मराठी नाटकांच्या इतिहासात विजय तेंडुलकरांची नाटके हा एक फार मोठा टप्पा आहे, तर त्यातील 'शांतता! कोर्ट चालू आहे' हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. एक वेगळे नाटक, तसे सहजासहजी कळणार नाही असेच हे नाटक आहे, पण या नाटकाने एक इतिहास घडवला आणि त्या इतिहासातून अनेक अभिनयाची रत्नंही दिली. त्यात अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल ते सुलभा देशपांडे यांचे.
'शांतता!...' या नाटकासाठी रंगायन आणि नंतरच्या टप्प्यात आविष्कार या नाट्यसंस्थांची निर्मिती झाली. हे फार मोठे आहे. या नाटकात 'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाºया सुलभा देशपांडे यांना अमाप लोकप्रियता मिळाली. मुंबईच्या दादर येथील छबिलदास मुलींच्या शाळेत कोंडून ठेवल्यानंतर विजय तेंडुलकर यांनी तासाभरात 'शांतता! कोर्ट चालू आहे' नाटकाचा दुसरा अंक लिहून दिला. श्री. पु. भागवत हे रंगायनचे अध्यक्ष, तर विजय तेंडुलकर उपाध्यक्ष होते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एण्ट्री करताना भागवतांनी नाटककार तेंडुलकर एवढेच लिहिले होते. नाटक लिहून तयार नव्हते आणि तेंडुलकर यांना विषय सुचत नव्हता. एक दिवस ते रेल्वे स्टेशनवरून पार्ल्याला पायी घरी जात होते. त्यांच्यापुढे काही तरुण मुले चालली होती. त्यांतील एकाने देशस्थ ऋग्वेदी संघाचा हॉल कुठे आहे, अशी विचारणा तेंडुलकर यांच्याकडे केली. हे तरुण तेथे अभिरूप न्यायालय सादर करणार होते आणि त्याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. त्यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा ऐकतच तेंडुलकर घरी पोहोचले. घरी गेल्यावर त्यांनी अरविंद देशपांडे यांना फोन करून नाटकाचा विषय सुचल्याचे सांगितले आणि लगोलग पहिला अंक लिहून दिला. तेंडुलकर यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या निधनानंतर अंत्यसंस्कार आटोपले आणि सायंकाळी तालमीच्या ठिकाणी आलेल्या तेंडुलकर यांना निर्मात्यांनी शाळेच्या खोलीत कोंडून ठेवले. तासाभरात दुसरा अंक आणि बेणारेचे स्वगत झाल्याचे तेंडुलकर यांनी सांगितल्यानंतरच बाहेरून कडी उघडली गेली. बेणारेचे हे स्वगत रंगभूमीवरील ऐतिहासिक स्वगत झाले आहे. इतका मोठा या नाटकाला इतिहास असूनही राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच परीक्षकांनी हे नाटकच नाही असे म्हणत या नाटकाला बाद ठरविले.
विशेष म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेतील परीक्षकांनी बाद ठरवलेल्या या नाटकाची अन्य भाषांत रूपांतरे झाली. मराठी, हिंदीसह विविध १६ भारतीय भाषांत 'शांतता!...' रंगभूमीवर सादर झाले आणि त्याला इंग्रजीसह परदेशी भाषांमध्ये चित्रपटाद्वारे झळकण्याचा बहुमान लाभला. यावरून राज्य नाट्य स्पर्धेतील परीक्षकांची उंची समजायला हरकत नाही. या नाटकाचा याच नावाने चित्रपटही काढण्यात आला. याचे दिग्दर्शक सत्यदेव दुबे होते, तर कलावंत सुलभा देशपांडे होत्या. या नाटकाच्या हिंदी आवृत्तीत 'खामोश अदालत जारी है'चे दिग्दर्शक ओम शिवपुरी होते. प्रमुख भूमिका- सुधा शिवपुरी यांनी केली होती. हिंदी चित्रपट- 'शांतता कोर्ट शुरू है'चे दिग्दर्शक सत्यदेव दुबे होते, तर कलावंत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, अमरीश पुरी, अमोल पालेकर, एकनाथ हट्टंगडी आदी होते.
'शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. कळायला अवघड असले तरी प्रेक्षक हे नाटक काय वेगळेपण आहे यासाठी येत होते. त्याला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार हा महत्त्वाचा होता. याशिवाय शंभू मित्रा यांनी हे नाटक बंगाली भाषेत नेले. मराठी रंगभूमीवर सुलभा देशपांडे यांनी या नाटकाचे १00 प्रयोग केले, तर त्यानंतर रोहिणी हट्टंगडी यांनीही ९0 प्रयोग केले, पण मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालवणारे, नवा फॉर्म देणारे असे हे नाटक होते.
अभिरूप न्यायालय किंवा कोर्ट कोर्ट खेळता खेळता उभे राहिलेले एक नाट्य. कोणी आरोपी व्हायचे, कोणी वकील, कोणी साक्षीदार यातून आरोप कोणता लावायचा, तर भ्रूणहत्येचा आरोप घेऊन हे नाटक तयार होते. यात एकप्रकारची निरागसता, तर दुसरीकडे विकृती दिसते. हे नाटक कसे पहायचे, तर त्याचे उदाहरण आहे. मे महिन्याच्या सुट्टीत मुले गावाकडे जमतात. दुपारच्या जेवणानंतर मोठी माणसे माजघरात वामकुक्षीला जातात. उन्हाचे कोणीही मुलांनी बाहेर खेळायला जायचे नाही म्हणून मुलांना ताकीद दिलेली असते. त्यामुळे घरातच बैठे खेळ खेळावे लागतात. मग काय खेळायचे? अनेक खेळ होतात दुपार संपताना. एखादे चिमणीचे पिलू घरात येते. मुले पटापट खिडक्या बंद करतात आणि आता त्या पिलाशी खेळायचं ठरवतात. कुणी पकडायचा प्रयत्न करते. त्यात पंखात फारसा जोर नसलेले पिलू दमते आणि खाली बसते. कुणी त्याला हातात घ्यायचा प्रयत्न करे. कुणी दाणा खायला देते, कुणी पाणी देण्याचा विचार करते. इतके करूनही ते पिलू मुलांशी खेळत राहते. मग कोणीतरी खट्याळ मुलगा त्याचे पिस काढायचा प्रयत्न करतो. त्याच्या तडफडीने सगळ्यांना मजा येते. मग प्रत्येक जण त्या पिलाची एकेक पिसं उपटायला सुरुवात करतात. पिलू तडफडत असते. एवढ्यात स्वयंपाकघरातून हाक येते. मुलांना नाश्त्याला बोलावलेले असते. सगळी मुलं त्या पिलाला टाकून नाश्ता करायला जातात. इकडे पिसं काढल्यामुळे ते पिलू मात्र तडफडून प्राण सोडते. हाच तो शांतता कोर्ट चालू आहेचा खेळ. वकील, साक्षीदार, न्यायाधीश सगळेच आपली भूमिका खेळतात आणि त्या बेणारे बाईची पिसे उपटतात. असे हे नाटक. अतिशय गहनपणे असं असलेले हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील मानाचे पान आहे.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
1 may
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा