आज १ मे... कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून हौतात्म्य पत्करणाºयांमुळे आज महाराष्ट्र अभेद्य आहे, पण त्याच महाराष्ट्राचे तुकडे करायला काहीजण सरसावले आहेत. त्यामुळे या महाराष्ट्र दिनाला फार मोठे महत्त्व आहे. गेली सलग दोन वर्ष म्हणजे २0२0 आणि २0२१ या वर्षात महाराष्ट्र दिन हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे मराठी मनाला याचा आनंद साजरा करता येत नाही याचे दु:ख आहेच. गुरुवारीच मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाºयांना आणि प्रशासनाला हा दिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा एक मे महाराष्ट्र दिन हा फार महत्त्वाचा आहे. ''मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा'' अशी आपण या राज्याची प्रार्थन करतो. आता कणखरपणे या संकटाला तोंड देऊन आपण पुढे जाऊच, नक्कीच जाऊ, पण त्या कोरोनापेक्षा भयानक व्हायरस महाराष्ट्राच्या विभाजनाचा काहींच्या डोक्यात आहे तो अगोदर दूर केला पाहिजे. त्यासाठी आता 'राकट देशा कणखर देशा' अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून थांबली असली, तरीही एकूणच संयुक्त महाराष्ट्राचे विभक्त महाराष्ट्र करण्यासाठी विदर्भातील नेते आतुर झालेले आहेत हे नक्की. कोरोनामुळे ही भाषा काही महिने बंद आहे, पण महाराष्ट्राचे लचके तोडण्याची आतून प्रवृत्ती मनात आहेच. अशा विखारी विचारांना लांब ठेवण्याचा निर्णय आज आपल्याला घ्यावा लागेल. अशा विखारी लोकांमुळे या संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणाºयांची यानिमित्ताने आपणच क्षमा मागावी असे वाटते. तुझे तुकडे करण्याची भाषा करणाºयांना माफ करा, असे म्हणावेसे वाटते. म्हणूनच या संयुक्त महाराष्ट्रासाठी झटणाºयांचा आणि संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जरा आठवला पाहिजे.
२१ नोव्हेंबर १९५६ ची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. तेव्हा महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नेते होते ना शिवसेना होती, ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना. फक्त प्रामाणिक नेते तेव्हा होते. म्हणूनच महाराष्ट्राला मुंबई नाकारण्याच्या निर्णयाचा सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य अर्थात काँग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येणार होता. हे सगळे गिरणी कामगार होते. मुंबई ही गिरणी कामगारांनी वाचवली होती, पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी तिथून गिरणी कामगारांना देशोधडीला लावले आणि ती परप्रांतीयांच्या घशात घातली जात आहे. मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापड गिरण्यांमधील कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल असा अंदाज होता, पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसºया बाजूने बोरिबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाºयांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाऊंटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. प्रेक्षणीय फ्लोरा फाऊंटनच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाºया निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेला हा संयुक्त महाराष्ट्र आहे. अगदी पहिला मुख्यमंत्री पदाचा मान यशवंतराव चव्हाणांना मिळाला होता. तरीही त्यांचे दिल्लीश्वरांपुढे काही चालत नव्हते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने त्यांनी काहीच भूमिका घेतली नव्हती. नेहरू आणि मोराराजीभाई देसाई यांच्यापुढे नांगी टाकण्याचेच काम त्यांनी केले होते. महाराष्ट्रातून मुंबई काढून ती गुजरातला देण्याचा मोरारजी देसाई यांचा डाव होता. सगळे काँग्रेसजन आणि महाराष्ट्रविरोधी नेते मोरारजीभाई देसार्इंच्या बाजूनेच होते. त्यामुळे महाराष्ट्रासाठी गिरणी कामगारांनी हा लढा दिला होता. त्यांनी हौतात्म्य पत्करले होते. या हौतात्म्याला तिलांजली देऊन, त्याचा अनादर करून आता याच महाराष्ट्राचे तुकडे करायला काहीजण निघाले आहेत. काँग्रेसने ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशचे विभाजन केले, तसे महाराष्ट्राचे विभाजन करण्याचे स्वप्न काही पाहत आहेत. विदर्भातील नेते कित्येक वर्ष हे स्वप्न पाहत आहेत, पण हा विभाजनाचा अट्टाहास करणारे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे स्वार्थी आहेत हे त्यातून स्पष्ट होणार आहे. समतोल विकासासाठी महाराष्ट्राचे विभाजन करायला चालले आहेत. संघवाले तर त्रिभाजन करायला चालले आहेत, पण जास्तीत जास्त काळ विदर्भ, मराठवाड्यातील मुख्यमंत्री होते. त्या लातूरमध्ये गेल्या साठ वर्षांत तिथल्या नेत्यांना पाणी नेता आले नाही, ते स्वतंत्र राज्य झाल्यावर काय विकास करणार आहेत? आज महाराष्ट्रात मुंबई आहे म्हणून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांतील रोजगार आणि विकास, अर्थव्यवस्थेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे चालते. विदर्भ स्वतंत्र झाल्यावर विकास नसताना हे काय करणार ते आता भविष्यात पहावे लागेल, पण सर्वाधिक मुख्यमंत्री या राज्यात मराठवाडा आणि विदर्भाने देऊनही त्यांना तेथील विकास करता आला नसेल आणि त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची भाषा केली जात असेल, तर या विचाराच्या नेत्यांना, त्यांच्या पक्षांना महाराष्ट्राने एकजुटीने दूर केले पाहिजे. कोरोनामुळे घरात बसल्यावर आगामी काळातील या विचारांना बाजूला करण्याचा निर्धार करण्याची हीच ती वेळ आहे.
1 may
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा