गुरुवार, ६ मे, २०२१

महाविकास आघाडीचे भगीरथ प्रयत्न, तरी भाजपचे समाधान


पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दणदणीत पराभव केला आहे. हा पराभव म्हणजे महाविकास आघाडीला मतदारांनी दिलेली चांगलीच चपराक आहे. महाविकास आघाडीने एकत्रितपणे येऊन भाजप विरोधात ही निवडणूक लढवली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा राखता आलेली नाही. यावरून मतदारांची महाविकास आघाडीवर नाराजी आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे. खरं तर कोणत्याही नेत्याच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या नेत्याच्या घरातीलच उमेदवार जेव्हा निवडणूक लढवतो, तेव्हा तो सहज विजयी होतो. एखाद दुसरा पिंपरी-चिंचवड आणि पालघरचा अपवाद वगळला, तर बहुतेक ठिकाणी निकाल तो पक्ष आपल्याकडे राखतो. त्यातून भारत भालके यांची प्रतिमा चांगली होती. जनमानसात त्यांचा आदर केला जात होता. त्यामुळे त्यांच्या वारसाला ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यावर विजय होणे अवघड नव्हते. असे असतानाही मतदारांनी नाकारले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. २०१६ला राष्ट्रवादीचे सभ्य नेते आर. आर. पाटील आबा यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई यांना मतदारांनी सहज निवडून दिले होते. आर. आर. आबांचा मान राखत भाजपने तिथे उमेदवारही दिलेला नव्हता; पण हे या निवडणुकीत झाले नाही. सत्ताधारी आघाडीतील पक्षाला आपली जागा राखणे शक्य झाले नाही हे त्या पक्षाच्या दृष्टीने अपयश म्हणावे लागेल.

२०१९च्या निवडणुका या मतदारसंघात आघाडी विरुद्ध युती अशी झाली होती; पण पोटनिवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली आहे, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची मते त्यात आता मागच्या निवडणुकीत नसलेली शिवसेनेची मतेही जमा झाली होती, तरीही भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे हे तिथून विजयी होतात हा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासाठी फार मोठा धक्का आहे. यात काँग्रेस कुठे नाही; पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सगळं मंत्रिमंडळ आणि बडे नेते इथे प्रचाराला होते. भाजपच्या फडणवीस यांच्यावर अगदी तुटून पडून टीका केली जात होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रचारात उमेदवार समाधान आवताडे आहेत याचाही विसर पडला होता. जणू काही ही निवडणूक फडणवीसांच्या विरोधात आहे, अशा आवेशात राष्ट्रवादीने भाषणबाजी केली. शिवसेनेनेही त्याची री ओढली; पण विजय शेवटी भाजपचाच झाला. महाविकास आघाडीने भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कंबर कसून अगदी भगीरथ प्रयत्न केले, तरी विजयाचे समाधान हे भाजपच्या वाट्याला आले.


या निकालानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी लक्ष्मीकृपा झाली, पैशांचे वाटप केले, असे आरोप केले; पण राष्ट्रवादीचे नेतेही इतके सोवळे होते का याचे उत्तर त्यांनीच दिले पाहिजे. गेल्या सव्वा वर्षातील सरकारची कामगिरी आणि जनतेची नाराजी या निकालातून पुढे आलेली आहे. अनेक लोकांचा लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेला, त्यावेळी राज्य सरकारने सर्वसामान्यांची केलेली मुस्कटदाबी, केंद्र सरकारवर केलेली गलीच्छ टीका याचे फळ महाविकास आघाडी सरकारला मिळाले आहे, असे म्हणावे लागेल; पण या निकालाने कामापेक्षा बडबड करणाºया महाविकास आघाडी सरकारला दणका दिलेला आहे, हे नक्की.

आज पश्चिम महाराष्ट्रातला, सोलापूर पंढरपूर भागातला मोठा वर्ग नोकरीधंदा, कामासाठी, रोजगारासाठी मुंबईत आहे. या कामगारवर्गाची महाविकास आघाडी सरकारकडून छळवणूक झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नाही. केंद्राकडून आलेली मदत पोहोचू दिली नाही. धान्य सडवून टाकले; पण सामान्यांपर्यंत पोहोचले नाही. याचा राग कुठेतरी मतदारांनी या निवडणुकीतून काढलेला दिसतो आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन, लसीकरणाचे राजकारण, रेमडेसिवीरचे राजकारण, आॅक्सीजनचे राजकारण, रुग्णांचे केले जाणारे हाल यामुळे या महाविकास आघाडीवर जनतेची प्रचंड नाराजी आहे. खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक करण्याचे प्रकार चालवले आहेत. केंद्र आम्हाला देत नाही, केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नाही, केंद्राकडून आॅक्सीजन मिळत नाही, असा खोटा कांगावा करायचा. दुसरीकडे महाराष्ट्र लसीकरणात देशात नंबर वन म्हणायचे. केंद्राने जर मुबलक पुरवठा केला नसता, तर लसीकरणात नंबर वन राहिले असते का? अशा दुतोंडी प्रचाराला नागरिक वैतागले आहेत. महाविकास आघाडीकडून जनतेची फसवणूक होत आहे. पोलिसांच्या ताकदीचा दुरुपयोग केला जात आहे. वाझे प्रकरणातून गृह मंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्री संशयास्पद काम करताना दिसतात. हे सतत जनतेच्या समोर आल्याने जनता या सरकारला कंटाळली आहे. गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारच्या काळात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत; पण एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यावर भाजपने लगेच त्यांचा राजीनामा घेतला. त्याच खडसेंना राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतले. साहजीकच सरकारचा चेहरा समोर आला. जनता संकटात असताना जनतेला मदतीऐवजी राजकारण करण्याचे काम केले गेले. ही सगळी नाराजी या निकालातून दिसून आली. वाझे हा गुन्ह्यात अडकलेला दिसत असतानाही मुख्यमंत्र्यांनी वाझे म्हणजे काही लादेन नाही, असे म्हणून केलेली पाठराखण आणि वाझेचा खरा चेहरा समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी गप्प बसणे. हे सगळे जनता, मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. असे असताना महाविकास आघाडीने कितीही भगीरथ प्रयत्न केले, तरी तुमचा हिशोब आम्ही निवडणुकीत करू, असा इशारा मतदारांनी दिलेला आहे. हाच प्रकार आगामी महापालिका निवडणुकीत पहायला मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको.

2 may

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: