गुरुवार, २० मे, २०२१

संयम राखला पाहिजे.

सध्या आपला देश एका गंभीर आरोग्य संकटाला तोंड देत आहे. गेल्या काही दिवसांपासून येत असलेले अहवाल, निरीक्षणे पाहता हा हाहाकार वाढण्याची शक्यता आहे. या महामारीचे नवे लक्ष्य लहान मुले असल्याचेही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत परस्परांवर टीका करणे, चिखलफेक करणे यात गुंतलेल्या राजकीय नेत्यांनी थोडे गप्प बसावे असे वाटते. या संकटाने देशाचे सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही शक्ती टार्गेट करत आहेत. त्यांच्या पक्षाचे कनिष्ठ नेते अन्य पक्षांना टार्गेट करत आहेत. त्यामुळे वेळ काय, परिस्थिती काय आणि आपण करतो आहोत काय, हे लक्षात घेतले पाहिजे. चिखलफेक करून काहीच साध्य होणार नाही, तर एकत्र येऊन लढणे फार महत्त्वाचे आहे.


प. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतत निवडणूक प्रचार करण्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. किंबहुना त्या मुद्याचे राजकारण केले जात आहे, पण ते जरी पंतप्रधान असले तरी एका राजकीय पक्षाचे नेते, आयकॉनही आहेत. त्यामुळे प्रचारासाठी त्यांचा वापर होणे, सहभागी होणे हा काही गुन्हा नाही. किंबहुना पंतप्रधानांनी प्रचारात उतरू नये असे कुठेही म्हटलेले नाही, नियमही नाही, पण गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या कामगिरीचे अवमूल्यन करून निवडणुकीतील अपयश आणि वाढती महामारी यावरून टार्गेट करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे राज्यातील परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य रीतीने करत आहेत. तीन पक्षांचे सरकार बरोबर घेऊन जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जात ते योग्य परिस्थिती हाताळत आहेत. किंबहुना राज्यात भाजप विरोधक पक्ष असला तरी मुख्यमंत्री सातत्याने पंतप्रधानांच्या संपर्कात आहेत. वारंवार पत्र पाठवून, फोनवरून संपर्क साधून आपली मते कळवत आहेत, आपल्या मागण्या करत आहेत. पंतप्रधानही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ते हाताळत असलेल्या परिस्थितीचे कौतुकही करत आहेत. हे फार महत्त्वाचे आहे, पण या दोघांच्या आजूबाजूचे मात्र एकमेकांवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री आपल्या भाषणात, निवेदनात पंतप्रधानांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानत आहेत. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत आहेत. असे असताना कडेचे चिखलफेक का करत आहेत? ही ती वेळ नव्हे. म्हणजे आपल्याकडे म्हणतात मुंजा वाईट नसतो, पण प्रभावळ वाईट असते. तर या प्रभावळीने आता सांभाळले पाहिजे. संयम राखला पाहिजे.

आपला देश एकापाठोपाठ दुसºया संकटाने घेरला जात होता, मात्र पंतप्रधान कोविड निराकरणासाठी उशिरा सक्रिय झाले. त्यामुळे लोकांची निराशा झाली. लोकांना रुग्णालयात खाटा मिळत नव्हत्या. आॅक्सिजनचा प्रश्न तीव्र झाला होता. देश या संकटाचा सामना करत होता, तेव्हा पंतप्रधान प्रचारात दंग असल्याचे लोकांनी पाहिले. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी राज्यांशी चर्चा न करताच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला, पण त्यानंतरही देशात कोविड संसर्ग टाळण्यासाठी हा धाडसी निर्णय असल्याचे कौतुकही अनेकांनी केले. आत्मनिर्भर भारत हे त्यांचे स्वप्न फार महत्त्वाचे आहे. ज्या प्रकारे एका दिवसात तीन तीन निरनिराळ्या राज्यांतील संस्थांना भेटून लसीच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले हे फार महत्त्वाचे होते. लसीकरणाबाबत आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून राहू नये यासाठी त्यांची असलेली तळमळ ही फार महत्त्वाची होती. कारण देशाला मोठे बनवण्यासाठी जगभरातील लसींचे आपण दाते असलो पाहिजे हा उद्देश होता, पण त्यावरूनही टीका होत गेली. बाहेरच्या देशांना दिलीच का? वगैरे टीका सुरू झाली, पण आपल्या उत्पादनातील काही भाग बाहेर देणे आवश्यक होते. ही लस सर्वश्रेष्ठ आहे आणि देश आत्मनिर्भर होतो आहे. यासाठी जगाला आपली ताकद दाखवण्यासाठी ते महत्त्वाचे होते, पण त्यावर टीका झाली ही दुर्दैवी आहे. टीका करून, चिखलफेक करून काही होणार नाही. सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. अर्थात पंतप्रधान मोदी हे कसल्याही टीकेला उत्तर देत नाहीत. तोच प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. ते कोणत्याही टीकेला भीत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे हे त्यांना समजते. त्याबाबतीत सहकारी पक्षांना विश्वासात घेतात, वेळप्रसंगी आग्रही राहतात आणि समजावून सांगतात हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे दोन राज्यांचे नेतृत्व करणारे आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते ठाम असताना बाकीच्यांनी टीका करण्यात, चिखलफेक करण्यात का वेळ घालवावा हे न कळणारे आहे.


आज प्रत्येक पक्षात काही नेते आहेत ते केवळ वाचाळगिरी करत आहेत. प्रवक्ते असा त्याला गोंडस पदनाम आहे, पण खरे तर त्याला वाचाळवीर हे पदच योग्य राहील. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि सर्वच पक्षांत असे नेते आहेत, त्यांनी आपल्या जिभेला लगाम घालून या संकटावर एकत्र येण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार केले, तर या रोगावर लवकरात लवकर विजय मिळेल. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, राज्य आणि केंद्र परस्पर सहकार्याने काही करू शकत असतील, तर त्यांचं खच्चीकरण करण्याचे काम कोणी करू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: