कोरोनाबरोबर मागीलवर्षापासून अनेक नैसर्गिक आपत्तीही येत आहेत. या आपत्तींना तोंड देताना नाकीनऊ येत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात निसर्ग वादळाने महाराष्ट्राला कोकणाला फार मोठा फटका दिला होता. या गोष्टीला एक वर्षही पूर्ण झालेले नाही तोच तौक्ते वादळ घोंगावत दाखल झाले आहे. यावर्षी मान्सूनही वेळेत येणार आहे आणि त्याचे प्रमाणही सरासरीइतके आहे. याचा अर्थ अनेक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. गेल्यावर्षीही कोल्हापूर, सांगली भागात पावसाने कहर केला होता. वादळ आणि पावसाच्या या संकटात सर्वसामान्यांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकारने या तौक्ते वादळाला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रविवारी सांगितले आहे. केंद्र आणि राज्य सरकार सज्ज असले, तरी ज्या लोकांचे यामध्ये नुकसान होणार आहे त्यांना तातडीने मदत करण्याची कार्यवाही झाली पाहिजे. स्थानिक प्रशासनाकडून या बाधित लोकांना मदत आणि नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत. गेल्यावर्षीच्या निसर्ग वादळाची मदत अजूनही कित्येकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे सध्याच्या या सकंटामुळे किनारपट्टीवरचा सामान्य माणूस घाबरून गेला आहे.
केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनाºयालगतच्या परिसरांत रविवारी धुमाकूळ घातल्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढं सरकत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे किनाºयालगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोकणातही याचे पडसाद पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी समुद्राचं पाणीही गावात आल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो घरे उध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागांत वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. यामुळे घरांचे, छोट्या व्यावसायिकांचे, मच्छीमारांचे, आंबा, नारळ, सुपारी, केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने तातडीने पंचनामे केले पाहिजेत. सध्या कोरोनाचे वातावरण असल्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्रिमंडळातील सदस्यांनी दौरे काढू नयेत. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी पंचनामे करण्याचे आदेश स्वत:हून देण्याची गरज आहे. शासनाने आदेश दिल्यानंतर ही कामे करण्याचा प्रकार होता कामा नये. काही झाले तरी हे काम टळणारे नाही, ही जबाबदारी टाळता येणार नाही. त्यामुळे ते फक्त कागदोपत्री न राहता नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना शक्य तितकी आणि लवकरात लवकर मदत कशी पोहोचेल याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
शनिवारी-रविवारी या वादळाचा अंदाज असल्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आलं. हे चक्रीवादळ आता हळूहळू गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. सध्या चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास २०० किलोमीटर आणि गुजरातपासून ४०० किलोमीटर दूर आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचसोबत मच्छीमारांना देखील आवाहन केलं गेलं होतं. त्याला मच्छीमारांनी प्रतिसाद देत बाहेर न पडता घरीच राहण्याचं ठरवलं; पण या वादळात मच्छीमारांचे रोजगाराचे नुकसान झालेले आहे. त्यांनाही मदत वेळेवर देणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील १५० मच्छीमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे. राज्य सरकारने वादळाची कल्पना असल्यामुळे योग्य खबरदारी घेतली आहेच; पण वादळानंतरची कृती आणि मदतीची कार्यवाही तितक्याच तत्परतेने होणे गरजेचे आहे. याबाबतीत केंद्र मदत देते का? तिकडून काही पॅकेज मिळते का?, यावर विसंबून न राहता राज्य सरकारने कोकणासाठी मदतीची तयारी करावी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या वादळाच्या परिस्थितीकडे डोळ्यात तेल घालून नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून होते ही चांगली बाब होती. त्यामुळेच यावर्षी मदतीत दिरंगाई न होता लवकरात लवकर कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे.
दोनच दिवसांपूर्वी हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला होता की, चक्रीवादळ तौक्तेमुळे १७ मे रोजी मुंबईसह, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला आणि रायगडात प्रचंड नुकसान झालेले आहे. बागायतदारांचे नुकसान यात मोठ्या प्रमाणात झालेले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. कर्नाटक, गोव्यातही पावसाचा इशारा देण्यात आला होता. या वादळाचा परिणाम पुढील दोन दिवस तरी राहील, असा अंदाज आहे. रविवारी गोव्यातल्या पणजी शहरात समुद्राचे पाणी शिरले होते. केरळ, कर्नाटकातील काही भागांत पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारी भागांत आणि गुजरात, असम, मेघालयच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार, मराठवाडाच्या काही भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात. सिक्किम, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या वादळानंतरची परिस्थिती हाताळणे हे फार महत्त्वाचे आहे. मुंबईकरांनी आपल्या स्वभावाला साजेसे वागून या संकटाला न डगमगता तोंड देण्याची तयारी दोन दिवस अगोदरच केली होती हे विशेष आहे; पण आता कोरोनाबरोबर येत असलेल्या या नैसर्गिक संकटात सर्वसामान्यांची भिस्त ही प्रशासनावर आहे. त्यांनी याबाबत पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा