रविवारचा दिवस सर्व मराठी वाहिन्यांनी शिवसेना आणि राणे या विषयावर केंद्रित केला होता. नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपद मिळताच शिवसेनेविरोधातील तलवार म्यान केली अशी टिप्पणी सुरू केली. ज्या वाहिन्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले अशी हवा विनाकारण तयार करत होत्या त्या एकदम फिरल्या, त्यामुळे रविवारचे मनोरंजन झाले. अर्थात खरोखरच राणेंनी तलवार म्यान केली असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे, कारण शिवसेनेला टार्गेट करणे या उद्देशाने केलेली मंत्रिपदाची कामगिरी चांगली होणार नाही. हेतू स्वच्छ आणि शुद्ध असेल, तर विकासासाठी हे मंत्रिपद आहे हे लक्षात घेऊन काम केले, तर त्याचा फायदा होईल. अर्थात नारायण राणे तेच करतील यात शंकाच नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी खरं तर वेगळी भूमिका घेतली पाहिजे आता. शरद पवारांनी मला अभिनंदनाचा फोन केला; पण उद्धव ठाकरेंनी नाही केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती; पण अशी आढी ठेवण्यापेक्षा त्यांनी सरळ प्रथम मुंबईत आल्यावर शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत. आज नारायण राणे इथपर्यंत पोहोचले आहेत, ते शिवसेनाप्रमुखांमुळे. त्यामुळे शुभेच्छांचा फोन येण्याची वाट पाहण्यापेक्षा शिवसेनाप्रमुखांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर तमाम शिवसैनिकच नाही, तर मराठी माणूस सुखावेल. कारण सामान्य माणसांना हे आरोप-प्रत्यारोप, टीका याची काही पडलेली नाही. त्यांना विकास हवा आहे. त्यामुळेच तलवार म्यान केली असेल, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बाब आहे.
अर्थात या चर्चा वाहिन्यांवर होण्याचे कारण होते सिंधुदुर्गातील एक कार्यक्रम. म्हणजे एरवी एकमेकांना टोमणे मारणारे भाजपाचे आमदार नीतेश राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले येथील एका कार्यक्रमात कोकणच्या विकासासाठी आम्ही सर्व जण एकत्र येऊन काम करण्याची ग्वाही दिल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली आहे.
वेंगुर्ले नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी आॅनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते उपस्थित होते. या उपस्थितीचा संदर्भ देऊन बोलताना राणे यांनी, या कार्यक्रमात सर्वपक्षीय एकत्र आले तसेच कोकणच्या विकासासाठी सर्व जण एकत्र येऊन काम करू, असे आवाहन केले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनीही प्रास्ताविकात या सुसज्ज मच्छी मार्केटसाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन एकत्र येऊन काम केल्याने मार्केट उभे राहिले, असे नमूद केले. हाच धागा पकडून आमदार नीतेश राणे यांनी कोकणच्या विकासासाठी वेळ पडल्यास आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करू, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर आजचे हे व्यासपीठ पाहिल्यावर युतीचे स्वप्न पाहणाºया कार्यकर्त्यांना सुखाची झोप लागेल, अशीही टिप्पणी केली. खरं तर मंचावर आल्यावर असेच बोलायचे असते. ते किती गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. युती करायची की, मोडायची याचा निर्णय वरच्या पातळीवर होत असतो. अशा व्यासपीठावरून होत नसतो; पण तरीही वाहिन्यांना कुठेतरी वाळवंटात ओअॅसिस दिसले म्हणे आणि त्यांनी दिवसभर हे गुºहाळ लावले. अर्थात हे झाले, तर चांगले असेल.
आमदार नितेश राणे यांच्यानंतर बोलताना खासदार राऊत यांनी, ‘कणकवलीचे लोकप्रिय आमदार आणि आमचे मित्र.’ असा नीतेश यांचा उल्लेख केला. त्यावर श्रोत्यांमध्ये हास्याची लकेर उमटल्याचे पाहून, ‘आम्ही खरंच मित्र आहोत’, असे सांगत ‘माणूस विचारांनी श्रीमंत असला पाहिजे’, अशी पुस्तीही राऊत यांनी जोडली. त्यामुळे खालच्या पातळीवर, स्थानिक पातळीवर जर अशा टाळ्या देणे सुरू झाले, तर वरीष्ठ पातळीवरही त्याचा विचार होईल कदाचित; पण परस्पर विरोधी पक्षांमधली मैत्री हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. त्यामुळे ते लोक कधी एकत्र येतातच असे नाही.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची मैत्री गाढ होती. दोघे अनेकवेळा एका व्यासपीठावर आले होते आणि त्यांनी व्यासपीठे गाजवली होती. यावरूनही मुंडे काँग्रेसमध्ये जाणार का अशा चर्चा झाल्या होत्या; पण राजकारणात दोघे कायम विरोधकच राहिले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील मैत्रीही सर्वश्रृत आहे; पण शिवसेना आणि शरद पवार बाळासाहेबांच्या हयातीत कधीच एकत्र आले नव्हते. किंबहुना त्यांनी तसा विचारही कधी केला नाही. शरद पवारांचा उल्लेख शिवसेनाप्रमुख नेहमी मैद्याचं पोतं असाच करायचे. त्यामुळे एखाद्या सभेत समारंभात एकमेकांची स्तुती केल्याने लगेच युती झाले अशी हवा निर्माण करण्याचे वाहिन्यांनी टाळायला पाहिजे होते. एक औपचारीकता म्हणून त्याकडे पाहणे गरजेचे होते; पण फारच स्वप्नरंजन केल्याचे दिसून आले.
अर्थात एकमेकांचे वाभाडे काढणे, चिखलफेक करणे असल्या राजकारणाला आता थोडा विरामच मिळाला पाहिजे. या कोरोनाच्या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हितासाठी एकजुटीने काम करणे आणि आर्थिक संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे अशा तलवारी म्यानच झाल्या पाहिजेत हीच अपेक्षा आहे. युती नाही झाली, तरी चालेल पण परस्परांचा आदर करण्याची संस्कृती निर्माण केली आणि चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे धोरण आखले, तर बरेच काही साध्य होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा