गुरुवार, २० मे, २०२१

लॅन्सेटचे लांछन


भारताने कोरोनाविरुद्ध लढण्याच्या रणनीतीत बदल न केल्यास येत्या १ आॅगस्टपर्यंत देशातील १० लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, असा गंभीर इशारा लॅन्सेट या आरोग्य नियतकालिकाने नुकताच दिला आहे. भारताने सुरुवातीच्या काळात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते; मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत केंद्र सरकारने नेमलेल्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठकच झाली नाही. त्यामुळे आता देशात १० लाख मृत्यू झाल्यास त्या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकार जबाबदार असेल, असे लॅन्सेटच्या लेखात म्हटले आहे. त्यामुळे लॅन्सेटच्या या गंभीर इशाºयाचे लांछन मोदी सरकारवर आहे. याबाबत मोदी सरकार नेमके काय करणार आहे? आॅगस्ट महिना लांब नाही आणि उपाय करायला पुरेसा अवधी नाही अशीही परिस्थिती नाही; पण देशाला वाचवण्यासाठी, कोरोनावर मात करण्यासाठी आता थाळ्या वाजवून, मेणबत्त्या पेटवून काही होणार नाही, तर जनतेमध्ये जागरूकतेची आग आणि सरकारमध्ये ऊर्जा पेटण्याची गरज आहे. नाहीतर इंदिरा गांधींना जसा आणीबाणीचा कलंक आहे, तसेच हे लॅन्सेटचे लांछन आयुष्यभर नावाला चिकटून राहील याची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली पाहिजे.


आतापर्यंत देशात १ कोटी ८३ लाख १७ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी २२ लाख ९६ हजार ४१४ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ४२ हजार ३६२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत, तर ३७ लाख ३६ हजार ६४८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. जगातील अन्य देशांची लोकसंख्या आणि रुग्णसंख्या याचा विचार करता भारतातील हे प्रमाण खूपच कमी आहे; पण भारतातील लोकसंख्या हे आपले बलस्थानपण आहे कमजोरीही आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करणे सोपे नाही. तेवढी उपलब्धता होत नसल्यामुळे आज केंद्र सरकार कात्रीत सापडले आहे ही कमजोरी आहे; पण दुसरीकडे मोठी लोकसंख्या असल्यामुळे जगाची बाजारपेठ आहे, सर्व प्रगत देशांना त्यांची उत्पादने खपवण्यासाठी भारत ही बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ सुरक्षित राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असणार आहे. परकीय राष्ट्रांनी लॅन्सेटसारख्या नियतकालिकातून चिंता व्यक्त केलेली आहे हे तसे पुतनामावशीचे प्रेम असले, तरी त्यातील दाखवलेल्या उणिवांकडे डोळेझाक करता येणार नाही. शत्रूने जरी डोळ्यात अंजन घातले आणि त्याने डोळे साफ होत असतील, तर त्याचे स्वागत केले पाहिजे. म्हणूनच मोदी सरकारने आता खंबीरपणे उपाययोजना केल्या पाहिजेत.

लॅन्सेटने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलेल्या उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या २४ तासांत उत्तराखंडमध्ये कोरोनाचे ८,३९० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे. जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम , राहुल गांधी हे आक्रमक झाले असून, थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. अशा कागदपत्रांच्या आधारे विरोधक आपली बाजू लावून धरणार हे ओघाने आलेच. पी. चिदंबरम यांनी दोन ट्विट करून केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. लॅन्सेटच्या लेखानंतर थोडी जरी लाज बाकी असेल, तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी, तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी त्वरीत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे; पण ही वेळ उणीदुणी काढण्याची नाही हे चिदंबरम यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्याकडे काही उपाययोजना असतील, तर त्या त्यांनी सांगाव्यात. हे लागलेले लांछन, हा कलंक धुण्यासाठी देशात सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भारत ही जगाची बाजारपेठ असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीच्या मदतीचा ओघ मिळवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट दाखवणे आवश्यक आहे.


मोदी सरकारची लोकप्रियता गेल्या तीन महिन्यांत ओहोटीला लागली आहे. जो तो मोदी सरकारवर टीका करतो आहे. यामागचे कारणही मोदी सरकारने समजून घेतले पाहिजे. पक्षातीलच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे वारंवार घरचा आहेर देत आहेत. या नियोजनात कुठेतरी नितीन गडकरींना सामावून घ्यावे, त्यांच्याकडे याची जबाबदारी द्यावी असा सल्ला स्वामी वारंवार देत आहेत. त्याचा कुठेतरी मोदी सरकारने विचार केला पाहिजे.

आज देशातील आॅक्सीजनची कमतरता, लसीकरणाचा होत असलेला गोंधळ, रेमडेसिवीरचा काळाबाजार, बेडची संख्या पुरेशी नसणे, यामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. या गोंधळाला कळत-नकळत केंद्राचे नियोजन कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. एखाद्या चांगल्या गोष्टीचे यश, श्रेय हवे असेल, तर हे अपयश नाकारून चालणार नाही. संपूर्ण देशात अस्वस्थतेचे, अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. हे बदलण्याचे आव्हान सरकारने घेतले पाहिजे. लॅन्सेटच्या निमित्ताने विरोधक आक्रमक होतील. लॅन्सेटचे हत्यार म्हणून वापरले जाईल; पण त्या हत्याराला तोंड देण्यासाठी टीका हे हत्यार मोदींनी उपसू नये. तर ठोस कार्यक्रम आणि कृती हे त्यासाठी उत्तर असेल. तरच हे लांछन दूर होईल.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: