शुक्रवार, २८ मे, २०२१

प्रेक्षकांच्या पसंतीचा सूर ‘सूर नवा ध्यास नवा’


कलर्स मराठीवर गेली चार वर्ष म्हणजे २०१७ पासून सुरू असलेला ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीचा कार्यक्रम ठरताना दिसत आहे. सध्या या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरू आहे. ते आता अंतिम फेरीच्या दिशेने जात असतानाच हा कार्यक्रम उत्तरोत्तर खूपच रंगतदार होताना दिसत आहे.


२०१७-१८ ला आलेल्या या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्यासाठी तेजश्री प्रधान ही अभिनेत्री होती. परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते, महेश काळे आणि शाल्मली हे तिघे होते. हा कार्यक्रम एका उंचीवर पोहोचला होता. पहिल्या पर्वात अंतिम विजेता हा अनिरुद्ध जोशी होता, तर उपविजेती शरयू दाते ठरली होती. हे पर्व यशस्वी झाल्यानंतरच ‘इंडियन आयडल’, ‘सारेगमप’ यांप्रमाणे हा कार्यक्रम कायम सुरू राहणार हे नक्की झाले होते आणि त्याप्रमाणे थोड्याच दिवसांत दुसरे पर्व आले. यात बदल फक्त निवेदनाचा होता. सूत्रसंचालन करणारी तेजश्री न दिसता तिची जागा स्पृहा जोशीने घेतली. बाकीचे परीक्षक, पाहुणे तेच होते. २०१८-२०१९ च्या पर्वात अंतिम विजेती ठरली होती ती स्वराली जाधव आणि उपविजेती ठरली ती मीरा निलाखे. हे पर्वपण बहारदार झाले होते. २०१९-२० चे पर्व असेच गाजले यात अक्षया अय्यर ही अंतिम विजेती ठरली, तर उपविजेता ठरला होता तो अमोल घोडके.

आता हे चौथे पर्व सुरू आहे. यातील अंतिम पाच स्पर्धक आता फायनलसाठी तयार झाले आहेत. एका उंचीवर ही स्पर्धा पोहोचली आहे. याचे कारण हे पर्व फक्त महिलांचे पर्व आहे. यात सुरुवातीला सोळा गायिकांना निवडले होते. त्यातील गुणांच्या जोरावर दर आठवड्याला कमी होत होत आता अंतिम पाच जणांची यादी तयार होत आहे. या कार्यक्रमाचा निर्माता सध्या अवधूत गुप्ते स्वत: आहे. जातीने तो लक्ष घालत आहेच, पण या कार्यक्रमावर त्याने भरपूर खर्चही केला आहे. स्पर्धकाच्या सादरीकरणावर लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे वाद्यवृंद या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.


सुरुवातीचे काही भाग आणि शुभारंभ झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेचा या कार्यक्रमाला फटका बसला. त्यामुळेच या कार्यक्रमाचे चित्रीकरण मुंबईत थांबले. त्यासाठी भरगच्च सेट उभा केलेला असतानाही ते थांबवावे लागले. त्यामुळे अवधूत गुप्तेनी हे चित्रीकरण आपल्या ओळखीचा फायदा घेऊन गोव्यात सुरू केले. गोव्यात काही भागांचे चित्रीकरण झाल्यावर तिथेही त्याला विरोध होऊ लागला. काही दिवस चित्रीकरण थांबवण्याची वेळ आली, पण नंतर पुन्हा ते सुरू झाले. अशा असंख्य अडचणींवर मात करत हा कार्यक्रम कसलाही सूर न बिघडता सुरू आहे हे या कार्यक्रमाचे यशच म्हणावे लागेल.

सुरुवातीला जे सोळा स्पर्धक यासाठी निवडले होते ते अक्षरश: महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून निवडून आणले होते. सर्व स्पर्धक हे अत्यंत तयारीचे आहेत हे त्यांच्या सादरीकरणातून आणि मेहनतीतून दिसून आले आहे. यातील रश्मी मोघे, तृप्ती दामले, सन्मिता शिंदे, राधा खुडे, स्नेहल चव्हाण, फरीन शेख, माधवी माळी, प्रज्ञा साने, इशानी पाटणकर, किशोरी मुर्के, मालविका दीक्षित, हेतवी सेतिया, धनश्री कोरगांवकर, श्रीनिधी देशपांडे, श्वेता दांडेकर, संपदा माने यांनी पहिल्या सोळा स्पर्धकांमध्ये प्रवेश मिळवला होता. आता दर आठवड्याला त्यातील काही कमी होत सात स्पर्धक राहिले आहेत, पण अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवणारी डोंबिवलीची प्रज्ञा साने ही कौतुकाचा भाग ठरली. या आठवड्यातील लोकगीतांवर आधारित आठवडा तर उत्तम झालाच. यातील उगवली शुक्राची चांदणी हे लावणी गीत अतिशय बहारदार असे झाले. प्रसंगानुरूप पाडवा स्पेशल, शिवजयंती विशेष, महाराष्ट्र दिन विशेष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष असे भाग सादर करून हा कार्यक्रम अधिक लज्जतदार केला.


या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धकाने आपले गाणे सादर केल्यानंतर त्यावर महेश काळे यांचे वक्तव्य हे अत्यंत छान वाटते. प्रत्येकाशी कसे आदराने बोलावे, त्याला न दुखावता त्याच्यातील उणिवा दाखवण्यापेक्षा हे आणखी कसे छान झाले असते हे सांगण्याचे महेश काळेंचे कसब अतिशय चांगले आहे. कितीही लहान स्पर्धक असला तरी त्याचा मान ठेवून त्याला अहो-जाहो करण्याचा मोठेपणा हा फार मोठा गुण या कार्यक्रमात महेश काळेंमध्ये दिसून येतो. कधीही तोल जाऊ न देता शांतपणे बोलण्याचे काम महेश काळे करतात. त्यामुळे हा कार्यक्रम एका उंचीवर पोहोचला आहे. कार्यक्रमाचा निर्माता असलेला अवधूत गुप्ते आपल्या अवखळपणाने, हसत-खेळत कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे, चांगल्या सादरीकरणाला शिट्टी वाजवून, नाचून दाद देण्याचे काम करतो आणि त्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार होतो.

ताईमाई, सासवा-सुनांच्या मालिकेतून बाहेर पडून आणि चोथा झालेले विनोदाचे कार्यक्रम बाजूला ठेवून हा कार्यक्रम खºया अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ठरला. प्रत्येक आठवड्याला बुधवारी एक सोन्याची कट्यार आणि राजसिंहासन कोणाला मिळणार ही उत्सुकता असतेच, पण त्याहीपेक्षा वाईट वाटते ते जे स्पर्धक बाहेर पडणार असतात त्यांना निरोप देतानाचा क्षण तसा जीवघेणाच असतो, पण हा कार्यक्रम ज्याप्रकारे एका उंचीवर गेला आहे ते पाहत पुढील आठवड्यातील अंतिम फेरीत खुपच चांगले दर्जेदार सादरीकरण बघायला मिळेल यात शंकाच नाही. ‘सूर नवा ध्यास नवा’च्या निमित्ताने प्रेक्षकांना आनंदाचा सूर या कोरोनाच्या काळात सापडला हे नक्की.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

9152448055

27 may

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: