नमस्कार मंडळी, मी निखील जोशी, एक्सवायझेड तुमचाच्या ‘आमचा रट्टा’ कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत मान्याच्यावाडी गावचे ज्येष्ठ नेते आबासाहेब देशमुख. ‘आमचा रट्टा’ कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूया एक क्लीप, ज्यात माहिती मिळेल मान्याची वाडी या गावाची आणि आबासाहेब पाटील यांची.
मु. पो. मान्याचीवाडी हे महाराष्ट्राच्या नकाशातील एक आगळेवेगळे गाव. या गावात झालेल्या २०२४ च्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लागलेला निकाल हा आजच्या ‘आमचा रट्टा’ कार्यक्रमाचा विषय आहे. याचे कारण सर्व प्रस्थापित पक्षांना धूळ चारत या गावाने सर्व अपक्षांना निवडून दिले. आलटून-पालटून वेगवेगळ्या पक्षांची सत्ता गेली पन्नास वर्ष या ग्रामपंचायतीत असायची; पण सर्वच राजकीय पक्षांना माती चारत या गावाने फक्त चांगल्या आणि जनहिताची कामे करतील, अशा नव्या चेहºयांना दिलेली संधी हा आजच्या कार्यमात प्रेक्षकांना दिसणारा ‘आमचा रट्टा’ आहे. प्रस्थापितांना हा रट्टा देण्याचे महत्त्वपूर्ण काम आबासाहेब पाटील यांनी केले, म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.
‘नमस्कार, आपलं स्वागत आहे आबासाहेब, आपलं ‘आमचा रट्टा’ या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. काय सांगाल या बदलाविषयी?
आबासाहेब सावरून बसले आणि आपल्या गावरान आवेशात कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांनी बोलायला सुरुवात केली. शेवटी मान्याच्यावाडीचं पाणी त्यांच्या अंगात होतं. असं बगा... म्हंजी चार वर्षांपातुर समदं ठिक चाललं व्हतं; पण त्यानंतर जे समुर आलं, ते लईवंगाळ. जो तो दुसºयावर टीका करतुय, चिकलफेक करतुय. हे काइं आमा गावºयांना पसंत नव्हतं. काय तर म्हणे सव्वाशे वरसाची परंपरा असलेला आमचा पक्ष. तुमच्याच चॅनेलवर सारके त्यांच्या पक्षाचे नेते चर्चेला यायचे. काय नाव त्यांचं? नितीन सामंत का कोण ते. काई जालं तरी निसती टीका. आरं बेन्या तुमी पन्नास वर्स सत्तेत व्हता तवा काय केलं? झालंच तर...त्यो चिकलातनं वर आल्येला पक्ष. आवं चिकलातनं आला म्हनून आमी त्यात लक्ष्मी शोदाय गेलो; पण त्यांनी समदा राजकारणाचाच चिकल केला. यला वड, त्याला वड, त्याला पकड, त्याचा मुका घी... आर तुमच्या पक्षाची काय धोरनं हैत की नाय? इकडलं उचल, तिकडचं उचल हा सगळा वाकाळ शिवन्याचा प्रकार. योक पक्ष मराटी मानसांचा, दुसरा पक्ष हिंदूंचा आरं काय चाललंय काय? आनी तुमच्या चॅनेलवर तुमी चर्चेला त्यांना बोलावता आणि नळावर भांडल्या परमानं समदी भांडत बसतात. योक तरी तुमचा संवाद कधी जनतेच्या हिताचा झाला का? म्हणून पयल्या परथम आमी मान्याच्यावाडीत केबल बंद केली. डीश टीव्ही बंद केले. परत्येकाच्या घरावर असंल दूरदर्शनचा अँटीनाच. अन येकबी बातम्याचं चॅनेल कुनी लावायचं नाही, असा ठराव केला. अन गावातलं समदं लोक आनंदी दिसू लागले.
आबासाहेबांच्या पहिल्याच सेगमेंटमध्ये चॅनेल आणि न्यूज अँकरला रट्टा बसला होता. त्याचं तोंडही बघण्यासारखं झालं होतं. तरी निखील जोशी उसनं अवसान आणत म्हणाला, ‘म्हणजे आबासाहेब आपल्याला असं म्हणायचं आहे का, की सगळे राजकीय पक्ष नालायक आहेत?’ त्याला काटत आबासाहेब म्हणाले, ‘ते तसलं काई आमच्या तोंडून वदवून घ्यायचं न्हाय... त्याला तुमच्या राजकीय पक्षाचं प्रवक्ते, फुडारी फसतील पर मी जे बोलतो तेच दाकवायचं. मी कोनाला नालायक म्हणलो नाय, पर समदे राजकीय पक्ष बिनकामाचे हायत हे गावानं ठरवलं.’
‘पण मग आबासाहेब, कोणत्याच पक्षाला संधी न देता मान्याचीवाडीत निवडक लोकांना संधी देण्याचे नेमके कसे ठरले? राजकीय पक्षांवर इतका मान्याच्यावाडीचा राग का?’ निखीलने पुढे विचारले तसे आबासाहेब म्हणाले, ‘ह्यो आज जरी बदल मान्याच्यावाडीत दिसला ना, तरी येत्या काई दिवसांत समद्या देशात दिसल्याशिवाय राहनार न्हाई. तुमा सांगतो जोशी सायब, आवं कोरोनाच्या साथीत या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेचे किती हाल झाले हायत ते आमचं आमाला म्हाइंत. ज्या त्या डाक्टरनं निसतं पैसं काडायचं. सरकानं फकस्त बंद करून टाकायचं. घराबाहीर पडू नका, मग खायाचं काय? मोफत थाळी मिळणार.. पण कुनाला? पोराबाळांच्या साळा बंद झाल्या. बारा बलुतेदारांची हातावर पोटं व्हती ती बंद झाली. उपासमारीनं अनेकांनी आत्महत्या केल्या. लोकांच्या नोकºया गेल्या. अशा परिस्थितीत हे समदे राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्यात गुंतलं. आरं लेकांच्यानो उनदुनं काडायची ही येळ हाय का? पर हीच ती येळ हाय म्हणत येकमेकांवर टीका करत बसले समदे राजकीय पक्ष. म्हणून गाववाल्यानी ठरावलं. आता पयला रट्टा या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना देण्याची वेळ आलेली आहे. मान्याच्यावाडीत हे करून दाकवायचं. आमी या विलेक्शनला कुना बि राजकीय पक्षाच्या मोट्या नेत्यानं गावात फिरकायचं नाई असा हुकूमच काडला. ज्या कोणाला विलेक्शन लडायची हाय त्यानं लडावी पर गाववाले येक झाले अन् सगळ्यांची चिन्ह पुसून टाकली. आवं म्हणतात ना गाव करील ते राव करील काय? समद्यांची डिपॉझीटच जप्तच झाली नाय, तर हाताच्या बोटावर मोजन्याइतकीही मतं मिळू दिली न्हाईत. लॉकडाऊन करून आमाला घरात बसवलं ना? आता पाळी तुमची, बसा लेको घरात, म्हणून सर्वांना आता घरात बसवलं.’
‘मान्याच्यावाडीचा हा पॅटर्न देशभर पसरेल असं वाटतं तुम्हाला? ’ निखीलनं प्रश्न विचारला तसे आबासाहेब म्हणाले, ‘असं बगा... आता देशभर पसरवणारे तुमीच हाय की... आमी काय सांगायला आलो होतो का, इथं असा बदल झालाय म्हणून? पण तुमाला कायतरी वेगळं, ब्रेकिंग असं हवं हुतं. तसं आमच्या गावात घडलं म्हणून तुमी आलातच ना इतक्या दूर? आमच्या गावानं जर ग्रामस्वच्छतेत पयला नंबर मिळवला असता, तर गावात आला असता का तुमी? कुणी शेतीत चांगला प्रयोग केला म्हणून त्याचं कौतुक करायला आला असता का? पर यात कायतरी आगळं वेगळं हाय जानवलं म्हनून तुमी ‘आमचा रट्टा’ कार्यक्रमात आमाला बोलावलं. आमी म्हणालो, आमी काय असं कुटं जात नाय बोललो. तर तुमी तुमची व्हॅन, कॅमेरा घिऊन गावात आला आन हित शूटिंग केलं. मग देशभर हे हुनारच ना.’
निखीलनं थोडं क्रॉस करत आबासाहेबांना विचारायचा प्रयत्न केला, ‘पण म्हणजे आबासाहेब तुम्हाला असं म्हणायचं आहे का? की सरकारनं लॉकडाऊन केला त्याचा राग मतदारांनी निवडणुकीत काढला? ’
‘ आता तुमी काडाल तसाच अथं व्हो... म्हंजी आमचा लॉकडाऊनला इरोध नव्हता; पण त्या काळात त्याची अंमलबजावणी जी झाली त्यानं अनेकांचे हाल झालं, त्याचा कोनीच वाली नव्हता. सरकारनं मोफत धान्य देतो म्हणत होतं. पण कुनाला मिणालं? दलालांनीच समदं हाडप केलं. अत्यावश्यक सेवेत काम करनारांना लोकल बस प्रवास म्हनायचे. पन अनावश्यक सेवेतल्या लोकांना सगळं मिळत होतं अन अत्यावश्यक सेवेतले लोक अडकत होते. म्हंजी ते जगाच्या पाठीवर चित्रपटातलं गानं हाय ना... पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार... अजब तुझे सरकार...असंच काहीतरी झालं. त्यामुळे आमच्या गावानं समद्या ग्रस्त लोकांच्या समस्या जानून घेतल्या अन या राजकीय पक्षांना हद्दपार करायचं ठरवलं. लॉकडाऊनचा राग नाय काडला आमी, लॉकडाऊनच्या काळात आमची जी छळवणूक झाली त्याचा राग काडला. हॉस्पीटलला आगी काय लागतायत, अन सरकार आर्थिक मदत काय करतंय... आरं इतके डाक्टर, कर्मचारी तिथं असताना फकस्त पेशंट कसे काय मरत्यात आगीत? येक तरी डाक्टर, नर्स जळून मेली का? अशांना पाठीशी घालनाºया सरकारला, त्यांच्या पक्षांना आमी का दारात हुंब करावं? राग लॉकडाऊनचा नाही, पन जनतेचं लॉकडाऊनच्या नावाखाली जे शोषण झालं त्याचा राग निवडणुकीत निगालाय, म्हनून हा रट्टा बसलाय हे लक्षात घ्या.’ आबासाहेबांनी ठणकावून सांगितलं तसं निखील जोशीनं विचारलं, ‘आबासाहेब आता फक्त शेवटचा प्रश्न विचारतो. तो म्हणजे कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता सगळे अपक्ष निवडून आले आहेत. मग यातून ग्रामपंचायतीचा कारभार कसा होणार? सरपंचपदाची निवड कशी करणार?’ त्यावर हसत, आबासाहेब म्हणाले, ‘खरं तर याच प्रश्नाची मी वाट पहात होतो. आम्ही सगळे अपक्ष असलो, तरी सगळे मान्याच्यावाडीवर प्रेम करनारे आहोत. समद्यांचा इचार हा मान्याच्यावाडीचा विकास हा हाय. आवं भिन्न इचारांचे शत्रू जर सत्तेसाठी एकत्र येतात तर आम्ही चांगल्या कामासाठी गावातले मित्र का नाही एक येनार? आमच्यातला कुनी फुटणार नाही, कुनी कुटल्याही पक्षात जानार न्हाई, तर आमचा विकास आम्हीच करून दाखवू.’
हे होते, मु. पो. मान्याच्यावाडी ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब पाटील. सर्वच राजकीय पक्षांना लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कोंडीमुळे नाकारून सगळ्यांची चिन्हे पुसणारा मान्याच्यावाडीचा पॅटर्न देशभर रुजवणारे नेते. आता आगामी काळात पहायला लागेल हा पॅटर्न देशात कुठे-कुठे रुजतो आणि परिवर्तन होते ते, तोपर्यंत पहात रहा एक्सवायझेड तुमचा.
- प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा