रविवार, २३ मे, २०२१

कोल्हटकरी नाटके


मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटकरांनी अतिशय सुंदर अशी नाटके मराठी रंगभूमीला दिली. त्यातील बहुसंख्य नाटके ही तुफान चालली आणि हजारो प्रयोग या नाटकांनी केले, पण बाळ कोल्हटकर म्हटले की सर्वांना प्रथम लक्षात येते हे त्यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे नाटक. त्यांच्या नाट्यसंस्थेचे नावही त्यांनी ‘दुर्वांची जुडी’ असेच ठेवले होते.


महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाट्यसृष्टीतला एक मानबिंदू. भाषेवर असलेले प्रभुत्व आणि भाषेचे सौंदर्य भाषेतील अलंकारांनी सजवणारे शब्दप्रभू नाटककार म्हणजे बाळ कोल्हटकर. बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले, पण लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. यातून त्यांनी समृद्ध नाटककार म्हणून ख्याती मिळवली. अनुभवाची जोड आणि निरीक्षणाची बाजू भक्कम असल्याने त्यांची लेखणी ही सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबीयांना आपली वाटली होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘जोहार’ हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्याकडे नाटकात काम करणारा, नाटकाचे वेड असलेला कलाकार म्हणजे टिंगलीचा विषय असतो. पन्नास वर्षांपूर्वी तो जास्तच होता. त्या काळात कसल्याही टीका, टिंगलीची परवा न करता ते कार्यरत राहिले. त्यामुळेच ज्यांना पूर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेक्षकांची नस नेमकी ओळखत असत. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील सुभाष हा आपल्या जवळच कुठेतरी आहे, आसपास वावरत आहे आणि त्याला आपण कुठेतरी पाहिले आहे, असे प्रेक्षकांना वाटण्याइतके जवळचे नाटक त्यांनी लिहिले होते. प्रेक्षकांच्या मनात आणि घरात घुसून नाटक जोडण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नाटकातील प्रसंग हे नाट्यमय असले, शाब्दिक कमाल करणारे असले, तरी ते आपल्या अवतीभोवती घडलेले असे वाटतात. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत, थोडेसे अतिभावनिक असोत, पण सामान्य प्रेक्षकांना अश्रू पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. ब‍ºयाच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती, तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्यं जपली होती.

त्यांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकांचे पंधराशे प्रयोग, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचे चौदाशे प्रयोग, ‘मुंबईची माणसे’ याचे जवळपास दोन हजारांच्या वर, तर ‘एखाद्याचे नशीब’ या नाटकाचे हजारावर प्रयोग झाले. यावरून नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.


‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाने कौटुंबिक नाटकाला एका उंचीवर नेऊन ठेवलेच, पण यातील वास्तव चित्रण उभे करणे यातही त्यांच्यातील दिग्दर्शक आणि निरीक्षण शक्ती अतिशय सुंदर होती. या नाटकाचे सेट किंवा नेपथ्य हे एक बोलके वातावरण तयार करणारे होते. दारात तुळशी वृंदावन, बाहेर टाकलेली खाट, आत येताना पाय धुवून येण्यासाठी केलेली छोटीशी मोरी, कुसवांच्या पलीकडून घराच्या दिशेने येणारी माणसं आणि छोटं फाटक उघडून आत येण्याची सोय हे जुन्या मराठी घरातील वातावरण उभे करणारे होते. दिवाळीतील वातावरण, तुळशी वृंदावनाजवळची पणती यातून अस्सल मराठीपण उभे राहात होते. हे करता करता सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडोचा संदेश देत वाहिलेली दुर्वांची जुडी प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घ्यायची.

‘सीमेवरून परत जा’ या नाटकातून बाळ कोल्हटकरांनी जग जिंकायला आलेल्या अलेक्झांडर आणि पौरस यांच्यातील संघर्ष शब्दांनी इतका सुंदर मांडला आहे की, यातील शब्द हे शस्त्र बनून जातात. पौरसाकडून अलेक्झांडरला घायाळ करण्यास, खच्चीकरण करण्यास कारणीभूत होतात. यातून त्यांनी देशप्रेम, संघटन यावर कटाक्षाने भर दिलेला दिसून येतो.


‘उघडले स्वर्गाचे द्वार’ या नाटकातून वसिष्ठ विश्वामित्र यांच्यातील संघर्ष मांडला आहे. आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे म्हणून चाललेली विश्वामित्राची धडपड आणि वसिष्ठ राजर्षी म्हणतात म्हणून त्या वसिष्ठाला संपवायला निघालेल्या विश्वामित्राचा चिडचिडेपणा या संघर्षातून तयार झालेले नाटक हे उत्तम कलाकृती म्हणून ओळखले जाते. कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक अशा सर्वप्रकारच्या नाटकांमधून लिलया आपल्या भाषेचा प्रवास करणारे नाटककार म्हणून बाळ कोल्टकरांचे स्थान हे फार मोठे आहे.

बाळ कोल्हटकर हे स्वत:ला राम गणेश गडकरींचे शिष्य मानायचे. अर्थात हे शिष्यत्व द्रोणाचार्य एकलव्यासारखेच होते. कारण दोघे प्रत्यक्षात कधी भेटले नव्हते, पण गडकरींची नाटके ही गडकरी पंचाक्षरी म्हणून ओळखली जातात तशी बाळ कोल्हटकरांची नाटके ही नवाक्षरी होती. यामध्ये ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘देणाराचे हात हजार’, ‘ सीमेवरून परत जा’, ‘ देव दिनाघरी धावला’, ‘दुरितांचे तिमिर जाओ’, ‘ वेगळं व्हायचंय मला’, ‘उघडले स्वर्गाचे द्वार’ या नाटकांचा समावेश होतो.


बाळ कोल्हटकरांच्या नाटकांतील गीतेही अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर अशीच आहेत. यातील ‘उठी उठी गोपाळा’, ‘ऋणानुबंधांच्या कुठून पडल्या गाठी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’ ही  गंधर्व, भालचंद्र पेंढारकर, माणिक वर्मा यांनी अजरामर केलेली नाट्यगीतं आहेत.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: