शुक्रवार, २८ मे, २०२१

आता जनतेला काम करू द्या


कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी पाहता-पाहता देशातील अनेक राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले. त्याचा फायदा झालेला दिसू लागला आहे. वेगाने सुरू झालेले लसीकरण आणि विविध राज्यांमध्ये टाळेबंदीसह योजलेल्या कठोर उपाययोजनांमुळे गेल्या दहा दिवसांत सक्रिय बाधितांची आढळणारी संख्या अर्ध्यावर आल्याने देशातील नागरिकांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्याचवेळी काही भागात कडक निर्बंध केले जात आहेत. काही राज्यांनी विशेषत: दिल्ली, तामिळनाडूने निर्बंध वाढवले आहेत, तसेच महाराष्ट्रातही १ जूनपासून हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आहेत; पण हे किती काळ चालणार? याने थांबलेले अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही प्रयत्नच केले जाणार नाहीत का, हा खरा प्रश्न आहे.

खरं तर १० मे रोजी देशातील सक्रिय बाधितांची आकडेवारी २४.८३ टक्के होती, ती २२ मे रोजी १२.४५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याची बाब नीती आयोगाच्या आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. त्यामुळे सावधगिरी घेणे जरी गरजेचे असले, तरी घरात कोंडून घेत जगणे हा काही त्यावरचा उपाय नाही. या कोंडून घेण्यामुळेच हे बुरशीजन्य आजार पसरत आहेत काय, अशी शंका मनात येते.


गेल्या पंधरा-वीस दिवसांत सातत्याने काळी बुरशी, पांढरी बुरशी असले विषय बातम्यांमधून येत आहेत. त्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार झाल्याची चिंता व्यक्त होत आहेत. हे प्रकार एकातून एक, एकातून दुसरे उद्भवण्याचे प्रकार आहेत. हे सातत्याने होतच राहणार म्हणून काही घरातच बसून रहायचे, असा त्याचा अर्थ होत नाही.

माणसांना बुरशी लागते हे किती लाजीरवाणं आहे. खरं तर आपल्याकडं बुरशी ही कुजलेल्या, सडलेल्या, शिळ्या पदार्थांना येते. शिळी भाकरी पोळी किंवा पावाचा तुकडा, तसेच डब्यात बंद करून ठेवले तर त्याला बुरशी येते. हवेचा दमटपणा, शुद्ध स्वच्छ हवा लागली नाही आणि भिंतीला ओल आली, तर भिंतींना बुरशी लागते. याचे कारण मोकळी शुद्ध हवा त्या घरात फिरली नाही. कित्येकवेळा वर्षाचे म्हणून घातलेले लोणचे असते, त्याला नीट अधून-मधून मीठ, तेल घालून डाव फिरवून हालवले नाही, तर कोंडमारा झाल्याने बुरशी लागते. कपाटात बरेच दिवस आपण कपडे, चादरी, बेडसिट ठेवून दिली, तर त्यांना हवेतील दमटपणामुळे, हवेतील बाष्पकण साचल्याने कपाटातल्या कपाटात बुरशी येते. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की, शुद्ध हवा न मिळाल्याने आणि कोंडमारा झाल्याने बुरशी येते.


गेले वर्ष सव्वावर्ष माणसं घरात बसून आहेत. त्यांना बुरशी येईल नाहीतर काय होईल? हे समजण्यासाठी कोणत्याही डॉक्टर, वैद्य शास्त्रज्ञाची गरज नाही. त्यामुळे आता अंगातला आळस, मरगळ, झटकून कामाला लागणे, अर्थचक्र सुरू ठेवणे हाच यावरचा उपाय आहे. दु:ख आणि रोग जेवढा कुरवाळत बसाल तेवढे ते वाढत जाते. आज कोरोनाचे तसेच झाले आहे. त्याला जास्त कुरवळण्यात वेळ घालवता कामा नये हे आमच्या डॉक्टरांनी, समाजव्यवस्थेने समजून घेतले पाहिजे.

गेल्या महिना पंधरा दिवसांत कोरोनावर चर्चा होतच नाहीये, तर चर्चा फक्त म्युकरमायकोसिस, पांढरी बुरशी, काळी बुरशी यावर होत आहे. हा कोरोनाचा दुसरा अवतार आहे, असे म्हटले जात आहे; पण हा दुसरा अवतार आपणच घ्यायला लावला आहे. घरात बसून त्याला पोसण्याचे काम आपण करत आहोत.


बुरशी कुठे नाही? राज्यकर्त्यांच्या मेंदूला बुरशी आलेली आहे. बुरशी हा आळसाचा, निष्क्रियतेचा अवतार आहे. काम करणाºयांना घरात बसवायचे आणि अर्थचक्र थांबवायचे. लोकांची उपासमार करायची, बेरोजगारी वाढवायची ही राजकीय बुरशी आहे. बुरशी ही परावलंबी वनस्पती असल्याचे वनस्पती शास्त्रात म्हटले जाते. ती दुसºया वस्तुतील अन्नकण शोषून घेते, म्हणजे बुरशी ही शोषणकर्ती आहे. आज आमचे राज्यकर्ते शोषणकर्तेच झाले आहेत. सर्वसामान्यांचा हक्काचा रोजगार काढून घेऊन त्यांना घरात बसवून परावलंबी बनवत आहे. आमच्या जनतेलाच बुरशी बनवण्याचे काम ही सरकारी यंत्रणा करताना दिसत आहे.

या दीड वर्षाच्या काळात एक फार मोठी विषमता सरकारने निर्माण केलेली आहे. मध्यमवर्गीयांना गरीब केले. गरिबांना दरिद्री केले आणि वैद्यक व्यवसायाच्या लोकांना इतके श्रीमंत करून सोडले की, ते शोषणकर्ते होताना दिसत आहेत. आज जो तो एकमेकांना लुबाडायचा विचार करतो आहे. मास्क, सॅनिटायझर, औषधे हे उत्पादक प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत. औषधांच्या किमती वर्षभरात दुप्पट चौपट केल्या गेल्या. सध्या फंगस किंवा बुरशीजन्य औषधांचा तुटवडा असल्याचे सांगून त्याच्या किमती वाढवल्या जात आहेत. वितरकांकडे असलेल्या औषधांचा साठा परत घेऊन त्यावरील किमतीची लेबल बदलली जात आहे. हा सगळा काळाबाजार सरकारी प्रोत्साहनाने होत आहे. प्रत्येक जण बळी तो कानपिळी या न्यायाने वागतो आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. त्याचा परिणाम पोलीस सर्वसामान्यांवर राग काढत आहेत. काठीने बडवत आहेत. सरकारला जर माणसांना जगूच द्यायचे नाही, तर मरायला मोकळं सोडा. शेवटी आम्ही जबाबदार, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार असेच जर आहे, तर जनतेला त्यांच्या जबाबादारीवर कामासाठी, पोटापाण्यासाठी बाहेर पडू द्या ना. त्यांचे अर्थचक्र थांबवून काय साध्य होत आहे? वर्षभर घरात बसवून जर कोरोनानंतर फंगस, बुरशी येत असेल, तर हा लादलेला रोग नाही का?


सरकार जर इतके हुशार आहे, प्रामाणिक आहे, काळजीपूर्वक काम करत आहे, तर मग सरकारी यंत्रणेला, घराच्या बाहेर न पडणाºया मंत्र्यांना, एसी गाड्यांमधून हिंडणाºयांना कोरोना का होतो आहे? त्यातून ठराविक लोक बरे होत आहेत, तर ठराविक लोकच का जगत आहेत? हे नेमके काय आहे? आज फक्त वैद्यकीय चक्र चालू आहे. ते चालू राहुदेत; पण सर्वसामान्यांचे अर्थचक्र चालू व्हायला पाहिजे. त्यामुळे आता १ जूननंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवला, तर या राज्यात अराजक माजेल, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल, चोºया माºया वाढतील. माणसं माणसाला खायला उठतील. कारण हे निर्णय घेणाºयांची पोटं भरलेली आहेत. त्यांना कसली चिंता नाही, त्यामुळे त्यांना आदेश देणे सोपे आहे. रोजी थांबली, तरी रोटी थांबणार नाही हे भाषणात बोलायला सोपे आहे; पण किती जणांना घरात बसून रोटी मिळाली हे सांगता येणार आहे का? चार महिन्यांत चार लाख मोफत शिवभोजनच्या थाळ्या देऊन १२ कोटी जनतेची पोटं भरली, असे मुख्यमंत्र्यांना वाटते का? तेव्हा मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, सरकारने त्यांना भीती वाटत असेल, तर घरात थांबावे; पण जनतेचे जे अर्थचक्र, रोजगाराचे चक्र थांबवले आहे, ते सुरू करावे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\

24 may

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: