गुरुवार, ६ मे, २०२१

पुन्हा जुन्या मालिका येणार का?


लॉकडाऊनच्या काळात मालिकांचे चित्रीकरण थांबल्यामुळे अनेक वाहिन्यांवरील मालिकांचे प्रक्षेपण थांबले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात जशा जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या गेल्या होत्या त्या दाखवल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दीर्घकाळ लॉकडाऊन असल्यामुळे आणि चित्रीकरण रखडल्यामुळे झी मराठी वाहिनीला तारण्यासाठी ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका आली होती. दिवसभर आठवड्याचे पाठोपाठ भाग दाखवून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. यादरम्यान ‘टोटल हुबलाक’ ही एकच विनोदी मालिका थोडक्यात तयार झाली होती, पण आता पुन्हा अनेक मालिकांचे प्रक्षेपण बंद झाल्याचे दिसते आहे.


मागच्या आठवड्यापासून सोमवार ते शनिवारऐवजी सोमवार ते शुक्रवार असे प्रक्षेपण सुरू केले आणि मालिकांचा एक दिवस कमी केला गेला. यादरम्यानच्या काळात बºयापैकी चाललेली तीन दिवसांची मालिका ‘काय घडलं त्या रात्री’ ही मागच्या गुरुवारपासून दाखवणे बंद झाले. त्याच्या अगोदर दोन आठवडे या मालिकेतील मुख्य तपास अधिकारी असलेली रेवती बोरकर ही गायब झाली होती. त्यामुळे तिच्याकडचा तपास पुन्हा ज्युनिअर आॅफीसरकडे दिला गेला होता. ती मानसी साळवी अचानक गायब का केली गेली, हे अनाकलनीय होते. पण अखेर ती मालिका स्थगित झाली. त्याचप्रमाणे मागच्या चार दिवसांपासून ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिकाही बंद झाली आहे. अण्णा परत इलय अशी रघुकाकानं माहिती दिली आणि दुसºया दिवशी काहीतरी धमाल पहायला मिळणार म्हणेपर्यंत या अण्णांना ब्रेक लागला. सयाजी शरीरात अण्णांच भूत आणि कावेरीच्या शरीरात शेवंताचे भूत संचारल्यामुळे आता धुमाकूळ पहायला मिळेल असे वाटत असतानाच ही मालिका थांबली. त्यामुळे सध्या ‘चला हवा येऊ दे’ची हवा जोरदार आहे, पण ऐन उन्हाळ्यात ही हवा प्रेक्षकांना थंड करण्यास पुरेशी नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा गतवर्षीचा फॉर्म्युला वापरून जुन्या मालिका लावतात का, हे आता पहावे लागेल.

झी मराठी किंवा पूर्वीच अल्फा टीव्हीने आपल्या पूर्वीच्या लोकप्रिय मालिका आता दाखवण्यास हरकत नाही. यात उंच माझा झोका ही मालिका सध्या दाखवली तर पुन्हा टीआरपी वाढू शकतो. गेल्या वर्षी ‘होणार सून मी या घरची’ झी मराठीवर, तर त्याला उत्तर देण्यासाठी कलर्सने ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका आणली होती. त्यानंतर तू तिथे मी ही पण गाजलेली मालिका झी मराठीने पुन:प्रक्षेपित केली होती. त्याप्रमाणे झी मराठीच्या चांगल्या मालिका पुन्हा दाखवायला हरकत नाही. वादळवाट, आभाळमाया, अधुरी एक कहाणी या मालिका खूप गाजल्या होत्या. त्या मालिकांनी झी मराठीला एका उंचीवर नेले होते. त्यामुळे आता या मालिका दाखवायला काही हरकत नाही.


सध्या झी मराठीवर फक्त देवमाणूस आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांचे काही भागांचे चित्रीकरण झाल्याचे दिसते आहे. देवमाणूसचे शूटिंग बेळगांवच्या फार्महाऊसवर आहे. आता कर्नाटकातही लॉकडाऊन आहे. त्यामुळे जर तिथले चित्रीकरण बंद झाले, तर तेही पुढचे भाग पहायला मिळतील का याबाबत शंकाच आहे, पण चित्रीकरणाचे स्थळ बदलले की कथानकात बदल होत जातो. विसंगती निर्माण होते. आता सध्या एकाच जागेत मैत्री रिसॉर्ट आहे आणि पोलीस स्टेशनही आहे, पण मालिका सुरू ठेवली आहे हे विशेष.

येऊ कशी तशी मी नांदायला मध्ये मर्यादित कलाकारांना घेऊन कसेबसे भाग चालवले आहेत. एकाच जागेत मालविकाचं आॅफीस, किचन हे सगळं दाखवून वेळ मारून नेली जात आहे. खानविलकरांचा भव्य राजवाडावजा बंगला दिसणे बंद झालेले आहे. शकूमावशी आणि तिचे मिस्टर दिसेनासे झाले आहेत. घरातलेच सगळे सीन आहेत, तर अचानक शकूमावशी कुठे गेली याबाबत कुठलाही उल्लेख नाही. संथगतीने कथानक पुढे सरकवले जात आहे. त्यामुळे हे सगळे नवे भाग अत्यंत कंटाळवाणे होताना दिसत आहेत. यासाठी आता पुन्हा थोडे दिवस जुन्या मालिकांचे येतील असे दिसते.


सतत ते चला हवा येऊ द्या पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत. हसावे असे विनोद आता तयार होताना दिसत नाहीत. त्यात नवे कलाकार येत आहेत, तर जुने बाहेर पडत आहेत. सात वर्ष सलग सागर कारंडेने आपली हवा दाखवून दिली. तो आता या मालिकेतून बाहेर जात आहे, तर मसाले कुटणारी राधिका आता यात येणार आहे. अर्थात त्याने कार्यक्रमात खूप काही फरक पडेल असे दिसत नाही. आठवड्यातून दोन दिवसांची तीन दिवस झाली, पण प्रेक्षक कंटाळू लागले आहेत. त्यापेक्षा पूर्वीच्या अल्फा टीव्हीचे असलेले घडलंय बिघडलंय या मालिकेचे प्रक्षेपण केले तर प्रेक्षकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल.

कलर्स वाहिनीकडेही चार दिवस सासूचे याशिवाय अनेक चांगल्या मालिका होत्या. यामध्ये भाग्यविधाता ही खूप गाजलेली मालिका पुन्हा दाखवली तर ती प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करू शकते. अग्निशिखा ही एक अशीच मालिका ई टीव्हीकडे होती. ती दाखवता येईल, पण हे सध्या जे कंटाळवाणे कार्यक्रम आणि संथगतीने मालिका पुढे सरकवायचे, फ्लॅशबॅक दाखवून कशीबशी वीस मिनिटे भरवायचे तंत्र चालले आहे ते रटाळ आहे. त्यामुळे आता जुन्या मालिकांना पर्याय नाही असेच दिसते, पण इथून पुढे जास्तीत जास्त एपिसोड अगोदरच तयार करण्याचे भान निर्माते ठेवतील असे मानायला हरकत नाही.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

6 may

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: