लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात बसून आहेत. त्यांना करमणुकीचे साधन म्हणजे फक्त टीव्ही मालिकाच आहेत. आयपीएलचा सीझन बंद झाल्यामुळे मालिका पाहण्याशिवाय पर्याय नाही, पण अनेक मालिकांचे चित्रीकरण ठप्प झाल्यामुळे कथानकं रखडत, पाणी घालत, आहे तिथून पुढे सरकतच नाहीत असे दिसून येत आहे. त्यातल्या त्यात कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना जरा आनंद मिळतो. त्यातील सर्व गायिका स्पर्धक एकसे एक असल्याने सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले जातात. मुंबईतून गोव्यात या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू झाले, पण तिथे सूर लागायच्या आतच तेथील राजकीय संघटनांनी गोव्यातले चित्रीकरण बंद पाडले. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांतील या मालिकेचे भाग पहायला मिळतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे खंडीभर वाहिन्या असूनही प्रेक्षक करमणुकीपासून वंचित आहेत असे या इडियट बॉक्सचे सध्याचे रुपडे आहे.
काही वाहिन्यांवर सतत अमिताभ बच्चनचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट असतो. हा चित्रपट पूर्ण कधीच बघितला जात नाही. काही मराठी चित्रपट वाहिन्यांवर सध्या सातत्याने 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'आई थोर तुझे उपकार' याशिवाय चित्रपट नाहीत. ते इतके वेळा बघून झाले आहेत की, आता त्या चित्रपटातील अत्याचारित महिलांच्या अभिनयासाठी रडायला कोणाच्या डोळ्यात पाणीपण शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे एकूणच सगळ्यांचा करमणुकीचा स्टॉक संपलेला असल्याने पुन्हा पुन्हा तेच ते दाखवले जात आहे.
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या तोच तो पणामुळेही हसायला येणे कमी झाले आहे. त्यातल्या त्यात दोन-तीन मालिका कशाबशा पाणी घालून चालवल्या आहेत. त्याचाच प्रेक्षकांना आधार आहे. त्या 'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये तर कहर चालला आहे. तो मोहित स्वीटू आणि तिच्या कुटुंबीयांना इतका छळतो आहे, तरी त्या स्वीटूच्या आईला त्याच्याशीच लग्न लावायची घाई झाली आहे, हे अतीच वाटते. मुंबईतील नोकरी करणारी समजंस असलेली मुलगी केवळ आईच्या हट्टासाठी मनाविरुद्ध लग्नाला कशी काय तयार होईल? ती जर समंजस आहे, सर्वांना सांभाळून घेणारी आहे, तर ती आईला समजावून का सांगू शकत नाही, असे अनेक प्रश्न या मालिकेबाबत पडतात. स्वीटूचे वडील साळवी हे पण इतके लाचार कसे काय होऊ शकतात. मोहित सगळ्यांना हॉटेलमध्ये आग्रह करून घेऊन येतो. त्याचे सात हजार रुपये बिल होते. ते बिल देण्याचा आग्रह तो साळवींना करतो. त्यामुळे त्यांची बेइज्जती होते, वेटरकडून मार खावा लागतो हे किती अतिरंजीत आहे. कोणीही सामान्य माणूस तू आम्हाला इथे घेऊन आला आहेस, त्यामुळे हे बिल तुला दिले पाहिजे, असे ठणकावून सांगेल, पण आपला मोबाइल तिथे ठेवून बिल देण्याचा प्रयत्न करणाºया स्वीटूच्या वडिलांची बेइज्जती हे न पटणारे आहे. तिकडे ती मालविका नक्की कसला बिझनेस करते आहे? हजारो कोटींच्या गप्पा पण त्याचे काहीही दर्शन नाही. ना कोणती प्रॉडक्शन करण्याची बात, बिझनेसची बात. फक्त त्या मोमोशी लग्न लावण्याचा धंदा तिने चालवला आहे. खरं तर आता बदलत्या काळानुसार मालिकांमधून हे पोळीभाजी, मसाले, लोणची, फूड प्रॉडक्ट, काढे असले धंदे बंद केले पाहिजेत. जी मालिका गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर आलेली आहे त्यात तरी बदल होणे अपेक्षित आहे.
जरा मालिकांच्या निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांनी आता आपल्या कथानकातील धंदे हे बदलेले पाहिजेत. पोळ्या लाटणारी, विकणारी फॅमिली दाखवण्यापेक्षा छोटे मास्क शिऊन घरोघरी, दुकानात पोचवणारी उद्योजक दाखवता येईल. सॅनिटायझरचे उत्पादन करणारी कोणीतरी कारखानदार दाखवता येईल. मालविकाने काढे, डायड फूड बनवण्यापेक्षा आॅक्सिजन प्लँट उभारला आहे असे दाखवले तरी चालेल. मालिकांमधला तोच तो पणा काढून टाकण्याची गरज आहे.
झी मराठीवरची दुसरी मालिका म्हणजे 'देवमाणूस'. याला कधी एकदा पकडतात याची वाट प्रेक्षक पाहत आहेत, पण तो एकापाठोपाठ एक खून करत आहे आणि पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिसांच्या हातात लागलेला महत्त्वाचा साक्षीदार हॉटेलमधील वेटरलाही लाडवात विष घालून त्याने मारले. तरी त्या सर्वांगसुंदर आणि डोक्याने कमी असलेल्या पोलीस अधिकारी महिलेला डॉक्टरचा संशय येत नाही. मंगळवारच्या भागातही मुंबईहून आले असे वाटेत गाडी अडवलेल्या डॉक्टरच्या समोर बोलताना अजूनही आपण त्याच्या प्रेमातच आहोत असे दाखवणे आणि जराही संशय न येणे हे न पटणारे आहे. दोन दिवसांपूर्वी ही बया आता योग्य मार्गावर आलेली आहे, तपासाची दिशा सापडते आहे, काही गोष्टी गुप्त राखते आहे असे वाटत असतानाच पुन्हा डॉक्टरला बघून पाघळते हे वैताग आणणारे झाले आहे. खरं तर मालिकांमधील गुन्हेगारांचे शौर्य, क्रौर्य दाखवण्यापेक्षा पोलिसांची तपास यंत्रणा कशी मजबूत असते हे दाखवणे गरजेचे असते. गुन्हेगारांचे उदात्तीकरण होण्यापेक्षा पोलिसांची कर्तबगारी दिसणे आवश्यक आहे, पण इथे प्रत्येक वेळी पोलीस यंत्रणेचे धिंडवडे काढलेले दिसतात. हा बदल होणे गरजेचे आहे. आता लॉकडाऊनमुळे काहीही दाखवायचे आणि नाइलाजाने पहायचे. हातात रिमोट असला तरी चॅनेल बदलूनही दुसºया चॅनेलवर तोच प्रकार आहे. करमणुकीसाठी वृत्तवाहिन्यांकडे जावे, तर तिथेही सगळ्या हॉरर स्टोरी पहायला मिळतात. कोरोनाचे रौद्र, अतिरंजीत स्वरूप आणि काहीतरी घोटाळे. त्यामुळे पाणीदार झालेली कथानके आणि अतिरंजीत वाहिन्या यात छोटा पडदा करमणूक करण्यात कमी पडत आहे असे वाटू लागले आहे.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा