रविवार, २३ मे, २०२१

सरसकट मदत

 संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीशी लढा देत असतानाच तौक्ते या चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला जोरदार धडक दिली. देशातील विविध यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यात व्यस्त असताना नव्याने कोसळलेले हे संकट दुष्काळात तेरावा महिना यासारखेच ठरले. या चक्रीवादळाचा जोर दोन दिवस कायम होता. त्यादरम्यान १८० ते १९० किलोमीटर प्रती तास वेगाने आलेल्या तौक्तेने महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये हाहाकार माजवला. महाराष्ट्रातही त्याने आपले रौद्र रूप दाखविले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ गेल्या २३ वर्षांत धडक देणारे सर्वात शक्तिशाली होते. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात प्रचंड थैमान घातल्यानंतर ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टीवरील शहरांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस झाला. वाºयाची गती इतकी प्रचंड होती की, तीन प्रवासी जहाज खवळलेल्या समुद्रात अडकले. या तिन्ही जहाजांमध्ये एकूण ७०७ कर्मचारी होते. त्यातील ३१४ जणांना नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी शर्थीने बाहेर काढण्यात यश मिळविले. या राष्ट्रीय आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी ज्या भागात मोठे नुकसान झाले, त्या भागाचा हवाई दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. गुजरातसाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून त्यांनी चक्रीवादळग्रस्तांच्या जखमेवर योग्यवेळी फुंकर घालण्याचे काम केले आहे, मात्र त्याचवेळी महाराष्ट्र, कोकणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. हे नक्की काय आहे? गुजरातला न मागता पॅकेज घोषित केले गेले का? गुजरातने पॅकेजची मागणी केली होती का? तसे असेल तर महाराष्ट्र सरकारने तशी मागणी केंद्राकडे तातडीने का केली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. साधारणपणे अशा परिस्थितीत पॅकेजची मागणी करायची असते ती आपल्याकडून राहिली असेल कदाचित, पण मोदींचे विमान महाराष्ट्रावरूनच गुजरातला गेले तेव्हा त्यांना महाराष्ट्रातल्या नुकसानीची कल्पना आहे. न मागता महाराष्ट्राला गुजरातबरोबर पॅकेज जाहीर केले असते, तर हा दुजाभावाचा आरोप आज त्यांच्यावर झाला नसता हेही तितकेच खरे.


खरं तर या वादळाचा फटका गुजरातबरोबरच महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू या राज्यांना बसला आहे. त्यांनाही मदतीची गरज होती. त्यामुळे कसलाही भेदभाव न करता मोदींनी या सर्व राज्यांना मदत जाहीर करणे आवश्यक आहे. खरं तर या चक्रीवादळाचे अनुमान हवामान खात्याने पूर्वीच काढलेले होते. त्याची तीव्रतादेखील स्पष्ट करण्यात आली होती. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती होणार हे स्पष्ट होते. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्गला चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार, हे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने किनारपट्टीच्या ३८ गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता. दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला जाणवू शकतो, हा हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरला. ताशी १८५ किलोमीटर वेगाने आलेले हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले आणि त्याने कोट्यवधी एकरवरील पिकांची नासाडी करून टाकली. राज्यातल्या प्रशासनाच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्रात नुकसान कमी झाले आहे. नागरिकांचे स्थलांतर करणे, सुरक्षा व्यवस्था पाहणे, यामुळे जीवितहानी टळली असली, तरी अपरिमित अशी वित्तहानी झालेली आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे या लोकांना मदत करणे ही नैतिक जबाबदारी असताना फक्त एका राज्याला पॅकेज जाहीर करणे हा या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकारच नव्हे का? या चक्रीवादळाला ‘तौक्ते’ हे नाव म्यानमारकडून देण्यात आले होते, याचा स्थानिक भाषेतील अर्थ गोंधळ घालणारी पाल असा होतो. असे यंदाच्या वर्षात भारताला धडक देणारे हे पहिलेच चक्रीवादळ ठरले आहे. गोवा, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या किनारपट्ट्यांवर थैमान घालून तौक्ते गुजरातच्या दिशेने निघून गेले. राज्यात या चक्रीवादळामुळे हाहाकार माजला. मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे प्रचंड नुकसान झाले. रायगड जिल्ह्यात तीन, जळगावात दोन आणि मुंबईत एकाचा मृत्यू झाला. या चक्रीवादळामुळे रायगडच्या किनारपट्टी भागात अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात किनारपट्टीच्या भागांत प्रचंड नुकसान झाले. झाडे पडणे आणि विजा कोसळणे यांसारख्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्याही बरीच मोठी आहे. १६ हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ४० हजारांवर झाडे आणि एक हजारावर विजेचे खांब उन्मळून पडले. दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याने अनुचित घटना टळल्या. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथके मदत आणि बचावकार्यासाठी आधीच तैनात केली गेली होती. तरीपण राज्याला आज मदतीची तातडीने गरज असताना सरसकट सर्व राज्यांना मदत जाहीर करण्याचे काम पंतप्रधानांनी करायला हवे होते.

रायगडमध्ये हवामान खात्याने अतिसतर्कतेचा इशारा दिला होता. या जिल्ह्यातील स्थिती सिंधुदुर्गपेक्षाही भयानक झाली होती. चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत असताना, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही त्याचा परिणाम जाणवला. त्याच्या प्रभावाने समुद्रात उंच लाटा उसळल्या होत्या. प्रचंड वेग असलेल्या वाºयामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात २,०६० घरांचे अंशत:, तर १२ घरांचे संपूर्ण नुकसान झाले. ७८२ विजेचे खांब अंशत: आणि ९८ पूर्णत: पडले आहेत. ३०५ विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले. तीन दिवस काही भागांत विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत मदतीची घोषणा करून जनतेच्या मनात स्थान मिळवण्याची संधी पंतप्रधानांनी गमावली असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: