गुरुवार, २० मे, २०२१

पुलंची ती फुलराणी


१९७0 च्या दशकात पु. ल. देशपांडे यांच्या ती फुलराणीने रसिकांच्या मनावर भुरळ घातली. ती भुरळ अजूनही उतरू शकली नाही. अनेक कलावंतांना सादर करताना आव्हान वाटेल आणि आनंद मिळेल असे हे नाटक गेल्या पन्नास वर्षांत अनेक संचात आले असले, तरी फुलराणी म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती म्हणजे फक्त आणि फक्त भक्ती बर्वे. पुलंची लेखणी, भक्ती बर्वेचा अभिनय यात ती फुलराणी की ती पुल राणी असा प्रश्न पडतो. पु. ल. देशपांडे यांची बहुतेक सर्व नाटके ही पाश्चिमात्य किंवा परकीय कल्पनांवर आलेली आहेत, पण तिला अस्सल मराठीपण कसे द्यायचे याचे कसब खास पुलंचे. म्हणूनच फुलराणी ही अजरामर झाली. ते नाटक पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो.


ती फुलराणी हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मंजुळेची भूमिका करीत होती. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी मंजुळाची भूमिका केली. या चौघींनीही लेखक पु. ल. देशपांडे यांच्या मनातली मंजुळा रंगमंचावर साकारली. भाषाशास्त्र आणि भाव हे या नाटकाचे गमक आहे.

सुनीताबाई देशपांडे यांनी पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगाचे हक्क कलाकारांसाठी खुले केले असल्यामुळे ती फुलराणी या नाटकाला कॉपीराइट कायदा लागू होत नाही. असे असले तरी पुलंनी लिहून ठेवल्याप्रमाणे नाटकातला संवाद हा कवितेच्या ओळीसारखा असावा लागतो. चांगल्या कवितेच्या ओळीतले शब्द जसे बदलता येत नाहीत, तसे चांगल्या संवादातले. त्यामुळे जसेच्या तसे शब्द घेत हे नाटक केले तरच ते यशस्वी होते. मनाचे शब्द घालणारांना हे नाटक कधीच जमणार नाही. त्यामुळेच ते नाटक पुलंचे राहिले आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी हेमांगी कवी मंजुळेची भूमिका करत आहे, पण जे गारुड भक्ती बर्वेचे आहे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाषने ज्या प्रकारे भूमिका केलेली आहे ती मजा हेमांगी कवी कधीच देऊ शकली नाही. याचे कारण हेमांगी कवी ही उत्तम अभिनेत्री जरी असली, तरी तिचा अभ्यास या नाटकाबाबत कमी पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या नाटकाचा म्हणजे हेमांगी कवी करीत असलेल्या फुलराणीचा दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि हेमांगी कवी हिची मंजुळेची भूमिका असलेल्या नाटकाच्या बदल केलेल्या संहितेमुळे नाट्यरसिकांचा विरस झाला आहे. ती फुलराणी नाटकाचा नवा प्रयोग संहितेपेक्षा वेगळाच होत असल्याची बाब ध्यानात आल्यामुळे नाट्यरसिकांमध्ये नाराजीची भावना आहे. पुलंचे मानसपुत्र आणि जागतिक कीर्तीचे गणितज्ञ दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी आपल्या भारतभेटीत हे नाटक पाहिले. त्यांनी या प्रयोगावर आक्षेपच घेतला होता. लेखकाचा लिहिण्याचा उद्देश सोडून केलेले ते एक विडंबन ठरले. हा एका उत्तम कलाकृतीचा अपमान होता, पण तरीही मराठी रंगभूमीच्या इतिहासात ती फुलराणी हे नाटक अजरामर असणार आहे. त्यावर कायम छाप ही भक्ती बर्वेचीच असणार आहे.

काहीतरी वेगळं करण्याच्या नादात कधी कधी दिग्दर्शक भरकटत जातो. तो प्रकार हेमांगी कवीच्या बाबतीत झाला. मुळात हेमांगी कवी ही कायम प्रेक्षकांच्या समोर विनोदी भूमिकेत आलेली आहे. त्यात तिची देहयष्टी आणि मुद्रा हा प्रकार विनोदाच्या अंगाने जाणारा आहे. परिणामी या एका वेगळ्या नाटकाला फार्सिकल स्वरूप देण्याचा प्रकार झाला. हा या नाटकावरचा अत्याचारच होता असे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे हा प्रकार कोणालाच आवडला नव्हता. या नाटकाच्या सादरीकरणातील बदलांबाबत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, साहित्यिक रत्‍नाकर मतकरी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.


प्रत्येक ठिकाणी विनोद असलाच पाहिजे असे नाही. पु. ल. देशपांडे हे विनोदी लेखक असले तरी फुलराणी हे नाटक काही व्यंगात्मक नाटक नाही, पण पुलं विनोदी म्हणून नाटकाचा फार्स झाला पाहिजे, लोक हसले पाहिजेत या अट्टाहासात हेमांगी कवीने जो प्रकार केला त्यामुळे भक्ती बर्वे यांची आठवण प्रेक्षकांना प्रकर्षाने झाली. फार्सिकल करण्याच्या नादामध्ये ती फुलराणी नाटकाचा तोल हेमांगी कवीकडून बिघडवला गेला हे प्रेक्षकांना कधीच रुचणारे नाही. त्यांनी सादर केलेले नाटक मूळ संहितेनुसार होत नसल्याचे जाणवले. हेमांगी कवी हिने काम चांगले केले, पण ती फुलराणी कधीच वाटली नाही. ती फुलराणी हे नाटक शब्दांवरचे आहे, पण पुलंचे शब्द काढून काही ठिकाणी वेगळेच संवाद घुसडण्याचा प्रकार केला आणि तो प्रयोग फसला. गरज नसलेले संवाद आल्यामुळे ज्यांना शब्दांचे महत्त्व समजते त्यांचा विरस होतो.

जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करताना त्याचा आत्मा काढायचा नसतो हे समजले नाही, तर त्या नाटकाचे हासे होते हे या फुलराणीने दाखवून दिले. त्यामुळे फुलराणी म्हटल्यावर फक्त लक्षात राहते ती भक्ती बर्वेच. तिचा रंगमंचावरचा वावर, तिची चपळाई, ते तुला शिकवीन चांगलाच धडा हे लांबलचक स्वगत पाहताना प्रेक्षक अत्यंत स्वर्गसुख घेत असत. त्यात तो घोडा येईल, त्या घोड्याचा तोंडाने काढलेला आवाज लाजबाब.


काही नाटकांवर अभिनेत्यांनी आपले नाव अजरामर असे कोरलेले असते, त्या यादीत हे नाटक भक्ती बर्वेच्या नावावर जाते. नटसम्राट म्हटले की डॉक्टर श्रीराम लागू, तो मी नव्हेच म्हटल्यावर प्रभाकर पणशीकरच, अश्रूंची झाली फुले म्हटल्यावर काशिनाथ घाणेकरच, त्याप्रमाणे ती फुलराणी म्हटल्यावर फक्त आणि फक्त भक्ती बर्वे हिचेच नाव शिल्लक राहते. तिच्यासारखे हे नाटक पुलंच्या संहितेला प्रामाणिक राहून करता आले नाही तर शिडी लावून उंटाचा मुका घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये हे या नाटकाच्या हेमांगी कवीच्या फसलेल्या प्रयोगावरून लक्षात येते. हे नाटक भक्तीभावाने केले तरच यशस्वी होऊ शकते हेच याचे वैशिष्ट्य आहे.

प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: