गुरुवार, ६ मे, २०२१

आम्ही काय केलं, हे महत्त्वाचं...


शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या संवादात आपण समर्थ असल्याचा विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला. यामध्ये त्यांनी कुठेही केंद्र सरकारवर विनाकारण टीका केली नाही. केंद्राकडून सहकार्य मिळते आहे, आपल्या सगळ्या मागण्या पंतप्रधान मान्य करत आहेत, राज्याला सहकार्य करत आहेत हे त्यांनी सांगितले ते फार बरे झाले. यामुळे केंद्राच्या नावाने विनाकारण गळा काढणाºया त्यांच्याच सरकारमधील आणि पक्षातील अनेकांची तोंडे बंद केली आहेत. ही राजकारण करण्याची वेळ नाही असे नुसते बोलून चालत नाही; पण केंद्र आम्हाला देत नाही, केंद्राने नियोजन केले नाही असा विनाकारण कांगावा काँग्रेसचे सचिन सावंत, राजू वाघमारे, नबाब मलिक करत असतात; पण केंद्राकडून लसीचा पुरवठा झालाच नसता, तर महाराष्ट्र नंबर एकचे राज्य ठरले असते का? एका दिवसात पाच लाख लसींचे डोस झाले असते का? महाराष्ट्रात दीड कोटीपेक्षा जास्त लसीकरण झाले असते का? केंद्र पुरेपूर सहकार्य करत असताना त्या सहकार्यामुळे केंद्राची प्रतिमा उंचावेल या भीतीने हे लोक विनाकारण राजकारण करत आहेत. त्याला मुख्यमंत्र्यांनी चांगला चाप बसवला, त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे लागेल. दुर्जनांना अनुल्लेखाने मारावे लागते. तसा प्रकार मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारमधील विघ्नसंतोषी प्रवृत्ती विरोधात केला आहे. ही काँग्रेसची पिल्लावळ सचिन सावंत, राजू वाघमारे आदी लोक करकचून आवाजात रेटून बोल, पण जनतेची दिशाभूल कर अशा आवेशात कोणत्याही चांगल्या गोष्टीचे कौतुक करण्याचे मोठेपण दाखवत नाहीत. अशा लोकांवर जनता विश्वास ठेवत नाही. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होत गेला याचे कारण विरोधकांचेही चांगले काम असेल, तर त्याचे कौतुक करण्याचे मोठेपण अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज अशा पूर्वीच्या नेत्यांनी दाखवले होते. द्वेषाच्या राजकारणातून कोणी मोठे होत नाही, हे खरेतर काँग्रेस नेत्यांना कळायला पाहिजे. समोरचा मुर्ख आहे, चुकीचा आहे हे सांगण्यात का वेळ दडवता आहात? तुम्ही कसे चांगले आहात, तुम्ही काय केले हे सांगण्याचे काम करण्याची गरज आहे. नेमके हेच औचित्य शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी दाखवले. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.

गेल्या वर्षभरात राज्य सरकारने काय केले याचा मांडलेला आढावा महत्त्वाचा होता. गेल्या वर्षी कोव्हिडच्या टेस्ट करण्याच्या प्रयोगशाळा राज्यात फक्त २ होत्या. आज वर्षभरात त्याची संख्या ६०९ इतकी गेलेली आहे. रेमडेसिवीर, आॅक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड मिळवण्यासाठी केलेली प्रगती, कोव्हिड सेंटरची केलेली उभारणा यासाठी केलेल्या संपूर्ण नियोजनाचा आढावाच त्यांनी जनतेसमोर मांडून आम्ही तिसºया लाटेशी लढण्यासाठी कसे तयार आहोत हे सांगण्याचे काम केले. ही फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर बाकीचे फक्त रडत बसत आहेत. त्या महापौर येतात सकाळी सकाळी लाईव्ह टीव्हीवर येतात आणि केंद्राने आमच्यावर अन्याय केला, लसी नाहीत म्हणून लसीकरण खोळंबले म्हणून गळा काढतात; पण तुम्ही काय नियोजन केले आहे? तुमच्या नगरसेवकांना सहकार्य करायला सांगितले का? कुठे कसे नागरिक आहेत, गर्दी करू नका सर्वांना लस मिळणार आहे हे आवाहन करण्याऐजी केंद्राच्या नावाने ओरडायचे. ही राजकारणाची वेळ नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रवृत्तीलाही चाप लावला. केंद्र सरकारकडे मागणी केल्यावर पंतप्रधान महाराष्ट्राला सहकार्य करत आहेत हे सांगून त्यांनी ही तोंडे बंद केली आहेत.


आरोग्य मंत्री असेच रडत बसत आहेत. १ मे पासून १८ वर्षांपुढील लसीकरण करायचे होते, पण केंद्र सरकारने लसीच पाठवल्या नाहीत. काढला गळा. अरे हे काय शोभते का? लहान पोरं सुद्धा या पोरकटपणाला हसतात. तिथे लसींचे उत्पादन तर झाले पाहिजे. केंद्र सरकार उत्पादन करणार नाही. त्या कंपन्यांची ती जबाबदारी आहे. त्याच्या काही मर्यादा आहेत. दररोज किती लसीचे उत्पादन करायचे याचे काही आडाखे आहेत. त्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध असला पाहिजे. तरीही अत्यंत वेगाने उत्पादन होत आहे. या साध्या गोष्टी मंत्रिलेव्हलच्या नेत्यांना समजत नसतील आणि राजकारण करत केंद्राच्या नावाने गळा काढत असतील, तर जनता अशांना बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय करताय ते सांगा. केंद्र काय करत नाही हे सांगू नका. हे जनतेला मान्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे. प्रेक्षक जनता टीव्हीवरचे तुमचे चेहरे करमणूक म्हणून पहात असतात. त्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही, कारण तुमच्या बोलण्यातील खरेपणा, तिखटमीठ लावून सांगण्याचा प्रकार जनता सहज ओळखत असते. जनतेला इतके कमी लेखायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही काय केले सांगा. आज मुख्यमंत्र्यांनी नेमके हेच करून दाखवले आहे. आपण वर्षभरात काय केले आहे हे सांगून जनतेला दिलेला विश्वास फार महत्त्वाचा होता. हे उदाहरण या सरकारमधील प्रत्येकाने लक्षात घेतले, तर राजकारण बाजूला राहील आणि कोरोनावर मात होईल

2 may

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: