कोरोनाच्या दुसºया लाटेतील लॉकडाऊन म्हणजे गोड भाषेत कडक निर्बंध सध्या सुरू आहेत. हे निर्बंध अजून किती काळ राहतील आणि किती वेळा वाढतील हे कोणीच सांगू शकणार नाही. त्यामुळे आता इथून पुढचे जग कसे असेल हा प्रश्न आहे. आता अर्थव्यवस्थेला थोडी चालना मिळेल असे वाटत असतानाच पुन्हा कधी लॉकडाऊन लागेल हे सांगता येत नाही असे वातावरण तयार होत आहे, पण यातून प्रत्येक माणसाची, राज्याची, देशाची आणि जगाची आर्थिक स्थिती भविष्य काय असेल हे आपल्याला पहावे लागेल. हा नवा बदल, नवी लाईफस्टाईल किंवा जीवनशैली जगण्याची आपल्याला तयारी करावी लागेल हे नक्की. ज्याप्रमाणे आपण मास्क लावण्याची सवय लावून घेतली आहे त्याचप्रमाणे आता आपल्या जीवनाला काही नव्या सवयी लावाव्या लागतील.
आज जगभरात वर्चस्वाची जी स्पर्धा लागली आहे, त्या स्पर्धेतूनच कोरोनाचा जन्म झाला आणि हे पाप विस्तारवादी, साम्राज्यवादी चीनने केले आहे. चीनला सुपरपॉवर होण्याची घाई झाली आहे आणि या घाईतूनच चीनने या व्हायरसची निर्मिती केली. एखादा देश किंवा एखादी व्यक्ती आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते, हे कोरोनाच्या प्रसाराने दाखवून दिले आहे. चीनमधला बाधितांचा आणि मृतांचा आकडा अत्यंत अल्प आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने आपला आकडा मर्यादीत ठेवत संपूर्ण जगाला वेठीस धरले. संपूर्ण जग गेले सव्वा वर्ष बंद पाडून त्यांच्या अर्थव्यवस्थेला खिळ घातली आहे, मात्र यातून चीन नामानिराळा राहू पाहत आहे.
कोरोना व्हायरस हे एकप्रकारचे जैविक अस्त्रच आहे, ज्याने जगभर थैमान घातले आहे. जगभरातल्या गळेकापू स्पर्धेतून या व्हायरसचा जन्म झाला असावा, असे मानण्यास आजतरी जागा आहे. आज आपल्याजवळ जेवढे आहे, त्यापेक्षा अधिक कमवा, असे आजचे अर्थशास्त्र शिकविते. यातून अधिकाधिक कमावण्यासाठी अनैतिक स्पर्धा सुरू होते आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाधिक पैसा कमवायचा, त्यातून स्वत:ची ताकद वाढवायची आणि वाढलेल्या ताकदीतून विस्तार करायचा, हा प्रकार भांडवलवाद जन्माला घालून खतपाणी देणाराच म्हटला पाहिजे. हे सगळे काही औषध कंपन्या, फार्मास्युटिकल कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे का? अशा अनेक शंका आज निर्माण होत आहेत.
एखाद्या घरातील एका व्यक्तीला लागण झाली, तर त्या घरातील पाचही व्यक्तींना अॅडमिट केले जाते. त्यांच्या संपर्कातीला पाच-पंचवीसच लोकांना पकडले जाते. हा एकत्रित आकडा फुगत जातो, पण एकूणच जागतिक वर्चस्वाच्या या लढाईतून, स्पर्धेतून अनेक देशांनी महासंहारक शस्त्रास्त्रे निर्माण केली आहेत. या महासंहारक शस्त्रांचा वापर वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांविरुद्ध झाला, तर संपूर्ण जग त्यात उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही ठिकाणी वन्यपशूंना, वाघांनाही हा रोग झाल्याच्या बातम्या आल्या आहेत, तर काही ठिकाणी माकडांना झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. म्हणजे हे नक्की काय चालले आहे? यातून कधी बाहेर पडायचेच नाही काय? आता भविष्यातील नुकसान टाळायचे असेल, तर आजच त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
आपली अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, तिचे स्वरूप कसे असावे, यावर मंथन सुरू झाले पाहिजे. आज आपण ज्याला अर्थव्यवस्थेचा सिद्धांत असे म्हणतो, त्याचा आधार एकमेव आहे आणि तो म्हणजे भौतिकवाद. अर्थशास्त्राच्या प्रत्येक मूळ कल्पनेचा आधार हाच आहे. हाच त्याचा दृष्टिकोनही आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने मानवाचे जे व्यवहार आहेत, ते उत्पादक वा अनुत्पादक असू शकतात. मनुष्याच्या ज्या व्यवहारामुळे काही ना काही प्रमाणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या भौतिक गरजा पूर्ण होतात, त्याला उत्पादक व्यवहार असे आपण म्हणू शकतो. अर्थशास्त्राचे हे स्वरूप समजून घेणे तसे कठीणच आहे, पण ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. मनुष्यजातीचे अस्तित्व सुरक्षित करायचे असेल, तर वर्चस्वासाठीच्या लढाईला पूर्णविराम कसा देता येईल, याचा विचार करावा लागेल. आपल्या गरजा किती आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून जगभरातील देशांना आपली धोरणे सुनिश्चित करावी लागतील, अन्यथा यापूर्वी झाले नसेल एवढे प्रचंड नुकसान भविष्यात होईल, हे कायमचे लक्षात ठेवावे लागेल. जगाचं जे काय व्हायचं ते होत राहील. आपण भारताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जगातल्या अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी आली असतानाही आणि अमेरिकेसारख्या देशाने गतकाळात आर्थिक निर्बंध लादले असतानाही आपली अर्थव्यवस्था तग धरून राहिली होती. भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमुळेच हे शक्य झाले. आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरच आधारित आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' ही नवी कल्पना देशवासीयांपुढे मांडली आणि ती सगळ्यांना आवडलीही. प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर कसे होता येईल आणि स्वावलंबी बनून देश मजबूत कसा करता येईल, याचा विचार मांडताना मोदींनी काळाची पावलं ओळखली आहेत, हेही तेवढेच खरे! अमेरिकेसारख्या देशाला औषधांचा पुरवठा करून भारताने जगाला आपली ताकद आणि क्षमता यांचा परिचय करून दिला आहे. तरी अजूनही बरेच काही करण्याची गरज आहे. सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न व्हायचे, ते सुरू आहेत आणि राहतीलच, पण या देशाचा एक सतर्क आणि कर्तव्यदक्ष नागरिक या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकाने स्वदेशीचा अंगीकार करायला शिकले पाहिजे. चीन आणि सर्वच परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा निर्धार हेच या युद्धाचे मुख्य हत्यार असणार आहे. आज संपूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त झाले आहे. प्रत्येकजण स्वत:ला घरात कोंडून बसला आहे, नव्हे, कोरोनाने माणसाला घरात बसण्यास बाध्य केले आहे. पण ही मरगळ झटकण्याची हीच वेळ आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा