भाग पाडतो. वरील सद्गुरू, गुरू, श्रीगुरू, जगद्गुरू या संज्ञेमध्ये गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे कुठेच बसत नाहीत. केवळ एक क्रूर, अनीतीची पाठराखण नाइलाजास्तव का होईना करावी लागते म्हणून ते अर्जुनासारखा उत्तम शिष्य असूनही त्याला मरण्यासाठी शत्रूच्या पक्षात उभे राहतात. ही धर्मनीती नाही; पण जे आपले गुरू आहेत, ज्यांच्याकडून मी विद्या घेतली, त्यांच्या वधास कारणीभूत होणे हे योग्य नाही. त्यांना मारून राज्य मिळविणे योग्य नाही त्यापेक्षा दयेचीच भिक्षा मागणे योग्य होईल. ते माझ्या नशिबाचे, रक्ताचे भोग समजून तसे करणे योग्य होईल; पण गुरू वधाच्या पापात पडणे योग्य होणार नाही अशी धारणा अर्जुनाची आहे. तसं पाहिलं, तर गुरूंचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरू हा संतकुळीचा राजा आहे. तो माय, बाप, बंधू, भगिनी, मित्र, सगा, सोरा अशा सगळ्या नात्यांचा सूत्रधार आहे. तो ब्रह्मनंद देणारा आहे. परमसुखद आहे. फक्त ज्ञानपूर्ती आहे. द्वंद्व असण्याचं काहीच कारण नाही, कारण गुरू हा त्याच्याही पुढे आहे. ज्ञानमूर्ती असल्याने त्याचे ज्ञान गगनासारखे विस्तीर्ण आहे. भावाच्या पलीकडे तो पोहोचलेला असल्यामुळे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. सच्चिदानंद असल्याने तोच सद्गुरू आहे. त्याला नमस्कार करून त्यांनाच आशीर्वाद संपादन करणे हे सर्वोत्तम आहे. हे जे सर्व अनुभवाचे ज्ञानभांडार व्यासांनी निर्माण केले त्यामुळे ते सदैव वंद्य झाले, म्हणून त्यांच्या नावाने गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा