शनिवार, ३१ जुलै, २०२१

सामंजस्याचे राजकारण


माणसं एकत्र येतात, हेवेदावे सोडून एक होतात, ही आपली संस्कृती आहे, पण ही संस्कृती आता राजकारणात पुन्हा एकदा रुजताना दिसते आहे हे अतिशय चांगले आहे. पुन्हा असे म्हणण्याचे कारण असे की, पूर्वी आपल्याकडे लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करण्याची, त्यांच्या विचारांचा आदर करण्याची प्रवृत्ती होती, पण गेल्या काही दिवसांपासून त्या संस्कृतीला हरताळ फासला होता. विशेषत: कायम सत्तेत राहणाºया काँग्रेसला सत्तेपासून दूर जावे लागल्यापासून ही संस्कृती लयाला गेली होती. सभागृहात चांगल्या दर्जेदार चर्चा होणे बंद झाले आणि सभागृहाबाहेर दंगे करण्याचे, माध्यमांना सामोरे जाण्याचे प्रमाण वाढले, पण हे दूषित होणारे वातावरण सध्या समंजस राजकारण्यांनी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.


महाराष्ट्रावर संकट कोसळल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आस्थेने चौकशी केली, त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन करून दिलासा दिला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रात जे सामंजस्याचे राजकारण पहायला मिळाले ते निश्चितच कौतुकास्पद असे म्हणावे लागेल. यामध्ये कोल्हापूरच्या घटनेचा उल्लेख करावा लागेल. कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी दौरा होता. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर दौºयावर आहेतच. शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना जेव्हा देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात शाहुपुरीत आहेत हे समजले तेव्हा त्यांनी आपण होऊन त्यांना फोन लावला आणि कळवले की, आपण हा पाहणी दौरा एकत्रित करू, प्रशासनावरही त्यामुळे ताण पडणार नाही आणि जनतेच्या हिताचे काम होईल. याला लगेच सकारात्मक प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पाहणी दौरा केला. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत समंजसपणाची बाब होती. परस्परांचा मान राखण्याची, आदर करण्याची आणि मतांची कदर करण्याची ही जी संस्कृती पुन्हा इथे रुजते आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बाब आहे.

सत्ताधारी आणि विरोधक हे काही परस्परांचे शत्रू नसतात. ते लोकशाहीचे पहिले दोन खांब असतात, पण गेल्या काही दिवसांत लोकशाहीच्या या तत्त्वाला काळीमा फासण्याचे काम होत होते. ते बदलून समंजस लोकशाहीचे वातावरण तयार करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे विरोधकांचा आदर करण्याची फारमोठी परंपरा आहे. पंडित नेहरूंनी अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक करणे, भारत-पाक युद्धानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा दुर्गा म्हणून गौरव करणे, आॅपरेशन ब्ल्यू स्टारनंतर भाजपकडून इंदिरा गांधींचे कौतुक करणे, राजीव गांधींनी अटलजींचा मान राखणे ही फक्त काही उदाहरणे आहेत, पण त्या परंपरेचे पालन आता पुन्हा होताना दिसत आहे हे फार महत्त्वाचे आहे. जनतेला हेच हवे आहे.


आज सामान्य माणसांना राजकारणातील चिखलफेक नको आहे. लोकशाहीचे मंदिर जे आहे त्या सभागृहात चांगल्या चर्चा, चांगली भाषणे होणे जनतेला अपेक्षित आहे. लोकशाही रुजवण्याचे काम होणे आवश्यक आहे, पण गेल्या काही वर्षांत विरोधकांनी कामकाज होऊ द्यायचे नाही, सरकारने कुठेतरी हट्टीपणा करायचा, असले प्रकार वाढीस लागले आहेत. पूर्वीच्या काळातील नेत्यांची सभागृहातील भाषणे ही सभागृहासाठी पर्वणी असायची. यशवंतराव चव्हाण, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, त्यानंतर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, नारायण राणे अशा नेत्यांनी सभागृहात दीर्घकाळ भाषणे करून वाहवा मिळवली आहे, पण आजकाल सभागृहात चर्चा न होता गोंधळ होतो. फक्त टीका, चिखलफेक होताना दिसते. यामुळे सामान्य जनता कुठेतरी दुखावताना दिसते आहे. हे सगळे प्रकार जनतेला नको आहेत. सामान्य जनतेने नेत्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात पाठवले आहे, पण तिथे होणारा गोंधळ, यातून काहीच काम होताना दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आज सकारात्मक विचारांचे नेते उद्धव ठाकरे, त्याला प्रतिसाद देणारे देवेंद्र फडणवीस अशी पिढी हे वातावरण बदलू शकेल यात शंका नाही.

जनतेच्या दृष्टीने दोघांचेही महत्त्व सारखेच आहे. त्यामुळे परस्परांचा आदर राखून केलेले सामंजस्याचे राजकारण हे जनतेला अभिप्रेत असलेले राजकारण आहे. एकूणच महाराष्ट्रातील आलेल्या संकटग्रस्त परिस्थितीने हे वातावरण बदलण्याची संधी निर्माण केली असेच म्हणावे लागेल. संकट काळात एकत्र आले त्याप्रमाणे राज्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी या दोघांनी पुन्हा एकदा सामंजस्याचे राजकारण करून एकत्र आले पाहिजे. एकत्र याचा अर्थ सरकार स्थापन करणे असे नाही, पण राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे. तसेच कोरोना लॉकडाऊनच्या काळात फार मोठा फटका सेवा क्षेत्राला बसला आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक विकासकामे रखडली आहेत. महाराष्ट्रातील चित्रपट उद्योग, कलाकार यांचे असंख्य प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी असेच एकत्र आले पाहिजे, तर खºया अर्थाने लोकशाहीची बूज राखली गेली, असे म्हणता येईल.

समस्याप्रधान नाटके


आपल्या मराठी रंगभूमीने सातत्याने समस्याप्रधान नाटके आणलेली आहेत. किंबहुना जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रभावी नव्हता तोपर्यंत मराठी नाटकांनीच सामाजिक बांधिलकी जपत अनेक समस्यांना हात घातला आहे. सामाजिक वास्तव समाजापुढे आणून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करत असताना रंजनाचा भाग कुठेही कमी पडू न देता ही कामगिरी केल्याचे दिसून येते. सामाजिक प्रश्न म्हणजे फक्त गरिबी, दारिद्र्य असेच नाही, तर समाजात राहताना कितीतरी प्रश्न असतात, जे मध्यमवर्गीयांचे असतात, पांढरपेशांचे असतात. त्यावर चर्चा होणे आवश्यक असते, असे विषय मराठी नाटकाने सातत्याने घेतल्याचे दिसते.


संगीत रंगभूमी असताना शारदा या नाटकाने बालविवाहाचा विषय हाताळला आणि त्यातून शारदा कायदा हा बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार होण्यास मदत मिळाली. एकच प्यालामधून दारूचे दुष्परिणाम दाखवले, पण गायकांनी गाण्याला महत्त्व दिल्याने हा विषय मागे पडत गेला, पण ही चूक गद्य नाटकात झाली नाही. त्यात आशय आणि विषय प्रेक्षकांमध्ये सहजपणे पोहोचला.

जयवंत दळवींची बहुतेक नाटके ही अशीच समस्याप्रधान नाटके असायची. १९७० च्या दशकात आलेल्या संध्या छाया या नाटकाने वृद्धांचे प्रश्न मांडले. मुलांना शिकवायचे आणि त्यांनी नोकरीसाठी परदेशात निघून जायचे. आयुष्याची संध्याकाळ मुलांच्या सान्निध्यात घालवायची, तर मुले लांब. अशा अवस्थेत वेडीपिसी झालेली म्हातारा-म्हातारी म्हणजे नाना-नानी हे या नाटकातून अत्यंत प्रखरपणे दाखवले आहे. या वयातील असुरक्षितता, ही भीतीदायक संध्या छाया, कातरवेळ अंगावर शहारा आणणारी होती. या नाटकात विजया मेहता आणि माधव वाटवे या दोघांनी केलेल्या अजरामर भूमिका आजही वृद्धांच्या समस्या डोळ्यासमोर आणतात.


जयवंत दळवींचे आणखी एक समस्याप्रधान नाटक म्हणजे लग्न. वयात आलेली मुलगी, तिचे वेळीच लग्न होणे न होणे यांमुळे समाजात काय समस्या निर्माण होतात, लग्नाशिवाय मुलगी घरात असणे किंवा लग्नापूर्वीच तिला दिवस जाणे हे समाजातील धक्कादायक प्रसंग असतात. अशावेळी त्या कुटुंबाने जगायचे कसे यावर प्रकाश टाकणारे हे नाटक.

जयवंत दळवींनी सगळीच नाटके बहुदा समस्याप्रधान नाटके म्हणून लिहिली. असेच एक १९८० च्या दशकात आलेले नाटक म्हणजे नातीगोती. दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे, स्वाती चिटणीस आणि मोहन जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेले प्रेक्षकांना रडवणारे हे नाटक. अनेकांना वाटते की, हे नाटक गतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे नाटक आहे, पण ते गतिमंदांच्या समस्या मांडणारे नाटक नव्हते, तर गतिमंद मूल घरात असल्यावर त्या घरातील माणसांना येणाºया समस्या दाखवणारे नाटक होते. हाच विषय घेऊन त्याअगोदर दळवींनी ऋणानुबंध नावाचे नाटक लिहिले होते. त्यावर चार वर्षांपूर्वी कच्चा लिंबू नावाचा चित्रपटही आला होता, पण असे मूल घरात जन्माला आल्यावर त्या कुटुंबाला काय तोंड द्यावे लागते यावर त्यांनी टाकलेला प्रकाश फार महत्त्वाचा आहे.


जयवंत दळवींच्याच महासागर या नाटकात सामान्य कुटुंब आणि श्रीमंत कुटुंब यातील तफावत दाखवत एक अतृप्ती दाखवली आहे. प्रत्येकाची सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत, पण त्या अपूर्णतेतही तडजोड करत आयुष्य कसे जगले जाते यावर प्रकाश टाकला आहे. माणसाचं मन म्हणजे महासागर असते. अथांग. त्याचा कधीच कुणाला थांगपत्ता लागत नाही हे दाखवणारे हे नाटक.

जयवंत दळवींच्या अपूर्णांक या नाटकात तर अतृप्त राहिलेली इच्छा दाखवली आहे. म्हणजे आपण तरुण वयात, लहान वयात काही वाचतो, काही स्वप्न असतात. ती प्रत्यक्षात घडत नाहीत मग माणूस व्यवहारी अपूर्णांक राहतो. चित्रपटात आणि कादंबरीत लग्नाची पहिली रात्र म्हणजे केलेली कवी कल्पना असते. ती सगळ्यांच्याच आयुष्यात येत नाही. फुलांनी सजवलेली शेज, चहुबाजूंनी पलंगाला लावलेल्या माळा. यात पांढरे कपडे घालून बसलेला नवरदेव आणि त्याला दुधाचा ग्लास घेऊन येणारी त्याची नवी नवरी. हे रंगवलेले चित्र प्रत्यक्षात न घडलेल्या माणसाची कथा म्हणजे अपूर्णांक हे नाटक. त्यातून निर्माण झालेली अतृप्तीची समस्या यावर केलेले चिंतन. अशा कितीतरी न दिसणाºया समस्या जगात असतात. त्यावर अनेक नाटककार सातत्याने लिखाण करत असतात. करमणूक करता करता त्यावर कटाक्ष टाकतात.


आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, प्रेमानंद गज्वी या नाटककारांनीही अनेक समस्याप्रधान नाटके लिहिली आहेत. आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच नाटकाची श्रेयनामावली सुरू करतानाच सामाजिक समस्याप्रधान नाटक असाच उल्लेख असायचा. शिरवाडकरांचे महंत किंवा कानेटकरांचे बेईमान हे नाटक मालक कामगार संघर्ष या समस्येवर भाष्य करणारे नाटक होते. कालेलकरांचे अपराध मीच केला, नाते युगायुगांचे या नाटकांतूनही सामाजिक, कौटुंबिक प्रश्न मांडले होतेच. रत्नाकर मतकरींनी जोडीदार, कर्ता करवता, घर तिघांचं हवं, माझं काय चुकलं? अशा नाटकांतून समाजात घडलेल्या घटनांवर भाष्य केले होते. विजय तेंडुलकरांच्या कन्यादान नाटकातून आंतरजातीय विवाहामुळे निर्माण झालेल्या समस्येवर कटाक्ष टाकला होता. प्रेमानंद गज्वींनी किरवंतमधून उपेक्षित अशा स्मशानकर्म करणाºया ब्राह्मणांचा विषय घेतला होता. अशाप्रकारे नाटककार आपल्या नाटकांतून सामाजिक समस्यांचा सातत्याने उहापोह करत आलेले आहेत.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055

‘स्वर’ गात गेलेला स्वर्गीय गायक रफी


३१ जुलै स्वर्गीय गायक मोहम्मद रफींचा स्मृतीदिन. आज त्यांना जाऊन ४ दशकं उलटली, तरी त्यांची लोकप्रिता तसूभरही कमी झालेली नाही. प्रत्येकाला गायक म्हणून रफी व्हायचं असतं. इतक्या त्या गायकीला उच्च पदावर त्यांनी नेऊन ठेवले. मृत्यूनंतर आपल्याकडे स्वर्गात गेला, असे म्हणतात; पण हा गायक ही सृष्टी सोडून जाताना स्वर गात गेला अशा प्रकारे स्वर्गात गेला.


मोहम्मद रफी भारतीय चित्रपटातील एक सुप्रसिद्ध महान गायक होते. त्यांना भारतीय उपमहाद्वीपाच्या शतकातील श्रेष्ठ गायकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद रफी यांची पवित्र आणि सौम्य आवाजातील गाणी आणि देशभक्तीवर गीतांसाठी अजरामर झाली आहेत. त्यासोबतच त्यांनी अनेक प्रसिद्ध रोमँटिक गीत, कव्वाली, गझल आणि भजन गायले आहेत. जी श्रोत्यांच्या मुखावर आजवर आहेत. चित्रपटातील अभिनेत्यात समरस होऊन त्यांचा आवाज जणू त्याच कलावंतांचा वाटायचा. १९५० ते १९७०पर्यंत त्यांनी ३००पेक्षा जास्त चित्रपटांत गीते गायिली.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्यांची एक विशेष ओळख आहे, जी त्यांनी स्वत:च्या बळावर कमावलेली आहे. त्यांच्या नावे ६ फिल्मफेअर अवॉर्ड आणि १ राष्ट्रीय अवॉर्ड आहे. १९६७मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. रफीचे गाणे ऐकताना ते रेडीओवर जरी ऐकले, तरी ते कोणत्या अभिनेत्यासाठी गायले असेल त्याचा चेहरा समोर येतो, इतके त्याचे गाणे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांशी एकरूप होणारे होते. त्यामुळे प्रत्येक अभिनेत्याला मोठा करणारा गायक अशीच त्याची ख्याती होती.


मोहम्मद रफी यांनी हिंदीसोबत अनेक भाषांमध्ये मिळून ७४०० गीते गायली आहेत. त्या भाषांमध्ये आसामी, कोकणी, भोजपुरी, ओडिया, पंजाबी, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नड, गुजराती, तेलगु, मैथिली, ऊर्दू यांचा समावेश आहे. भारतीय भाषांशिवाय इंग्लिश, फारशी, अरबी आणि डच भाषांमध्ये पण त्यांनी गीत गायले आहे. त्यांचे सर्व संगीत आजही श्रवणीय आहे. गिनिज बुक आॅफ रेकॉर्डच्या नोंदीनुसार मोहम्मद रफींच्या नावावर २८ हजार गाण्यांची नोंद आहे.

मोहम्मद रफी हे हाजी अली मोहम्मद यांच्या ६ पुत्रांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचा परिवार मुख्यत्वे कोठला येते आहे. हे अमृतसर जवळ एक गाव आहे. घरासमोरून रोज जाणाºया एका फकिराचे गाणे ऐकून त्यांना गायनाची प्रेरणा मिळाली. १९३५मध्ये रफी लाहोर, पाकिस्तान येथे गेले. तेथे भट्टी गेट गल्लीजवळ त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहम्मद दिनू हे केशकर्तनालयाचे काम करत. त्यांच्या मित्राने रफीची प्रतिभा पाहिली आणि त्यांना गायनासाठी प्रेरित केले. त्यानंतर मोहम्मद रफी १९४४मध्ये मुंबई येथे आले. तेथे आल्यावर गायनातील बारीक गोष्टींचे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान आणि पंडित जीवनलाल मट्टू, तसेच फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी मोहम्मद रफी यांनी लाहोर येथे एका संस्थेमध्ये गायन केले होते.


भारतीय आॅल इंडिया रेडीओ स्टेशन लाहोरने त्यांना गायनासाठी आमंत्रित केले होते. १९४५ साली चित्रपट गाव की गोरी मधून त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नोशाद यांच्यासोबत हिंदुस्तान के हम हैं मधील काम फारच कौतुकास्पद असे ठरले. त्यानंतर चित्रपट लैला-मजनू मधील तेरा जलवा जिसने देखामध्ये त्यांनी प्रथम कामही केले.

१९४९पासून त्यांच्या चित्रपटसृष्टीचा प्रवास खºया अर्थाने सुरू झाला. चांदनी रात, दिल्लगी, दुलारी चित्रपटांमध्ये गीत गायले. संगीतकार नौशाद शामसुंदर, हुस्नलाल, जी. एम. दुर्वांनी यांच्यासाठी त्यांनी गायन केले. १९४८मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे सुनो सुनो दुनिया वालो, बाबूजी की अमर कहानी हे गीत श्रोत्यांनी फार पसंत केले. पंडित नेहरूंनी त्यांना आपल्या घरी बोलवून हे गीत ऐकले होते.


१९४८ रोजी प्रथम स्वतंत्रता दिवसानिमित्त त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून एक मेडल मिळाले होते. मोहम्मद रफी यांनी दोन विवाह केले. त्यांचा पहिला विवाह बेगम बशीरसोबत झाला होता. भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या पत्नीने भारतात राहण्यास नकार दिला, परंतु ते भारतात राहिले. त्यांना या पत्नीपासून एक मुलगा सईद होता. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांची एकूण चार मुले व तीन मुली आहेत. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ३१ जुलै, १९८० रोजी रात्री १०:२५ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी त्यांचे शेवटचे गाणे फिल्म आसपाससाठी गायले होते. ज्याचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. मोहम्मद रफी यांचा अंतिम संस्कार जुहू मुस्लीम कब्रस्तानमध्ये केला गेला होता. त्यावेळी तेथे १० हजार लोक उपस्थित होते. पाऊस असतानाही लोकांनी तेथे हजेरी लावली होती. त्यांना सन्मान देण्यासाठी भारत सरकारने दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता.

२०१०मध्ये रफी यांच्या मकबºयाजवळ सिनेसृष्टीतील महानायिका मधुबाला यांचा मकबरा बांधला गेला. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिवस साजरा करण्यासाठी त्यांचे असंख्य चाहते तेथे दरवर्षी जमा होतात. त्यांच्या मकबºयाजवळ एक नारळाचे झाड लावण्यात आले आहे.


हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात गाण्यांना फार महत्त्व होते. या काळात रफीच्या आवाजाने अनेक नायकांना नायक म्हणून ओळखले गेले. रफीच्या गाण्यांसाठी त्यांचे चित्रपट गाजले, लोकप्रिय ठरले. यामध्ये प्रदीप कुमार, भारत भूषण अशा अभिनेत्यांचा उल्लेख करावा लागेल. पण दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, देवानंद यांचाही आवाज होऊन रफीची एक ओळख तयार झाली होती. दोस्तीसारख्या चित्रपटातून तरुण वयातील मुलांना दिलेला आवाज, तर अफलातून आहे. आपल्याकडे साधारणपणे लहान मुलांना आवाज देताना तो आजपर्यंत गायिकांचा दिला जायचा; पण दोस्तीतील सुशील कुमार, सुधीर कुमार हे थोडे मोठे होते. त्यांना शोभेल असा आवाज देण्याचे काम रफीने केले आणि त्यातील सगळी गाणी अजरामर झाली. चाहुंगा मैं तुझे सांज सबेरे, आवाज मैं ना दुंगा, तेरी दोस्ती हैं मेरा प्यार या गाण्यांची जादू आजही तितकीच कायम आहे. त्यानंतरच्या पिढीतील सर्व कलाकारांना रफीच्या आवाजाने ओळखले गेले होते. विशेषत: अलीकडच्या काळात ऋषी कपूरसाठी रफीचा आवाज खूपच सूट होत होता. लैला-मजनू, अमर अकबर अँथनी, हम किसीसे कम नही आणि कर्जमधील गाणी ऐकल्यावर ऋषी कपूरच डोळ्यांसमोर यायचा, ही रफीच्या गाण्याची खासीयत होती.

रफीने सर्वच संगीतकारांबरोबर काम केले; पण ओपी नय्यर आणि रफी, आशा हे त्रिकुट सुवर्ण काळात फारच गाजले. रफी आणि त्यांचे प्रत्येक गीत यावर एक स्वतंत्र लेख होईल; पण आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने इतकेच की, स्वर गात गेलेला हा खरा कलाकार.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055\\

निर्णय महत्त्वाचा

 आर्थिक संकटातील बँकेच्या ठेवीदारांना सरकारने बुधवारी संध्याकाळी दिलासा दिला आहे. हा निर्णय अर्थातच स्वागतार्ह आहे. त्याची अंमलबजावणी फक्त महत्त्वाची आहे. तो निर्णय म्हणजे अडचणीतील बँकांमधील खातेदारांच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी ९० दिवसांत परत करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली. ही खरं तर काळाची गरज होती. आज छोट्या विशेषत: सहकारी बँकांमधील ठेवी या असुरक्षित आहेत. काही दिवसांपूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार, खासदार, नगरसेवकाला कोणत्याही सहकारी बँकेचे संचालक होता येणार नाही, असा नियम रिझर्व्ह बँकेने केला. त्याचवेळी आता बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता जपण्यासाठी सरकार काही चांगल्या सुधारणा करणार, असे वाटत होते. त्याप्रमाणे बुधवारी जाहीर केलेला हा ९० दिवसांच्या आत ठेवी मिळणार हा निर्णय फार महत्त्वाचा आहे.


बँकांमधील ठेवींना सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याद्वारे विम्याचे संरक्षण आहे. अशा पात्र रकमेची मुदत नुकतीच १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली होती; मात्र अडचणीतील बँकांमधील ठेवी परत मिळण्यास खातेदारांना तुर्त विलंब लागतो. कित्येक बँका बुडीत निघून अनेक वर्ष लोटली आहेत. लोकांनी आपला कष्टाने मिळवलेला पैसा हा काही लोकांच्या ओळखीस्तव या बँकांमध्ये ठेवला होता. आमच्या ठेवी सुरक्षित आहेत, अशा जाहिराती करणाºया बँकांमधून हा पैसा ठेवला गेला. कोणी एखादा टक्का जास्त व्याज मिळते, या आमिषापोटी ठेवला; पण त्यांची अवस्था ही व्याजाला सोकला अन् मुद्दलाला मोकला, अशी झाली. व्याजही नाही आणि मुद्दलही नाही, अशा अवस्थेत अनेक मध्यमवर्गीय, सर्वसामान्य शेकडो बँकांमध्ये अडकले. आपल्या आयुष्याची पुंजी अनेकांनी अशाप्रकारे गमावलेली दिसते. खरं तर डीआयसीजीसीचे विमाकवच असतानाही वर्षानुवर्ष या ठेवी अनेकांना परत मिळालेल्या नाहीत. हा विलंब का लागला आहे, याचीही चौकशी होण्याची खरंतर गरज आहे. पूर्वी डिपॉझिट इन्शुरन्सची १ लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण होते. त्यामुळे किमान १ लाख तरी मिळतील, अशी अपेक्षा होती; पण वर्षानुवर्ष खेटे घालूनही काहीही हातात लागत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे सरकारने हा घेतलेला निर्णय फार महत्त्वाचा आणि स्वागतार्ह आहे. त्याची फक्त अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. डीआयसीजीसीची तशी स्वतंत्र यंत्रणा तयार करून जे ठेवीदार आपल्या पैशांसाठी क्लेम करत आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.

खरं तर कोणतेही काम किती दिवसांत झाले पाहिजे याला काही नियम असणे आवश्यक होते. त्याप्रमाणे हा कालावधी निश्चित करण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा आवश्यक होती. तसे विधेयक संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच आणले जाणार आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँक, येस बँक, लक्ष्मी विलास बँक आदींची अर्थव्यवहार कोलमडल्यानंतर ठेवीदारांच्या रकमेबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली होती. शुक्रवारी मंजूर झालेल्या बदल प्रस्तावानंतर संसदेत विधेयक पारित होताच लाखो ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. या प्रस्तावित बदलामुळे बँकेत सध्या असलेल्या एकूण ठेवींपैकी ९८.३ टक्के मुदत ठेव खात्यांना संरक्षण मिळेल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे संरक्षण केवळ ८० टक्क्यांपर्यंत असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले. नव्या प्रक्रियेनुसार बँक अर्थसंकटात गेल्याचे जाहीर झाल्यापासून ४५ दिवसांत दाव्याची पूर्तता होईल; त्यानंतर विमा कंपनीची प्रक्रिया होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. ही एक चांगली बाब म्हणून त्याचे कौतुक करावे लागेल.


गेल्या तीस वर्षांत विशेषत: आर्थिक उदारीकरणानंतर म्हणजे १९९०च्या दशकात सहकाराला उतरण लागली. सहकारी क्षेत्रातील बँका बुडण्याचे प्रमाण वाढले. अनेक व्यापारी बँका बुडीत निघाल्या. हर्षद मेहता प्रकरणानंतर अनेक बँका बुडाल्या, यात बँक आॅफ कराडसारखी शेड्युल्ड बँकही होती. तिथपासून ठेवीदारांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यासाठी सहकारी आणि छोट्या बँकांनी अनेक युक्त्या काढल्या. इन्शुरन्स विमा, ठेव विमा हे प्रकार तोपर्यंत सामान्य ग्राहकांना माहितीही नव्हते. त्यानंतर डीआयसीजीसी वगैरे ग्राहकांना माहिती झाले. आपल्या बँकेची विश्वासार्हता दाखवण्यासाठी मग अनेक सहकारी बँका आणि संचालकांनी आमच्याकडच्या ठेवींना १ लाखापर्यंत विमासंरक्षण आहे, तुमचे पैसे, ठेवी बुडणार नाहीत, अशाप्रकारे जाहिराती सुरू केल्या. त्यानंतर मग पूर्वी एकच मोठी रकमेची पावती केली जात होती, ती फोडून ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले. १ लाखापर्यंतचीच ठेव सुरक्षित आहे, म्हटल्यावर अनेक बँकांमध्ये एक-एक लाख ठेवण्याचे प्रकार सुरू झाले. काहींनी विविध नातेवाईकांच्या नावावर, घरातल्या अन्य सदस्यांच्या नावांवर ठेवी ठेवण्यास सुरुवात केली. जेणेकरून प्रत्येकाची स्वतंत्र विमा संरक्षणाची ठेव असेल. प्रत्येकाला क्लेम करून आपले पैसे सुरक्षित राहतील, परंतु असे होऊनही वर्षानुवर्षे ठेवीचे पैसे, त्याचे विमाकवच काही केल्या मिळत नव्हते. त्यानंतर गेल्या काही वर्षात ही ठेवीची मर्यादा ५ लाखांपर्यंत डीआयसीजीसीने संरक्षित केली; पण तरीही त्याचे पैसे कधी परत मिळावेत याबाबत काहीच तरतूद नव्हती. त्यामुळे बुधवारी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ठेवीदारांना दिलासा देणारा असाच आहे.

अतर्क्य मालिकांचा सुळसुळाट


झी मराठी वाहिनीचा टीआरपी दिवसेंदिवस घसरताना दिसतो आहे, तर सोनी मराठी ही वाहिनी सध्या वेगाने प्रेक्षकांना खेचताना दिसत आहे. सोनी मराठीवर कौन बनेगा करोडपती, अजूनही बरसात आहे, गाथा नवनाथांची या मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे गाजत आहेत. कलर्स वाहिनीची धुरा जय जय स्वामी समर्थ या मालिकेने सांभाळली आहे; पण आज झी मराठीवर मात्र अतर्क्य मालिकांनी कहर केला आहे. त्यामुळे प्रेक्षक दिवसेंदिवस तिकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.


मागच्या आठवड्यात येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काय वाटेल तो धुडघूस घातलेला दाखवला आहे. मुळात अंबरनाथ आणि मलबार हिल, मुंबई हे तळ्यात-मळ्यात खेळावं इतके जवळ असल्याचे दाखवले आहे. दोन मिनिटांत कोणतेही पात्र मुंबईतून अंबरनाथमध्ये येते हेच अतर्क्य आहे. त्या मालिकेच्या दिग्दर्शक, लेखकाला सांगावेसे वाटते की, एकदा अंबरनाथ ते मुंबई सीएसएमटी, असा प्रवास करून बघ आणि किती वेळ ट्रेनने लागतो ते समजेल; पण मालविकाने हाकलले की, मोहित दुसºया मिनिटाला मनोवेगाने अंबरनाथमध्ये कारस्थानं करायला येतो.

नलूनं ओमला दिलेला टास्क पूर्ण होऊ नये आणि स्वीटूशी ओमचे लग्न होऊ नये, म्हणून ओमनं जो भाजीचा ठेला टाकला आहे, तो उध्वस्त करण्याचे काम मालविका मोहितवर सोपवते. मोहित दोन गुंड मंडईत घेऊन येतो आणि सगळं उध्वस्त करतो. कोणी त्यांना अडवत नाही. हे सहसा होत नाही. व्यापारी मंडळी एकमेकांना मदतीला धावतात. मुंबईतून तो जादू कुत्रा लोकलप्रवास करून अंबरनाथमध्ये ओमला भेटायला येतो. रस्त्यावरची भटकी कुत्री अशा बाहेरच्या कुत्र्याला सहज शिरकाव करून देतात का?


ओम ज्या खोलीत राहत आहे, त्या खोलीच्या मालकाला मालविका बोलावून घेते आणि ओमला घराबाहेर काढायला सांगते. त्यासाठी ७० हजार रुपये त्याला लाच देते. त्यानंतर ओमला घरातून बाहेर काढले जाते. ओम मुंबईला परत जात नाही, दुसरी खोली त्याला मिळत नाही, स्वीटूच्या घरी रहायला जात नाही. रस्त्यावर राहून त्याचे रूटीन सगळे कसे व्यवस्थित चालले आहे, हे कुठेच पटणारे नाही.

सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे चिल्याला नोकरी लागल्यावर तो पहिल्याच दिवशी लोकलने कामावर निघाला आहे. त्याचा पाठलाग मोहित करतो आणि लोकलच्या दारात तो उभा आहे हेपाहून त्याच्या हाताला पिन टोचतो आणि चालत्या लोकलमधून ढकलून देतो. हे किती भयानक आहे. कथानकाशी काहीही संबंध नसलेले हे दृश्य का दाखवले आहे? मुळात रेल्वेत मुंबई लोकलमध्ये चरसी, गर्दुल्ले, फटका गँग यांची अगोदरच दहशत असताना, अशा तºहेने हाताला पिन टोचून हात सोडून दरवाजातून खाली पाडायची ही शक्कल कशासाठी दाखवली? तो भाग आक्षेपार्ह आहे.


नलूने घातलेल्या अटीप्रमाणे २५ हजार रुपये जमल्यावर ओम आणि स्वीटूचे मंडईत जे मिठ्या मारण्याचे प्रकार दाखवले आहेत ते योग्य नाही. दोघंही प्रेमात बुडाले आहेत; पण मर्यादांचे उल्लंघन करणारे नाहीत, अशा व्यक्तिरेखा असताना हे सार्वजनिक ठिकाणी मिठ्या मारण्याचे दाखवलेले प्रकार अशोभनीय असेच आहेत. मालविकाने त्या मोहितला ओमच्या जागेवर सीईओ म्हणून नेमला आहे. त्याला जोड्यापासून सगळं उचलायला लावते आहेच; पण धडाधडा त्याला थपडा मारते आहे. तोही निर्लज्जासारख्या थपडा खातो आहे. कोणी इतका लाचार जगू शकतो का? रॉकी एक गुडघ्यात मेंदू असलेला भोळसट दाखवला आहे; पण मोहित कसा काय इतका मार खाऊ शकतो? काहीही दाखवण्याचा हा प्रकार चालला आहे.

याशिवाय सोमवार ते बुधवार असलेल्या चला हवा येऊ द्या या मालिकेत आता हसू येईनासे झाले आहे. हसताय ना हसायलाच पाहिजे, अशी सुरुवात झाली, तरी ते दिलखुलासचा जो प्रकार आहे तो अत्यंत इरिटेटेड होतो आहे. त्यात निलेश साबळे सगळ्या कलाकारांना इतकं अंडरएस्टीमेट करताना दिसतात की, तो प्रकार विनोदाचा न राहता अपमानित करणारा राहतो. तुला डायलॉग नाहीत, पेमेंट मिळणार नाही. तीन-तीन महिने पेमेंट मिळत नाही, असे संवाद वारंवार घेऊन झी मराठीकडून या कलाकारांना वेळेवर मानधन दिले जात नाही हे दाखवण्याचा जो प्रकार केला जात आहे, ते झी मराठीसाठी बदनामकारक आहे. अशा प्रकारांना वाहिनीनेच आळा घातला पाहिजे. विनोदापेक्षा एकमेकांना अपमानित करण्याचे प्रकार हे कधीकधी हिडीस वाटतात. तो दिलखुलास हा भाग अतिशय बेकार आहे; मात्र यातील काही प्रहसनं निश्चित कौतुकास्पद अशीच आहेत. यातले याच आठवड्यातले घरात शूटिंगला आलेल्या कलाकारांचे प्रहसन छान होते. त्याची संहिता पण दमदार होती. यात खूप दिवसांनी कुशल बद्रिके, भाऊ कदम यांच्यातील जुगलबंदी पहायला मिळाली. श्रेया बुगडेनी, तर नटीचं काम अफलातूनच केले; पण याच भागात झी टीव्हीवर हिंदीत येणाºया एका कॉमेडी शोचे प्रमोशन करताना दाखवले आहे. फराह अख्तर आणि तिची टीम नवीन शो घेऊन येत आहे. त्या टीमपुढे मात्र मराठी कलाकारांच्या मर्यादा स्पष्ट करण्याचे काम केले ते चुकीचे होते. डॉयलॉग पाठ नाहीत, पेमेंट वेळेवर मिळत नाही, अशा तºहेच्या कॉमेंट्स टाकून आपले वैचारिक दारिद्र्याचे विनाकारण प्रदर्शन झाले. असे विनोद इथे अपेक्षित नाहीत. विनोदासाठी कोट्या, कुरघोड्या असल्या पाहिजेत; पण त्या मार्मिक असल्या पाहिजेत. कोणाचीही कुचेष्टा होणारी कमेंट विनोद नाही निर्माण करत. असे पंच फारसे चालतही नाहीत. फक्त समोर बसलेले कलाकार, प्रेक्षकच खोटे-खोटे हसतात ते अत्यंक केविलवाणे वाटते. असे अतर्क्य प्रकार थांबले पाहिजेत.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

9152448055\\

सीमावाद


आपल्या देशात अनेक सीमावाद आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यासहित अनेक राज्ये यासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडत असतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सहा दशके चालू आहे. अधूनमधून हे वाद उफाळूनही येतात. अनेकवेळा आंदोलकांवर लाठीमारही होतो; मात्र आसाम आणि मिझोराममधला सीमावाद पाहिल्यावर एक प्रकारची भीती निर्माण होते. ती म्हणजे हा वाद एकाच देशातील दोन राज्यांमधला आहे; पण दोन शत्रू राष्ट्रांप्रमाणे इथे वातावरण तयार झाले. हे देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी घातक आहे. विशेषत: ज्या राज्यात हा प्रकार घडतो आहे, ती दोन राज्य आपल्या शत्रू राष्ट्र असलेल्या चीनला जवळची आहेत. त्यामुळे इथे खबरदारी घेणे आवश्यक आहे.


म्हणजे, एका राज्याच्या पोलिसांना सीमावादातून थेट ठारच मारले जाते. हा भारताच्या एक राष्ट्र म्हणून असणाºया एकात्मतेवरचा मोठा आघात आहे. शर्मा आसामचे मुख्यमंत्री झाल्यापासून तेथे पोलिसांच्या सशस्त्र कारवायांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यातून आसाम व मिझोराम यांच्या सीमेवर काही ठिणगी पडली आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी केंद्र सरकारने करायला हवी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शिलाँगमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर लगेच हा हिंसाचार झाला. ईशान्येचा भूभाग हा चीनला लागून असल्याने त्याचे गांभीर्य आता वेगळे सांगायला नको. एकंदरीत ईशान्येत सध्या शांतता असली, तरी तेथे हिंसाचाराचा आश्रय घेणारे अनेक गट, संघटना आजही आहेत. ईशान्येकडील राज्य तशी पूर्वीपासूनच धगधगती आणि अस्थिर अशी राहिली आहेत; पण गेल्या दोन दशकांत या भागात भारतीय जनता पक्षाने आपली बिजे रोवली आणि तिथल्या नागरिकांना भारतीय असल्याचा विश्वास दिला. माय होम इंडिया सारखे उपक्रम राबवून या भागावर असलेली चिनी नजर त्यामुळे लांब राहिली, परंतु यामुळे शत्रू राष्ट्रांना सामील असणाºया काही शक्ती या मार्गाने डोकावतात आणि इथे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमित शहा यांच्यासारखे खंबीर गृहमंत्री असताना, आता त्यांच्याकडून हा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळला जाईल आणि इथे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, यासाठी ते उपाययोजना राबवतील यात शंकाच नाही.

विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन दशकांपासून इथे दहशतवादी मोठ्या संख्येने पहायला मिळतात. शेजारी शत्रू राष्ट्रांची त्यांना कुमक असतेच. त्यांच्याकडे अत्याधुनिक, अशी शस्त्रेही आहेत. त्यामुळे ईशान्येतील विविध राज्यांच्या सीमावादाचे किंवा इतर वादांचे निमित्त करून हिंसाचाराचा भडका उडवून देण्याचा डाव शत्रू देशांच्या गुप्तचर यंत्रणा आखत नाहीत ना, याकडे आता सरकारला लक्ष दिले पाहिजे. गृहमंत्री त्यादृष्टीने पावले टाकतील आणि यावर खंबीर असा उपाय करतील, असा विश्वास आहे.


विशेष म्हणजे दोन राज्यांमध्येच अशा चकमकी झाल्या की, ‘राष्ट्र म्हणून तुम्ही कुठे एक आहात?’, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आसाम सरकारने सीमेवर सुरू केलेले रस्त्याचे काम हे निमित्त ठरले असले, तरी यामागे मोठे कारस्थान असू शकते. यातून केंद्र सरकारने घ्यावयाचा धडा, म्हणजे खंबीर राजकीय इच्छाशक्ती दाखवून ईशान्येतील आणि खरे म्हटले, तर साºया देशातील अंतर्गत सीमाप्रश्न तातडीने मिटवून टाकायला हवेत. ‘आपण वेगळ्या राज्यांत राहत असलो, तरी आपला सगळ्यांचा देश एकच आहे,’ ही भावना निर्माण करून सीमावादाची धार कमी करण्याची गरज आहे. सगळे प्रश्न न्यायालयात जाऊन सोडवायची वेळ येता कामा नये. तोडगा काढून, विश्वास देऊन हे प्रश्न सुटायला पाहिजे. बेळगाव सीमाप्रश्न ६ दशके न्याय प्रविष्ठ आहे. असे जर सगळे प्रश्न न्याय प्रविष्ठ राहिले आणि त्यावर कसलेच तोडगे निघणार नसतील, तर ही अस्थिरता कायम वाढत जाईल. त्यामुळे केंद्राने केवळ आसाम-मिझोरामच नाही, तर सगळेच सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. परस्परांतील तेढ कमी करून एकात्मतेला प्रोत्साहन दिले पाहिजे.

आसाम आणि मिझोराम यांच्या सशस्त्र संघर्षात नेमकी काय भावना आहे आणि या भावना भडकावण्याचे काम कोण करत आहे, हे पण समोर येणे गरजेचे आहे. आपल्याच देशबांधवांवर निव्वळ सीमावादातून कोणी मशीनगन्स चालवत नाही. आज ईशान्येत भाजपप्रणित एनडीएची किंवा मित्रपक्षांची सरकारे आहेत. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना, जन्माला आलेल्या ईशान्येच्या भागाला सध्या विशेष महत्त्व आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा दोन्ही बाजूंचा सीमाभाग आधी केंद्रीय दलांच्या ताब्यात सोपवायला हवा आणि त्यानंतर ईशान्येतील सर्व सीमावाद सामंजस्याने सोडविण्यासाठी वेगाने पावले टाकायला हवीत. मोदी-शहा यांचे खंबीर नेतृत्व हा प्रश्न जास्त चिघळू न देता त्यावर वेगाने तोडगा काढतील, अशी अपेक्षा आहे.


आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर दोन शत्रू राष्ट्रांमध्ये व्हावी, तशी सशस्त्र चकमक झाली. यात आसाम पोलिसांचे सहा जवान मारले गेले. अनेक जखमी झाले. यात महाराष्ट्रातील एका अधिकाºयाचाही समावेश आहे; पण यानंतर मिझोरामच्या सीमाभागात जो विजयोत्सव चालू होता, तो राज्यांमधला सीमावाद आणि त्यातून जन्मणारे शत्रुत्व किती टोकाला जाऊ शकते, याचा निदर्शक होता. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येतील आठ राज्यांमध्ये सीमावर्ती अरुणाचलचा भूप्रदेश सर्वात विस्तीर्ण आहे. यात आसाम हेच खºया अर्थाने ईशान्येतील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गुरुवार, २९ जुलै, २०२१

खांदेपालट


कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी मंजूरही केला. येदियुरप्पा यांचा राजीनामा अनपेक्षित म्हणता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. विशेष म्हणजे स्वत: येदियुरप्पा यांनीच आपल्या राजीनाम्याच्या चर्चेचे खंडन केले होते; मात्र अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा त्या अर्थाने धक्कादायक म्हणता येणार नाही; पण कर्नाटकातील अस्थिरता यातून पुढे दिसून आली आहे. मुळात या पाच वर्षांत झालेल्या निवडणुकीत कर्नाटकात अस्पष्ट कौल आला होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनता दलाला पाठिंबा दिला आणि कुमारस्वामींचे सरकार आणले होते; पण जेमतेम ते सरकार वर्षभर टिकले. काँग्रेसच्या जाचापायी कुमारस्वामी पायउतार झाले आणि भाजपने आॅपरेशन लोटस करून पुन्हा सरकार स्थापन केले. प्रत्यक्षात येदियुरप्पा यांनी निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत नसतानाही सिंगल लार्जेस्ट पार्टी, म्हणून सरकार स्थापनेचा दावा केला, शपथविधीही पार पाडला; पण बहुमत सिद्ध करता न आल्याने काही तासांतच हे सरकार गडगडले आणि कुमारस्वामींचे सरकार आले, तेव्हापासून कर्नाटकात एक प्रकारची अस्थिरताच होती. ती अजूनही संपलेली नाही, असे दिसते; पण कर्नाटकातील ही खांदेपालट भाजपने आगामी निवडणुकांची रणनीती आखण्याचा एक भाग आहे हे नक्की.


आज कर्नाटकमधील भाजपच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असतानाच मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देताना नाराज नाही, तर खूश आहे; मी नेहमीच अग्निपरीक्षेतून बाहेर पडलो आहे, असे येदियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर राजभवनच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. अर्थात येदियुरप्पा यांची ही काही नाराजीची पहिली वेळ नाही. काही वर्षांपूर्वी ते भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले होते आणि कर्नाटक जनता पक्ष, अशी नव्या पक्षाची स्थापना केली होती. कालांतराने ते पुन्हा भाजपमध्ये आले; पण कर्नाटक भाजप म्हणजे येदियुरप्पा हे समीकरण त्यांना दाखवून द्यायचे होते. त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यात गेली दहा वर्ष खर्ची केली आहेत हे नक्की. राजीनामा देताना त्यांनी म्हटले आहे की, राजीनाम्यासाठी माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता. नव्या नेत्याची पक्षाला मुख्यमंत्री म्हणून निवड करता यावी, म्हणून मी राजीनामा दिला असल्याचे येदियुरप्पा यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. मागील आठवड्यात येदियुरप्पा यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला बळ मिळाले होते. त्यांच्या राजीनाम्याने कर्नाटक भाजपमधील एक अध्याय संपला असून, पुढील मुख्यमंत्री कोण राहणार, याचा दुसरा अध्याय आता सुरू होणार आहे; मात्र पुढील मुख्यमंत्री भाजपचा राहणार, याबद्दल कोणतीही शंका कोणाच्याही मनात राहयचे कारण नाही. मुख्यमंत्री पदासाठी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे संघटन महासचिव बी. एल. संतोष यांच्यासह जवळपास अर्धा डझन नावांची चर्चा आहे. यापैकी एकाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड झालेली असेल. भाजप राज्यातील नेत्याची मुख्यमंत्री पदी निवड करेल की, दिल्लीतून कोणा खासदाराला मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवेल, याबाबत उत्सुकता राहणार आहे. आमदार नसलेल्या कोणाची मुख्यमंत्री पदी निवड केली, तर त्याला सहा महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून आणण्याची जबाबदारी भाजपला घ्यावी लागेल. खासदाराला मुख्यमंत्री करण्याबाबतचा चांगला अनुभव भाजपला नुकताच उत्तराखंडात आला आहे; पण एकूणच अजून दोन वर्षांनंतर होणाºया निवडणुकीची ही भाजपने केलेली तयारी आहे. भाजपने आपल्या नेत्यांचे वय ७५च्या आत असावे, असे ठरवलेले आहे. त्यामुळे भाजपचा चेहरा कायम तरुण राहिला पाहिजे, याची त्यांनी खबरदारी घेतली आहे. ८०च्या घरात असलेल्या येदियुरप्पा यांना त्यासाठीच पक्षाने विश्रांती घेण्यास भाग पाडले असून, आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरुणांना संधी या न्यायाने भाजप सगळीकडे कार्यरत राहणार हे यातून स्पष्ट आहे. त्याचाच हा एक भाग आहे.

खरं तर भाजपची रणनीती ही स्थिर सरकार देण्याची असते. शक्यतो नेतृत्वात बदल करण्याचा प्रयत्न भाजपचा नसतो. संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांना एखादा कार्यकाल पूर्ण करता आला म्हणजे तो चांगली कामगिरी करेल, अशी भाजपची अपेक्षा असते; पण २०१८च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर येथील समीकरणे बदलली. सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर रहावे लागले. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तरी लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१९ला घवघवीत आणि अनपेक्षित यश मिळाले होते. विधानसभेच्या निकालाच्या तुलनेत इतके मोठे यश भाजपला तिथे मिळेल आणि जनता दलाची वाताहात लागेल, असे कोणाला वाटलेले नव्हते; पण ते भाजपने करून दाखवले आणि लगेचच आॅपरेशन लोटस करत येदियुरप्पा यांचे सरकार आले. त्यावेळी लोकसभेतील यशाचे बक्षीस, म्हणून येदियुरप्पांना मुख्यमंत्री करणे भाग होते, तसेच त्यांनी अगोदर सरकार स्थापनेचा दावा केलेला होता. त्यामुळे आॅपरेशन लोटस नंतर त्यांना संधी दिली गेली; पण आता वेळ आल्यावर तिथे खांदेपालट होताना दिसत आहे.

जलसाक्षरतेची गरज


आपल्याकडे भरपूर पाऊस आहे, भरपूर पाणी आहे; पण त्याचे नियोजन व्यवस्थित नाही. त्यामुळे आपल्याला पाण्याच्या संकटाला तोंड देण्याची वेळ वारंवार येते. मागचा आठवडा पूर, जलप्रलय अशा परिस्थितीत गेला; पण हे अतिरिक्त पाणी फक्त निचरा करणे, वाया घालवणे याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. धरणात पाणी जास्त झाले की, त्याचा विसर्ग करायचा, तो नाही केला, तर बॅकवॉटरला पूर आणि सोडले की, धरणक्षेत्रातील गावांत पूर. इथून-तिथून धरणाचेही आमच्याकडे संकट होताना दिसत आहे. धरणं बांधायची, पाणी अडवायचे, ते जास्त झाले की, सोडायचे, त्यामुळे अतिरिक्त पाण्याचे नियोजन संचय आपल्याला करताच येत नाही. त्यामुळे मार्च महिना संपला की, सर्वत्र पाण्याची ओरड सुरू होते. निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस पडायला जवळपास अडीच ते तीन महिने असताना, ही धरणे असूनही पाण्याची ओरड, पाणी कपात सुरू होते. हा नियोजनाचा अभाव आहे.


सरकार कुणाचे आहे किंवा सत्ता कोणाकडे आहे यावर पाण्याचे नियोजन अवलंबून नसते, तर ते शासकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. सतत वाढत जाणारी लोकसंख्या, वाढते शहरीकरण, वाढती बांधकामे यामुळे पाण्याचा मेळ घालणे हे सोपे काम नसते; पण अवघड जरी असले, तरी ते अशक्य नसते. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, जलव्यवस्थापन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या जनजागृतीप्रमाणे पाण्याच्या नियोजनाबाबत आपण जागृती निर्माण करू शकलो, तर बºयाच समस्या सुटतील. यासाठी जलसाक्षरतेचा प्रसार होणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमात, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात जलशास्त्र यावर संशोधन होऊन तो विषय अभ्यासक्रमात महत्त्वाचा असला पाहिजे.

गणिताला जेवढे महत्त्व आपण देतो, तेवढेच महत्त्व किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व जलशास्त्र, जलनियोजन या विषयांना दिले पाहिजे, कारण भविष्यातील सगळी गणिते ही पाण्यावर मांडली जाणार आहेत. वाढते नागरिकीकरण, वेगाने होणारे औद्योगिकीकरण, पाश्‍िचमात्य जीवनशैलीचे अंधानुकरण, लोकसंख्येचा भस्मासूर, लोकसंख्येचा भार न पेलणारी शहरे, उध्वस्त होत चाललेली ग्रामीण संस्कृती, पाण्याचा प्रचंड गैरवापर, पाण्याचे वाढते प्रदूषण, जलाशयातील पाणी वाटपासंबंधी असलेले ग्रामीण आणि नागरी वाद, नदीच्या पाणी वाटपाचे सर्व स्तरावरील वाद, नागरी विरुद्ध ग्रामीण असा एक वाद, पाण्याचे राजकारण आणि राजकारणासाठी पाणी ही आजच्या जलसमस्येची मूळ कारणे आहेत.


जलस्त्रोतांशी समाजाचे असलेले नाते आजकाल खंडीत झालेले दिसते. पाण्याचे पावित्र्य संपले आहे, नदीचे मातृत्व नाहीसे झाले आहे. आजकाल नद्यांना गटारीचे रूप आले आहे. गटारगंगा हा शब्द रूढ होऊन पवित्र गंगेचे विडंबन होताना दिसत आहे. जलाशयाची समाजमनातील अन्य साधने नष्ट होताना दिसत आहेत. बाव, विहीर, कूप, सागर, पुष्करणी, हे शब्दच आता कालबाह्य वाटू लागले आहेत. पाण्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे अध:पतन होऊन त्याला बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याचे व्यापारी मूल्य वाढत आहे. आपण जलातून जीवन साकारण्याची कल्पनाच विसरून गेलो आहोत. माणूस आणि पाणी यांचे युगानुयुगाचे नाते आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर पुन्हा प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे.

यासाठी जलव्यवस्थापन आणि जलशास्त्राचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत. ग्रामीण संस्कृती म्हणजे आम्हाला कमीपणा वाटतो. शहरी माणूस म्हणजे सुधारलेला, असा भ्रम करून दिला जातो; पण पाण्यासाठी ग्रामीण संस्कृती टिकवली, म्हणजे त्याचे महत्त्व टिकून राहील. आपल्याकडील संस्कृतीत गंगेला फार महत्त्व आहे. किंबहुना पाण्याला प्रतिशब्द म्हणजेच गंगा असाही शब्द रूढ झालेला आहे. विकास गंगा आपण म्हणतो, तेव्हा या गंगाचा शब्द पाण्याशी आहे. ज्ञानगंगा असे म्हणतो, तेव्हा ज्ञानाचा शब्द पाण्याशी आहे. नद्यांचे प्रवाह आणि उगम हे त्यासाठीच फार महत्त्वाचे राहिले आहेत. विविध नद्यांचे आपल्याकडे केले जाणारे उत्सव हे या नद्यांनी आपल्याला भरभरून पाणी द्यावे, यासाठी असतात. प्रत्येक नदीला आपल्याकडे आईची उपमा दिली आहे. गंगामाई, कृष्णामाई, गोदाई, वर्धामाय ही नावे आजकाल नाहीशी होताना दिसत आहेत. नद्यांचे मातृत्व संपल्याने आता निर्जीव पाणी आम्हाला प्यावे लागत आहे. कोणत्या तलावाचा अथवा धरणाचा उत्सव केलेला आपण कधी पाहिलेला नाही. याचे कारण धरणाचा उल्लेख करतानाच त्याची पातळी किती? त्यात डेड वॉटर किती याचा विचार केला जातो. नदी मात्र शेवटच्या थेंबापर्यंत वाहतच राहते. असे वाहणे आणि प्रवाहित होणे हे फार महत्त्वाचे आहे. हे प्रवाहित राहण्यासाठी जलव्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे आहे.


प्रत्येक शाळा, आस्थापना, कंपन्या, फर्ममधून जलव्यवस्थापनाकडे लक्ष दिले गेले पाहिजे. आपल्याकडे असलेला पाण्याचा साठा किती आहे? असणारे कर्मचारी किती आहेत? असलेले विद्यार्थी किती आहेत? त्यांना आवश्यक पाणी किती आहे? आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असेल तर ते वाया न घालवता त्याचा काय वापर करता येईल याचे नियोजन होणे महत्त्वाचे आहे. दररोज नळाला येणारे पाणी ताजे म्हणून भरायचे आणि आदल्या दिवशी शिल्लक राहिलेले पाणी ओतून द्यायचे, असे प्रकार घरोघर घडत असतात. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू लागल्यावर ते वाया जाणारे पाणी किती महत्त्वाचे होते हे लक्षात येते. पैसे असतात तोपर्यंत काही वाटत नाही; पण पैसे खर्च झाल्यावर ज्याप्रमाणे आपण किती अनावश्यक खर्च केला याचा विचार करून काटकसर करतो तोच विचार पाण्याबाबत व्हायला पाहिजे. जलकोष किंवा पाण्याची बँक यांसारखे प्रयोग राबवता आले पाहिजेत. यासाठी सरकारने, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमचे जादा असलेले पाणी दुसºयांना देता आले पाहिजे, त्यातून अर्थार्जन करता येईल काय आणि आपल्या अडचणीच्यावेळी त्यातून आपल्याला पाणी मिळवता येईल काय, याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. आज पाण्याची साठवण कमी होण्याचे कारण, म्हणजे पाणी जमिनीत मुरत नाही हे आहे. शहरे वाढली, खेडी शहरांमध्ये सामील झाली. त्यामुळे डांबरीकरण, काँक्रिटीकरण वाढले. जमिनीत मुरणारे पाणी वाहून जाऊ लागले. आम्ही पेरलंच नाही तर उगवणार कसे? पाणीसुद्धा पेरलं पाहिजे, तरच ते मिळणार आहे, हा विचार कधी आमच्या मनाला सुचला नाही. यासाठी शहरीकरणावर नियंत्रणे आली पाहिजेत. काँक्रिटीकरणावर मर्यादा घातल्या पाहिजेत. खेड्यांकडे जा, याचा अर्थ हा आहे. खेड्यांतील संस्कृती ही समृद्ध संस्कृती आहे, तिचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला, तर जलव्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन याबाबतचे महत्त्व आम्हाला पटेल. जलव्यवस्थापनाच्या अभ्यासाबाबत सरकारने आग्रही राहिले पाहिजे. समाजशास्त्राचा, नागरिकशास्त्राचा, अर्थशास्त्राचा आणि भौतिक, जीव, रसायन अशा सर्व शास्त्रांचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाण्यावर लिहिलं पाहिजे, पाण्याबाबत वाचलं पाहिजे, पाण्यासंबंधी शिकलं पाहिजे, पाण्यासंबंधी शिकवलं पाहिजे, हा दृष्टीकोन रूजवला पाहिजे. तो दृष्टीकोन रूजवला, तर देशात कोठेही हंडा मोर्चे निघणार नाहीत. पाणीदार दृष्टीचे प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी आणि पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटण्यासाठी, पाण्याचे राजकारण संपुष्टात येण्यासाठी जलव्यवस्थापनाचे शिक्षण देण्याची गरज आहे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

योद्धा मुख्यमंत्री


२६ नोव्हेंबर, २०१९ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते राज्याचे महाविकास आघाडीचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड वर्षात नावारूपास आले. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एकापाठोपाठ एक संकटांची मालिका त्यांच्या वाट्याला आली; पण अत्यंत खंबीरपणे लढा देत, अत्यंत संयमी खेळी खेळत त्यांनी आपली कारकीर्द पुढे चालू ठेवली आहे. संकटांशी यशस्वीपणे लढणारा योद्धा मुख्यमंत्री, अशी त्यांची ख्याती झाली आहे. विशेष म्हणजे ही युद्धे ते नुसती लढताना नाही, तर जिंकताना दिसत आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात याच त्यानिमित्ताने शुभेच्छा!


नोव्हेंबर २०१९मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर राज्य सरकार स्थापनेसाठी जवळपास १ महिन्याचा कालावधी लागला. या कालावधीत अनेक घडामोडी, भेटीगाठी घडत होत्या; पण कसलीही घाई न करता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी यशस्वी बोलणी करत सरकार स्थापनेचा तिढा सोडवत महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणले. अनेक जणांनी सशाची झेप घेत सरकार स्थापनेचा प्रयत्न केला; पण कासवाच्या गतीने जात ही शर्यत जिंकायची आहे, या इराद्याने त्यांनी सरकार स्थापन केले आणि यशस्वी दीड वर्ष कारकीर्द आज अखेर केली आहे.

मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि एका पाठोपाठ एक संकटांची मालिकाच तयार झाली; पण न डगमगता त्यांनी या सगळ्या संकटांना तोंड दिले आहे, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विविध पाहणींमध्ये, सर्वेमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत ते कायम पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.


एकीकडे राज्य सरकार स्थापनेची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे संपूर्ण जगावर एक संकट त्याच सुमारास येऊ घातले होते. ते म्हणजे कोव्हिड-१९ या कोरोनाच्या लाटेचे संकट. नोव्हेंबर २०१९ पासूनच चीनमधून या रोगाला सुरुवात झाली. भारतात तो पोहोचेपर्यंत मार्च २०२० उजाडले; पण तिथपासून संपूर्ण देशच एका फार मोठ्या संकटात सापडला. मुंबई आणि महाराष्ट्र हा तर देशाचा आत्मा. देशाची आर्थिक राजधानी मुंबई. या महाराष्ट्रालाच या संकटाने वेढले. संपूर्ण देशभरातून पोटापाण्यासाठी, रोजगारासाठी लोक महाराष्ट्रात येतात. मुंबईत येतात. अशावेळी सर्वांची जबाबदारी पेलणे हे सोपे आव्हान नव्हते; पण केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क ठेवून, प्रसंगी आपली मते स्पष्ट मांडून ही परिस्थिती कशी हाताळायची याचे उद्धव ठाकरे यांनी अचूक काम केले. या रोगावर इतका अभ्यास केला की, महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे त्यांनी बरोबर जाणले. त्यादृष्टीने कोणाच्या आग्रहाला बळी न पडता, प्रसंगी कटूता स्वीकारून निर्बंध लादण्याचा त्यांनी निर्णय घेतला. माणसं जगली, तर पुढचं सगळं आहे. आधी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा, रोजगार आणि बाकीचे पुढे आहेच. कोणाची रोटी थांबू न देता महाराष्ट्र चालवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे केले. हे करताना त्यांच्या मनात फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार होता. तो म्हणजे, रडायचं नाही, आता लढायचं. त्याप्रमाणे त्यांनी एक योद्धा म्हणून या पदाकडं पहात आपलं काम चोखपणे चालू ठेवले आहे.

एकीकडून कोरोनाचा उद्रेक होत असतानाच दुसरीकडून गेल्या वर्षी जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला झोडपले. ते संपते ना संपते तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. ती कुठे ओसरायला सुरुवात होते तोच तोक्ते या चक्रीवादळाला तोंड देण्याची वेळ महाराष्ट्रावर आली. ते संपते ना संपते तोच पुन्हा मागच्या आठवड्यापासून राज्यात होत असलेली अतिवृष्टी, पूर, शहरं पाण्याखाली जाणे, दरडी कोसळणे या संकटांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एकूणच मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना एक योद्धा म्हणूनच मैदानात उतरावे लागत आहे; पण आपल्या संयमी कामगिरीने ते प्रत्येक युद्ध जिंकताना दिसत आहेत. मित्र पक्षांना विश्वासात घेऊन, बरोबर घेऊन राज्याचा हा गाडा यशस्वीपणे हाकत आहेत.


अनेक आघाड्यांवर लढणे म्हणजे काय असते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकायला मिळते. एकीकडे विरोधक, प्रसारमाध्यमांकडून होणारी टीका असेल, तर दुसरीकडे पक्षाचीही जबाबदारी असेल. राज्याचा शकट तर चालवायचा आहेच. तो चालवताना विविध संकटांना तोंड द्यायचे आहे. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे याचे तारतम्याने पाऊल उचलण्याचे काम अतिशय शांत संयमीपणाने त्यांनी केले आहे हे विशेष आहे. तोल जाऊ न देता, धीर न सोडता खंबीरपणे कसे वागायचे याचे जीवंत उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन कटूता आली, तरी ती स्वीकारताना न डगमगणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पहावे लागेल. मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. आज सामान्यांसाठी ती बंद आहे. नोकरदारांसाठी ती बंद आहे. शिक्षक, वकील या सर्वांसाठी ती बंद आहे; पण माझ्या मराठी माणसाला जपले पाहिजे या प्रेमापोटी त्यांनी लोकलवर या सर्वांना निर्बंध लावले आहेत. ते भय्ये परप्रांतिय करू देत बिनधास्त प्रवास, घेऊ देत लोकलचा लाभ बाहेरचे; पण मी माझ्या मराठी माणसाला संकटात जाऊ देणार नाही हा जो त्यांनी बाणा स्वीकारला आहे तो अत्यंत कौतुकास्पद असाच आहे.

संपूर्ण राज्याचे शंभर टक्के लसीकरण करणे आणि हे युद्ध जिंकणे या एकाच ध्येयाने मुख्यमंत्री कार्यरत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लसींचा साठा महाराष्ट्राच्या पदरात कसा पडेल, यासाठी सतत ते जातीने लक्ष देत आहेत. सरकारी, महापालिका रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयांतूनही लसीकरण कसे करता येईल, प्रसंगी घरोघर कसे करता येईल, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हा या कोरोना युद्धाचा प्रकार आहे. अशा या योद्धा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

महत्त्वाचा निर्णय


गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने दिलेला तडाखा आणि त्यामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व पूरस्थिती पाहता पुन्हा एकदा सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची गरज लक्षात आली आहे. त्यादृष्टीने सरकारने प्रयत्नही सुरू केले आहेत, हे विशेष. रविवारच्या कोकण दौº­यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशी कायम स्वरूपी यंत्रणा तयार करण्याचा निर्धारच केला आहे. हे फार महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे असे संकट आपल्याकडे आता कायम येणार हे गृहीत धरून त्यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. नव्हे ती एक काळाची गरज होती. वेळीच ते ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत पावले टाकली आहेत, हे छान आहे. नाहीतर दरवर्षीच या संकटाला आपल्याला सामोरे जावे लागले असते.


गेल्या आठवड्यात राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांना ज्याप्रकारे पावसाचा आणि महापुराचा अभूतपूर्व तडाखा बसला, त्यानंतर संपूर्ण यंत्रणा काही प्रमाणात गोंधळून गेलेली दिसली; पण लवकरच ती खडबडून जागी झाली आणि कार्यरत झाली हे महत्त्वाचे आहे. तसे हे आस्मानी संकट होतेच मोठे; पण अशाही परिस्थितीत जास्तीत जास्त लवकर पोहोचत, कमीत कमी नुकसान होण्याचे प्रयत्न करणे, जास्तीत जास्त जीव वाचवणे याला दिलेले प्राधान्य यात महत्त्वाचे होते; पण हे संकट आपल्याला वारंवार परवडणारे नाही. २६ जुलै, २००५ ला जेव्हा मुंबईत असाच पाऊस झाला, त्यावेळी मुंबई जवळपास शंभर वर्ष मागे गेली इतके नुकसान झाले होते. त्या संकटातून आपण बाहेर आलो; पण अशी संकटे गेल्या चार वर्षांत सातत्याने येताना दिसत आहेत. २०१९ ला कोल्हापूर, सांगली ही शहरे पाण्याखाली गेली. यावर्षीही तीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कायम स्वरूपी यंत्रणेची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफची मदत पथके, बोटी अशा यंत्रणा सतत सज्ज असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेतला आहे हे फार महत्त्वाचे आहे.

महापूर, अतिवृष्टी दरवर्षी कुठे ना कुठे होतेच; पण यावेळी फक्त अभूतपूर्व अशी महापुराची स्थिती नव्हती, तर राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. रायगड आणि सातारा जिल्ह्यांत दरड कोसळून अनेक लोकांचा मृत्यूही झाला. सह्याद्रीच्या या पर्वतरांगा, डोंगर दºया अशा कमकुवत होताना दिसत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यापुरतेच जे बचावकार्य मर्यादित होते ते बचावकार्य आता ढिगाºयाखाली सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यापर्यंत विस्तारित झाले आहे. त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, दर्जेदार आणि जलद करण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.


खरं तर आपल्याला मान्सूनचा पाऊस काही नवीन नाही आणि महापूरही काही नवीन नाही. यापूर्वी २०१९मध्ये आणि त्यापूर्वी २००५मध्ये अशाच प्रकारे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही सांगली-कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर महापुराचा तडाखा बसला होता. हे सगळे अनुभव गाठीशी असतानाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमध्ये तेवढ्या प्रमाणात कार्यक्षम असे बदल करण्यात आलेले नाहीत. २००५ नंतर जवळपास १० वर्ष आघाडीचे सरकार होते; पण त्यांनी या काळात तितके ते गांभीर्याने घेतले नव्हते; पण सध्याच्या सरकारला याचे गांभीर्य समजले आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, हे महत्त्वाचे आहे. आज लगेच नाही निदान २०२२ चा पावसाळा तरी आमच्याकडे संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे दाखवून देणारा असेल. जीवितहानी होणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील परिस्थिती पाहता तेथे आपत्ती व्यवस्थापनाचे बचाव पथक पोहोचण्यास खूप वेळ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांच्या रविवारच्या दौº­यावेळी व्यापाº­यांचीही नाराजी दिसून आली; पण मुख्यमंत्र्यांनी ज्या संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळले ते फार महत्त्वाचे होते.


राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यानंतर कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याची घोषणा केली आणि काही निधी जाहीर केला. कोकणात नेहमी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे असो किंवा इतरत्र महापुराचा तडाखा बसतो आणि दरडी कोसळण्याचे प्रकारही घडतात. अशावेळी आतापर्यंत कोकणासाठी स्वतंत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा का नव्हती हे अनाकलनीय आहे. खरं तर कोकण रेल्वेचा प्रकल्प आल्यावर ही योजना होणे अपेक्षित होते; पण पंचवीस वर्षांत ते केले नव्हते, याचेच आश्चर्य आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्यालय पुणे येथे असल्यामुळे तेथून जवानांना आणि संपूर्ण यंत्रणेला आपत्ती झालेल्या ठिकाणी जावे लागते. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर येथील दरड कोसळण्याची घटना पाहिली, तर त्या घटनास्थळापर्यंत जवानांना पोहोचणे अशक्य झाले होते, कारण संपूर्ण रस्ते बंद झाले होते. हीच परिस्थिती कोकणातील चिपळूण आणि खेड या शहरांची झाली होती, कारण चारही बाजूने कोंडी झाल्यामुळे बचाव पथक घटनास्थळी जाणार तरी कसे, हाच प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी बचावकार्य सुरू करायला काही प्रमाणात विलंब लागला हे वास्तवही स्वीकारावे लागणार आहे, म्हणूनच आगामी कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेमध्ये सुधारणा केल्या जाण्याची अपेक्षा आहे. सरकार त्यादृष्टीने पावले टाकताना दिसत आहे, ही गोष्ट स्वागतार्ह अशीच आहे.

खरं तर आपण अनुभवावरून काही शिकत नाही, म्हणूनच दर वेळी आपल्याला नवीन काही तरी समस्येला सामोरे जावे लागते. कित्येक वर्षांपासून राज्यातील सांगली आणि कोल्हापूर या शहरांना महापुराचा वेढा पडत आहे; पण पूरस्थिती उद्भवू नये, म्हणून कोणत्याही पातळीवर काही प्रयत्न केले जात नव्हते; पण आता या सरकारने कायम स्वरूपी यंत्रणेच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा केलेला निर्धार महत्त्वाचा आहे. तो प्रत्यक्षात लवकरात लवकर येईल, हीच अपेक्षा.

आम्हाला ना आर्किमिडीज कळला, ना कावळा कळला


महाराष्ट्रात सर्वत्र तुफान पाऊस झाला. अनेक शहरांतून पावसाचे पाणी तुंबले. अनेक शहरे पाण्याखाली गेली. सांगली, कोल्हापूर, चिपळूण ही शहरे पाण्याखाली गेली. मुंबईत तर पाणी साचण्याचे प्रकार दरवर्षीच घडतात. नेमेची येतो मग पावसाळा त्याप्रमाणे नेमेची होते इथे तुंबई असे समीकरण झाले आहे. कुठे धरणाचे पाणी सोडल्यामुळे, तर कुठे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे, कुठे नदीला पूर आल्याने शहरात पाणी शिरले; पण हे समजण्यापूर्वी आम्ही लक्षात घेतले पाहिजे की, आमच्या लहानपणी आम्हाला हुशार कावळ्याची गोष्ट सांगितली ती आम्हाला कधी कळलीच नाही किंवा विज्ञानात आर्किमिडीजचा सिद्धांत मांडला गेला, तोही आम्हाला कळला नाही. त्यामुळे आम्हाला ना विज्ञान समजते ना तत्वज्ञान ना बोधकथा, अशी आमची अवस्था आहे, असे म्हणावे लागेल.


आर्कीमिडीजच्या सिद्धांताप्रमाणे अनियमीत वस्तूचे वस्तुमान मापण्यासाठी संपूर्ण भरलेल्या पात्रात तो अनियमित पदार्थ टाकल्यावर त्या पात्रातून बाहेर पडणारे पाणी हे त्या पदार्थाचे वस्तुमान असते. हा शोध लागल्यावर तो युरोका युरेका करत बाथ टबमधून विवस्त्रावस्थेत पळत सुटला. त्यानंतर हा सिद्धांत जगप्रसिद्ध केला; पण विज्ञानवादी आम्हाला तो कधी समजलाच नाही का? यावर्षी पाऊस खूप झाला असे आपण म्हणतो. हवामान खाते सरासरी इतका पाऊस झाला किंवा होणार असे म्हणते. थोडाफार पाऊस कमी जास्त होत असतो; पण खूप पडतो असे काही नाही. पण पडल्याचे भासते मात्र याचे कारण आर्किमिडीजचा सिद्धांत. याचे कारण आमच्या हुशार कावळ्याने, तहानलेल्या कावळ्याने सांगितलेली गोष्ट.

कावळ्याला तहान लागलेली असते. तो खूप उडतो, पाणी शोधतो. शेवटी त्याला कुठेतरी एक रांजण दिसते; पण रांजणाच्या तळाशी पाणी असते. तिथपर्यंत तो पोहोचू शकत नसतो. शेवटी तो एक एक खडा त्या रांजणात टाकतो आणि हळूहळू पाणी वर येते. पात्रातून पाणी वर येण्यासाठी दगड टाकले पाहिजेत हे आमच्या इसापनितीतील किंवा बोधकथांमधील कावळ्याला आर्किमिडीजच्याही आधी माहिती होतं. तो त्याची तहान भागवतो. पात्रात दगड टाकले की, पाणी वर येणार हे कावळ्याला समजते, पात्रात कोणतीही अनियमीत वस्तू टाकली की, पात्र पाणी बाहेर फेकणार हे आर्किमिडीज सांगतो; पण कोणासाठी? त्यांनी सांगितलेले आम्ही ऐकणार नसू, त्याचा अर्थ समजून घेणार नसू, तर त्या विज्ञानाला काय अर्थ आहे? त्या बोधकथेला तरी काय अर्थ आहे?


आज प्रत्येक शहरांची अवस्था हीच झालेली आहे. नदीकाठावर, ओढ्यांच्या काठावर, पाणस्थळांच्या काठांवर इतकी अनियमीत बांधकामे होत आहेत की, त्यांचे आक्रमण, अतिक्रमण पाण्याच्या पात्रांवर होत आहे. नदीपात्रांवर होत आहे. बांधकामांमुळे नदीच्या पात्रांची रुंदी कमी झाली की, पाणी बाहेर फेकले जाणार आणि ते अर्थातच शहरात घुसणार. हाच तर आर्किमिडीजचा सिद्धांत आहे. हीच तर तहानलेल्या कावळ्याची बोधकथा आहे.

पण प्रत्येक शहरातून तळाशी गेलेल्या नदीपात्रात आम्ही कावळ्याप्रमाणे नजर ठेवून एकेक बांधकामाचा खडा टाकला आणि तळाला गेलेले पाणी वर ओढून घेतले. कावळ्यानं एका डोळ्यानं जे शिकवलं ते आम्ही दोन डोळ्यांनी उघडपणे नाही समजू शकलो का? भरलेल्या पात्रात कोणतीही वस्तू पडली की, त्याच्या आकारमानाइतका द्रव बाहेर फेकणार. हे सांगण्यासाठी नग्नपणे धावत सुटलेल्या आर्किमिडीजचा सिद्धांत आम्हाला समजला नाही. आम्हाला अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडावे लागले. याचा नेमका अर्थ आम्ही कधी समजून घेणार आहोत?


माणसं वाढली. लोकसंख्या वाढली. राहण्याची जागा अपुरी पडली. बांधकामे वाढली; पण ही वाढलेली बांधकामे नदीच्या पात्रात, खाडीत, पाणस्थळाच्या काठावर केल्यामुळे पाणी आपल्याभोवती वेढले जाऊ लागले हे आम्हाला का नाही समजले? जमिनीत मुरणारे पाणी जमिनीत न मुरता नदी, नाले, ओढे यांच्या दिशेनेच वाहू लागले, कारण आम्ही रस्ते हे सिमेंट-काँक्रीटचे केले. टायर पंक्चर होऊ नये, पोटातलं पाणी हालू नये, म्हणून रस्ते काँक्रीटचे केले; पण पोटातलं पाणी हालू नये म्हणता-म्हणता पाण्यानेच आम्हाला इतके हालवून सोडले की, पोटाला खायलाही काही मिळणार नाही इतके बेघर केले. हे कशानं झालं?, तर आम्ही नदीपात्रात बांधकामे केली, आम्ही पाण्याचे प्रवाह बदलले, आम्ही अतिक्रमणं केली, आम्ही कावळ्याचा बोध घेतला नाही, आम्ही आर्किमिडीजचा सिद्धांत समजून घेतला नाही, म्हणून हे सारे घडले आहे. पाऊस आहे तितकाच आहे. थोडाफार कमी जास्त; पण आता दिवसेंदिवस ही अशीच कोंडी होत राहणार, कारण पात्रातील अनियमित आकाराच्या वस्तू म्हणजे वास्तू, रांजणातील पडणारे खडे म्हणजे बांधकामे ही वाढतच जाणार. पाणी वर येतच राहणार. रांजण मोकळा ठेवायचा की दगडांनी भरलेला हे आपल्या हातात आहे.

आज ज्या-ज्या शहरात पाणी साचले आहे, जी शहरे पाण्याखाली गेली आहेत तेथील नदी काठावर, पात्रात किती अतिक्रमणे आहेत, किती अनावश्यक बांधकामे आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. कोणत्या आधारावर या बांधकामांना परवानगी स्थानिक संस्थांनी दिली हे तपासणे गरजेचे आहे. याचवेळीच आॅडीट केले नाही, तर दरवर्षी जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात आम्हाला अशा शोकसागरात बुडावे लागेल. दु:खाचे अश्रू ढाळावे लागतील.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कौतुकास्पद कामगिरी


गेले दोन दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील परिस्थिती पाहिली आणि प्रत्यक्ष जाऊन तेथील पूरग्रस्तांना जो दिलासा दिला आहे ती अत्यंत कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. शनिवारी तळीये रायगडचा दौरा केला, तर रविवारी चिपळूणचा दौरा करून प्रत्यक्ष संपर्कातून सामान्य नागरिकांना दिलेला दिलासा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचवेळी कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळाला रविवारी भेट दिली. या सर्व पिडीतांना केंद्राकडून योग्य ती मदत दिली जाईल, याचा अहवाल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. पंतप्रधानांनी खास आपल्याला इकडे पाहणी करण्यासाठी पाठवले आहे हे सांगितले. यातून केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारे जनतेला दिलासा देण्यासाठी, जनता संकटात असताना मदतीला धावून आली हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारची ही कौतुकास्पद कामगिरी आहे हे निश्चितच.


विशेषत: परिस्थितीचे भान किंवा तारतम्य कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी दाखवून दिले. काही वाहिन्यांचे पत्रकार विनाकारण टीका करण्यास भाग पाडत होते. प्रश्न विचारून नारायण राणे, फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास भाग पाडत होते; पण त्यावेळी फडणवीस आणि नारायण राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही ती वेळ नव्हे. आधी लोकांना मदत देणे महत्त्वाचे आहे. उगाच टीका वगैरे करायची नाहीये. राज्य सरकार, प्रशासन मदतीला धावून आले आहे. केंद्रानेही मदतीसाठी लष्करापासून सर्व दले पाठवली आहेत. त्यामुळे टीका करण्याची, राजकारण करण्याची ही वेळ नाही, माध्यमांनीही ती करू नये. अगोदर या लोकांच्या मदतीला, पुनर्वसनाला प्राधान्य दिले पाहिजे हे ठणकावून सांगितलेही फारच कौतुकास्पद अशी कामगिरी आहे.

कोरोनाची परिस्थिती असतानाही, गर्दी करण्यास प्रतिबंध असतानाही कसलीही पर्वा न करता रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणच्या दौºयावर आले. त्यांच्यासमवेत मंत्री उदय सामंत, भास्कर जाधव असे नेते होते. पोलीस फाटा, शासकीय अधिकारी, नागरिक अशी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत सर्व नागरिकांशी त्यांनी संवाद साधला आणि जनतेला दिलासा दिला हे फार महत्वाचे आहे.


शनिवारीही तळीये या गावात गेल्यावर बाधितांना दिलेला दिलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. आधी तुम्ही स्वत:ला सावरा बाकीचं सगळं सरकारवर सोडा. सर्वांचंच पुनर्वसन आम्ही करणार आहोत हा दिलेला दिलासा फार म्हणजे फार महत्त्वाचा होता. त्यात आत्मविश्वास होता. आपण पुनर्वसन करू शकतो, या नागरिकांना मदतीसाठी धावू शकतो हा विश्वास मुख्यमंत्र्यांमध्ये दिसत होता. तो विश्वास आतून आलेला होता. प्रत्यक्षात ही परिस्थिती पाहिल्यावर त्यांना गहिवरून आलं होतं. लोकांचं दु:ख पाहून ते अत्यंत गहिवरले होते; पण चेहºयावर दु:ख न दाखवता त्यांनी जो आत्मविश्वास दाखवला तो फार महत्त्वाचा होता. आम्ही पुनर्वसन करणारच आहोत, तुम्ही फक्त सावरा आता. आपलं दु:ख गिळा आणि नव्याने जगण्याचा निर्धार करा हा विश्वास फार महत्त्वाचा होता. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे तो उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अक्षरश: सत्यात उतरवलेला दिसला. आता रडायचं नाही, लढायचं. असं म्हणत तुमचा कणा मोडलेला नाही, आम्ही तुमच्या पाठीवर थाप मारणार आहोत, तुम्हाला उभे करणार आहोत, लढण्याचे बळ देणार आहोत, त्यासाठी तुम्हाला सावरले पाहिजे हा विश्वास त्यांनी अत्यंत ठामपणे दिला. त्याचा परिणाम इतका जोरदार झाला की, पाच तासांच्या आत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या गावाचे पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून केले जाईल हे जाहीरही करून टाकले. ही तत्परता फार महत्त्वाची होती. या कामगिरीत संपूर्ण ठाकरे सरकारने बाजी मारली आणि या दु:खद परिस्थितीत जनतेची मने जिंकली. मते जिंकणे सोपे असते; पण मने जिंकणे महत्त्वाचे असते; पण ती कौतुकास्पद कामगिरी उद्धव ठाकरे यांनी करून दाखवली.

बºयाचवेळा विविध वाहिन्या नेत्यांकडून न बोललेली वक्तव्ये दाखवून चुकीचा संदेश पोहोचवतात. चुकीचे बोलण्यास भाग पाडतात; पण अशा वाहिन्यांना चुकीचे काम करू न देता त्यांना वठणीवर आणण्याचे कामही केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. पाऊस, नैसर्गिक आपत्ती ही काही सरकारने लादलेली संकटे नसतात. पाऊस जास्त पडला, अतिवृष्टी झाली, नैसर्गिक आपत्ती आली की, सरकारवर टीका करून मोकळे व्हायचे आणि शासन कसे दुर्लक्ष करत आहे, कसे बेजबाबदार आहे, अशा बातम्या दाखवत कुठेतरी घाबरवून सोडणारे कॅमेरे फिरवत रहायचे. आता कोणतीही दरड कोसळली, पाऊस पडला, तर त्याला सरकार जबाबदार नसते; पण संकटानंतर तातडीने मदत पोहोचणे, नागरिकांची दखल घेणे महत्त्वाचे असते. सरकारने ते केले आणि विनाकारण टीका करणाºयांची तोंडंही बंद केली. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. केंद्रातील आणि राज्यातील राज्यकर्ते परस्पर विरोधी असले, तरी या परिस्थितीत दोघांनी दाखवलेला समंजसपणा, मदतीला धावून येण्याची केलेली कमाल ही कौतुकास्पद कामगिरी आहे.

वारसदार

 


‘गावाकडनं निरोप आलाय’. प्रकाश बायकोला सांगत होता. त्यावर फणफणत त्याची बायको सविता म्हणाली, ‘पैसे हवे असतील... दुसरं काय काम असणार नायतर? यांची सदानकदा दरिद्री असत्या... आज काय पाऊस जास्त झाला, उद्या काय दुष्काळ पडला.... कधी समाधानानं यंदा भरपूर पीक झालंय कळवलं का इतक्या वर्षात.’


हे ऐकून प्रकाश चिडलाच. ‘लई बोललीस... तुझं ऐकून गेल्या पंधरा वर्षांत गावाकडं कदी गेलो न्हाय... आई-बाप होते तवा किमान जत्रंला तरी जात होतो. पण नंतर गावाकडचं तुटलं ते तुटलंच.’

‘काय उपेग हाय हो तुमच्या गावाचा? जमीन आहे मोप... पण त्याचा आपल्याला काय फायदा? तुमचा भाऊच तर ती पिकवतो आणि आपला संसार चालवतो. कधी पोतभर धान्य घिऊन जा म्हणून कळवलं का आपल्याला? मस्त पन्नास शंभर पोती धान्य येत असल. बाजारात जाऊन विकत असतील; पण कधी आपल्याला विचारलं का त्यांनी? त्या जमनीवर आपला बी हक्क हाय ना?’


‘अगं कसला हक्क अन् कसली जमीन घिऊन बसलीस? जमिनीचा हिस्सा त्यानं दिला, तरी आपण काय शेती करायला जाणार हाय का तिकडं? का गावाकडं ºहायला तुला आवडणार हाय? शेतात कसं पिकवतात यातलं काय तरी आपल्याला समजतंय का? मग कशापायी हा हट्ट?’ प्रकाशनं समजावण्याचा प्रयत्न केला. तशी फणकारत सविता म्हणाली, ‘काय नाय....जमिनीचा तुकडा मागाच त्यांच्याकडं... आपल्याला नसेल येत शेती करायला... पण आपण तो तुकडा विकून त्याचे पैसे करू शकतो ना?’

प्रकाश निरुत्तर झाला; पण गावाकडचा विषय आला की, नेहमी असाच संवाद असायचा. गावाकडं मदत करायची इच्छा असूनही बायकोमुळं त्याला कधी मदत करता यायची नाही. भाऊ रमेश आणि त्याच्या बायकोला हे सगळं माहिती होतं; पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. दरवर्षी जत्रा असली, गणपती गौरी असले की, एखादं पत्र पाठवून जत्रेला या, ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी या, गौरीगणपतीच्या कुळाचाराला या असे निरोप यायचे; पण प्रकाश आणि त्याची बायको मुलं कधी यायची नाहीत; पण रमेशनं आपलं कर्तव्य कधी सोडलं नव्हतं. त्यांना यायचे तर येतील; पण आपलं आमंत्रण देण्याचं कर्तव्य तो कधी विसरला नाही.


आज असाच एक निरोप आला होता. गावात सरकारकडून अनेक प्रकल्प येत आहेत. जमिनीला चांगला भाव मिळेल. तुलाही तुझा हिस्सा मिळेल. एकदा सवड काढून गावाकडं येऊन जा.

डोंगराच्या बाजूला वसलेलं गाव. आता नव्या विकासकामात या गावातून महामार्ग जात होता. डोंगर जणू कापायलाच सुरुवात झाली होती. डोंगराकडेच्या बाजूला काही गावं होती, त्यांनी विस्थापित न होता तिथंच राहणं पसंत केलं होतं. त्यापैकीच रमेशचं एक घर होतं. रमेशचं वारंवार आमंत्रण येऊनही प्रकाश बायकोमुळं जाऊ शकत नव्हता. गेल्या पंधरा वर्षांत भावाभावांचं दर्शन झालं नव्हतं.


शुक्रवारचा दिवस होता. गेल्या चार दिवसांपासून धो-धो पाऊस पडत होता. सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडत होता. तसा प्रकाशच्या गावातही पावसाने थैमान घातले होते. प्रकाश आणि सविता मुंबईतल्या खोलीत बसून टीव्ही पहात होते. आपल्या गावाकडं खूप पाऊस पडत होता हे पाहून प्रकाश थोडा चिंतेत होता. मध्येच आपल्या गावाकडं कसा दरवर्षी पाऊस असायचा, आम्ही लहानपणी पावसात कसा खेळायचो, आनंद घ्यायचो, भिजून आल्यावर कांबळ वाकळ घेऊन गरगटून कसे बसायचो, हे सगळं प्रकाश बायकोला सांगत होता. सविताला त्यात काडीचाही रस नव्हता. तिला मुळी ते गावाकडचे जगणेच रानटी वाटायचे. शहरात वाढल्यामुळे तिला मुंबई सोडून कुठेही जायचं नव्हतं. त्यामुळे निवृत्तीनंतर गावाकडं जायचं, असा विचार जरी प्रकाशनं बोलून दाखवला, तरी ती आकांडतांडव करायची. त्यामुळे प्रकाशनं असं बालपणात रमणं, लहानपणाच्या पावसातल्या आठवणी सांगणं, म्हणजे तिच्या दृष्टीने थट्टेचा विषय होता. ती त्याची टरच उडवायची.

शुक्रवारी रात्रभर पाऊस पडला. न भूतो न भविष्यती असा पाऊस पडला. सकाळी उठल्या उठल्या पुन्हा टीव्ही लावला आणि प्रकाश हादरूनच गेला, कारण टीव्हीवर बातमी झळकली होती की, आपल्या गावावर दरड कोसळली आणि आख्खं गाव गाडलं गेलं आहे. त्याला आतून भरून आलं. त्यानं ओरडतच सांगितलं, ‘अगं ए सविता... ऐकलंस का... अगं आपलं आख्ख गाव दरडीखाली गाडलं गेलं. गावातली सगळी माणसं गाडली गेली.’ तरीही सविताचा तोरा कमी झाला नाही. ती म्हणाली, ‘आपलं नाही.. तुमचं गाव... आपलं हेच गाव आता.’ असं म्हणत बाहेर आली. टीव्हीवर सतत गावाकडची बातमी दाखवत होते. प्रकाशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या.


सविता मात्र नाकं मुरडत होती. ‘आता समजलं ना? मी का गावाकडं जायचं न्हाई म्हणत होते ते? नशीब समजा आपण जित्तं हाओत ते.’

प्रकाश आतून कोसळला होता. त्याला सारखी भाऊ, वहिनी, भावाची दोन मुलं असा चार माणसांचा संसार डोळ्यापुढं येत होता. तो ताडकन उठला. ‘सविता चल... आपल्याला जायला हवं... गावाच्या मदतीला जायला हवं.’


तशी सविता पुन्हा फणकारली, ‘आता काय हाय तिथं? सगळं गाव गाडलं गेलं ना? कुणाची मदत करणार आहात तिथं जाऊन. गप्प बसा इथंच. इतक्या पावसाचं तिकडं जाऊन काय करायचं हाय?’

प्रकाशचा जीव कळवळला. भाऊ अंतरवैरी ठरला. आता घरच्या कुणाचं अंत्यदर्शनही आपल्याला होणार नाही, म्हणून कळवळला आणि बिछान्यावर जाऊन झोपला. सविता मात्र टीव्हीपुढेच होती. इतक्यात बातमी आली, ‘मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या वारसदारांना सरकारतर्फे ५ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधानांनीही प्रत्येकी दोन लाख जाहीर केले आहेत. तिचे डोळेच दिपून गेले. दीर जाऊ आणि पुतणे चार माणसं खपली असतील, तर २८ लाख रुपये मिळतील. खूश झाली.


टीव्ही बंद केला. गुपचूप प्रकाशपाशी आली. रडवेला चेहरा केला. ‘अहो, ऐकलंत का? मला पटलंय तुमचं म्हणणं. चला आताच्या आता आपण तिथं जाऊ. आपल्या गावात इतकी वाईट घटना घडली असताना, आपण इथं थांबणं बरं नाही. स्पेशल गाडी करून जाऊ; पण लगेच जायला हवं.’

प्रकाशला बरं वाटलं. त्यानं समाधानानं तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, खरंय... आपण लगेच निघू. प्रकाशला गावाकडं जाऊन मदत करायची दिसत होती, तर मृतांच्या वारसांना मिळणारा आर्थिक मदतीचा पैसा सविताला दिसत होता. चार प्रेतं सापडतील आणि आपण हंबरडा फोडून आपले नातेवाईक असल्याचे सांगू आणि २८ लाख रुपये मिळवू हे एकच स्वप्न सविताच्या डोळ्यात तरळत होतं.


- प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा


9152448055

\\

एकजूट महत्त्वाची

 अग्रलेख


राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून कोसळणाºया मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे हाहाकार उडाला असून, चिपळूण, खेड, महाडला महापुराचा वेढा बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोकण जलमय झाले आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुराने दाणादाण उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात ४८ तासांत तब्बल ३०० मिमी तुफानी वृष्टी झाल्याने चिपळूणसह परिसरातील ७ गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. हजारो घरे पाण्याखाली गेली असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. बचावकार्य युद्धस्तरावर सुरू झाले आहे. मदतकार्यासाठी एनडीआरएफची पथके बोटींसह पाठविण्यात आली आहेत. कोकणासह नाशिक जिल्ह्यात आणि विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही धो-धो पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने लोकांच्या मनात धास्ती भरली आहे. महापुराचे चढलेले पाणी उतरणार कधी आणि पुरात अडकलेल्यांची सुटका होणार कधी, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. सरकार योग्य प्रकारे मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही या क्षणी मदतीसाठी धावत आहेत. आपापल्या परिने योग्य ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी हा प्रश्न राजकारणाचा न करता एकजुटीने हातात हात घालून मदतीला उतरण्याची गरज आहे. गुरुवारी दरड कोसळण्याच्या प्रकारानंतर केंद्राने आपली मदत तातडीने पोहोचवली, तसेच राज्यानेही त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण सरकारच्या नावाने ओरड करण्याचा प्रयत्न करू नये, असे वाटते.


प्रत्येक गोष्ट सरकारनेच करायची असते, असे नाही. सरकारला आपणही मदत करायची असते, असा विचारही करायला हवा. कोणतेही संकट सरकार लादत नसते. सरकार चालवणारी माणसेच आहेत. त्यामुळे विनाकारण शासन, प्रशासन यांच्या नावाने ओरड करणे टाळले पाहिजे. विनाकारण टीका करणेही टाळले पाहिजे. संकटाच्या परिस्थितीत एकजुटीने सर्वांनी तोंड देणे महत्त्वाचे आहे. आम्हीच पहिल्यांदा मदतीला धावून आलो, असा डांगोरा कोणी कृपा करून पिटू नका. ही ती वेळ नव्हे. आज महाराष्ट्रावर आलेले पावसाचे, अतिवृष्टीचे, जलप्रलयाचे, दरडी कोसळण्याचे, भूस्खलनाचे जे काही संकट आले आहे ते नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याला सर्वांनी एकजुटीने तोंड देणे हेच खरे आहे.

कोकणात पावसाने २५ जणांचे बळी घेतले असून, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरड कोसळल्याने ३६ जणांना प्राण गमवावे लागले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाटण तालुक्यातही दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. तेथे १५ जणांचा मातीच्या ढिगाºयाखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईमध्येही पाऊस आपले रौद्र रूप दाखवत आहे. या अभूतपूर्व घटनेची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. शनिवारी ते घटनास्थळाला भेटही देऊन पूरग्रस्तांचे, पिडीतांचे सांत्वनही करून आले आहेत. घटना घडत असताना ते स्वत: पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: मंत्रालयात दाखल झाले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संकटाला राज्याने सामोेरे जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. तथापि, मदतीसाठीचे सरकारी हात तोकडे पडू लागले आहेत. अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्थांनी सेवाभावी वृत्तीतून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज भासू लागली आहे. अतिवृष्टी बहुतांश महाराष्ट्राला झोडपून काढत असली, तरी कोकणावरचे संकट अधिक गहिरे आहे. गेली दोन-तीन वर्षे कोकणाला निसर्गाचे एका पाठोपाठ एक फटके बसत असून, चिपळूण व परिसराला तुफान पावसाने दिलेला तडाखा भयंकरच आहे. अहोरात्र सरकार, मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून काम करत असताना, अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे की, आपण सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे.


विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दिल्लीत असलेल्या खासदारांनी यावेळी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून संकटाची कल्पना दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही लागेल ती मदत करू, असा विश्वास दिला. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यात यावरून सतत चर्चा होत होती. केंद्राकडून एनडीआरएफ, तीनही लष्करी दले मदतीसाठी तातडीने धावून आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही चांगल्या हालचाली केल्या आणि वेळेवर मदत पाठवली. हेच भारतातील चांगल्या लोकशाहीचे, सुंसंस्कृतपणाचे लक्षण आहे. या परिस्थितीचा, या परिस्थितीत राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना आता कोणीच डगमगायचे कारण नाही.

सर्वसामान्य माणसांपासून विरोधकांपर्यंत आपण नेहमीच प्रत्येक गोष्टीला सरकारला जबाबदार धरत असतो. दोष देत असतो. टीका करत असतो; पण जेव्हा सरकार चांगले काम करते, मदतीसाठी धावाधाव करते, तेव्हा त्या चांगल्या कामाचेही कौतुक करण्याचे मोठेपण प्रत्येकाकडे असले पाहिजे. या अतिवृष्टीच्या काळात मदतीसाठी सरकारने केलेली धावाधाव योग्य अशीच आहे. जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा तेव्हा सर्व जण हातात हात घालून मदतीला धावतील, असेच प्रयत्न सरकार करत असते. त्यामुळे या परिस्थितीचा कोणालाही गैरफायदा घेण्याची अजिबात संधी मिळता कामा नये. त्यासाटी एकजूट ही महत्त्वाची आहे.

सिद्धहस्त नाटककार विद्याधर गोखले


विद्याधर गोखले हे नाव घेतले की, समोर येते मंदारमाला ते बावनखणी असा संगीत नाटकांचा प्रवास. मराठी संगीत नाटकातील मरगळ झटकून खºया अर्थाने संजीवनी देणारे नाटककार म्हणून विद्याधर गोखले यांच्याकडे पहावे लागेल. हाडाचे पत्रकार असलेल्या गोखले यांनी पत्रकारितेतील लेखनात नाट्यमयता आणून रंजकता निर्माण केली होती, तर नाटकात वस्तुस्थितीचे भान सांभाळत प्रेक्षकांना आवडतील असे विषय दिले होते. ते खºया अर्थाने सिद्धहस्त लेखक होते. त्यांच्या या लेखणीचा सन्मान १९९३ ला झालेल्या सातारच्या ६६ व्या साहित्य संमेलनात झाला. या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर गेल्या २८ वर्षांत इतके सुंदर साहित्य संमेलन झाले नाही. नंतर साहित्य संमेलने ही वादाची झाली, पण या साहित्य संमेलनात खºया अर्थाने लेखक, कलाकार, साहित्यिक यांचा मेळा होता. तो विद्याधर गोखले यांच्या नावाचा दबदबा होता, आदर होता. कधी साहित्य संमेलनाला न जाणारे व. पु. काळे एकीकडे व्यासपीठ गाजवत होते, तर एकीकडे शांताबाई शेळके. हृदयनाथ मंगेशकर, लतादीदी यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम, अशी पर्वणी या संमेलनात मिळाली ती नंतर कधीच नाही. ते साहित्य संमेलन विद्याधर गोखले यांच्या नावावर नोंदवले आहे.


अमरावतीहून मुंबईत आल्यावर काही काळ ते शिक्षक म्हणूनही काम करत होते. न. चि. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, शि. म. परांजपे यांच्या लेखनाचा त्यांनी खास अभ्यास केला होता. विद्याधर गोखले यांचे लेखन मात्र गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे अधिक झुकणारे होते. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत. लेखन सालंकृत करण्यावर त्यांचा अधिक भर असे. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे त्यांचा अधिक कटाक्ष होता. त्यांनी झंझावात या कादंबरीशिवाय अनेक नाटकांचे लेखन केले. त्यामध्ये संगीत अमृत झाले जहराचे, इब्राहिमखान गारदी, संगीत चमकला ध्रुवाचा तारा, संगीत जय जय गौरीशंकर, जावयाचे बंड, संगीत पंडितराज जगन्नाथ, बरसते सूर्यातून चंद्रिका, बावनखणी, संगीत मदनाची मंजिरी, संगीत मंदारमाला, संगीत मेघमल्हार, रूपरंजनी, राणी रूपमती, साक्षीदार, सुंदरा मनामध्ये भरली, संगीत सुवर्णतुला, संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकांचा समावेश आहे. ही सर्वच नाटके अतिशय सुंदर आहेत, पण यातील मंदारमाला हे नाटक संगीत रंगभूमीसाठी मैलाचा दगड म्हणून ओळखले जाते. जय जय गौरीशंकर या नाटकाने कमाल केली, पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी या नाटकांनी संगीत नाटकांना ऊर्जा दिली तर बावनखणी या संगीत नाटक आता बंद होणार की काय अशा परिस्थितीत, विनोदी फार्सिकल नाटकांच्या लाटेत प्रेक्षकांना संगीत नाटकांकडे खेचले. त्यामुळे विद्याधर गोखले यांच्या नाटकांनी दोन दशके संगीत रंगभूमीला सोनेरी दिवस दिले होते.

विशेषत: १९५५-६० या काळात मरगळलेल्या अवस्थेत असलेली मराठी संगीत रंगभूमी, नाटककार विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ आणि सुवर्णतुला या दोन लागोपाठ आलेल्या संगीत नाटकांनी पुन्हा जागृत केली, मात्र त्या रंगभूमीला विद्याधर गोखले यांच्या संगीत मंदारमालाने खºया अर्थाने नवसंजीवनी दिली.


संगीत मंदारमालाचे कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यात घडले, अशी मध्यवर्ती कल्पना आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदिशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले यांनी कल्पनेची जोड देत या नाटकाचे कथानक लिहिले. या नाटकाद्वारे, मंदार या कमालीचा स्त्रीद्वेष्टा असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणा‍ºया आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास रसिकांसमोर आला. त्याला रसिकांनी उदंड साथ दिली. १९६३ च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या भारत नाट्य प्रबोधन संघाने हे नाटक रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग रंगमंदिरतर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या नाट्यमंदारने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधी कधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२०० हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली. चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांच्यातील बसंत की बहार आयी ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले, तरी प्रेक्षक जागचे हलायचे नाहीत.

सोऽहम हर डमरू बाजे ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले.


एकूणच नाट्यकलेचं दैवत म्हणजे नटराज अर्थात नटेश्वर भगवान शंकर. शंकराचं गुणगान करूनच संगीत नाटकाची सुरुवात होते. डमरूच्या निनादातूनच आद्य संगीताची निर्मिती झाली, असं मानलं जातं. विद्याधर गोखले यांनी त्यांच्या सर्वच नाटकांत शंकराचं गुणगान करणारी अनेक नाट्यपदं लिहिली होती. परंतु संपूर्ण नाटकच भगवान शंकर आणि पार्वती अशा कथानकावर लिहिण्याचे त्यांच्या मनात घोळत होते. हे नाटक शिवलीलामृतातील १४ व्या अध्यायाच्या आधारे लिहिलं आहे. कैलासाचा रम्य परिसर आणि गोमंतकीय निसर्गसौंदर्य अशा पार्श्वभूमीवर हे नाटक घडत जातं. किंबहुना भगवान शंकराच्या आणि पार्वती अर्थात गौरीच्या गोमंतकीय वास्तव्यामुळे मंगेशी आणि शांतादुर्गा ही जागृत देवस्थानं गोमंतकात स्थापन झाली, त्याचंच हे कथानक. या नाटकासाठी भव्यदिव्य वास्तववादी नेपथ्य, त्या काळातील नंदी, शृंगी, भगवान शंकर, पार्वती यांची अत्यंत अभ्यासपूर्ण वेशभूषा, रंगभूषा, निसर्गातील संगीताचा चपखल वापर केला गेला. तसेच या नाटकासाठी आगळंवेगळं संगीत देणारा संगीतकार, कुशल नृत्यदिग्दर्शक आणि यातील सात व्यक्तिरेखा निवडणे हे सर्वच शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. गौरीशंकरच्या तालमी सुरू झाल्या. ललितकलादर्शचे वाचिक आणि आंगिक अभिनयात अतिशय मातब्बर असे नटवर्य मामा पेंडसे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी होती. मुळात पौराणिक नाटक आणि अण्णा गोखल्यांची संस्कृतप्रचुर ओघवती भाषा असल्यामुळे नाटकाच्या वाचनाला मामांनी महत्त्व दिले होते.

संगीत नाटक असूनदेखील या नाटकातली मुख्य नायिका अर्थात पार्वती ही गाणारी नाही, तर ती भिल्लिणीच्या वेशात बहारदार नृत्य करते आणि शंकराला पुनश्च वश करून कैलासावर परत आणते. आजच्यासारखा विविध प्रसारमाध्यमांचा वापर त्या काळी नसतानाही रसिकांमध्ये या नाटकाचा प्रचंड बोलबाला झाला होता. १४ आॅगस्ट १९६६ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये शुभारंभाचे सकाळ, दुपार, रात्र असे तीन प्रयोग दणक्यात हाऊसफुल्ल सादर झाले. नाटककार विद्याधर गोखले यांच्याबद्दल लिहिण्यासारखं बरंच आहे, पण संगीत रंगभूमीला त्यांचे योगदान इतके मोठे आहे की, त्यासाठी जागा कमी पडते, त्यामुळे थांबावे लागते.


प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा

9152448055

जन्माच्या दाखल्याबरोबरच दहावीचे प्रमाणपत्रही दिले जावे


सध्याची शिक्षण व्यवस्था आणि दहावीचा निकाल पाहता आता एकच अपेक्षा करावीशी वाटते ती म्हणजे जन्माच्या दाखल्याबरोबरच दहावीचे प्रमाणपत्रही दिले जावे. असे तसे पास करायचे आहे, तोंड बघून, गुणवत्ता न पाहताच मुलांना पुढे ढकलायचे आहे, मग जन्माबरोबरच जन्मदाखला, कुंडली, दहावीचे प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळावे. यातला जन्मदाखला फक्त शाश्वत असेल. कुंडली कोणाचेही भविष्य सांगू शकणार नाही. कारण आज ज्याप्रकारे मूल्यांकनातून गुणांकन झाले आहे ते पाहता कसलेही आकलन झालेले दिसत नाही. शिक्षणाची इतकी दुरावस्था किंवा बकासूर कधी झालेला दिसला नव्हता. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावून त्यांना वरच्या वर्गात जाण्याचा सिग्नल दिलेला आहे, पण ट्रॅफिक जाममुळे गाडी पुढे सरकणार नाही हे वास्तव आहे. त्याचा अर्थ या सिग्नलचा जसा काही उपयोग नाही तसाच या दहावीच्या प्रमाणपत्राचाही काही उपयोग नाही. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे म्हणजे पुनश्च दहावीची परीक्षाच देणे आहे. त्यामुळे हे गुण, हे प्रमाणपत्र नाममात्र आहे, बिनकामाचे असणार आहे.


गेल्या पंधरा वर्षांत जेवढी सरकारे आली आणि जेवढे शिक्षण मंत्री आले त्या काळात शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे गिनिपीग करून टाकले आहे. रात्र संपली, पण उजाडलं कुठे अशी अवस्था विद्यार्थी वर्गाची झाली आहे. दहावी पास झालो, पण अकरावीत जाऊ शकत नाही अशी ही अवस्था फार भीषण असणार आहे. अर्थात हे काही कोविड-१९ किंवा कोरोना आला म्हणून घडलेले नाही. गेल्या पंधरा वर्षांतच हे शिक्षण खात्याने वाटोळे केलेले आहे. २०१४ ला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेल्यावर राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा होती, पण त्यानंतर तर शिक्षणाचा विनोदच होत गेला.

खरं तर त्या काळात विनोद तावडे यांनी शिक्षण खात्याचा कारभार सुरू केल्यावर त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, कारण त्यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा यांनी केलेली घाण ते काढतील अशी अपेक्षा होती, पण विनोद तावडे हे त्यांच्यापुढे एक पाऊल पुढे टाकायला निघाले. काँग्रेसने आठवीपर्यंत मुलांना नापास करायचे नाही असे आदेश काढून बेरोजगार आणि बिनडोक मुलांचा कारखाना काढला. त्या कारखान्याचे विस्तारीकरण करून विनोद तावडे यांनी शिक्षणाचाच विनोद करून टाकला. आता कोविडच्या निमित्ताने सरकारने दहावीत सरसकट सगळ्यांना पास केले. खिरापतीसारखे मार्क वाटले. कोणीच नापास नाही. आता या मुलांचे भवितव्य काय असणार आहे? जागतिक स्पर्धेत ही मुले कशी टिकणार आहेत? शाळा आॅनलाईन घेतल्या, परीक्षा का आॅनलाईन घेतल्या नाहीत. अकरावी प्रवेशाच्या परीक्षाच घ्यायच्या होत्या, तर दहावीच्या का घेतल्या नाहीत? तेव्हाच दहावीचे फॉर्म भरताना प्रत्येकाकडून तुम्हाला कोणत्या साइडला जायचे आहे त्याचा अर्ज भरून घेऊन दहावीची परीक्षाच सीईटीप्रमाणे घेतली असती, तर आॅनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचे समाधान मिळाले असते. ही शिक्षण खात्याने केलेली फसवणूक आहे. या मार्कांना काडीचाही अर्थ नाही. अकरावी प्रवेशासाठी प्रत्येक कॉलेज सीईटीचा नाही, तर भरमसाट देणग्यांचा आधार घेणार. याचा परिणाम गुणवंत विद्यार्थ्यावर होणार. एक फार मोठी सामाजिक दरी विषमता निर्माण करण्याचे काम यातून सरकार करणार आहे हे नक्की.


त्यामुळे आता इथून पुढे मुलगा शिकला काय, नाही शिकला काय, काही फरक पडणार नाही. लग्नात मुलगा किमान दहावी शिकलेला आहे हे सांगण्यासाठी जन्माबरोबरच दहावी पासचे दाखले देण्याचे काम सरकारने सुरू करावे, असे वाटते. आजच्या परिस्थितीत पुढे सगळीजण जाऊ शकणार नाहीत. एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून मुकणार नाही असे सरकार आज ठामपणे सांगू शकत नाही. आठवीपर्यंत सरसकट पुढे ढकलली. तीच पिढी दहावीत पोहोचली आणि तिथेही कोरोनाच्या निमित्ताने बिनपरीक्षा पास होण्याची संधी मिळाली, पण या पास होण्याला किंवा चांगले मार्क मिळण्याला काडीचीही किंमत नाही. या निकालाने ३५ टक्केवाला आणि १०० टक्केवाला एकाच पातळीवर आले आहेत. वरच्या वर्गात गेला, पण अकरावीत नाही गेला. दहावी पास झाला, पण अकरावीला प्रवेश मिळाला तरच तो खºया अर्थाने पास झाला म्हणता येईल. त्यामुळे शिक्षणाचा फारच मोठा खेळखंडोबा या व्यवस्थेने केलेला आहे. त्यामुळे आता जन्मदाखल्याबरोबरच दहावीचे सर्टिफिकेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला तर आश्चर्य वाटायला नको.

आॅनलाईन शिक्षणच सगळी शाळा, कॉलेज देणार आहेत तर सरसकट सर्वांना प्रवेश देण्यास काय हरकत आहे? आॅनलाईन शिक्षणाची प्रथा रूढ झाली असेल तर विद्यार्थी संख्येची मर्यादा काढून टाकावी. ज्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश पाहिजे त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश देण्याचे धोरण सरकारने घ्यावे. प्रत्येक जण आपल्या घरातूनच अभ्यास करणार आहे. मग सीईटीची गरज काय? आॅफलाईन शिक्षण असेल तर वर्गांची मर्यादा असेल. आसनक्षमता आहे. एका वर्गात ६० पेक्षा जास्त मुले बसणे अशक्य असेल, पण आॅनलाईन शिक्षणाला याची काहीच गरज नाही. त्यामुळे एकतर आॅनलाईन शिक्षण बंद करा किंवा सरसकट अकरावी प्रवेश द्या. काय गरज आहे अकरावी प्रवेश परीक्षेची. हे सगळंच चुकीचं होतंय. अकरावीची प्रवेश परीक्षा घेणे याचा अर्थ दहावीच्या या गुणांना काडीमात्र अर्थ नाही यावर केलेले शिक्कामोर्तब आहे.

मुलाधार व्यास


महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतीशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.


व्यासांचे कौरव-पांडव या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये, म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उध्वस्त झाली असेल, त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले, तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते.

गीतेच्या प्रारंभी जी अर्जुन-विषादाची वेदना प्रगटते, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेला उपदेश आहे. व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांना आपली धर्मिक आणि सांस्कृतिक परंपरा त्यामुळेच अतिउच्च स्थानी सन्मानाने बसविते.


म्हणौनि भारतीं नाहीें तें न्हवे चि लोकीं तिहीें एणें कारणें म्हणिपे पाहीें व्यासोच्छिष्ट जगत्रय॥ असे ज्ञानोबा म्हणतात. व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. सर्व ज्ञानांचे मूळ असल्यामुळेच त्यांना गुरू म्हटले जाते. त्यांच्या स्मरणातून आपल्या सद्गुरूची पूजा केली जाते. आपली गुरू परंपरा फार मोठी आहे. भगवान शंकर त्यांचे शिष्य विष्णू त्यांचे शिष्य ब्रह्मा अशी ती सुरू होते.

त्यानंतर भगवान श्री राम, भगवान श्रीकृष्ण हे देवावतार असूनसुद्धा गुरूअंकित आहेत. जो सकल जिवास चांगले शिकवितो. सुसंस्कार देतो तो गुरू. सत् म्हणजे सत्य परमात्म्याची भेट घालून देणारा, त्याला सद्गुरू म्हणावे. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू भेटतील; पण आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो. सद्गुरूपेक्षाही मोठा श्रीगुरू असतो. ज्ञानोबा माऊलींना एकनाथ महाराज श्रीगुरू म्हणूनच संबोधतात. एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वेर््े


याही पुढे गुरूची एक पायरी असते. ती म्हणजे जगद्गुरू. आद्य शंकराचार्य, तुकोबाराय आणि श्रीकृष्ण परमात्मा यांना जगद्गुरू ही उपाधी आहे, कारण ते सगळ्या जगाचे गुरू ठरलेले आहे. असा जगद्गुरू परमात्मा साक्षात भगवंत हा अर्जुनाजवळ होता आणि गंमत अशी की, अर्जुन वेड्यासारखे श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्रश्न करू लागला, कारण अर्जुनाकडे अहंकार उरला होता. उरलेला अहंकारच त्याचा मुखातून देवालाच ज्ञान शिकवू पाहात होता. वास्तविक पाहाता भगवान श्रीकृष्णाने धर्म, न्याय, नीती, नियम यांचा वस्तुपाठ अगदी लहान वयातच जगताला दाखवून दिला होता. देवकी आणि वसुदेवासाठी तो बाळकृष्ण झाला. कुमारींच्यासाठी तो गोकुळी गेला होता. लहान असतानाच पूतनेचा वध केला. गर्वाने फुगलेल्या इंद्रदेवाचा गोवर्धन उचलून अहंकार घालविला. लेकीबाळींना, मुलंमाणसांना त्रास देणारा कालिया त्याच्या डोक्यावर थयथय नाचून लहानपणीच यमसदनास पाठविला. गोकुळ नगरीवर आलेले संकट घालविण्यासाठी बारा गाव अग्नी प्राशन केला. बह्मदेवास वेड लावण्यासाठी गोमातेचं वासरू बनला. अत्यंत लहान वयातच कंस मामासारख्या अनेक राक्षसांना त्याने यमसदनास पाठविले. याच श्रीकृष्णाने गोकुळ नगरीत समाजकारण केले. मथुरेला जाऊन पक्के राजकारण केले, तेही समाजहितासाठी आणि द्वारकेत मात्र पूर्णपणे धर्मकारणच केले, कारण तिथे तो धर्माचा राजा होता व राजाचा धर्म पाळणारा म्हणूनच तो द्वारकाधीश झाला. हे सगळं अर्जुनाला माहीत होतं. तो बालपणापासूनच अर्जुनाचा जिवलग होता. युक्तीच्या सगळ्या गोष्टी देवाला माहिती होत्या. त्याने महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले, कारण युद्धामुळे होणारा संहार त्याला माहीत होता. तो टाळावा यासाठी तो प्रयत्नशील होता. हे युद्ध आप्तइष्टातच होऊन दोन्हीही बाजूंचे नुकसान होणार होते. या सर्व गोष्टींचा अनुभव श्रीकृष्णाला होता; पण तरीदेखील देवाला काहीच कसे कळत नाही. तो मला माझ्याच गुरूंच्या विरुद्ध लढायला भाग पाडतो. वरील सद्गुरू, गुरू, श्रीगुरू, जगद्गुरू या संज्ञेमध्ये गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे कुठेच बसत नाहीत. केवळ एक क्रूर, अनीतीची पाठराखण नाइलाजास्तव का होईना करावी लागते म्हणून ते अर्जुनासारखा उत्तम शिष्य असूनही त्याला मरण्यासाठी शत्रूच्या पक्षात उभे राहतात. ही धर्मनीती नाही; पण जे आपले गुरू आहेत, ज्यांच्याकडून मी विद्या घेतली, त्यांच्या वधास कारणीभूत होणे हे योग्य नाही. त्यांना मारून राज्य मिळविणे योग्य नाही त्यापेक्षा दयेचीच भिक्षा मागणे योग्य होईल. ते माझ्या नशिबाचे, रक्ताचे भोग समजून तसे करणे योग्य होईल; पण गुरू वधाच्या पापात पडणे योग्य होणार नाही अशी धारणा अर्जुनाची आहे. तसं पाहिलं, तर गुरूंचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरू हा संतकुळीचा राजा आहे. तो माय, बाप, बंधू, भगिनी, मित्र, सगा, सोरा अशा सगळ्या नात्यांचा सूत्रधार आहे. तो ब्रह्मनंद देणारा आहे. परमसुखद आहे. फक्त ज्ञानपूर्ती आहे. द्वंद्व असण्याचं काहीच कारण नाही, कारण गुरू हा त्याच्याही पुढे आहे. ज्ञानमूर्ती असल्याने त्याचे ज्ञान गगनासारखे विस्तीर्ण आहे. भावाच्या पलीकडे तो पोहोचलेला असल्यामुळे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. सच्चिदानंद असल्याने तोच सद्गुरू आहे. त्याला नमस्कार करून त्यांनाच आशीर्वाद संपादन करणे हे सर्वोत्तम आहे. हे जे सर्व अनुभवाचे ज्ञानभांडार व्यासांनी निर्माण केले त्यामुळे ते सदैव वंद्य झाले, म्हणून त्यांच्या नावाने गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.

लवचिक अभिनेता मेहमूद


हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी अभिनेते होऊन गेले; पण विनोदी अभिनेता असूनही नायक, खलनायक, निर्माता अशा अनेक भूमिका करणारा उत्तम कलाकार म्हणजे मेहमूद. हातात येईल ते काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केल्याने ते कसे यशस्वी होते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मेहमूद. पाण्याला जसा आकार द्यायचा ठरवले, तर ज्या पात्रात ठेवू तसा आकार येतो, अशीच मेहमूदची कारकीर्द होती. आज मेहमूदची पुण्यतिथी. २३ जुलैला त्याचे निधन झाले; पण त्याची बॉलीवूडमधील कारकीर्द मात्र संस्मरणीय अशीच आहे.


रूपेरी पडद्यावर अनेक दिग्गजांबरोबर मेहमूदची जोडी जमली होती. यात धर्मेंद्र-मेहमूद, जितेंद्र-मेहमूद, धुमाळ शुभा खोटे-मेहमूद, आय. एस. जोहर-मेहमूद अशा जोड्या जमवून त्याने आपली छाप उमटवलीच; पण एक सजग निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्याने निर्माण केलेले चित्रपट हे केवळ अविस्मरणीय असेच आहेत.

त्याचा उल्लेख लवचिक असा करण्याचे कारणच आहे की, तो पाहिजे तसा वाकू, वळू आणि करू शकत होता. मुमताज अली हे मेहमूदचे वडील. ते बॉम्बे टॉकीजमध्ये काम करत होते. सुरुवातीला मेहमूद हा गाडी चालवण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याला वाटले ही नसेल की, हा कधी बॉलीवूडचा पडदा व्यापणारा कलाकार होईल. त्यानंतर मीनाकुमारीने त्याला टेबल-टेनिस शिकवण्यासाठी म्हणून ठेवले. त्यावेळी मीनाकुमारीच्या बहिणीशी मधूशी त्याचे प्रेम जमले आणि दोघांनी लग्न केले. या लग्नानंतर मीनाकुमारीच्या पुढाकाराने त्याने अभिनयाला सुरुवात केली. सुरुवातीला दो बिघा जमीन, प्यासा अशा चित्रपटातून छोट्या भूमिका त्याने केल्या; पण त्याला खºया अर्थाने ब्रेक म्हणतात तो मिळाला परवरीश या चित्रपटात. या चित्रपटात राज कपूरच्या भावाची भूमिका त्याने केली होती. त्यानंतर त्याने प्यार किये जा, जिद्दी, लव्ह इन टोकियो असे अनेक हिट चित्रपट दिले; पण त्याच्यातील विनोदी अभिनेता हा सर्वांना भावला; पण हाच विनोदी अभिनेता एक उत्तम निर्माता-दिग्दर्शक बनू शकतो हे त्याने पुढच्या काळात दाखवून दिले.


अमिताभ बच्चनला घेऊन त्याच्या सुरुवातीच्या काळात केलेला बॉम्बे टू गोवा हा १९७२मध्ये केला होता. हा चित्रपट आजही कोणत्याही वाहिनीवर लागला, तर प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यापूर्वी १९६८ला मेहमूदची निर्मिती असलेला एव्हरग्रीन तुफान हिट चित्रपट म्हणजे पडोसन. सुनील दत्त, सायरा बानू, किशोर कुमार आणि मेहमूदची उत्तम केमिस्ट्री म्हणजे सदाबहार पडोसन हा चित्रपट.

त्यानंतर मेहमूदने निर्माण केलेले दोन चित्रपट मला मनापासून आवडतात ते म्हणजे कुवारा बाप आणि सबसे बडा रुपया.


कुवारा बाप हा फार मोठी दूरदृष्टी असलेला चित्रपट. मेहमूदच याचा नायक होता. यात विनोद मेहरा, विनोद खन्ना, संजीवकुमार याशिवाय पाहुणे कलाकार म्हणून धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमामालिनी, दारासिंग यांनी मेहमूदच्या मैत्रीखातर काम केले होते; पण यात जो पोलिओचा विषय त्याने १९७४ साली हातात घेतला तो फार महत्त्वाचा होता. संपूर्ण जगाला किंवा भारताला पोलिओ निर्मूलनाची मोहीम हातात घेण्यासाठी १९९५ हे साल उजाडले होते, तेव्हापासून आजपर्यंत या निर्मूलनाची जाहिरात दो बूंद जिंदगी के म्हणून अमिताभ बच्चन गेली वीस-पंचवीस वर्ष जाहिरात करत आहेत; पण त्यापूर्वी २० वर्ष अगोदर मेहमूदन याने पोलिओची भयानकता आपल्या चित्रपटातून दाखवली होती. जे-जे उपेक्षित आहे त्यांना आपल्यात सामावून घेत केलेला हा चित्रपट होता. विवाहापूर्वी जन्माला आलेली संतती एखाद्या तरुणीने टाकून देऊन त्याचा सांभाळ करावा लागणे. झोपडपट्टीत शेकडो हिजड्यांसमवेत त्याचे नामकरण करणे, सज रही गली मेरी अम्मा सुनहरी कोठे में... हे गाणं आणि त्या सापडलेल्या अनाथ मुलाला पोलिओची लागण होणे. त्याचे भविष्य याचा चांगला विषय या चित्रपटातून त्याने हाताळला होता. मेहमूदच्या स्टाईलने विनोदी अंगाने हा चित्रपट जात असला, तरी त्यात संजीवकुमारने डॉक्टर म्हणून दिलेला संदेश हा अतिशय गंभीर होता; पण या चित्रपटातील हाजी हाजी करत टाळ्या पिटणे लक्षात राहिले; पण त्या संदेशाकडे दुर्लक्ष झाले; पण एक सुंदर कलात्मक चित्रपट म्हणून याची दखल घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मेहमूदच्या खºया जीवनातील घटनेवर आधारीतच हा चित्रपट होता. त्याच्या मुलाला पोलिओ झाला होता. त्याला तो बरा करू शकला नाही. ही व्यथा त्याने सामाजिक प्रश्न म्हणून या चित्रपटातून मांडली होती.

मेहमूदने निर्माण केलेला आणखी एक चित्रपट म्हणजे सबसे बडा रुपया हा चित्रपट. पूर्वापार ऐशोरामात वाढलेल्या पण साधा असलेल्या विनोद मेहराला पैशांची किंमत कळण्यासाठी मेहदूनने जे खलनायकी ढंगाने कथानक उलगडले आहे, ते पूर्णपणे रंजक आहे. त्यानंतरही मेहमूदने अखेरपर्यंत चित्रपटातून कामे केली. देवानंदच्या मनपसंतमधून तो दिसला. त्याचे सतत कुठे ना कुठे दर्शन होत होते; पण मेहमूद हा एक परिपूर्ण अभिनेता होता. या अभिनेत्याचे आजच्या दिवशी निधन झाले. गुमनाम, अनोखी अदा, पत्थर के सनम, नीला आकाश, नीलकमल अशा अनेक चित्रपटांतून त्याने भूमिका केल्या होत्या. त्या काळात हिरो-हिरॉईनपेक्षा खलयनायकाचे मानधन जास्त असायचे; पण मेहमूद त्या सर्वांपेक्षा जास्त मानधन घेत होता, हा चमत्कारच होता. म्हणजे एका चित्रपटात नायक विश्वजीतला २ लाख रुपये मानधन होते, तर मेहमूदने त्याच चित्रपटासाठी ८ लाख रुपये घेतले होते, त्या चित्रपटाचे नाव होते ‘सुंदर’. हमजोली या चित्रपटात जितेंद्र नायक होता; पण त्याच्यापेक्षा जास्त पैसे मेहमूदने घेतले होते. आय. एस. जोहर याच्या बरोबर त्याची चांगली भट्टी जमली आणि दोघांनी जोहर मेहदूद इन गोवा, जोहर मेहमूद इन हाँगकाँग हे दोन चित्रपट हिट केले. ही मालिका भरपूर चालू शकली असती; पण ती खंडीत झाली. अशा या दिलसे कलाकाराला सलाम.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055\\