रविवार, २३ मे, २०२१

हतबल पोलीस प्रशासन


रविवारी दोन घटना सर्वसामान्यांच्या दृष्टीने संतापजनक अशा घडल्या. म्हणजे एकीकडे खासदार राजीव सातव यांचे निधनाची दु:खद घटना घडली होती. तौक्ते वादळामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि त्यात कोरोना संकटाचे वादळ घोंगावत आहेच. अशातच पुणे आणि सोलापुरात सरकारचे नियम पायदळी तुडवून दोन जणांच्या अंत्ययात्रेला तुडुंब गर्दी केली गेली. शक्तीप्रदर्शन करत त्यांच्या मिरवणुका काढल्या गेल्या. एकीकडे सामान्य माणूस बाहेर पडला, तर त्याच्या पार्श्वभागावर पोलीस लाठ्या मारत असताना, या गुंडांना पोलीस घाबरून त्यांची अंत्ययात्रा अडवू शकले नाहीत. त्यांच्या अंत्ययात्रेला एवढी गर्दी होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात ही संतापजनक घटना होती. एकूणच या सगळ्या वातावरणात पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.

पुण्यामधली ही घटना आहे. सराईताच्या गुन्हेगाराच्या अंत्यविधीला तब्बल १०० ते १२५ दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी परिसरात घडला आहे. याप्रकरणी १५० ते २०० जणांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण ही एवढी गर्दी जमेपर्यंत पोलीस बघत का बसले, हा खरा प्रश्न आहे. गृहमंत्रालयाचा कारभार बदलला तरी त्यातील गोंधळ संपलेला नाही. ही राज्य सरकारची नाचक्की म्हणावी लागेल.


माधव हनुमंत वाघाटे या सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली काढण्यासाठी तो कोणी महान होता का? गेल्या वर्षात कितीतरी महान व्यक्तींचे निधन झाले आहे; पण कोरोनामुळे त्यांच्या अंत्ययात्रांना कोणी जाऊ शकले नाही; पण गुंड मात्र राजरोस अशा यात्रा मिरवणुका काढत असतील, तर सामान्यांनी काय समजायचे?

एका टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार असलेल्या माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्याच्या अंत्यविधीसाठी १५० ते २०० जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पण इथवरच हे थांबून कसे चालेल? गुन्हेगाराचे समर्थन करणारी एक शक्ती आपले जाहीरपणे शक्तीप्रदर्शन करत असेल, तर त्याचा अर्थ इथे लवकरच टोळीयुद्ध सुरू होणार आहे. खून का बदला खून असे काहीसे वातावरण निर्माण करण्याचा तो प्रयत्न आहे. हा प्रकार सरळसरळ गुंडांची दहशत पसरवण्याचा आहे. कोरोना नियमावलीचे आदेश झुगारून अंत्यविधीला १०० ते १२५ जणांनी दुचाकी रॅली काढल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकींचे क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे; पण ही रॅली पोलिसांनी अडवली असती आणि रोखली असती, तर त्यांचे कौतुक करता आले असते. त्यामुळे एकतर पोलिसांनी दुर्लक्ष करून या गुंडांना प्रोत्साहन दिले असे म्हणावे लागेल किंवा पोलीस या गुंडांच्या दहशतीला घाबरत असावेत किंवा कोणा राजकीय नेत्याचा या गुंडांच्या डोक्यावर वरदहस्त असावा. त्यामुळे तो नेमका काय प्रकार आहे हे समोर येणे गरजेचे आहे.


दुसरी घटना सोलापुरातील आहे. ताडी विरोधात आवाज उठविणारा आणि ताडीला थोपविणारा, अशी ओळख निर्माण करणारा सामाजिक युवा कार्यकर्ता करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला रविवारी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे कोरोना प्रतिबंधक नियमांना हरताळ फासला गेला होता. विशेष म्हणजे हे पाहणारे पोलीस प्रशासन मात्र या गर्दीसमोर हतबल झाले होते. करण म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र याच आजारात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. हे समजताच हजारो कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

करण यांच्या पत्नी अनिता म्हेत्रे या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. करण यांनी मोची समाजातील तरुण तंदुरुस्त असावा म्हणून अनेकांना व्यवसनापासून दूर केले होते. ताडीसारख्या विषाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. हे सगळे खरे आणि कौतुकास्पद असले, तरी त्यांच्या निधनानंतर असा उत्सव करून सरकारी नियम पायदळी तुडवणे हे योग्य नव्हते.


करण म्हेत्रे यांचे निधन झाल्याचे वृत्त पसरताच पोलिसांनी तत्काळ हॉस्पिटलबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता; मात्र तरीसुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी रात्रभर हटलेली नव्हती. अंत्ययात्रेला मोठी गर्दी होणार हे लक्षात आल्यावरही पोलिसांनी कोणतीच काळजी घेतली नाही. याचा अर्थ पोलीस गर्दीला नियंत्रित करण्यास असमर्थ आहेत असे दिसते. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे पोलिसांवर प्रचंड ताण पडलेला आहे. ते थकले आहेत हे मान्य आहे; पण तरीही कर्तव्यात कसूर करून कसे चालेल? आज अनेक मोठ्या नेत्यांनी, अभिनेत्यांनी आपले अंत्यविधीचे कार्यक्रम होऊ दिले नाहीत; पण सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाºयांनी मात्र आपल्या आजवरच्या कार्यावरच पाणी फिरवल्याचे दिसते. अशांना धाकाने नाही, रागाने नाही तर प्रेमाने समजावून सांगण्याची जबाबदारी पोलिसांची होती. आज याच नेत्यांनी घालून दिलेला आदर्श पायदळी तुडवला जात आहे, याची जाणिव करून देण्याची जबाबदारी पोलिसांची असतानाही पोलीस गप्प बसले हे चांगले नाही. खरं तर सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना परवानगी देण्यात आलेली आहे; मात्र म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत हतबल झालेल्या पोलिसांना केवळ बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली. पोलिसांनी गर्दीसंदर्भात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले; मात्र नेमका कोणावर आणि किती जणांवर गुन्हा दाखल करणार हे मात्र सांगितलेले नाही. मोची समाजामध्ये जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते, तर मृत्यूनंतरसुद्धा आनंदाने निरोप देण्याची प्रथा आहे. समाजामध्ये अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे. करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेतसुद्धा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत व करण यांचे डिजिटल फ्लेक्स फडकावत त्यांना आनंदाने निरोप दिल्याचे दिसून आले. अनेक कार्यकर्ते घोषणाबाजी व जल्लोष करताना दिसून आले; पण याला आवर घालण्यात पोलीस अपयशी ठरले. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055 \

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: