मान्याच्यावाडीत कसली तरी गडबड दिसत होती. शहरातून काही मंडळी गावाला भेट देण्यासाठी आले होते. कसली तरी जागेची पाहणी चालली होती. जो-तो काय भानगड आहे म्हणून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता, पण संध्याकाळच्या वेळी गावातून रिक्षा फिरली अन् सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
मान्याच्यावाडीच्या ग्रामस्थांनो, नीट लक्ष देऊन ऐका. आज सायंकाळी ठिक ५ वाजता, वेतोबाच्या माळावर ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या तातडीच्या ग्रामसभेला शंभर टक्के उपस्थिती असावी, ही नम्र विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे हो...
आता ग्रामसभा अन् अचानक कशी काय? १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला ग्रामसभा होतात, पण ही अचानक कशी काय? जो-तो विचार करत असताना काही गावकºयांना राहवले नाही. त्यांनी थेट सरपंचाचा वाडाच गाठला.
‘राम राम सरपंच...’ बंडुतात्यांनी हात जोडले, तसे चौसोपी वाड्यातल्या ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसलेले सरपंच म्हणाले, ‘रामराम तात्या... आज कसं काय येनं झालं म्हनायचं?’
‘न्हाई म्हंजी, गरामसबा ठिवलीय ऐकलं... कशापायी ठिवलीय, त्ये जानून घेन्यासाठी आलो.’ तात्या ओशाळवाणे हसत म्हणाले, तसे सरपंच फुरफुरलेच. ‘यवडी काय घाई हाय? समजलंच की संध्याळी..’
‘न्हाई. म्हंजी इशय काय हाय समजलं तर...’
‘वरून आर्डर आलीय... ते सांगायचा आमाला अदिकार न्हाय... डायरेक्ट ग्रामसभेतच ठराव... या आता.’
सरपंचांनी कुणाला ताकास तूर लागू दिली नाही. त्यामुळे गावात निसती चर्चा अन् चर्चा. काय असंल? कशापायी मीटिंग बुलवलीय? दिवसभर निसती तंबाखू आणि मिश्रीची देवाण-घेवाण करत जो-तो ग्रामसभेचा विषय काढत होता. नदीवर, घाटावर, पारावर फकस्त चर्चा ग्रामसभेची. त्यामुळे ग्रामसभेला यरवी न जमनारी मानसं पन संध्याकाळी पाचाच्या अगोदरच वेतोबाच्या माळावर जमली होती.
वेतोबाच्या माळावर छोटंसं स्टेज उभारलं होतं. चार-पाच खुर्च्या, लाऊडस्पिकर. शहरातून आलेली काही साहेब लोकं अन् साखर कारखान्याचं चेअरमन, सरपंच सगळे मान्यवर व्यासपीठावर होते.
सभेला सुरुवात झाली. पाहुण्याचं स्वागत झालं. सरपंचांनी प्रस्तावना केली. ‘तर समस्त मान्याच्यावाडीतील बंधू आणि भगिनींनो. आज आपला देश फार मोठ्या संकटातून जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशावर, आपल्या राज्यावर आॅक्सिजनचं संकट उभं राहिलंय. त्यासाठी नुकतंच आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक साखर कारखाना आणि त्यांच्या भागात आॅक्सिजन प्लँट उभारायचे आदेश काडले. त्याप्रमाणं आपल्या सहकारी साखर कारखान्यानं हा आॅक्सिजनचा प्लँट आपल्या गावात उभारायचा निर्णय नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या सभेत घेतला आहे. आता हा प्लँट आपल्या गावात उभारल्यानं काय फायदे होतील ते हे साहेब सांगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मान्याचीवाडी.’
शहरातून आलेला कोट घातलेला टाईट म्हणजे कडक इस्त्रीचे कपडे घातलेला साहेब पुढं आला आणि सांगू लागला. ‘सर्वात प्रथम मी मान्याचीवाडी या गावातील लोकांचं अभिनंदन करतो की, त्यांनी या प्लँटसाठी आपल्या गावाची जागा उपलब्ध करून दिली. आता या ठिकाणी नदीच्या काठापासूनची सगळी जमीन या प्लँटसाठी घेतली जाणार आहे. त्या भागात असलेली सध्याची जागा साफ केली जाईल. काही जुनी झाडं तोडावी लागतील. नदीच्या पाण्यातून आणि बाहेरच्या हवेतून आपण आॅक्सिजन तयार करण्याचा प्लँट इथे राबवणार आहोत. इथून दररोज ४00 सिलिंडर भरून आॅक्सिजन शहरात पाठवला जाईल. त्यासाठी इथं अनेक वर्कशॉप, फॅब्रिकेशनचे शॉप उभारले जातील. मान्याच्यावाडीतून तयार होणारा आॅक्सिजन हा सर्वात चांगला असेल याची आपण खात्री देऊया आणि देशकार्यात सगळे सामील होऊया.’
साहेबाचं बोलून झालं, तसे चेअरमन उठले. त्यांनी माईकचा ताबा घेतला. ‘आज माजं काळीज अभिमानानं फुलून आलं हाय. शीएमच्या आदेशापरमानं आपन आपल्या गावात आॅक्सिजनचा प्लँट उभारनार आहोत. त्याला या ग्रामसभेनं येकमुखानं पाठिंबा दिल्यानं मला लईच अभिमान वाटत हाय.’
ग्रामस्थांमध्ये चुळबुळ सुरू झाली. तसं गावातलं उगवतं नेतृत्व जित्याभाऊ माने उभा राहिला आणि म्हणाला, ‘माजी येक शंका हाय..’
सरपंच खूश झाले. त्यांनी म्हटले, ‘आपली जी शंका आहे ती वर माईकसमोर येऊन बोला...’ सगळ्यांनी शिट्ट्या वाजवून जित्याभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा सुरू केल्या. आता जित्याला चांगलाच जोर आला. कुनीतरी म्हनालं, येकच वादा, जित्यादादा... तोपर्यंत जित्या माईकपाशी गेला.
जित्यानं बोलायला सुरुवात केली, ‘व्यासपिटावरील सर्व मान्यवर, मान्याचीवाडीचे सरपंच, चेअरमन आनि माज्या समस्त ग्रामस्तांनो, आता इथं चेअरमन सायबांनी या सभेनं एकमुखानं मंजुरी दिली म्हनलं पन तेकाई खरं न्हाई. आता ग्रामस्थांना गृहीत धरून कोनतेही निर्नय इथं होनार नाहीत. खरं तर यासाठी मतदान घेनं आवश्यक होतं. आपन गावात मतदान घेऊन दारूबंदी केली. केली का न्हाय?’ सर्वांनी हो हो म्हणून दुजोरा दिला. आता जित्याभाऊ म्हणाला, ‘या आॅक्सिजन प्लँटच्या बाबतीत या सायबांनी सांगितलं की, ही जमीन संपादित केली जाईल. आता नदीकाठी दोनशे तरी झाडं हायीत. त्यात पिंपळ, वड, उंबर, आंबा अशी लई झाडं हायीत. ती झाडं हे शिकले सवरलेले लोक कापनार आणि इथं आॅक्सिजनला प्लँट उभारनार. मला वाटतं शीएमनं काढलेला आदेश वेगळाच असेल. त्यांनी प्लँटेशन करायला सांगितलं असंल. आवं ही मोठी झाडं जेवढा आॅक्सिजन तयार करतात तेवढा आॅक्सिजन तुमचे कारखाने तयार करतात का? ती तोडायची आणि हवेतला, पाण्यातला आॅक्सिजन नळकांड्यात भरनार. हे काय पटनारं न्हाय. आपल्या गावात आॅक्सिजनचा प्लँट म्हणजे प्लँटेशन असेल. ते म्हंजे मोठ्या प्रमानावर वृक्षारोपन करायचं आणि या कृत्रिम आॅक्सिजन निर्मितीला आळा घालायचा. आत्ता इथं दोनशे झाडं आहेत. पुढच्या वर्षापर्यंत ती दोन हजार असतील. असे वृक्षारोपन येत्या जून महिन्यात करायचं. आता यांनी कारखान्यासाटी जे विटा, दगड, सिमेंट आणलंय ते आपण वाया जाऊ द्यायचं नाही, तर जी जुनी मोठी झाडं आहेत तिथं आपण पार बांधायचे. म्हणजे पावसाळ्यात झाडं उन्मळून पडणार नाहीत. त्याच्या सावलीला आॅक्सिजन घेण्यासाठी माणसं बसू शकतील. प्रत्येक झाडाभोवती पार बांधायचा आणि नवी झाडं लावायची. हाच निर्धार आपण आजच्या ग्रामसभेत करूया. कृत्रिम आॅक्सिजन प्लँटपेक्षा आपण नैसर्गिक आॅक्सिजनची निर्मिती करू आणि आपला मान्याचीवाडी पॅटर्न देशाला दाखवू. त्या महामार्गाच्या कामात हजारो मोठी झाडं तोडली. आता आपण गावात एकही झाड तोडू द्यायचं नाही.’
जित्याभाऊचं बोलनं सगळ्यांना पटलं. आता इथं प्लँट उभारणं म्हणजे गावकºयांकडून चपलांचा प्रसाद मिळवण्यासारखा प्रकार होणार हे ओळखून, सरपंच उठले आणि त्यांनी समारोप केला, ‘राज्य प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या मुंबईच्या साहेबांना मी मान्याच्यावाडीचा सरपंच सांगतो की, आजची तरुण पिढी लई हुशार हाय. आदेश आला म्हणून काय बी करायला ती तयार होणार न्हाईत. तवा हा आॅक्सिजन प्लँटचा निर्णय तुर्तास रद्द करू. त्यापेक्षा इथं वृक्षारोपन अन् झाडांभोवती पार बांधू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सहकुटुंब शुद्ध हवा खायला पिकनिकला म्हणून आमच्या गावाला या’ अन् मान्याच्यावाडीनं अधिकाºयांची बोळवण केली.
प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा