अनलॉक व्हायलाच हवे!
माणसाला कोणत्याही गोष्टीची पटकन सवय लागते. अगदी आपण कुठे चार दिवस प्रवासाला गेलो तरी तिथली सवय होते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला सहवासाची सवय पटकन होते. अगदी मुंबईच्या गर्दीतही आम्हाला तशी सवय असतेच असते. म्हणजे आपले लोकलमधले सहकारी, आॅफीसचे सहकारी, सहप्रवासी, रस्त्यावर दिसणारे, दुकानात दिसणारे, हॉटेल रेस्टॉरंट बारमध्ये नेहमी दिसणारे लोकही आपले पटकन ओळखीचे होतात. तिथले विक्रेते, वेटर, सर्व्हिस बॉय, पेट्रोल पंपवरचा माणूस हे सगळे आपल्या सवयीचे झालेले असतात. कारण त्यांच्यासोबत आपले आयुष्य अगदी यंत्रवत होऊन गेलेले असते, पण या यंत्राची गती गेल्या वर्ष-दीड वर्षात बदलली होती.
आपल्या आयुष्यात इतके छान दिवस येतील असे वाटले नव्हते, असेही कोणाला वाटले असेल. म्हणजे वर्षानुवर्ष जे लोक आपल्या घरच्यांना वेळ देऊ शकत नव्हते त्यांना या कोरोनाने, लॉकडाऊनने एकत्र आणले. घरात सारखा टीव्ही पाहून कंटाळा आल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने अनेकांचा नसलेला संवाद सुरू झाला. जे बायकोला कायम आॅर्डर सोडत होते तेच लोक स्वयंपाकातही बायकोला मदत करू लागले. आपल्या जोडीदारांचे माहीत नसलेले गुण एकमेकांना कळले, ही तर त्या कोरोनाची कृपाच म्हणावी लागेल. तर काही ठिकाणी एरव्ही भांडायला वेळ मिळायचा नाही, गडबडीत भांडण करायला मिळायचे नाही म्हणून या वेळेचा वापर अनेक नवरा-बायकोंनी मनसोक्त भांडण्यासाठी सत्कर्मी लावल्याचेही दिसून येते. मनसोक्त भांडायचे, यथेच्छ तोंडसुख घेण्याचे काम अनेकांनी या काळात केले. त्यामुळेच जर निर्बंध कमी केले किंवा हा लॉकडाऊन उठला तर अनेकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटेल.
आपल्या जोडीदाराच्या अंगात किती गुण आहेत हे अनेकांना या लॉकडाऊनने दाखवले असेल. म्हणजे आपल्या नवºयाला स्वयंपाकातील काही छान पाककृती येतात याचे आकलन अनेकांना यातून झाले असेल. एकमेकांच्या कलागुणांची कदर करण्याची संधी या लॉकडाऊनने दिलेली आहे. त्यामुळे अनेकजण थँक्स लॉकडाऊन असेही म्हणत असतील, पण गेल्या वर्षी या लॉकडाऊनचा सुखकारक आनंद घेतला असला तरी यावर्षीचा लॉकडाऊन हा वेदनादायी होता हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे आता दरवर्षी गणपती, नवरात्राप्रमाणे ठराविक काळात हा लॉकडाऊन लागणार का, अशी एक सुप्त भीती यात आहे. गेल्या वर्षी आपली पत्नी इतकी छान गाणे म्हणते याचीही जाणीव अनेकांना झालेली असेल, पण यावर्षी त्याच गाण्यांची कलकल झाल्यासारखी वाटत आहे. आपली मुले आपल्या आईवडिलांची काळजी करतात, त्यांना त्यांचे प्रेम हवे असते हेही अनेकांना यातून समजले असेल, पण सतत आपण त्यांच्याबरोबर असण्याने त्यांचा कोंडमाराही झाला असेल कदाचित.
पण आता आपल्याला लवकरात लवकर अनलॉक व्हायचे आहे. अर्थात अनलॉक फक्त कोरोनापासून व्हायचे आहे. एकमेकांत गुंतागुंत तशीच असली पाहिजे. या संकटाने बरंच काही बदलून गेले आहे. म्हणजे नेहमी काय करायचे हा प्रश्न गृहिणींना भेडसावत असतो. आज डब्याला भाजी कोणती द्यायची? जी करणार ती त्यांना आवडेल का? नवºयाला वांग्याची आवडत नाही. मुलाला दुधीभोपळा नको. मुलीला पालेभाजी नको. उसळी दिल्या, तर त्यावरून कुरूकुर. मग करायचे काय? खरंच त्या गृहिणीची स्वयंपाक म्हणजे कसरतच असते. आपण केलेली कसरत या मंडळींना आवडेल का? नवरा खूश असेल का? त्याच्या कपाळावर आठी तर नाही ना उमटणार? मुलं चीडचीड नाही ना करणार? या विचाराने स्वयंपाक करणाºया गृहिणीची हीच कसरत घरात बसलेल्या नवरोबांनी मागच्या वर्षभरात पाहिली.
घरात काय आहे, काय नाही याचा विचार न करता आपण आॅर्डर सोडतो, पण हे करणे किती अवघड आहे हे त्याला समजून चुकले, कारण घरात अडकून पडलो होतो तेव्हा एकमेकांची किंमत कळाली. सुरुवातीला काहीच मिळत नव्हते. जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय, तर फक्त गहू, तांदूळ, डाळच होती. भाजीपाल्याचा विचार नंतर आला. मग दारावर येईल ती भाजी घेण्याची तयारी झाली. मानसिक तयारी झाली. दारात शेपू, आळू विकायला आला, न आवडणाºया अनेक भाज्या विकायला आल्या. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो पाहून कंटाळा आला. तरी त्या असूदेत. उपयोगाला येतील म्हणून खरेदी केल्या गेल्या. आपल्याला आवडत नसतानाही खरेदी केल्या गेल्या. त्याच जेवताना गोड वाटू लागल्या. शेपूची भाजी वाईट नसते, उग्रपणा घालवूनही आई ती छान करते हे कळायला मुलांना घरात थांबावे लागले. म्हणजे बाहेरची हॉटेलं बंद झाली. चायनीज कॉर्नर बंद झाले. कोपºयावरचा वडापाव, पावभाजी, मिसळ सारे बंद झाले आणि आईच्या हातचा शेपूही किती चविष्ट आहे हे समजून चुकले. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली आपल्या नवºयाला काय काय कामे करावी लागतात. कशी बोलणी खावी लागतात. काय काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि तरीही हसत मूड ठेवण्याचा त्याचा चाललेला आटापिटा आपल्या घरकामापेक्षा खूपच मोठा आहे, हे तिलाही कळून चुकते. बाहेरून आल्यावर कधीतरी त्रासून येणारा नेमका का त्रासत होता? लोकल प्रवासात त्याला काही झाले का, याची जाणीव तिला झाली. लॉकडाऊनने अनेक लांब गेलेली माणसे जवळ आली. अनेक वेळा मनाने लांब गेलेली माणसेही जवळ आली. घरातील धुसफूस कमी झाली. एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. कित्येकांच्या घरात आनंद आला. म्हणजे अनेकांना प्रायव्हसी मिळत नव्हती. आता चान्स घ्यायचा की नको, याचा विचार होत होता. अनेक समस्या आहेत, खर्च आहेत याचा बाऊ होत होता, पण सोशल डिस्टन्सिंगच्या काळातही त्यांना शरीराने आणि मनाने जवळ आणले. अनेकांकडे त्यामुळे मोकळीक मिळाल्याने गुड न्यूजही आली. आता लवकरच सर्वांना अनलॉक व्हायला हवे, नाहीतर अशा गुड न्यूज सगळीकडे वाढल्या तर या देशाचे काय होईल?
पण आता अनलॉक व्हायचे आहे. पुनश्च हरीओम म्हणायचे आहे. नव्याने जुना डाव सुरू करायचा आहे. चांगल्या बदललेल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. आता बाहेर पडायचे आहे. हा विचार प्रत्येकाच्या मनात आज घोळत आहे, पण सगळं आता सुरू झालं पाहिजे. १ जूननंतर लॉकडाऊन वाढला तर जे वर्षभरात एकत्र आले होते, जवळ आले होते ते अतिपरिचयात अवज्ञा याप्रमाणे पुन्हा दुरावतील आणि दुखावतील. कौटुंबिक स्वास्थ्य संपुष्टात येईल. त्यामुळे आता अनलॉक व्हायलाच हवे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा