दादा कोंडके म्हटलं की, त्यांची नायिका म्हणून उषा चव्हाणचे नाव आपोआप समोर येते, पण दोघांमध्ये अनेकवेळा खटकेही उडाले होते. त्यामुळे अनेक चित्रपटांतून दादांनी उषा चव्हाणला नाकारून दुसरी नायिका घेतली होती. उषा चव्हाण म्हणजे अभिनयाबरोबर नर्तकी, तमाशा हा आलाच. त्यामुळे जेव्हा तमाशाविरहीत चित्रपट काढायची वेळ आली तेव्हा दादांनी उषा चव्हाणला पर्याय शोधला आणि तो पण चित्रपट यशस्वी करून दाखवला.
उषा चव्हाणने दादांबरोबर ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘आंधळा मारतो डोळा’ आणि ‘पांडू हवालदार’ या क्रमाने पहिल्या चार चित्रपटांत काम केल्यावर मराठी चित्रपटसृष्टीतील ही यशस्वी जोडी ठरली होती. त्यामुळे दादा कोंडके-उषा चव्हाण ही सुपरहिट जोडी होती,
पण जेव्हा जेव्हा कोणी डोईजड होतो तेव्हा त्याच्यावर दादागिरी कशी करायची हे दादांना चांगले माहिती होते. त्यामुळे ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटात नायिका म्हणून उषा चव्हाणला न घेता दादांनी अंजना या नायिकेला घेतले. अंजना तेव्हा गुजराती आणि हिंदी चित्रपटातूनही काम करत होती, पण दादा आणि अंजना ही जोडीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. अर्थात ही नायिका शहरी, शिकलेली असल्यामुळे ती भूमिका उषा चव्हाणला शोभलीही नसती. ‘तुमचं आमचं जमलं’मध्ये एकच लावणी आहे. त्यासाठी आयटम साँगच्या किंवा पाहुणी कलाकार म्हणून दादा उषा चव्हाणला आणू शकले असते, पण त्या लावणीतही दादांनी रजनी चव्हाण म्हणजे उषा चव्हाणच्या बहिणीला आणले. ही लावणी अर्थातच अशोक सराफबरोबर होती. ती म्हणजे, ‘आल्या आल्या जाऊ नका...’
त्यानंतर दादांनी १९७७ मध्ये जनता पक्षाची राजवट आल्यावर आणलेला चित्रपट म्हणजे ‘राम राम गंगाराम’. या चित्रपटात अर्थातच गंगीच्या भूमिकेसाठी पुन्हा उषा चव्हाणला दादांनी नायिका म्हणून घेतले. यात दादांनी आणि उषा चव्हाणने चांगलाच धुमाकूळ घातला होता. उषा चव्हाणला गावातील खट्याळ अशी गंगी दिली होती, पण खेड्यातून शहरात मुंबईत गेल्यावर दुसरी नायिका म्हणून पुन्हा अंजनाला घेतले होते. यात अंजना बरोबरचे गाजलेले गाणे म्हणजे ‘एक मोका दे, मोका दे, मोका दे...’ पण उषा चव्हाणच्या जोडीला तिच्या डोक्यावर मिरे वाटायला, तिला जळवायला एखादी दुसरी नायिका असावी असा फॉर्म्युला त्यांनी बरोबर पुढच्या चित्रपटातही साधला होता. कारण दादा खºया अर्थाने उषा चव्हाणच्या प्रेमात होते, पण वास्तव जीवनात दादांची ती नायिका होऊ शकली नाही.
त्यानंतर दादांनी ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ हा चित्रपट काढला. यात तमासगिरीण उषा चव्हाण, तर दिल्लीहून आलेली इरसाल अशी पद्मा चव्हाण अशा दोन नायिका होत्या. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, माया सामंत अशा रहस्यकथाकारांच्या पुस्तकात गुंतलेल्या तत्कालीन पिढीवर डिटेक्टीव कादंबºयांवर भाष्य करणारा असा हा मस्त चित्रपट दादांच्या खास स्टाइलने सुपरहिट गाणी, नाच यांनी तुफान चालला, मात्र त्यानंतरच्या चित्रपटात पुन्हा एकदा दादांनी उषा चव्हाणला ब्रेक दिला. म्हणजे थांबवले. तो चित्रपट होता ह्योच नवरा पाहिजे.
ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटात दादांनी जयश्री टी या अभिनेत्रीला नायिका म्हणून घेतले. यातही लावणी आहे. आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला. या कोठीवरच्या लावणीतही उषा चव्हाणला डावलले आणि मधु कांबिकरला ही लावणी दादांनी दिली होती. जयश्री टीबरोबर दादांनी धमाल केली होती. यातीलही सगळीच गाणी हिट होती.
यानंतर दादा कोंडकेंनी १९८२ ला आली अंगावर हा चित्रपट काढला. यात पुन्हा उषा चव्हाण ही दादांची नायिका होती. राजकारणावर भरपूर टीका करणारा हा चित्रपट होता. यात दादांनी धोब्याची भूमिका केली होती. त्यात त्यांच्याबरोबर एक गाढव होते. दादांनी आपल्या चित्रपटात पाळीव प्राण्यांना अनेकवेळा संधी दिली आहे. तुमचं आमचं जमलंमध्ये कुत्रा होता, माकड होतं. पळवापळवीमध्ये म्हैस होती, तर आली अंगावरमध्ये बोलणारे गाढव दाखवले होते. यात त्यांची नायिका उषा चव्हाण होती.
१९८८ ला आलेला दादांचा चित्रपट म्हणजे मुका घ्या मुका. यात पुन्हा दादांनी उषा चव्हाणला घेतले होते, पण यात नायिकेला फारसे प्राधान्य असे नव्हतेच. दादांचे डायलॉग काय असणार म्हणून प्रेक्षक जातात, पण दादा मुके असतात. त्यामुळे हा मुका ज्या अॅक्शनने हातवाºयांनी धमाल उडवून देतो तो दुकानात ५0१ साबण मागायला गेल्यावर समजते, पण त्याला बोलायला आल्यावर आयुष्यभराचे तो इतके बोलतो आणि मुका म्हणून कुठे बोलणार नाही म्हणून लपलेली सत्य बाहेर काढायला लागतो आणि गावात धुमाकूळ उडतो. यात नायिकेला उषा चव्हाणला फक्त गाण्यापुरती संधी होती.
त्यानंतर पुढच्याच वर्षी दादांनी मला घेऊन चला हा चित्रपट काढला आणि त्यात पुन्हा उषा चव्हाणला घरी बसवले. यावेळी मधु कांबिकरला नायिका म्हणून संधी दिली, तर त्याच्यानंतर १९९२ ला येऊ का घरात हा चित्रपट काढला. या काळात तर दादा आणि उषा चव्हाण यांचे संबंध फार ताणले गेले होते. त्यामुळे या चित्रपटातही दादांनी उषा चव्हाणला न घेता उषा नाईकला घेतले होते. यात दादा कोंडकेंनी पोस्टमनची भूमिका केली होती. हे सलग दोन चित्रपट वेगवेगळ्या नायिकांना घेऊन दादांनी केले होते.
त्यानंतर मात्र पळवापळवी, सासरचं धोतर आणि धरपकड हे तीन चित्रपट दादांनी उषा चव्हाणला घेऊन केले होते. दोघं एकत्र आल्यावर चित्रीकरणाच्या वेळेलाही धमाल करायचे. नैसर्गिकपणे दोघे काम करायचे. दादांनी आपल्या अन्य चित्रपटांतून उषा चव्हाण वगळून अंजना, जयश्री टी, मधु कांबिकर, उषा नाईक अशा अनेक अभिनेत्रींना संधी दिली, तरी प्रेक्षकांची पसंती मात्र उषा आणि दादा यांनाच होती.
राम राम गंगारामची हिंदीत केलेली रिमेक म्हणजे तेरे मेरे बीच में. यात हिंदीतही दादांनी उषा चव्हाणलाच घेतले होते, तर दुसरी नायिका म्हणून जयश्री टी हिला संधी दिली होती. अंधेरी रात में दिया तेरे हाथ में या हिंदी चित्रपटातही उषा चव्हाणच होती. फक्त आगे की सोच या चित्रपटात दादांबरोबर नायिका होती स्वप्ना नावाची त्या काळातली नवखी अभिनेत्री. उषा चव्हाणशिवाय अर्धा डझन नायिका दादांनी उभ्या केल्या होत्या, पण लक्षात राहिली ती जोडी म्हणजे दादा आणि उषा चव्हाण हीच.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा