सध्याची परिस्थिती पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल की, कोरोनाचा त्रास कमी पण राजकारणाचा त्रास जास्त आहे. कोरोनावरून होत असलेले राजकारण हे अत्यंत संतापजनक आहे. स्वत:ची जबाबदारी झटकून दुसºयाला दोष देणे यातच सगळे राजकीय पक्ष गुंतले आहेत. दिल्लीत असेच एक पोस्टर आंदोलन झाले. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी हे आंदोलन सुरू केल्याचे बोलले जाते. काय तर म्हणे, आमच्या मुलांसाठी असलेली लस विदेशात का पाठवली? असा सवाल या पोस्टर्समधून पंतप्रधान मोदींना करण्यात आला आहे. आता प्रियंका गांधींना हे सांगायला पाहिजे का, की मुलांसाठी लस अद्याप तयारच झालेली नसताना ती परदेशात कशी पाठवली जाईल? पण केवळ टीका करायची म्हणून काहीही बोलायचे, काहीही करायचे. काँग्रेसकडे कसलाच ठोस कार्यक्रम नसल्यामुळे असे कमकुवत विचारांचे आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली आणि आपलेच हसे करून घेतले.
म्हणजे एकीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असून, सध्याच्या आव्हानात्मक काळात ही बाब किंचित दिलासा देणारी आहे. कोरोनाच्या दुसल्या लाटेचा देशाला जबर तडाखा बसला हे नक्कीच आहे. ते कोणीच नाकारणार नाही, पण हे जर आपण युद्ध म्हणून मान्य करतो आहोत तर हे चिखलफेकीचे राजकारण कधी थांबवणार आहोत? ही मानसिकता म्हणजे एकप्रकारची विकृती आहे असे म्हणावे लागेल. नादुरुस्त व्हेंटिलेटर्स, आॅक्सिजनसाठी आणि बेडसाठी धावपळ, गंगेत सोडण्यात येणारे मृतदेह हे सारेच चित्र विदारक आहे. त्याहीपेक्षा त्यावरून होणारे राजकारण हे हिणकस आहे.
एकीकडे कोरोना योद्धे लढत आहेत, आपल्यापरीने शर्थ करीत रुग्णांना मदतीचा हात देत आहेत, मात्र ही लढाई निकरावर आली असताना राजकीय स्वार्थाला तिलांजली मिळाली नाही. उलट जिथे तिथे राजकीय हित पाहून भूमिका घेतल्या जात आहेत. राजकीय पक्ष हे वाद आणि विसंवाद यातच धन्यता मानत आहेत. राजकीय फेकाफेकीमुळेच ही कोरोनाची लाट वाढत चालली आहे. याचे कारण देशहितासाठी मदतीला येण्याऐवजी सरकारला अपयश कसे येईल, सरकारची फजिती कशी होईल आणि सरकारची झालेली नाचक्की चव्हाट्यावर कशी आणता येईल, यासाठी विरोधक टीका करत आहेत. त्याने सरकारची नाही, पण कोरोना योद्ध्यांची उमेद ढासळत जाण्याची शक्यता आहे. दुसरी लाट संपवायची आणि तिसºया लाटेला समर्थपणे तोंड द्यायचे, तर आरोग्य यंत्रणेत आज दिसणारा अजागळपणा दूर करावा लागेल. पीएम केअर्स फंडातून राज्यांना जे व्हेंटिलेटर्स पुरविण्यात आले त्यापैकी बरेचसे उपयोगाचे नव्हते. सदोष व्हेंटिलेटर्समुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले नाहीत. आता पंतप्रधानांनी तपासणीचे आदेश दिले आहेत. याऐवजी दोषविरहित व्हेंटिलेटर्स पुरविण्याची खबरदारी घेतली गेली असती तर? एकूण व्हेंटिलेटर्सपैकी वीस हजार व्हेंटिलेटर्स चार खासगी कंपन्यांकडून खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला, पण खरेदी करताना त्याचा दर्जा पाहून घेण्याची जबाबदारी कोणाची होती? पंतप्रधान मोदी काही त्यातील तज्ज्ञ नाहीत. त्यांनी फक्त आदेश द्यायचे, पैशाची व्यवस्था करायची. खरेदी करणारी यंत्रणा वेगळीच असते.
राजधानी दिल्लीत पोस्टरबाजीचे राजकारण केले गेले. त्याऐवजी जनतेला धीर देणारी पोस्टर्स लावली असती, तर काँग्रेसबद्दल लोकांना आत्मियता वाढली असती. शेकडो पोस्टर लावण्याच्या खर्चात हजारो मास्क आले असते. ते लोकांना वाटले असते, तर चांगले झाले असते. पण आमच्या मुलांसाठी असलेली लस विदेशात का पाठवली? असा सवाल या पोस्टर्समधून पंतप्रधान मोदींना करण्यात आला आहे. मुलांसाठी लस अद्याप तयारच झालेली नसताना अशी पोस्टर्स लावली हा वेडपणाच म्हणावा लागेल. ही मानसिकता जेवढी अनाकलनीय तेवढीच संताप आणणारी आहे. मणिपूरमध्ये भाजपच्या एका नेत्याचा कोरोनाने मृत्यू झाला. तेथील पत्रकाराने गोमूत्र आणि शेण कामाचे नाही अशी त्यासंदर्भात टिप्पणी केल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे! हीच ऊर्जा केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरली असती तर बरे झाले असते, पण सत्ताधारी असोत वा विरोधक राजकारण करण्यात धन्यता मानत आहेत हे वाईट आहे.
उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर माजवला आहे; पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चिंता पंजाबमध्ये नव्याने जिल्हा निर्माण केला याची आहे. पंजाबात नवीन जिल्हा निर्माण केला त्याच्याशी योगींचा काय संबंध आहे? तुमच्या राज्याकडे बघा ना, पण प्रत्येक गोष्टीवर टीका करायची. आपण लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलो आहोत, या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा विसर पडल्यासारखे अनेकांचे वर्तन चालले आहे. महाराष्ट्राला खिजवण्यासाठी प्रति फिल्मसिटी उभारण्याची घोषणा योगींनी केली, पण आता गंगेत तरंगणारे मृतदेह पाहून उत्तर प्रदेशात किमान आरोग्य सुविधा उभारण्याची गरज आहे, मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी चांगली स्मशानभूमी करणे गरजेचे आहे याचे भानही या नेत्यांना नाही. गल्ली ते दिल्ली सगळीकडे तेच आहे. आता अगदी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर सत्ताधारी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा सर्वसामान्यांना उबग आला आहे. महाविकास आघाडीने केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची आणि त्याच त्वेषात भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायचे, हा खेळ सव्वा वर्ष चालू आहे. त्याचा उबग आला आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी याआधीच दिला आहे. दुसºया लाटेत राज्यात आणि देशात अन्यत्र आरोग्य व्यवस्थेची जी लक्तरे निघाली, त्याची पुनरावृत्ती नको. लसीकरणाचा घोळ संपवता आला तरी येत्या काळात सकारात्मक दृश्य दिसू शकेल. वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दूरदृष्टीने नियोजन आणि चिखलफेकीला विराम याची आज गरज आहे, पण या कोरोनापेक्षाही जी टीकास्त्र आहेत ती जास्त जीवघेणी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा