‘तं मंडळी, आपल्या गावावर चक्रीवायदुळाचं लई मोटं संकट आलं हुतं. त्या चक्रीवादळानं गावाचं न्येमकं किती नुसकान झालं हाय याची पाहणी करायला राज्याचे शीएम येणार हायत. तवा आपल्या गावात समद्यास्नी वेवस्थीत माहिती सरकारपतुर दिली पायजे.’ सरपंचानं मान्याच्या वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली तसा गावात उत्साह संचारला.
गावात शीएम येणार, शीएम येणार, गावाची पाहणी करणार म्हणून आणि शीएमच्या दौºयानंतर गावाचा कायापालट हुनार. गावाच्या अडीअडचणी शीएम समजून घेणार म्हणून समदे खुश झाले.
चार दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात त्या तोकते चक्रीवादळानं धुमाकूळ घातला. राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झालं. त्यामुळे नुसकानीची पाहणी कराय शीएम चक्क मान्याच्या वाडीत येणार म्हणून परत्येकाच्या तोंडात आचर्यानं बोटंच गेली. मान्याच्या वाडीच्या रिवाजपरमानं सगळीकडं चर्चा सुरू झाली.
नदीच्या काठावर हौसाबाई, पारूबाई, कोंडाबाई कपडे धुता धुता बोलत हुत्या.
‘हुं... समाजलं का? शीएम येणार हायत म्हणं गावात..’ हौसाबाई नाक मुरडत म्हणाली तशी पारूबाईनं इचारलं, ‘पर म्या काय म्हंती? शीएम म्हनजे नक्की कुण येणार हाय? ते हितं यीउनशान कळणार काय हायत?’
तशी हासत कोंडाबाई म्हणाली, ‘आगं शीएम म्हंजी सरपंचाचा साहीब असल कुणीतरी. त्या कलेक्टरनं पाटीवलेला. असलं कसली तरी मोजनी करायची असल, कुणाची तरी जिमीन इकायची असल. नायतर दरवर्षी कसलं ना कसलं संकट येतय, वायदुळ येतय, पावसाचा छळवाद हुतुय पर आजपातुर कदी शीएम आलं नव्हतं. मागं ते शेज का काय आणायचं हुतं तवा गावातल्या जिमीनी हव्या म्हणून अशेच कोण लोक आलते. तशीच कायतरी भानगड असल.’ कोंडाबाईनं अक्कल पाजाळली तशी हौसाबाई म्हणाली, ‘आ बया... आपन न्हाई बाय आपली जमीन इकणार... त्या शीएमना काय हुतय? म्हणं लई मोटा प्रकल्प यील. पोरास्नी नोकºया मिळतील अशा बाता करायला सोपं हाय. पर परकल्प दहा-पंदरा वर्ष येत नाय अन् तवर काय खायाचं अन् काय पियाचं? आपण नाय जमीन द्यायची.’ ‘अगं पर या निसत्या हवेतल्या वावड्या हायत.. काण शीएम येतुय ते तर समजू दे.’ पारूबाईनं मिशेरी पुडं सरकवली अन् तिगी बी घासायला लागल्या.
तिकडं पारावर दत्तुनं तर सबाच भरवली हुती. ‘आपुन तर शीएमला सांगणार हाय... या लाकडाउननं मुंबैची समदी माणसं आमच्या गावात आली. आजपतुर गेली साट वर्स गावातलं घरटी येक माणूस मुंबईत कामाला हुतं. येकानं मुंबईला जाऊन नोकरी करायची अन् दुसºयानं गावाकडं शेती करायची. पर तुमी लॉकडाउन केला. मुबैंतलं समदं कामगार बेकार झालं अन् गावाकडं आलं. वायदुळाचं काय घिऊन बसलात? या लोकांच्या पोटापाण्याचा, मुंबई सुरू करण्याचा काय इचार करणार की न्हाई?’
समद्यांनी माना हालवल्या. तसा परबत्या पाटील म्हणाला, ‘आवं लई लोकांचं नुसकान झालंय. खालच्या आळीतल्या यादवांची आट दुकानं मुंबईत हुती. चार-चार कारागीर ठिऊन ठिकठिकाणी त्यांची सलून हुती. पर वर्सभरात समदी गावाकडं आली अन् फकस्त दुकानचं भाडं भरावं लागतंय. पर ती भायीरून आलेली बिहारी लोकांची दुकानं बिनबोभाट सुरू हायत. मराटी माणसाला भिकंला लावलं अन् बिहारींना जगवलं असं या सरकारचं काम हाय.’
जित्याला आता जोर आला. तो म्हणाला, ‘म्या त शीएमना सांगणार हाय... त्या तुमच्या लोकल अन् बस प्रवासावरची बंदी पयल्यापरथम उटवा. कारखाने चालू ठेवा बोलता, अत्यावश्यक उद्योग चालू ठेवा बोलता; पण मुंबईच्या कानाकोपºयातून येणाºया कामगारांना प्रवासाची काय सोय नाय. लोकलमधून जायला बंदी अन् बसमधून जायला सोय नाय. हे कसलं नियोजन हाय का काय? वायदुळाचं काय घिऊन बसलात, आव तुमच्या नियोजनानं पार राज्याचं मुंबईचं बारा वाजल्यात तिकडं अगुदर लक्ष द्या.’
आता या पारावरच्या गप्पा रंगल्या असताना नामा भाऊ म्हणाले, ‘आता काय बोलावं अन् काय बोलू न्हाय? लाकडाउन केलं. मुंबईतनं माणसं गावाकडं आली. नोकºया, कामधंदे, शाळा सोडून समदी हकडं आली. तेनं गावातला साथीचा रोग वाडला. घरघरात भांडनं वाडली. भाऊबंदकीचा उत आला. चक्रीवादळ यापेक्षा काय येगळं हायं. माणसांची कामाची चाकं थांबली, पैसापानी थांबला अन् ते चाक सुरू करण्याऐवजी आमचं शीएम चक्रीवादळानं हैरान झालं हायत का? येक चाक बंद केलं की दुसरं चाक सुरू होतय. तुमी लोकांचं कामाचं, पोटापान्याचं चाक बंद केलं. मानसांनी चिंतेत ºहावं म्हणून सगळं बंद केलं, पण निसर्गानं आपलं चाक फिरवलं. तवा आता जनतेच्या जिवाशी खेळण्यापलीकडं जाऊन आता रोजगार, कामधंदे कशे सुरू होतील इकडं लक्ष, द्या असं आपण शीएमना सांगायचं.’
ही समदी चर्चा चालली असताना, सरपंच चार माणसांबरोबर पाराच्या दिशेनं लगबगीनं आलं. सरपंच आल्याबरोबर कायतरी नवीन माहिती मिळणार म्हणून गावकरी पाराजवळ जमले. सरपंच बोलू लागले, ‘मान्याच्या वाडीच्या समस्त ग्रामस्थांना मला काई अत्यंत महत्त्वाचं सांगायचं हाय. आपल्या गावात शीएम येणार, असा निरोप मुंबईवरून आला हुता. त्यापरमानं आपण समदी तयारीबी केली. आपल्या गावाला लागलेल्या कोरोनाच्या वादळाची पाहणी करायला शीएम येणार म्हणून आपण जंगी तयारीभी केली. पर आताच फोन आला होता मुंबैवरून. शीएम काय येणार न्हाईत.’
‘पर का येणार न्हाईत?’ जित्यानं चवताळून इचारलं तसं सरपंच म्हणालं, ‘आवं शीएमचा दौरा कोकणातल्या शान्याच्या वाडीत होता; पण त्यांच्या पीएनं चुकून शान्याच्या वाडीचा मेशेज मान्याच्या वाडीत पोचवला अन् गोंदळ झाला. आता आपलं सरकार कसं तीन पक्षांचं हाय. शीएमनं कोकणात पायचं. दुसºया पक्षानं डेपुटी शीएमनं पच्चीम माराष्ट्रात पायचं अन् उरलेल्यांनी जमलं, तर विदर्बमराटवाड्यात पहायचं. असं त्यांचं ठरल्यालं असल्यानं आपल्या गावाकडं काई जालं तरी शीएम ना जमिनीवरून दौरा करणार ना हेलिकॉप्टरमदून जाऊन येकादं पॅकेज जाहीर करणार. तवा आपलं समदं प्रश्न आपल्यालाच सोडवायला हवंत. आता सर्वांनी आपल्या कामाला लागा. सामान्य माणूस, ग्रामीण भागातली जनता यांच्यासाठी शीएम नसतो का सरकार नसतो. म्हणून तर आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल.’
सर्वांनी शीएमच्या नावाचा जयघोष करत मान्याच्या वाडीत शीएमला जय महाराष्ट्र केला.
- प्रफुल्ल फडके/रविवारची कथा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा