मराठी रंगभूमीच्या पावणेदोनशे वर्षांच्या इतिहासात संगीत नाटकांचे अनेक दशके प्राबल्य होते. यातील सत्तरच्या दशकाचा उत्तरार्ध ते नव्वदचे दशक सोडले तर पुन्हा संगीत नाटकाचे आकर्षण नव्या पिढीला वाटू लागले. याचे कारण नाटकातील असणारी पदे आणि त्याचा शास्त्रीय संगीताचा असलेला आत्मा हा नव्या संगीतकार, गायकांना कायमच जवळचा वाटू लागला. त्यामुळे त्यातील चिजा या तानसेनांनी कानसेनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संगीत नाटकाचे आकर्षण पुन्हा वाढत गेले.
खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संगीत नाटकांनी जनजागृतीचे काम केलेले आहे. शारदा या नाटकामुळे बालविवाहाला विरोध केला, तर एकच प्याला या नाटकाने दारूचे दुष्परिणाम दाखवले, पण नाटकातील संगीताने अनेकवेळा कथानक आणि नाटकाचा विचार यावर कुरघोडी केल्याने त्या नाटकाचा उद्देश बाजूला पडला आणि नाट्यगीते शिल्लक राहिली. एकच प्याला या नाटकातील संवाद ऐकले तर माणसाला दारू पिण्याची इच्छा होणार नाही, पण तत्कालीन बालगंधर्वादी कलाकारांनी या विचारापलीकडे जाऊन आपले गाणे प्रेक्षकात रुजवले. कट्यार काळजात घुसली या नाटकाची कट्यार ही खून करण्यासाठी नाही, तर अहंकाराचा नाश करण्यासाठी आहे हे समजणे आवश्यक आहे. शेवटी तोही एक सत्तासंघर्ष होता. दोन संगीत घराण्यांतील सत्तासंघर्ष. यश मिळाल्यावर अहंकार डोक्यात जाऊ नये यासाठी ती राजदरबारी कट्यार आहे. हा उद्देश आमच्या आजच्या राज्यकर्त्यांनाही लागू पडतो, पण यातील पदांनी, नाट्यगीतांनी प्रेक्षकांना मोहून टाकले, जुगलबंदीने यातील संदेश, विचार मागे पडला, पण तरीही संगीत रंगभूमी आणि संगीत नाटके ही अजरामर अशीच आहेत. काही नाटके निरनिराळ्या संचात आली तरी ती तितक्याच गोडीने पाहिली जातात.
त्यापैकीच एक नाटक म्हणजे संगीत मानापमान. सुमारे ११0 वर्षांपूर्वी खाडीलकरांनी लिहिलेले हे नाटक. बालगंधर्वांनी अजरामर केलेलं संगीत मानापमान हे नाटक. दहा वर्षांपूर्वी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी राहुल देशपांडेंनी पुढाकार घेतला आणि त्यालाही तितकेच यश मिळाले.
मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये १२ मार्च १९११ रोजी मानापमान नाटकाचा प्रथम प्रयोग किर्लोस्कर संगीत मंडळींकडून सादर झाला. इतकी वर्ष एखादे नाटक सादर होणे आणि त्याच्याविषयीची महती अजूनही टिकणे, यामागे नाटककाराची प्रतिमा आढळून येते. कथानकं मिळवून ती फुलवणं आणि त्यामध्ये समाजातील परिस्थितीचे प्रतिबिंब दाखविणे, असे वैशिष्ट्य आहे. म्हणून १०० वर्षांनंतरही मानापमानसारखे नाटक ताजेतवाने वाटते. लोकमान्य तिळक यांनादेखील हे नाटक आवडले होते. मागच्याच आठवड्यात या नाटकावर चित्रपट येणार असल्याचे वृत्त होते. अर्थात नाटकाची मजा रंगभूमीवरच्या जिवंत अविष्कारात जेवढी असते तेवढी ती पडद्यावर नसते.
मानापमान या नाटकात परिस्थितीनं गरीब पण कर्तृत्वाने शूर असणारा नायक आणि स्वत:च्या ऐश्वर्याची घमेंड असणारी नायिका यामध्ये पहिल्याच प्रवेशात घडलेला संघर्ष यामधून मानापमान सुरू होतं. संगीत रंगभूमीने दिलेले हे शब्दप्रयोग आजही राजकारणात तितक्याच सहजपणे वापरले जातात. राजकीय मानापमान, सरकारमधील मानापमान असा उल्लेख आपण अनेकवेळा वाचतो. दारुड्यांना तळीरामाची उपमा दिली जाते. ही सर्व संगीत नाटकांची किमया आहे. मानापमान या नाटकाच्या समाप्तीपर्यंत नायिकेसह प्रेक्षकास स्वर्तृत्व मोठे करण्यास प्रवृत्त करते. श्रीमंत कुळात वाढलेली भामिनी ‘धनी मी पती वरीन कशी अधना’ असं म्हणत सेनापती असलेल्या पराक्रमी धैर्यधराशी लग्न करण्यास साफ नकार देते. या अपमानामुळे धैर्यधराच्या मनात भामिनीविषयी शेवटपर्यंत तिरस्कारच दाखवत, ‘स्वत:च्या पराक्रमानेच पत्नी मिळवून दाखविन’ अशी ईर्शा यातून दिसून येते.
श्रीमंतीची, लालसेची खिल्ली उडविण्यासाठी लक्ष्मीधर या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैर्यधराच्या मनातील भामिनीबद्दलचा राग लक्षात घेऊन प्रत्यक्षात भामिनीच वनमाला हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार, परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते.
आजही ताजंतवानं असलेल्या या नाटकातील पदेही खूप लोकप्रिय आहेत. अगदी नमन नटवरा या नांदीपासून धनी मी पती वरीन कशी अधना, या नवल नयनोत्सवा टकमक पाही सूर्यरजनी मूख, चंद्रिका ही जणू, दे हाता शरणागता, नाही मी बोलत, शुरा मी वंदिले, प्रेमभावे जीव जगीया, प्रेम सेवा शरण, रवी मी, माता दिसली, युवती मना दारुण रण, मला मदन भासे, अशी जवळजवळ पंचवीसहून अधिक गाणी मास्टर दीनानाथ मंगेशकर, आशा भोसले, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात आजही लोकप्रियता टिकवून आहेत. मानापमान या नाटकातील गीते हा फार मोठा सांगीतिक ठेवा आहे.
मानापमान या नाटकातील अनेक पदे प्रत्यक्ष रंगभूमीवर काम न करताही त्याच्या रेकॉर्ड रेकॉर्डब्रेक अशा खपल्या होत्या. कोणत्याही नाटकाची सुरुवात नाट्यशास्त्राप्रमाणे नांदीने होत असली तरी लक्षात राहते ती नांदी मानापमानचीच. ही गेल्या ११0 वर्षांतील नाट्यपरंपरेची जमेची बाजू म्हणता येईल. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनीही आपली व्यक्तिचित्रे रंगवताना मानापमानचा उल्लेख केलेला दिसतो. अंतु बर्वा आणि रावसाहेब या दोन्ही व्यक्तिचित्रांमध्ये याचा उल्लेख होतो.
तिसरी घंटा/ प्रफुल्ल फडके
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा