पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे कवित्व खूप बाकी आहे. त्यापैकी एक बाब म्हणजे इथून डाव्यांचे आणि काँग्रेसचे समूळ उच्चाटन झालं आहे. त्यामुळे इथून पुढे तिथे भाजप आणि तृणमूल यांच्यातच लढाई बघायला मिळणार आहे. अधुनमधुन या झाडावरचे कावळे त्या झाडावर होण्याचे प्रकारही पाहायला मिळतील, पण डावे सगळीकडून संपत चालले आहेत. याचे कारण विकासाच्या कामात, नव्या विचारात कायम आडवं पडायचं आणि कामं बंद पाडायची. प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा आणि नकारात्मक वातावरण तयार करायचे, ही डाव्यांची प्रवृत्ती होती. या प्रवृत्तीला आता आळा बसला आहे. दादा कोंडके यांच्या 'पळवापळवी' या चित्रपटात एक अत्यंत मार्मिक असा सीन आहे. दिनानाथ टाकळकर हा मास्तर असतो. शाळेत यायला उशीर होतो. तेव्हा दादा कोंडके त्यांना विचारतात, इतका का उशीर झाला? तर मास्तर म्हणतात, अहो रात्रभर जुलाब लागलेत. काही केल्या थांबता थांबत नाहीत. गोळ्या घेतल्या, औषधं घेतली, पण थांबता थांबत नाही. हे थांबण्यासाठी काही उपाय तुम्हीच सांगा. तेव्हा दादा कोंडके लाल कापड देतात आणि म्हणतात, खाली लाल बावटा लावा म्हणजे आपोआप सगळं बंद होईल. या लाल बावट्याने, डाव्या विचारांनी उद्योगधंदे कसे बंद पाडले आहेत, कामगारांना देशोधडीला कसे लावले आहे, यावर ते भाष्य होते. मुंबईतील गिरणी कामगार यामुळेच देशोधडीला लागला. त्यामुळे डाव्यांना संपवणे हेच योग्य होते. दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जींनी डाव्यांची चोवीस वर्षांची राजवट संपुष्टात आणली. आता भाजप आणि तृणमूल या दोघांनी मिळून त्यांचे नामोनिशाण संपवले.
तोच प्रकार काँग्रेसबाबत झाला आहे. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय ठरू पाहणाºया काँग्रेस पक्षाची काय हालत झाली आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे. केरळमध्ये आलटून पालटून विरोधक आणि सत्ताधारी बदलत असल्याचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यानुसार तेथे काँग्रेसला सत्ता मिळणे अपेक्षित असताना या ठिकाणी काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. आसामातही त्यांना अँटी इन्कबंसीचा लाभ घेता आला नाही. एकवेळ हातातोंडाशी आलेला विजय निसटला असता तरी या पक्षाला सहानुभूती मिळाली असती, पण वरील दोन्ही राज्यांत ज्या फरकाने त्यांनी सत्ता गमावली आहे, ती पाहता अशी सहानुभूतीही त्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता मावळली आहे. आता या निवडणूक निकालानंतर काँग्रेसच्या वाट्याला थट्टाच येऊ लागल्याचे सोशल मीडियांतील प्रतिक्रियांवरून दिसते आहे. ममतांच्या विजयानंतर मोदी-शाह जोडगोळीवर सोशल मीडियात जितकी 'मिम्स' आली आहेत, त्या खालोखाल काँग्रेसच्या या पराभवावरही लोकांनी बºयापैकी टवाळी केलेली दिसते आहे.
देशभर मोदी-शाह आणि भाजपच्या विरोधात मोठी नाराजी असताना त्या नाराजीचा लाभ घेत काँग्रेसला निदान आसामात तरी विजय मिळवणे अवघड नव्हते, पण तेथेही ते कमी पडले. वास्तविक निवडणूक स्ट्रॅटेजी म्हणून जे काही करता येणे आवश्यक होते ते काँग्रेसने आसामात अगदी अचूकपणे केले होते. त्यांनी तेथे तब्बल सातहून अधिक प्रादेशिक पक्ष एकत्र आणून एक महाआघाडी तयार केली होती. भाजप आघाडीतील बोडोलँड पीपल्स फ्रंट हा महत्त्वाचा राजकीय पक्षही त्यांनी त्यांच्यापासून फोडून आपल्या आघाडीत घेतला होता. तरीही काँग्रेसला यश मिळू शकले नाही. याचा अर्थ काँग्रेसला जनता डावलते आहे. त्यांच्या चुकीच्या विचारधारेने डाव्या पक्षांप्रमाणे त्यांची वाताहात होताना दिसते आहे. चुकीची विचारधारा म्हणण्यापेक्षा नसलेली विचारधारा. फक्त एकच, विचार पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबीयांनी करायचे. गांधी-नेहरू नाव घ्यायचे आणि मतं मागायची. ना कसले धोरण, ना कसला जाहीरनामा. या प्रकाराला जनता वैतागली आणि हा बिनकामाचा पक्ष म्हणून त्याला बाहेर काढले. जे डाव्यांचे झाले तेच काँग्रेसचे होताना दिसत आहे. सध्या या पक्षाची अवस्था एखाद्या छोट्या प्रादेशिक पक्षापेक्षाही केविलवाणी अशी झालेली आहे.
कोणताही पक्ष मोठा होण्यासाठी आणि टिकण्यासाठी त्याच्याकडे विचार असावा लागतो. पक्ष कधी संपत नाही, त्याचा विचार टिकून राहतो. कमी-जास्त होत राहते, पण विचार असलेला पक्ष टिकतो. विचारापासून भरकटला की त्याला जनता लांब करते. हिंदुत्वापासून एखादा पक्ष दूर गेला तर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ज्यांनी मते दिली ते त्या पक्षापासून लांब जाणारच. तसा कोणताच विचार आज काँग्रेसमध्ये नाही. फक्त गांधी हे नाव आता उपयोगाचे नाही. अंधपणे लोक त्यांना जवळ करणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि डावे पक्ष रसातळाला गेले. नामशेष होताना दिसत आहेत. काँग्रेसचे नाव आता फक्त तुकडे पडलेल्या पक्षांमुळे जिवंत राहील. काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेस झाले, राष्ट्रवादी काँग्रेस झाले, तसे फक्त काँग्रेस हे कुठेतरी नाव राहील, पण मूळची काँग्रेस ही नावालाही राहणार नाही असे दिसते. आसाममध्ये चहाच्या मळ्यात जाऊन प्रियंका गांधींनी चहाची पाने खुडल्याचे सुरुवातीला दाखवले गेले. काँग्रेस कामाला लागली असे तेव्हा वाटले, पण त्या तर काँग्रेसलाच मुळापासून खुडून आल्या असे वाटते.
5 may
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा