शुक्रवार, २८ मे, २०२१

ग्रामीण चित्रपटात गुरफटलेली गुणी अभिनेत्री उषा नाईक


उषा नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गुणी अभिनेत्री. १९७० च्या दशकातील उत्तरार्धात तिचा उदय झाला आणि सलग पंधरा वर्ष तिने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, मात्र १९९० च्या दशकानंतर ती ग्रामीण लो बजेट चित्रपटात अडकली, मिळेल ती भूमिका करत राहिली, पण प्रचंड ताकदीची असलेली गुणी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पहावे लागेल. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भूमिका करण्याची ताकद असलेली ही अभिनेत्री गुरफटली मात्र ग्रामीण चित्रपटातच. याचे कारण चांगली नृत्यांगना असल्यामुळे आणि तमाशाप्रधान चित्रपटाची गरज यांमुळे तिच्यावर तो छाप पडला, पण जबरदस्त ताकद असलेली आणि अभिनयासाठी काहीही करणारी अशी ती अभिनेत्री आहे.


१९७० च्या दशकात व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ चित्रपट आला होता. या चित्रपटात संध्याच्या बरोबरीने नाचणाºया ज्या सहनर्तिका होत्या त्यात उषा नाईक आपल्याला दिसते, पण त्यानंतर हाच चेहरा मराठी चित्रपटसृष्टीचा एक मोठा भाग बनून जाते. तिच्यासाठी आणि तत्कालीन ताकदीच्या अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून तिचे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट येतात आणि ती एक यशस्वी अभिनेत्री बनते. अशोक सराफ, रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, किशोर जाधव, अविनाश खर्शिकर यांच्यापासून ते अगदी दादा कोंडके यांच्या चित्रपटापर्यंत तिचा असलेला प्रवास हा अत्यंत मोलाचा आहे, पण तिने दिलेले काही चित्रपट हे जबरदस्त असे चित्रपट आहेत.

१९७० च्या दशकात जयश्री गडकर यांनी तमाशाप्रधान चित्रपट करणे थांबवले, उषा चव्हाण दादा कोंडकेंच्या चित्रपटात अडकून पडली. रंजना आणि आशा काळे या काही फडावर नाचणाºया अभिनेत्री नव्हत्या. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील फड गाजवला तो या काळात उषा नाईक हिनेच. त्यामुळेच ‘सुंदरा सातारकर’ हा निव्वळ तमाशाप्रधान चित्रपट केवळ उषा नाईकला समोर ठेवून बनवण्यात आला होता. तरीही बिगर तमाशाप्रधान अशा तिच्या काही भूमिका या अत्यंत गाजलेल्या अशा आहेत.


‘हळदीकुंक’, ‘राखणदार’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘सुशिला’, ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘चांदणे शिंपित जा’ हे तिचे चित्रपट वेगळ्या भूमिकांचे आहेत, तर दादा कोंडकेंबरोबरचा ‘येऊ का घरात’ हा चित्रपट आपण उषा चव्हाणला योग्य पर्याय आहोत हे तिने दाखवून देणारा ठरला होता.

‘राखणदार’ चित्रपटात तर तिची भूमिका फार आव्हानान्मक अशी होती. ही भूमिका करण्याचे धाडस त्या काळात कोणीच करणे शक्य नव्हते, पण भूमिकेची गरज म्हणून तिने केलेले शरीरप्रदर्शन कधीही गैर वाटले नाही. चित्रपटाला ए सर्टिफिकेट होते, पण त्यात कोणतीही अश्लिलता नव्हती की बीभत्सता नव्हती. रवींद्र महाजनी हा या चित्रपटाचा नायक असतो. लहानपणी बहिणीबरोबर खेळत असताना काही गुंड त्याच्या बहिणीवर बलात्कार करतात. हे लहान वयात पाहिल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. लग्नानंतर पत्नी उषा नाईकसमोर आल्यावर तिचे रूप बघितल्यावर त्याला ते आठवते आणि त्याच्या मानसिकतेत बदल होतो. हा अत्यंत नाजूक सीन देताना उषा नाईक आणि रवींद्र महाजनी यांनी जीव ओतला होता. स्त्रीदेहाचे दर्शन दिसल्यावर त्याला तो बलात्कार आठवून अटॅक येत असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री तिचे एकेक कपडे उतरवत त्याला तो अटॅक येतो हा सीन अत्यंत अवघड होता. तो करण्याचे आव्हान उषा नाईकने पेलले होते, पण यात कुठेही अश्लिलता नव्हती हे दिग्दर्शक आणि समर्थ अभिनयाचे दर्शन होते. बिगर तमाशाप्रधान अशी एक चांगली भूमिका तिच्या वाट्याला आलेली होती. तिने ती चोख केली होती. या मानसिक रोगातून बरे करण्यासाठी ती आणि निळू फुले एक फार मोठी जबाबदारी घेतात आणि कोण कुणाचा राखणदार असतो हे या चित्रपटाचे रहस्यमय कथानक होते. ते उषा नाईकने पेलले होते.


अशोक सराफबरोबर ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ हा एक चांगला गाजलेला चित्रपट उषा नाईकने केलेला होता. उषा नाईक ही अशोक सराफची पहिली बायको असते. कामिनी भाटिया तमासगीर असते. तिच्या नादाला अशोक सराफ लागतो आणि लग्न करून तिला घरी घेऊन येतो. मग एका नवºयावरून दोघींची भांडणे, नवºयाची वाटणी कशी करायची यावरून होणारी जुगलबंदी म्हणजे विनोदाची पेरणी होती. यात उषा नाईकने चांगले काम केले होते आणि आपले अभिनय सामर्थ्य दाखवून दिले होते.

‘सुशिला’ चित्रपटात अविनाश मसुरेकरच्या घरंदाज बायकोची भूमिका उषा नाईकने केलेली होती. अर्थात यातील ग्रामीण संवाद हे कोल्हापुरी ढंगाचे असल्याने ग्रामीण चित्रपटातील नायिका हाच तिच्यावर ठपका होता, पण तो पुसून टाकायची तिला संधी मिळाली ती ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटातून. पुण्यात आणीबाणीच्या काळात घडलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यावर आधारित हा चित्रपट होता. यात नाना पाटेकर, किशोर जाधव, बिपिन वर्टी, अविनाश खर्शिकर, मोहन गोखले हे दिग्गज कलाकार होते. यात मोहन गोखलेच्या प्रेयसीची भूमिका तिने केलेली होती. अस्सल पुणेरी मुलगी साकारून तिने आपल्या स्वच्छ भाषेतील संवादाचे दर्शन या चित्रपटातून दिले होते. आपण एक हरहुन्नरी आणि कोणत्याच पठडीत अडकलेली अभिनेत्री नाही हे तिने इथे दाखवून दिले होते.


‘भुजंग’ चित्रपटात रंजनाच्या मुलीची भूमिका तिने केली होती. चित्रपट रंजना आणि निळू फुले यांनी खाऊन टाकला असला, तरी यात प्रेमात फसलेल्या मुलीची उषा नाईकने लक्षवेधी भूमिका केलेली होती.

‘आई’ हा तमाशाप्रधान चित्रपट खास उषा नाईकसाठी बनवला होता. कॉलेजला जाणारी पण नाइलाजाने तमाशाच्या फडावर जावे लागलेल्या एका आईची मध्यवर्ती भूमिका तिने साकारली होती. आपण तमासगिरीण राहून आपल्या मुलावर सावलीही न पडू देता त्याला शिकून मोठी करणारी आई आणि त्याच्या भवितव्यासाठी अखंड तमाशाचा फड चालवणारी तमासगिरीण अत्यंत समर्थपणे उषा नाईकने साकारली होती. कुलदीप पवार, निळू फुले हे दिग्गज कलाकार यात होते, पण चित्रपटावर वर्चस्व होते ते उषा नाईक या समर्थ अभिनेत्रीचे.


पण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांचे युग सुरू झाले आणि ग्रामीण, तमाशाप्रधान चित्रपटात गुरफटलेल्या उषा नाईकला त्यात कुठे स्थान नव्हते. कुठे तमाशा असलाच, तर ती जागा प्रिया बेर्डे वगैरे अभिनेत्री मारून न्यायच्या. त्यामुळे सातारा, अहमदनगर, कोल्हापुरात अन्य निर्माते, पितांबर काळेंसारखे निर्माते-दिग्दर्शन काही चित्रपट सातत्याने बनवत असत. त्या लो बजेट चित्रपटात कामे करण्याशिवाय उषा नाईकसमोर पर्याय नव्हता. अशा चित्रपटातून छोट्या-मोठ्या भूमिका करत उषा नाईकने आपले नाव गाजवले, पण ती ग्रामीण चित्रपटात गुरफटत गेली, पण ती एक ताकदीची अभिनेत्री आहे यात शंकाच नाही. आजही अधूनमधून एखाद्या मालिकेतून छोट्या-मोठ्या भूमिकेतून तिचे दर्शन होते, पण मराठी चित्रपटसृष्टीत आपला एक ठसा उमटवलेली ती अभिनेत्री आहे.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


9152448055

28 may

दिखाऊपणा


कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेकजण देशोधडीला लागले आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. लाखो लोकांची उपासमार होत आहे, पण या दुर्दैवाच्या फेºयांचाही बाजार मांडला गेला आहे. याचे कारण अशा काळात मदतीसाठी धावून जाणारे अनेक आहेत, पण ज्यांना खºया अर्थाने मदत करायची इच्छा आहे ते लोक आपल्याला प्रसिद्धी मिळेल म्हणून मदत करत नाहीत. असे असंख्य अज्ञात हात आहेत की जे छुपी मदत करत आहेत. या मदतीचा कुठेही गवगवा करत नाहीत. ते मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करत आहेत. कुणाचा औषधपाण्याचा खर्च उचलत आहेत. कुणाला कपडालत्ता पुरवत आहेत. कुणाचा शिक्षणाचा खर्च उचलत आहेत. कुणाला धान्य, जीवनावश्यक वस्तू देत आहेत. असे असंख्य लोक समाजात प्रसिद्धीपराड़मुख आहेत. हे खरे दानी आहेत.


पण काही प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक कणभर करतात आणि मणभर त्याची प्रसिद्धी करतात. कुठेतरी पाच रुपयांचे बिस्कीटचे पुडे घ्यायचे आणि रस्त्यावर वाटायचे. त्याचे फोटो काढायचे आणि आपली दानशूरता सोशल मीडियावर दाखवायची आणि लाईक मिळवायच्या. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर या समाजमाध्यमांचा वापर अशा गोष्टींसाठी होताना दिसतो आहे. हे अत्यंत हास्यास्पद आहे.

एक कुठलीशी फुटकळ अभिनेत्री चार दिवसांपूर्वी रस्त्यावरील गरीबांना असेच पाच रुपये किमतीचे बिस्कीट पुडे देत होती. कुणाला कपडे देत होती. त्याचे फोटोसेशन करून ते फोटो समाजमाध्यमांवर टाकत होती. अत्यंत किळसवाणे असे हे दृश्य होते. स्वत: अर्ध्या कपड्यात, मांडीपर्यंत घातलेली चड्डी आणि जेमतेम शरीराचा कसाबसा झाकला जाईल असा टी-शर्ट घालून गरीबांना कपडे वाटत असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकत होती. त्या बार्इंना सांगायची वेळ आली आहे की, तुझं ते कमी कपड्यातलं दारिद्र्य अगोदर झाक आणि मग लोकांना मदत करायला जा. तू लोकांना मदत करते आहेस याचा बाजार मांडला आहेस का?


खरं तर प्रत्येक देशात गरीब असतात. अडीअडचणीला त्यांना मदत केली जाते, पण आपल्याकडे जसा त्याचा बाजार मांडला जातो तसा कुठे मांडला जात नाही. केलेल्या मदतीची कुठेही वाच्यता झाली नाही पाहिजे. कर्ण हा कसाही असला तरी त्याला दानशूर म्हटले जाते याचे कारण त्याने आपल्या दानधर्माची कुठे वाच्यता केलेली नव्हती. या त्याच्या एका गुणामुळे त्याचे सगळे दुर्गुण झाकले गेले होते, पण आपले सगळे दुर्गुण झाकण्यासाठी आजकाल दानशूरपणाचा आव आणला जातो हे फार मोठे विडंबन म्हणावे लागेल. असल्या दिखाऊपणाला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे.

विविध पक्षांचे, विविध संघटनांचे अनेक नेते, पुढारी, संघटक असतात. त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी हवी असते, पण कौतुक हे लोकांनी करायचे असते. आमचे कौतुक करा, आमच्या कार्याला प्रसिद्धी द्या, त्याचा गवगवा करा, असे जेव्हा वाटते तेव्हा त्यांना राजकारणात प्रवेश करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ता आहे, महापालिका, नगरपालिका असे कुठले तरी निवडणुकीचे तिकीट हवे आहे असा संशय येतो. त्यामुळे जे खºया अर्थाने निरपेक्ष विचाराने दान करत आहेत, मदत करत आहेत ते खरे लोक आहेत. बाकीचे सगळे भोंदू आहेत. मदतीचा बाजार मांडणारे संधीसाधू आहेत असेच म्हणावे लागेल. अशा लोकांसाठी एखादे संकट, मदतीची मिळणारी संधी ही पर्वणी असते. त्या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी हे लोक रस्त्यावर आलेले आहेत असेच दिसून येते. अशा दिखाऊ लोकांपासून सामान्यांनी सावध राहिले पाहिजे. कारे भुललासी वरलीया रंगा, ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा हे लक्षात घेतले पाहिजे. अशा लोकांनी केलेली मदत ही खरी मदत नसते. त्यामागे काही स्वार्थी भाव असतो.


अनेकांना दानधर्म करायचा असतो तो पुण्यसंचयासाठी करायचा असतो. आपल्या नावावर एखादा बँक बॅलन्स असावा तसा पुण्याचा बॅलन्स असावा असे वाटते, पण पुण्याचा संचय करावासा वाटणे म्हणजे आपल्या पापाचा बॅलन्स करण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. पापी लोकांना आपली प्रतिमा सुधारण्यासाठी अशा कर्माची गरज भासत असावी असे वाटते. हा दिखाऊपणा चांगला नाही.

अमुक एका व्यक्तीने पंतप्रधान निधीसाठी तमुक इतके रुपये दिले, त्याचा फोटो काढून वर्तमानपत्रांतून बातमी लावण्यासाठी हिंडायचे. तमुक एकाने मुख्यमंत्री निधीसाठी तमुक इतके रुपये दिले. त्याची प्रसिद्धी कशासाठी हवी आहे? या देशातील अनेक कार्यालयांतील कर्मचाºयांनी आपले कुणी एक दिवसाचे, कुणी पंधरा दिवसांचे वेतन असे दिलेले आहे. त्याची कुठे प्रसिद्धी केली जात नाही. त्या प्रसिद्धीची अपेक्षाही नाही. ते एक आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या नित्यकर्माची कधी प्रसिद्धी करतो का? पाऊस आला की छत्री उघडणार, ऊन लागले तर डोक्यावर टोपी घालणार, थंडी पडली की अंगात स्वेटर घालणार. हे जसे नैसर्गिक आहे, तसेच कोणतेही संकट आल्यावर आपण मदतीला धावून जाणे हे नैसर्गिकच आहे. त्यासाठी दिखाऊपणाची गरज नाही. नैसर्गिक संकट, महामारी आल्यावर मदतीसाठी जाणे हे माणसांचे कर्तव्य आहे. त्याचा डांगोरा पिटायचा नसतो. त्याचा दिखाऊपणा करायचा नसतो. म्हणूनच हे पाच-दोन रुपयांचे बिस्कीटचे पुडे वाटून दानशूर बनणारे खरे दानशूर नाहीत, तर आपण केलेली मदत आणि त्याची वाच्यता न करणारे खरे दानशूर आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्षच


गेले चार महिने महागाई सतत वाढत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. कोरोनाच्या नावाखाली तोंडावर बुरखा घेतला आहे आणि बाकीचे सगळे ताप दुर्लक्षिले जात आहेत. कोरोनाशिवाय या जगात कोणताही विषय नाही. पूर्वी प्रसारमाध्यमे, विरोधी पक्ष महागाईविरोधात दंड थोपटून रस्त्यावर येत असत, पण आजकाल कोणीही महागाईबाबत बोलताना दिसत नाही. अन्नधान्य, भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्या आहेतच, पण औषधांच्या किमती गेल्या वर्षभरात चौपट झाल्या आहेत. त्यामुळे औषधांच्या किमती नियंत्रित करणारा सरकारचा एखादा कायदा असला पाहिजे असे वाटू लागले आहे. सरकारचे एकूणच महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्षच असल्याचे दिसत आहे.


आपल्या महागाईच्या निर्देशांकात भाजीपाला वर्गाचा महागाई वाढीचा दर उणे असल्याचा सरकारचा दावा आहे. हा कसा काढला ते अनाकलनीय आहे. कारण भाजीपाला स्वस्त किंवा अपेक्षेपेक्षा कमी दरात मिळाल्याचे गेल्या वर्षभरात तरी ऐकीवात नाही. तो कदाचित मोठ्या बाजारपेठांमधील दरांच्या आधारे केला असावा. म्हणजे शेतकºयांकडून उणे दराने घेतला आणि ग्राहकांना या दलालांनी चौपट दराने विकला, असा प्रकार झाला असेल. प्रत्यक्षात भाजीपालादेखील महागल्याचे गेल्या काही महिन्यांत सातत्याने अनुभवास येत आहे. खाद्यपदार्थ या वर्गाचा महागाई वाढण्याचा दर एप्रिलमध्ये ४.९२ टक्के झाला. हा सहा महिन्यांमधील उच्चांक आहे. मार्चमध्ये तो ३.२४ टक्के होता. एका महिन्यात जवळपास २ टक्के वाढ झाली. फळे २७.४३ टक्क्यांनी, तर डाळी १0.७४ टक्क्यांनी महागली आहेत. ही महागाई जास्त आहे असे बहुधा सरकारला वाटत नसावे. खनिज तेल व त्याची उत्पादने, तयार उत्पादने यांचे दर वाढल्याने महागाईचा दर वाढला, असे पत्रकात म्हटले आहे, पण सरकार किंवा विरोधक यांना फक्त एकमेकांवर टीका करण्यात वेळ आहे. जनतेसाठी महागाईविरोधात रस्त्यावर येण्याची कोणाची तयारी नाही. रस्त्यावर स्वत:च्या हक्कासाठी, कसल्या फालतू आंदोलनासाठी उतरतील, पण सामान्य जनतेला भेडसावणाºया महागाईविरोधात कोणी रस्त्यावर येताना दिसत नाही. त्यामुळेच या पक्षांची विश्वासार्हता संपुष्टात आलेली आहे.

सध्या देशास सरासरी ६३.४0 डॉलर प्रतिपिंप दराने खनिज तेल मिळते. त्यावर केंद्र सरकार उत्पादन शुल्क लादते. राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांचे करही असतातच. यामुळे देशाच्या अनेक भागांत पेट्रोलचे दर लिटरमागे १00 रुपये झाले आहेत. डिझेल फार मागे नाही. यामुळे इंधन व ऊर्जा गटाच्या महागाई वाढीचा दर २0.९४ टक्के झाला यात नवल ते काय? यामुळे वाहतूक महागली व भाज्यांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. वाहने व त्यांचे सुटे भाग यांमुळे तयार वस्तूंचा महागाई वाढीचा दर ९.0१ टक्के झाला आहे. कोरोनाच्या साथीच्या दुस‍ºया लाटेत टाळेबंदीसारख्या निर्बंधांमुळे मागणी प्रचंड घटल्याचे रिझर्व्ह बँकेने ताज्या अहवालात म्हटले आहे. नागरिक बाहेर कमी पडत आहेत, त्याचबरोबर त्यांचा ऐच्छिक खर्च कमी झाला, असे त्यासाठी कारण देताना रोजगार घटणे हेही एक कारण असल्याचे त्यात म्हटले आहे. लोकांनी आपल्या गरजा कमी केल्या, माणसांची क्रयशक्ती कमी झाली हे विकासाला मारक आहे. त्यामुळे जे मर्यादित विक्रीचे पदार्थ ठेवले आहेत ते चढ्या भावाने विकण्याचे धोरण आहे. एकीकडे माणसांना घरात बसवून अर्थचक्र थांबवायचे, माणसांचा रोजगार काढून घ्यायचा, त्यांची क्रयशक्ती संपुष्टात आणायची आणि दुसरीकडे महागाईचा आगडोंब भडकवायचा. हे सरकारी धोरण सामान्य माणसांना जगणं महाग करण्याचा प्रकार आहे. सरकार या दरवाढीबाबत, महागाईबाबत काहीही कधीही बोलत नाही. आकांडतांडव करणाºया वाहिन्या महागाईबाबत कधीही वृत्त देताना दिसत नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेचे इथे फक्त मरण आहे.


सीएमआयईच्या पाहणीनुसार, १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर १४.४५ टक्के होता. शहरी भागात १४.७१ टक्के बेरोजगार आहेत. ग्रामीण भागात फार चांगली अवस्था नाही. गेले चार महिने बेरोजगारी सतत वाढत आहे. त्याविषयी सरकार काही बोलत नाही. कोणी विचारल्यास ते पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करत आहेत, असा आरोप भाजप करतो. सामान्यांच्या हलाखीपेक्षा त्यांना एका व्यक्तीची प्रतिमा महत्त्वाची वाटते, असा त्याचा अर्थ होतो. देशाच्या दृष्टीने हे भयावह आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यास पौष्टिक अन्न खाण्यास डॉक्टर्स सांगतात, पण सामान्यांकडे त्यासाठी पैसेच नाहीत. अनेकांचे रोजगार गेले आहेत, उत्पन्न घटले आहे, त्यात महागाई वाढत आहे. मृत्यू स्वस्त झाला आहे, जगणे महाग झाले आहे, असा त्याचा अर्थ आहे. महागाई व बेरोजगारी दररोज नवे उच्चांक स्थापन करत आहे. त्याचा विचार सर्व शक्तिमान पंतप्रधान करत नाहीत. भाजपला त्यांच्या प्रतिमेची चिंता आहे. देशाची प्रतिमा जगात कधीच धुळीस मिळाली आहे. त्यामुळे आता राजकारण थांबवून सामान्यांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आता जरा कोरोना आणि राजकारण बाजूला ठेवा आणि सामान्यांसाठी जगण्याचे साधन आणि हातात पैसा येईल यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. महागाई रोखण्याची आणि रोजगार वाढवण्याची गरज आहे.

......

अनलॉक व्हायलाच हवे.

 अनलॉक व्हायलाच हवे!


माणसाला कोणत्याही गोष्टीची पटकन सवय लागते. अगदी आपण कुठे चार दिवस प्रवासाला गेलो तरी तिथली सवय होते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला सहवासाची सवय पटकन होते. अगदी मुंबईच्या गर्दीतही आम्हाला तशी सवय असतेच असते. म्हणजे आपले लोकलमधले सहकारी, आॅफीसचे सहकारी, सहप्रवासी, रस्त्यावर दिसणारे, दुकानात दिसणारे, हॉटेल रेस्टॉरंट बारमध्ये नेहमी दिसणारे लोकही आपले पटकन ओळखीचे होतात. तिथले विक्रेते, वेटर, सर्व्हिस बॉय, पेट्रोल पंपवरचा माणूस हे सगळे आपल्या सवयीचे झालेले असतात. कारण त्यांच्यासोबत आपले आयुष्य अगदी यंत्रवत होऊन गेलेले असते, पण या यंत्राची गती गेल्या वर्ष-दीड वर्षात बदलली होती.


आपल्या आयुष्यात इतके छान दिवस येतील असे वाटले नव्हते, असेही कोणाला वाटले असेल. म्हणजे वर्षानुवर्ष जे लोक आपल्या घरच्यांना वेळ देऊ शकत नव्हते त्यांना या कोरोनाने, लॉकडाऊनने एकत्र आणले. घरात सारखा टीव्ही पाहून कंटाळा आल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने अनेकांचा नसलेला संवाद सुरू झाला. जे बायकोला कायम आॅर्डर सोडत होते तेच लोक स्वयंपाकातही बायकोला मदत करू लागले. आपल्या जोडीदारांचे माहीत नसलेले गुण एकमेकांना कळले, ही तर त्या कोरोनाची कृपाच म्हणावी लागेल. तर काही ठिकाणी एरव्ही भांडायला वेळ मिळायचा नाही, गडबडीत भांडण करायला मिळायचे नाही म्हणून या वेळेचा वापर अनेक नवरा-बायकोंनी मनसोक्त भांडण्यासाठी सत्कर्मी लावल्याचेही दिसून येते. मनसोक्त भांडायचे, यथेच्छ तोंडसुख घेण्याचे काम अनेकांनी या काळात केले. त्यामुळेच जर निर्बंध कमी केले किंवा हा लॉकडाऊन उठला तर अनेकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटेल.

आपल्या जोडीदाराच्या अंगात किती गुण आहेत हे अनेकांना या लॉकडाऊनने दाखवले असेल. म्हणजे आपल्या नव‍ºयाला स्वयंपाकातील काही छान पाककृती येतात याचे आकलन अनेकांना यातून झाले असेल. एकमेकांच्या कलागुणांची कदर करण्याची संधी या लॉकडाऊनने दिलेली आहे. त्यामुळे अनेकजण थँक्स लॉकडाऊन असेही म्हणत असतील, पण गेल्या वर्षी या लॉकडाऊनचा सुखकारक आनंद घेतला असला तरी यावर्षीचा लॉकडाऊन हा वेदनादायी होता हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे आता दरवर्षी गणपती, नवरात्राप्रमाणे ठराविक काळात हा लॉकडाऊन लागणार का, अशी एक सुप्त भीती यात आहे. गेल्या वर्षी आपली पत्नी इतकी छान गाणे म्हणते याचीही जाणीव अनेकांना झालेली असेल, पण यावर्षी त्याच गाण्यांची कलकल झाल्यासारखी वाटत आहे. आपली मुले आपल्या आईवडिलांची काळजी करतात, त्यांना त्यांचे प्रेम हवे असते हेही अनेकांना यातून समजले असेल, पण सतत आपण त्यांच्याबरोबर असण्याने त्यांचा कोंडमाराही झाला असेल कदाचित.


पण आता आपल्याला लवकरात लवकर अनलॉक व्हायचे आहे. अर्थात अनलॉक फक्त कोरोनापासून व्हायचे आहे. एकमेकांत गुंतागुंत तशीच असली पाहिजे. या संकटाने बरंच काही बदलून गेले आहे. म्हणजे नेहमी काय करायचे हा प्रश्न गृहिणींना भेडसावत असतो. आज डब्याला भाजी कोणती द्यायची? जी करणार ती त्यांना आवडेल का? नव‍ºयाला वांग्याची आवडत नाही. मुलाला दुधीभोपळा नको. मुलीला पालेभाजी नको. उसळी दिल्या, तर त्यावरून कुरूकुर. मग करायचे काय? खरंच त्या गृहिणीची स्वयंपाक म्हणजे कसरतच असते. आपण केलेली कसरत या मंडळींना आवडेल का? नवरा खूश असेल का? त्याच्या कपाळावर आठी तर नाही ना उमटणार? मुलं चीडचीड नाही ना करणार? या विचाराने स्वयंपाक करणा‍ºया गृहिणीची हीच कसरत घरात बसलेल्या नवरोबांनी मागच्या वर्षभरात पाहिली.

घरात काय आहे, काय नाही याचा विचार न करता आपण आॅर्डर सोडतो, पण हे करणे किती अवघड आहे हे त्याला समजून चुकले, कारण घरात अडकून पडलो होतो तेव्हा एकमेकांची किंमत कळाली. सुरुवातीला काहीच मिळत नव्हते. जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय, तर फक्त गहू, तांदूळ, डाळच होती. भाजीपाल्याचा विचार नंतर आला. मग दारावर येईल ती भाजी घेण्याची तयारी झाली. मानसिक तयारी झाली. दारात शेपू, आळू विकायला आला, न आवडणा‍ºया अनेक भाज्या विकायला आल्या. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो पाहून कंटाळा आला. तरी त्या असूदेत. उपयोगाला येतील म्हणून खरेदी केल्या गेल्या. आपल्याला आवडत नसतानाही खरेदी केल्या गेल्या. त्याच जेवताना गोड वाटू लागल्या. शेपूची भाजी वाईट नसते, उग्रपणा घालवूनही आई ती छान करते हे कळायला मुलांना घरात थांबावे लागले. म्हणजे बाहेरची हॉटेलं बंद झाली. चायनीज कॉर्नर बंद झाले. कोप‍ºयावरचा वडापाव, पावभाजी, मिसळ सारे बंद झाले आणि आईच्या हातचा शेपूही किती चविष्ट आहे हे समजून चुकले. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली आपल्या नव‍ºयाला काय काय कामे करावी लागतात. कशी बोलणी खावी लागतात. काय काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि तरीही हसत मूड ठेवण्याचा त्याचा चाललेला आटापिटा आपल्या घरकामापेक्षा खूपच मोठा आहे, हे तिलाही कळून चुकते. बाहेरून आल्यावर कधीतरी त्रासून येणारा नेमका का त्रासत होता? लोकल प्रवासात त्याला काही झाले का, याची जाणीव तिला झाली. लॉकडाऊनने अनेक लांब गेलेली माणसे जवळ आली. अनेक वेळा मनाने लांब गेलेली माणसेही जवळ आली. घरातील धुसफूस कमी झाली. एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. कित्येकांच्या घरात आनंद आला. म्हणजे अनेकांना प्रायव्हसी मिळत नव्हती. आता चान्स घ्यायचा की नको, याचा विचार होत होता. अनेक समस्या आहेत, खर्च आहेत याचा बाऊ होत होता, पण सोशल डिस्टन्सिंगच्या काळातही त्यांना शरीराने आणि मनाने जवळ आणले. अनेकांकडे त्यामुळे मोकळीक मिळाल्याने गुड न्यूजही आली. आता लवकरच सर्वांना अनलॉक व्हायला हवे, नाहीतर अशा गुड न्यूज सगळीकडे वाढल्या तर या देशाचे काय होईल?


पण आता अनलॉक व्हायचे आहे. पुनश्च हरीओम म्हणायचे आहे. नव्याने जुना डाव सुरू करायचा आहे. चांगल्या बदललेल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. आता बाहेर पडायचे आहे. हा विचार प्रत्येकाच्या मनात आज घोळत आहे, पण सगळं आता सुरू झालं पाहिजे. १ जूननंतर लॉकडाऊन वाढला तर जे वर्षभरात एकत्र आले होते, जवळ आले होते ते अतिपरिचयात अवज्ञा याप्रमाणे पुन्हा दुरावतील आणि दुखावतील. कौटुंबिक स्वास्थ्य संपुष्टात येईल. त्यामुळे आता अनलॉक व्हायलाच हवे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055

आसारामच्या वाटेवर


गेल्या सात वर्षात विशेषत: २0१४ ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बाबा रामदेव यांचे प्रस्थ वाढले. त्यांचा अभ्यास, वत्कृत्व, कर्तृत्व हे कितीही महान असले, तरी दुसरे मूर्ख आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे अ‍ॅलोपॅथीवर टीका करणे हे त्यांचे चुकलेच आहे. त्याचे समर्थन कोणीही करू नये. रामदेव बाबांनी आयुर्वेदातील ज्ञान आणि योग सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवले आणि लाखो लोकांमध्ये योग जागृती करून या माणसाने लोकांना निरोगी आणि सक्षम बनवण्याचे काम केले आहे, पण जेव्हापासून त्यांनी औषध निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे तेव्हापासून त्यांचे तंत्र बिघडल्याचे दिसत आहे. त्यांच्यातला सच्चा राम बाजूला झाला आणि फक्त बाबा राहिला असे वाटू लागले आहे. म्हणजे आपल्याकडे जेवढे बाबा, बापू झाले त्या सगळ्यांनी आयुर्वेदाचा पुरस्कार केला. काही वर्षांपूर्वी आसाराम बापूच्याही अशाच काही वस्तू विकायला यायच्या. कसली तेलं, साबण आणि बरेच आयुर्वेदिक शाम्पू वगैरेचे चांगले मार्केट आसारामने मारले होते. आसाराम आत गेला आणि रामदेवबाबांचे उत्पादन वाढले. त्यामुळे योगाच्या नावावर धंदा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप झाला तर तो चुकीचा नाही.


आपले काम आणि धंदा इतपत ते गुंतून होते तोपर्यंत ठिक होते, पण नुकतेच त्यांनी थेट अ‍ॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीवर आगपाखड करून अशास्त्रीय विधाने केली आहेत. जितकी माणसे आॅक्‍िसजन न मिळाल्याने मेली त्यापेक्षा अधिक माणसे अ‍ॅलोपॅथीची औषधे घेऊन मेली, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने केवळ रामदेव बाबांचा निषेधच केला नाही, तर त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्याची तयारी सुरू केल्यानंतर बाबा सरळ आले आणि त्यांनी खेद व्यक्‍त करीत दिलगिरीही व्यक्‍त केली आहे, पण हा विषय इथंच संपत नाही. गेल्या वर्षी त्यांनी कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला होता. तीन दिवसांत हे औषध घेऊन कोरोना बरा करण्याचा दावा केला होता. या औषधावर कोणी विश्वास ठेवला नाही आणि महाराष्ट्रात तर त्याला परवानगीही दिली नाही. त्यामुळे आसारामच्या वाटेवर जाण्यापासून रामदेवबाबांनी दूर राहिले पाहिजे.

आयुर्वेदात जगातल्या सर्वच आरोग्य समस्यांची व विषाणूजन्य आजारांची उत्तरे असल्याच्या थाटात सध्या हे बाबा बाजारातील प्रचलित औषधांवर तुटून पडले आहेत. रामदेव बाबांच्या थेरपींवर आक्षेप घेणारे आयुर्वेदाच्या म्हणजेच हिंदूंच्याही विरोधात आहेत, असा प्रचार त्यांच्या समर्थकांनी सुरू केला आहे. रामदेव बाबांना विरोध करणारे सेक्‍युलॅरिस्ट आहेत, काँग्रेसी व अल्ट्रा लेफ्ट आहेत, अशीही कोल्हेकुई सुरू करण्यात आली आहे. रामदेवबाबांनीच फक्त हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही. आयुर्वेदाचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडला जाऊ नये. कित्येक मुस्लिम हकीम जडीबुटीची औषधे देत असतात. तो आयुर्वेदच असतो. त्यामुळे आयुर्वेदावर फक्त हिंदुत्वाचा शिक्का मारणे थांबले पाहिजे. ती एक उपचार पद्धती आहे. निसर्गाने दिलेली ती शक्ती आहे.


साधारणपणे रामदेवबाबा अडचणीत आले की धर्मतत्त्वांच्या आड लपत असल्याचे अलीकडे सर्वांच्या लक्षात आले आहे. बाबा कसबी राजकारणीही आहेत. ते एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे समर्थक आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोदींच्या खालोखाल लोकांचा त्यांच्यावर रोष व्यक्‍त होत असतो. बाबांनी कोरोनावर कोरोनील नावाचे औषध बाजारात आणले. त्याच्या उद्‌घाटनाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन उपस्थित होते, पण याच बाबांच्या कंपनीत काम करणारे एक वरिष्ठ अधिकारी सुनील बन्सल यांचाच कोरोनाने मृत्यू झाला. मग कुठे गेली बाबांची उपचार पद्धती? खरं तर रामदेव बाबांचे कोरोनाच्या संबंधातील दावेही असेच अशास्त्रीय पद्धतीवर आधारित आहेत. त्यामुळे बाबा सध्या गोत्यात आले आहेत. ते आयुर्वेदातील ज्ञानाचे नवनवे दाखले पुढे करीत आहेत. वास्तविक त्यांनी अन्य कोणत्याही विज्ञानाधारित उपचार पद्धतींना विरोध करण्याचे काम करण्याच्या भानगडीत न पडणेच चांगले. रामदेवबाबांनी जेवढी प्रतिष्ठा सात वर्षांपूर्वी मिळवली होती तितकीच आता घसरणीला लागलेली आहे. त्यांच्यात आता राम शिल्लक राहिलेला नाही, तर फक्त बाबा राहिला आहे असे वाटू लागले आहे. त्यांनी आपल्यातील राम जपला पाहिजे, खरेपणा जपला पाहिजे आणि राजकारणात लक्ष न घालता योगाकडे लक्ष दिले तर बरे होईल.

बाबा रामदेव यांच्या आग्रहाखातर पंतप्रधान मोदींनी २0१५ पासून जगभरात योगा दिन सुरू झाला. दरवर्षी २१ जूनला जगभरात योगा केला जातो. संपूर्ण जगाला आपल्यामागे धावायला लावायची ताकद रामदेवबाबांमध्ये असताना त्यांनी वायफळ बोलून, नको त्यावर टीका करून स्वत:चे अवमूल्यन का करून घेतले हे न कळणारे आहे? बाबा रामदेव हे थोडे आधुनिक होताना दिसत होते. एकेक उत्पादने बाजारात आणण्याच्या मागे लागत होते. पतंजलीने अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांना दणका दिला होता. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांपुढे आव्हान उभे केले होते. बिस्किटे, नूडल्स आणि विविध साबण, सोप, क्रीम, सौंदर्यप्रसाधने, काढे यांतून त्यांचे चांगले चालले होते. अगदी जीन्सच्या निर्मितीपर्यंत तयारी केली होती, पण हे सगळं चाललं असताना दुसºयावर, अ‍ॅलोपॅथीवर टीका करण्याची त्यांना झालेली दुर्बुद्धी ही त्यांच्यातला राम निघून गेल्याची साक्ष म्हणावी लागेल.

प्रेक्षकांच्या पसंतीचा सूर ‘सूर नवा ध्यास नवा’


कलर्स मराठीवर गेली चार वर्ष म्हणजे २०१७ पासून सुरू असलेला ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीचा कार्यक्रम ठरताना दिसत आहे. सध्या या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरू आहे. ते आता अंतिम फेरीच्या दिशेने जात असतानाच हा कार्यक्रम उत्तरोत्तर खूपच रंगतदार होताना दिसत आहे.


२०१७-१८ ला आलेल्या या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्यासाठी तेजश्री प्रधान ही अभिनेत्री होती. परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते, महेश काळे आणि शाल्मली हे तिघे होते. हा कार्यक्रम एका उंचीवर पोहोचला होता. पहिल्या पर्वात अंतिम विजेता हा अनिरुद्ध जोशी होता, तर उपविजेती शरयू दाते ठरली होती. हे पर्व यशस्वी झाल्यानंतरच ‘इंडियन आयडल’, ‘सारेगमप’ यांप्रमाणे हा कार्यक्रम कायम सुरू राहणार हे नक्की झाले होते आणि त्याप्रमाणे थोड्याच दिवसांत दुसरे पर्व आले. यात बदल फक्त निवेदनाचा होता. सूत्रसंचालन करणारी तेजश्री न दिसता तिची जागा स्पृहा जोशीने घेतली. बाकीचे परीक्षक, पाहुणे तेच होते. २०१८-२०१९ च्या पर्वात अंतिम विजेती ठरली होती ती स्वराली जाधव आणि उपविजेती ठरली ती मीरा निलाखे. हे पर्वपण बहारदार झाले होते. २०१९-२० चे पर्व असेच गाजले यात अक्षया अय्यर ही अंतिम विजेती ठरली, तर उपविजेता ठरला होता तो अमोल घोडके.

आता हे चौथे पर्व सुरू आहे. यातील अंतिम पाच स्पर्धक आता फायनलसाठी तयार झाले आहेत. एका उंचीवर ही स्पर्धा पोहोचली आहे. याचे कारण हे पर्व फक्त महिलांचे पर्व आहे. यात सुरुवातीला सोळा गायिकांना निवडले होते. त्यातील गुणांच्या जोरावर दर आठवड्याला कमी होत होत आता अंतिम पाच जणांची यादी तयार होत आहे. या कार्यक्रमाचा निर्माता सध्या अवधूत गुप्ते स्वत: आहे. जातीने तो लक्ष घालत आहेच, पण या कार्यक्रमावर त्याने भरपूर खर्चही केला आहे. स्पर्धकाच्या सादरीकरणावर लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे वाद्यवृंद या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.


सुरुवातीचे काही भाग आणि शुभारंभ झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेचा या कार्यक्रमाला फटका बसला. त्यामुळेच या कार्यक्रमाचे चित्रीकरण मुंबईत थांबले. त्यासाठी भरगच्च सेट उभा केलेला असतानाही ते थांबवावे लागले. त्यामुळे अवधूत गुप्तेनी हे चित्रीकरण आपल्या ओळखीचा फायदा घेऊन गोव्यात सुरू केले. गोव्यात काही भागांचे चित्रीकरण झाल्यावर तिथेही त्याला विरोध होऊ लागला. काही दिवस चित्रीकरण थांबवण्याची वेळ आली, पण नंतर पुन्हा ते सुरू झाले. अशा असंख्य अडचणींवर मात करत हा कार्यक्रम कसलाही सूर न बिघडता सुरू आहे हे या कार्यक्रमाचे यशच म्हणावे लागेल.

सुरुवातीला जे सोळा स्पर्धक यासाठी निवडले होते ते अक्षरश: महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून निवडून आणले होते. सर्व स्पर्धक हे अत्यंत तयारीचे आहेत हे त्यांच्या सादरीकरणातून आणि मेहनतीतून दिसून आले आहे. यातील रश्मी मोघे, तृप्ती दामले, सन्मिता शिंदे, राधा खुडे, स्नेहल चव्हाण, फरीन शेख, माधवी माळी, प्रज्ञा साने, इशानी पाटणकर, किशोरी मुर्के, मालविका दीक्षित, हेतवी सेतिया, धनश्री कोरगांवकर, श्रीनिधी देशपांडे, श्वेता दांडेकर, संपदा माने यांनी पहिल्या सोळा स्पर्धकांमध्ये प्रवेश मिळवला होता. आता दर आठवड्याला त्यातील काही कमी होत सात स्पर्धक राहिले आहेत, पण अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवणारी डोंबिवलीची प्रज्ञा साने ही कौतुकाचा भाग ठरली. या आठवड्यातील लोकगीतांवर आधारित आठवडा तर उत्तम झालाच. यातील उगवली शुक्राची चांदणी हे लावणी गीत अतिशय बहारदार असे झाले. प्रसंगानुरूप पाडवा स्पेशल, शिवजयंती विशेष, महाराष्ट्र दिन विशेष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष असे भाग सादर करून हा कार्यक्रम अधिक लज्जतदार केला.


या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धकाने आपले गाणे सादर केल्यानंतर त्यावर महेश काळे यांचे वक्तव्य हे अत्यंत छान वाटते. प्रत्येकाशी कसे आदराने बोलावे, त्याला न दुखावता त्याच्यातील उणिवा दाखवण्यापेक्षा हे आणखी कसे छान झाले असते हे सांगण्याचे महेश काळेंचे कसब अतिशय चांगले आहे. कितीही लहान स्पर्धक असला तरी त्याचा मान ठेवून त्याला अहो-जाहो करण्याचा मोठेपणा हा फार मोठा गुण या कार्यक्रमात महेश काळेंमध्ये दिसून येतो. कधीही तोल जाऊ न देता शांतपणे बोलण्याचे काम महेश काळे करतात. त्यामुळे हा कार्यक्रम एका उंचीवर पोहोचला आहे. कार्यक्रमाचा निर्माता असलेला अवधूत गुप्ते आपल्या अवखळपणाने, हसत-खेळत कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे, चांगल्या सादरीकरणाला शिट्टी वाजवून, नाचून दाद देण्याचे काम करतो आणि त्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार होतो.

ताईमाई, सासवा-सुनांच्या मालिकेतून बाहेर पडून आणि चोथा झालेले विनोदाचे कार्यक्रम बाजूला ठेवून हा कार्यक्रम खºया अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ठरला. प्रत्येक आठवड्याला बुधवारी एक सोन्याची कट्यार आणि राजसिंहासन कोणाला मिळणार ही उत्सुकता असतेच, पण त्याहीपेक्षा वाईट वाटते ते जे स्पर्धक बाहेर पडणार असतात त्यांना निरोप देतानाचा क्षण तसा जीवघेणाच असतो, पण हा कार्यक्रम ज्याप्रकारे एका उंचीवर गेला आहे ते पाहत पुढील आठवड्यातील अंतिम फेरीत खुपच चांगले दर्जेदार सादरीकरण बघायला मिळेल यात शंकाच नाही. ‘सूर नवा ध्यास नवा’च्या निमित्ताने प्रेक्षकांना आनंदाचा सूर या कोरोनाच्या काळात सापडला हे नक्की.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

9152448055

27 may

टूलकिटने कोण होणार पुलकीत?


कोव्हिड संकट हाताळणीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये गेला बराच काळ आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. यात सध्या एक परवलीचा शब्द आला आहे, तो टूलकीट. काँग्रेस पार्टी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी अगदी पद्धतशीरपणे एका 'टूलकिट'चा वापर करते आहे, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. यावरून काँग्रेस टूलकीट एक्स्पोजड हा हॅशटॅग ट्रेंड झाला; पण भाजप खोटं बोलतोय असं म्हणत काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे. म्हणूनच काय आहे हे टूलकिट प्रकरण? आणि या टूलकीट प्रकरणातून कोण होणार नेमके पुलकीत हे आपल्याला पाहावे लागेल; पण एक यशाच्या शिखरावर जाऊन बदनाम होत असलेला आणि दुसरा गाळात जाऊन आणखी खोलात रूतत चाललेल्या दोन पक्षांमधला हा संघर्षहिडीस आहे हे नाकारता येणार नाही.


कोरोनाच्या दुसºया लाटेत भारतात रुग्ण आणि मृत्यूही वाढत गेले. देशात हॉस्पिटल बेड, आॅक्सिजन, औषधं, लसी अशा अनेक गोष्टींचा तुटवडा भासायला लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपापल्या सूचना, चिंता व्यक्त केल्या. या सगळ्या पत्रांना भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांनी उत्तरं दिली; पण भाजपला टार्गेट करण्यासाठी हा कोरोना आणि ही परिस्थिती आपल्याला तारणहार ठरेल, असा विश्वास कुठे काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाला आणि झोंबिज द फ्लेश इटर या चित्रपटातील गाडलेले मुडदे जसे कबरी तोडून बाहेर येतात, तसे काँग्रेसचे नेते हालचाली करू लागले.

अशातच भाजप अध्यक्ष जे पी नड्डांपासून ते अनेक केंद्रीय मंत्री, अगदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे विविध राज्यांतले प्रवक्ते अशा अनेकांनी काँग्रेस टूलकीट एक्स्पोजड असा हॅशटॅग वापरून काँग्रेसवर आरोप करायला सुरुवात केली. काँग्रेसचं कौतुक आणि मोदींची बदनामी, अशी काँग्रेसची रणनीती असलेलं 'टूलकिट' एक्सपोज झाल्याचा दावा हे भाजप नेते करत होते. टूलकिट हा शब्द सोशल मीडियाच्या बाबतीत अलीकडे वापरला जातो. तशी ती फॅशन किंवा फॅड आहे म्हणा हवं तर. त्याची सोपी व्याख्या म्हणजे एखाद्या आंदोलनाच्या किंवा मोहिमेच्या संदर्भातली सोशल मीडियावरील रणनीती आणि प्रत्यक्षपणे करण्याच्या गोष्टींची माहिती त्यात दिलेली असते. शेतकरी आंदोलनावेळीही असे एक टूलकीट आले होते.


गेल्या काही दिवसांपासून मोदींची बदनामी करण्याचं टूलकीट काँग्रेसनं सुरू केले आहे, असा भाजपचा आरोप होता. आता हे टूलकिट काँग्रेसच्या अधिकृत लेटरहेडवर होतं आणि काँग्रेस पक्षाच्या संशोधन विभागाने ते तयार केलं होतं, असा दावा भाजपने केला होता. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यात आघाडीवर होते. खरंतर आजकालचा जमाना हा बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ, अशा प्रकारचा आहे. त्यातून मोदींच्या बदनामीतून तर काँग्रेसने त्यांना मोठे केले आहे. २००६च्या गुजरात निवडणुकीपासून सोनिया गांधी यांनी जाहीर सभांमधून मोदींचा उल्लेख मौत का सौदागर, असा करून त्यांची बदनामी केली. ती त्यांच्या पथ्यावरच पडली. त्यामुळे तर गुजरातचे नेते देशाचे नेते झाले, राष्ट्रीय नेते झाले. मग आता मोदींच्या बदनामीची भीती भाजप का बाळगते आहे. मोदींना भाजपने नाही, तर काँग्रेसने मोठे केले आहे हे नाकारून चालणार नाही.

भारतात सापडणाºया कोरोनाच्या स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणा, असं काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचं, तसंच भारताची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा पात्रा यांनी केला. यावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस भारतविरोधी भूमिका का घेतंय, असा प्रश्न उपस्थित केला. लगेचच केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी हे टूलकिट हिंदूविरोधी असल्याचं म्हटल आहे. लगेच काँग्रेसने हे सगळे आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या संशोधन विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांनी भाजप काँग्रेसच्या नावाने खोटे टूलकिट पसरवत असल्याचा आरोप केला; पण भाजपचा दावा आहे की, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवरून मोदींवर टीका करण्याच्या सूचना देणारी कागदपत्रंही या टूलकिटचा भाग होती आणि त्याच्या लेखिका सौम्या वर्मा या राजीव गौडा यांच्या सहकारी आहेत. राजीव गौडांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं की, सेंट्रल व्हिस्टाबद्दलची रिसर्च नोट त्यांच्या विभागाने तयार केली होती; पण त्यात फक्त सेंट्रल व्हिस्टा बद्दलदची तथ्यं देण्यात आली होती. सोशल मीडिया स्ट्रॅटेजीबद्दल त्यांची टीम काम करत नाही, तसंच काँग्रेसच्या खºया संशोधनाच्या लेखिकेचं नाव भाजप आपल्या बनावट टूलकिटला जोडत आहे. यावरून काँग्रेसने दिल्ली पोलिसांकडे तक्रार देत चौकशीची मागणी केली, तसंच ट्विटरने पात्रांच्या सुरुवातीच्या ट्विटवर मॅन्युप्युलेटेड मीडिया हे लेबल लावणं यातून भाजपचा खोटेपणा उघडा पडला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. अर्थात काँग्रेस इतक्यावरच थांबलेलं नाही, त्यांनी टूलकिटबद्दलचे ट्विट करणाºया भाजप नेत्यांची अकाऊंट्स कायमची निलंबित करावी, अशीही मागणी ट्विटरकडे केली.


मात्र अल्ट न्यूजने आपल्या फॅक्ट चेकमध्ये म्हटलं आहे की, काँग्रेस पक्षाचं लेटरहेड आणि टूलकिट ज्या कथित लेटरहेडवर होतं या दोन्हीचे फाँट वेगवेगळे आहेत, त्यांच्यातली तारीख लिहिण्याची स्टाईल वेगळी आहे, तसंच या टूलकिटमध्ये स्ट्रेटेजी म्हणून दिलेल्या घटना यापूर्वीच घडून गेलेल्या आहेत. टूलकिट हे भविष्यात करण्याच्या गोष्टींबद्दल असतं. अल्ट न्यूजने आपल्या फॅक्ट चेकमध्ये भाजपने शेअर केलेलं टूलकिट फेक असल्याचं म्हटलं आहे, तर ओपीइंडिया या मोदी सरकारची वारंवार पाठराखण करणाºया वेबसाईटने अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकचा फॅक्ट चेक केला. अल्ट न्यूज ही काँग्रेस समर्थक वेबसाईट असून, काँग्रेसला क्लीन चिट देण्यासाठी त्यांनी कोलांटउड्या मारल्याचं म्हटलं आहे. अल्ट न्यूजने केलेले दावे अत्यंत कमकुवत आहेत, तसंच त्यांनी काँग्रेसने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर हे दावे केलेत यातून त्यांच्यातले लागेबांधे दिसतात, असा आॅप इंडियाच्या दाव्यांचा गोषवारा आहे. अल्ट न्यूजने आपल्या लेखात प्रकाशनानंतर केलेल्या बदलांबद्दलही आॅप इंडियाने आक्षेप घेतले.

थोडक्यात काय, तर कोरोनावरचे लक्ष हटवत आणि कोरानाकडे लक्ष देत राजकारण करत चर्चेत राहण्याचे हे दोन राष्ट्रीय पक्षांचे खेळ आहेत. त्यातून जनतेचे ना भले होणार आहे ना काही विकास साधणार आहे; पण चिखलफेकीच्या राजकारणाप्रमाणेचे हे टूलकीटचे राजकारण आपल्याला पुलकीत करेल आणि भविष्यातील आपला सिंहासनाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास ज्यांना वाटतो ते या टूलकीटचा वापर करतात. २०१८ला मी टू हॅशटॅग या टूलकीटनं जसे अनेकांनी आपल्यावर केव्हातरी लैंगिग अत्याचार झाल्याचे म्हटले आणि एकापाठोपाठ तक्रारी येत गेल्या. आता ज्यांच्यावर असे आरोप झालेते कुठे आहेत? पण चित्रपटसृष्टी आणि राजकारणातील अनेकांनी हमाम में सब नंगे होते हैं हे दाखवून दिले. तसे आता नंगे होण्याचे आणि एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचे हे एक नवे टूल या दोन पक्षांना सापडले आहे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

फक्त उपदेशाचे डोस


सध्या सर्वसामान्य जनता, व्यापारी, उद्योग जगाला अनलॉकचे वेध लागले आहेत. १ जूनपासून तरी पुन्हा सर्व व्यवहार सुरू होतील, असे वाटत असतानाच सरकारकडून मात्र कसलेच संकेत मिळत नाहीत. विविध पक्षांचे राजकीय नेते मुख्यमंत्री या विषयावर बोलायचे टाळत आहेत. तिसरी लाट येईल यावरूनच टास्कफोर्स असेल किंवा अन्य काही विषय घेऊन मुख्यमंत्री आणि सरकारचे प्रतिनिधी बोलत आहेत; पण लॉकडाऊन कमी करणे आणि सर्वसामान्यांना जगायला देणे याबाबत कोणताचा निर्णय होताना दिसत नाही. नुकतेच सरकारने शिवभोजन थाळी १४ जूनपर्यंत मिळेल हे जाहीर केले. त्यामुळे हा लॉकडाऊन १४ जूनपर्यंत कायम राहील असे दिसत आहे. कोरोनाकाळात आपल्या देशात, राज्यात, शहरांत, गावागावात जे काही चालले आहे ते पाहता बैल गेला अन् झोपा केला किंवा वरातीमागून घोडे अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोना आल्यापासून म्हणजे सव्वा वर्षापासून त्यासाठी आवश्यक धोरण, व्यवस्था, समन्वय, राजकीय प्रगल्भता, सामाजिक-आर्थिक भान यांची वानवा ठळकपणे जाणवते आहे. मग ते वर्षापूर्वीचे लॉकडाऊन, अनलॉक असो, लसीकरण, मदत पॅकेज असो की प्राणवायू, औषधी पुरवठा; सर्वच पातळ्यांवर कमालीचा गोंधळ दिसला. त्यातच निवडणुका, धार्मिक कार्यक्रमांची भर पडली. कोरोना आला, तेव्हा केंद्राने सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवत लॉकडाऊन जाहीर केला. त्यातून मजुरांचे स्थलांतर, उद्योगांचे हाल, अर्थचक्राला खीळ अशा अनेक समस्या उद्भवल्या. लसीकरणाच्या बाबतीतही असेच झाले.


सुपर स्प्रेडर ठरू शकणारा १८ ते ४५ वयोगट लसीकरणापासून दूर ठेवण्यात आला. मग दुसºया लाटेचा बागुलबुवा अंगावर येऊ लागताच १ मेपासून या वयोगटाला लस देण्याचा निर्णय झाला. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कोरोना रुग्णसंख्या घटली, तेव्हा सर्व यंत्रणा गाफील राहिली. दुसरी लाट येणार हे जगातील सर्व तज्ज्ञ सांगत असताना, आपण पाच राज्यांतील निवडणुकांचा घाट घातला. तेथे कोरोनाच्या त्रिसूत्रीला हरताळ फासत निवडणूक ज्वराने पछाडल्यागत प्रचार सभा, रोड शोला हजारोंचा समुदाय जमवण्यात आला. आता तेथे कोरोनाचा ज्वर वाढू लागला आहे; पण राजकीय नेत्यांनी उत्सव केले आणि सामान्य जनतेला वेठीला धरले हे मात्र यातून स्पष्ट झाले.

वाढत्या रुग्णांना लागणारा प्राणवायू, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवू लागताच यंत्रणेची पळापळ सुरू झाली. त्यातच रुग्ण सुरक्षेचा फज्जा उडाला. नाशिक, विरारमध्ये रुग्णांना हकनाक प्राण गमावावे लागले. याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर कदाचित देण्याची वेळ येऊ नये, यासाठी जनतेलाच लॉक करून टाकण्याचे धोरण म्हणजे लॉकडाऊन. अरे अपयश तुमचे, निष्क्रियता तुमची आणि सर्वसामान्य जनतेला कसले वेठीला धरता? तुमचे दौरे चालले आहे, सगळं चाललं आहे, तिथे गर्दी आहे; पण पोटापाण्यासाठी सामान्य जनतेला बाहेर पडू दिले जात नाही. हे एकप्रकारचे शोषण ही व्यवस्था करत आहे. जनतेला लॉक करून व्यवस्थाही डाऊन झाली आहे. कोरोना व्यवस्थापनाबाबत नेमके धोरण तयार करा, असे न्यायसंस्थेला सांगावे लागते, यातच सर्व काही आले. शिक्षणाचे वाटोळे केले, नोकरी, रोजगार आणि रोटीचेही वांदे झाले. जनतेला सामोरे जाण्याची ताकद नसल्याने फक्त लॉकडाऊन वाढवणे म्हणजे सरकार चालवणे, असा प्रकार या सरकारने चालवला आहे. हा छळ सर्वसामान्य जनतेला अजून किती काळ सोसावा लागणार आहे, याचे उत्तर कोणाकडेच नाही; पण कोरोना अजून दहा वर्ष गेला नाही, तरी हे सरकार घालवण्याची ताकद जनतेत आहे. कोरोनाला हरवणारी लस आणि औषध सक्षम नसले तरी जनतेला देशोधडीला लावणारे, जनतेला घरात बसवून त्यांची रोटी काढून घेणारे सरकार घालवण्याची ताकद जनतेत आहे हे सरकारने विसरू नये.


या सरकारचे सगळे नियम अर्धवट आहेत. वर्तमानपत्रे, नियतकालिके, छपाई आणि त्यासंबंधी सर्व कामे अत्यावश्यक सेवा म्हणून चालू राहतील, असे म्हटले आहे; पण या कामासाठी लागणाºया कामगारवर्गाला लोकल बसने प्रवास करण्यास मुभा नाही. मुख्यमंत्री आणि सरकारचे गोडवे गावेत म्हणून पत्रकारांनी कामे करावीत, असे सरकारला वाटते. अत्यावश्यक सेवेत त्यांचा समावेश आहे; पण त्यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली जात नाही. ही एकप्रकारची अघोषित हुकूमशाहीच झाली. घरात बसून मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवरून जे काही बडबडतील तेवढेच छापा, बाकी काही लिहायचे नाही, हाच प्रकार आहे. या अंदाधुंद कारभारातूनच तर रुग्णालयांना आगी लागतात, सगळीकडे अंदाधुंदी माजलेली आहे. असा छळ हे सरकार फार फार तर आॅक्टोबर २०२४ पर्यंत, म्हणजे अजून साडेतीन वर्ष करू शकेल; पण जनता याचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. लसीकरणाचा डोस सामान्यांना मिळू दिला जात नाही, सामान्यांना रोजगार बंद ठेवेून घरात उपासमार होत असताना हे सरकार फक्त उपदेशाचे डोस देत आहे. हात धुवा, मास्क घाला आणि सॅनीटायझर वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा; पण हीच त्रिसूत्री आगामी काळात जनता या राज्यकर्त्यांच्या बाबतीत वापरणार. हात धुवून या सरकारच्या मागे घालवण्यासाठी लागेल. सोशल डिस्टन्स म्हणजे या नेत्यांना ही जनता इतकी दूर करेल की, आज केंद्रात काँग्रेसची अवस्था झाली आहे, त्यापेक्षा वाईट अवस्था होईल. शेवटी शिशुपालाचे शंभर अपराध झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नसते, त्याप्रमाणे या सरकारचे जनतेला छळायचे अपराधांची शंभरी अजून व्हायची आहे; पण नंतर मात्र जनता सोशल डिस्टन्स म्हणजे सोसेल तेवढे सोसून झाल्यावर डिस्टन्स ठेवेल हे लक्षात घेतले पाहिजे.

१२च्या यादीचे रहस्य

विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुकीची यादी माहितीच्या अधिकारात मागितली असता, अशी कोणतीही यादी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेले सहा महिने ज्या बाराच्या यादीने गोंधळ घातला आहे, त्या राजकारणालाच वेगळे वळण लागले आहे. राजभवन खोटे बोलते की, हे सरकार खोटे बोलते, असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे १२ आमदारांच्या नावाची यादी खरोखरच राज्य सरकारने दिली होती का, याबाबतही शंकेला वाव आहे. आम्ही दिली असं म्हणून फक्त राजकारण करायचं, असा काही या तीन पक्षांचा कारनामा नाही ना असे यातून प्रश्न निर्माण होतात. कारण राज्यपालांकडे जर इतके महिने यादी असती, तर त्यावर निर्णय झालाच असता. हवे तर त्यांनी नाकारले असते, यातील काही नावे वगळा सुचवले असते; पण सगळीच नावे निर्णयावाचून राज्यपाल कसे गप्प बसू शकतील? त्यामुळे फक्त राजकारण खेळवत ठेवण्यासाठी या १२ नावांचा वापर केला का, अशी शंका येते.


माहिती अधिकारात त्या यादीबद्दल विचारणा करण्यात आली असता, अशी कोणतीही यादी नसल्याचा खुलासा राजभवनाने केला. १२ सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने केलेला सवाल आणि माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर राजभवनातून आलेलं उत्तर यामुळे या सरकारच्या दाल में कुछ काला हैं, असा संशय येतो आहे. ती यादी राजभवनावर पाठवलीच गेली नाही का? नसेल, तर का पाठवली गेली नाही याचाही विचार करावा लागेल. ही राज्यपाल नियुक्त सदस्यांची जागा कलाकार, साहित्यीक, खेळाडू अशा लोकांसाठी आहे; पण राज्य सरकारने विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यासाठी आपल्या कोटातून सुचवलेली नावे ही राजू शेट्टी, एकनाथ खडसे अशी आहेत. आता एकनाथ खडसे हे कसले कलाकार आहेत? ते उत्तम संसदपटू आहेत, राजकीय खिलाडी आहेत; पण राजकारणात खेळ करणाºयांसाठी ती जागा नाही. ती कलाकारांची जागा आहे. हे कलोपासक असलेल्या मुख्यमंत्र्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या नावाला मुख्यमंत्र्यांचीच पसंती नसावी असे स्पष्ट होते. शिवसेनेचे आणि कलाकारांचे जवळचे नाते असते. चांगल्या कलाकारांना डावलून कोणाचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी या बाराच्या यादीत एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांची नावे घुसडली जात असतील, तर कलाकारांचे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त ज्यांच्या अंगात आहे, असे मुख्यमंत्री ही यादी पोहोचूच देणार नाहीत. अशा नावांना मंजुरी ते मिळूच देणार नाहीत. शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव दिले आहे. ते नाव योग्य आहे. त्या अभिनेत्री आहेत, कलाकार आहेत, त्यामुळे शिवसेनेने कलाकारांची कदर केलेली आहे. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांचे नाव यासाठी योग्य आहे; पण राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे या नेत्यांच्या नावाला विरोध असल्यामुळेच कदाचित ती यादी खितपत पडली असावी. दुधाचे टँकर फोडणारे, शेतीचा माल रस्त्यावर फेकणारे राजू शेट्टी हे कोणत्या कलेत पारंगत आहेत, म्हणून त्यांना या जागेवर पाठवायचे? उद्धव ठाकरे आणि शिवसेना ही अत्यंत न्यायप्रिय आहे. कलाकारांसाठी राखिव असलेल्या जागेवर शिवसेना आणि त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री कदापि अन्याय होऊ देणार नाहीत. शिवसेनेच्या कोट्यातून या यादीत आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांचे, परंतु शरद पोंक्षे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाते म्हणजे विळा भोपळ्याचे नाते आहे. शिवसेनेने जरी हिुंदत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला असला, तरी शरद पोंक्षेंचे समर्थन जितेंद्र आव्हाड करणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीने त्या नावाला विरोध करत ही यादी कायम करू नका, अशी काही फिल्डींग लावली असण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सुचवलेली कलाकारांची नावे नियुक्त करायची असतील, तर कलाकार नसलेल्या राजू शेट्टी, एकनाथ खडसे यांच्या नावाला मान्यता दिली पाहिजे, असा आग्रह राष्ट्रवादीचा असू शकतो. या ओढाओढीत ही यादी गायब कुठे झाली त्याचा शोध घेतला पाहिजे; पण काही झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर, कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाहीत. कलाकार, साहित्यिकांसाठी असलेल्या जागेवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे, ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेल्या एकनाथ खडसे यांची वर्णी लावण्याचे पाप मुख्यमंत्री कधीच करणार नाहीत. शेतकºयांना बांधावर जाऊन मदत करण्याचे वचन देणारे उद्धव ठाकरे हे शेतकºयांच्या शेतमालाची नासाडी करणारे, त्यांचे दुधाचे टँकर फोडून हजारो लिटर दुधाची नासाडी करणाºया राजू शेट्टी यांना कलाकारांच्या जागेवर बसवण्याचे पाप करणार नाहीत. कटू निर्णय घेण्यासाठी कोणी नावे ठेवली, तरी चालतील; पण मी मागे पुढे पाहणार नाही, अशा बाण्याचे असलेले मुख्यमंत्री कधीच अशा बारा नावांचे समर्थन करणार नाहीत. त्यामुळ संजय राऊत यांनी कितीही यावरून आरडाओरडा केला, भाजप, राज्यपालांचे नावाने शिमगा केला, तरी तो प्रकार म्हणजे तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असाच आहे. त्यामुळे जोपर्यंत या बारा नावात फक्त कलाकार, साहित्यिक, खेडाडू अशा लोकांचे नाव येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री ती यादी मंजूर होऊ देणार नाहीत हे नक्की आहे. अशी कोणतीही यादी आमच्याकडे नाही हे राजभवनकडून आलेले उत्तर हेच सांगते आहे, हे समजले पाहिजे.

शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजपा यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे काही बाबतीत मंद गतीचे झाले आहेत. ही टीका नसून वस्तुस्थिती आहे. असे म्हटले असले, तरी मुख्यमंत्री कलाकारांच्या जागी खोगीरभरती होऊ देणार नाहीत हे वास्तव आहे. भाजप आणि राज्यपालांच्या चपलेने विंचू मारण्याचे योग्य काम त्यांनी केले आहे. शेवटी चिखलाला पाणी तुटत नाही त्याप्रमाणे हिंदुत्वावर आधारीत २५ वर्ष एकत्रित राहिलेले हे दोन नैसर्गिक मित्र एकमेकांचा कसा केव्हा वापर करायचा हे चांगले जाणतात. त्याच खेळीचा हा भाग आहे. १२ आमदारांच्या नावाच्या यादीचे नेमके काय झाले हे आता समजायला हरकत नाही.

आता जनतेला काम करू द्या


कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी पाहता-पाहता देशातील अनेक राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले. त्याचा फायदा झालेला दिसू लागला आहे. वेगाने सुरू झालेले लसीकरण आणि विविध राज्यांमध्ये टाळेबंदीसह योजलेल्या कठोर उपाययोजनांमुळे गेल्या दहा दिवसांत सक्रिय बाधितांची आढळणारी संख्या अर्ध्यावर आल्याने देशातील नागरिकांसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्याचवेळी काही भागात कडक निर्बंध केले जात आहेत. काही राज्यांनी विशेषत: दिल्ली, तामिळनाडूने निर्बंध वाढवले आहेत, तसेच महाराष्ट्रातही १ जूनपासून हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आहेत; पण हे किती काळ चालणार? याने थांबलेले अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही प्रयत्नच केले जाणार नाहीत का, हा खरा प्रश्न आहे.

खरं तर १० मे रोजी देशातील सक्रिय बाधितांची आकडेवारी २४.८३ टक्के होती, ती २२ मे रोजी १२.४५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याची बाब नीती आयोगाच्या आरोग्य विभागातील सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. त्यामुळे सावधगिरी घेणे जरी गरजेचे असले, तरी घरात कोंडून घेत जगणे हा काही त्यावरचा उपाय नाही. या कोंडून घेण्यामुळेच हे बुरशीजन्य आजार पसरत आहेत काय, अशी शंका मनात येते.


गेल्या पंधरा-वीस दिवसांत सातत्याने काळी बुरशी, पांढरी बुरशी असले विषय बातम्यांमधून येत आहेत. त्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार झाल्याची चिंता व्यक्त होत आहेत. हे प्रकार एकातून एक, एकातून दुसरे उद्भवण्याचे प्रकार आहेत. हे सातत्याने होतच राहणार म्हणून काही घरातच बसून रहायचे, असा त्याचा अर्थ होत नाही.

माणसांना बुरशी लागते हे किती लाजीरवाणं आहे. खरं तर आपल्याकडं बुरशी ही कुजलेल्या, सडलेल्या, शिळ्या पदार्थांना येते. शिळी भाकरी पोळी किंवा पावाचा तुकडा, तसेच डब्यात बंद करून ठेवले तर त्याला बुरशी येते. हवेचा दमटपणा, शुद्ध स्वच्छ हवा लागली नाही आणि भिंतीला ओल आली, तर भिंतींना बुरशी लागते. याचे कारण मोकळी शुद्ध हवा त्या घरात फिरली नाही. कित्येकवेळा वर्षाचे म्हणून घातलेले लोणचे असते, त्याला नीट अधून-मधून मीठ, तेल घालून डाव फिरवून हालवले नाही, तर कोंडमारा झाल्याने बुरशी लागते. कपाटात बरेच दिवस आपण कपडे, चादरी, बेडसिट ठेवून दिली, तर त्यांना हवेतील दमटपणामुळे, हवेतील बाष्पकण साचल्याने कपाटातल्या कपाटात बुरशी येते. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की, शुद्ध हवा न मिळाल्याने आणि कोंडमारा झाल्याने बुरशी येते.


गेले वर्ष सव्वावर्ष माणसं घरात बसून आहेत. त्यांना बुरशी येईल नाहीतर काय होईल? हे समजण्यासाठी कोणत्याही डॉक्टर, वैद्य शास्त्रज्ञाची गरज नाही. त्यामुळे आता अंगातला आळस, मरगळ, झटकून कामाला लागणे, अर्थचक्र सुरू ठेवणे हाच यावरचा उपाय आहे. दु:ख आणि रोग जेवढा कुरवाळत बसाल तेवढे ते वाढत जाते. आज कोरोनाचे तसेच झाले आहे. त्याला जास्त कुरवळण्यात वेळ घालवता कामा नये हे आमच्या डॉक्टरांनी, समाजव्यवस्थेने समजून घेतले पाहिजे.

गेल्या महिना पंधरा दिवसांत कोरोनावर चर्चा होतच नाहीये, तर चर्चा फक्त म्युकरमायकोसिस, पांढरी बुरशी, काळी बुरशी यावर होत आहे. हा कोरोनाचा दुसरा अवतार आहे, असे म्हटले जात आहे; पण हा दुसरा अवतार आपणच घ्यायला लावला आहे. घरात बसून त्याला पोसण्याचे काम आपण करत आहोत.


बुरशी कुठे नाही? राज्यकर्त्यांच्या मेंदूला बुरशी आलेली आहे. बुरशी हा आळसाचा, निष्क्रियतेचा अवतार आहे. काम करणाºयांना घरात बसवायचे आणि अर्थचक्र थांबवायचे. लोकांची उपासमार करायची, बेरोजगारी वाढवायची ही राजकीय बुरशी आहे. बुरशी ही परावलंबी वनस्पती असल्याचे वनस्पती शास्त्रात म्हटले जाते. ती दुसºया वस्तुतील अन्नकण शोषून घेते, म्हणजे बुरशी ही शोषणकर्ती आहे. आज आमचे राज्यकर्ते शोषणकर्तेच झाले आहेत. सर्वसामान्यांचा हक्काचा रोजगार काढून घेऊन त्यांना घरात बसवून परावलंबी बनवत आहे. आमच्या जनतेलाच बुरशी बनवण्याचे काम ही सरकारी यंत्रणा करताना दिसत आहे.

या दीड वर्षाच्या काळात एक फार मोठी विषमता सरकारने निर्माण केलेली आहे. मध्यमवर्गीयांना गरीब केले. गरिबांना दरिद्री केले आणि वैद्यक व्यवसायाच्या लोकांना इतके श्रीमंत करून सोडले की, ते शोषणकर्ते होताना दिसत आहेत. आज जो तो एकमेकांना लुबाडायचा विचार करतो आहे. मास्क, सॅनिटायझर, औषधे हे उत्पादक प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत. औषधांच्या किमती वर्षभरात दुप्पट चौपट केल्या गेल्या. सध्या फंगस किंवा बुरशीजन्य औषधांचा तुटवडा असल्याचे सांगून त्याच्या किमती वाढवल्या जात आहेत. वितरकांकडे असलेल्या औषधांचा साठा परत घेऊन त्यावरील किमतीची लेबल बदलली जात आहे. हा सगळा काळाबाजार सरकारी प्रोत्साहनाने होत आहे. प्रत्येक जण बळी तो कानपिळी या न्यायाने वागतो आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. त्याचा परिणाम पोलीस सर्वसामान्यांवर राग काढत आहेत. काठीने बडवत आहेत. सरकारला जर माणसांना जगूच द्यायचे नाही, तर मरायला मोकळं सोडा. शेवटी आम्ही जबाबदार, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार असेच जर आहे, तर जनतेला त्यांच्या जबाबादारीवर कामासाठी, पोटापाण्यासाठी बाहेर पडू द्या ना. त्यांचे अर्थचक्र थांबवून काय साध्य होत आहे? वर्षभर घरात बसवून जर कोरोनानंतर फंगस, बुरशी येत असेल, तर हा लादलेला रोग नाही का?


सरकार जर इतके हुशार आहे, प्रामाणिक आहे, काळजीपूर्वक काम करत आहे, तर मग सरकारी यंत्रणेला, घराच्या बाहेर न पडणाºया मंत्र्यांना, एसी गाड्यांमधून हिंडणाºयांना कोरोना का होतो आहे? त्यातून ठराविक लोक बरे होत आहेत, तर ठराविक लोकच का जगत आहेत? हे नेमके काय आहे? आज फक्त वैद्यकीय चक्र चालू आहे. ते चालू राहुदेत; पण सर्वसामान्यांचे अर्थचक्र चालू व्हायला पाहिजे. त्यामुळे आता १ जूननंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवला, तर या राज्यात अराजक माजेल, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल, चोºया माºया वाढतील. माणसं माणसाला खायला उठतील. कारण हे निर्णय घेणाºयांची पोटं भरलेली आहेत. त्यांना कसली चिंता नाही, त्यामुळे त्यांना आदेश देणे सोपे आहे. रोजी थांबली, तरी रोटी थांबणार नाही हे भाषणात बोलायला सोपे आहे; पण किती जणांना घरात बसून रोटी मिळाली हे सांगता येणार आहे का? चार महिन्यांत चार लाख मोफत शिवभोजनच्या थाळ्या देऊन १२ कोटी जनतेची पोटं भरली, असे मुख्यमंत्र्यांना वाटते का? तेव्हा मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, सरकारने त्यांना भीती वाटत असेल, तर घरात थांबावे; पण जनतेचे जे अर्थचक्र, रोजगाराचे चक्र थांबवले आहे, ते सुरू करावे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\

24 may

रविवार, २३ मे, २०२१

उच्च डोस

 मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत जे निर्णय होत आहेत त्यामुळे राज्य सरकारला मिळालेला हा उच्च डोस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकार आपल्या वर्तणुकीत काही बदल करणार का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही? असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला गुरुवारी फटकारले आहे. इतर प्रकरणांत वकिलांची फौज उभी करणारे सरकार विद्यार्थ्यांसाठी कुणी ज्येष्ठ वकील का नाही येत? या प्रकरणाची गांभीर्यता ओळखा, अशा कडक शब्दांत हायकोर्टाने राज्य सरकारला इशारा दिला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. खरं तर दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने अतोनात नुकसान केले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळ केला आहे. त्याबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने हा डोस दिला हे बरेच झाले, पण राज्य सरकार कितपत गांभीर्याने या आदेशाचे पालन करते यावर या मुलांचे भवितव्य अवंबून आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाला आव्हान देत निवृत्त प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कमी करण्यासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देत दहावीच्या परीक्षा तात्काळ घेण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. ही एक योग्य मागणी होती. सरकारने कसलाही विचार न करता सरसकट सगळे विद्यार्थी प्रमोट करण्याचा निर्णय घोषित केला, पण हे सांगणे सोपे आहे, पण त्या परीक्षा न झालेल्या आणि प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे याबाबत काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. त्यासाठी हा न्यायालयीन डोस महत्त्वाचा होता.

राज्यातील कार्यरत असणाºया एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डसह विविध बोर्ड परीक्षांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे परीक्षांबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्येही गोंधळाची परिस्थिती आहे. राज्य सरकार यापूर्वी परीक्षा घेण्यावर ठाम होते, मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यातही फक्त दहावी बोर्डच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, पण आता हा निर्णय सरकार मागे घेते का, हे बघावे लागेल.


आणखी एका बाबतीत न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटले आहेत. राजकीय नेते आणि कलाकारांना उपलब्ध कशी होतात कोरोनाची औषधे? हा सवाल करून या यंत्रणेतील दोषावर न्यायालयाने बोट ठेवले आहे. कोरोना काळात गरजू व्यक्तींना सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांकडून औषधांचा पुरवठा करण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने या कोरोनाच्या औषधांच्या दर्जाची हमी कोण देणार? अशी विचारणा केली आहे. नागरिकांच्या जीवाची आम्हाला चिंता आहे. कोणतीही लोकप्रियता यामधून मिळवण्याचे कारण नाही. जर गरजूंना मदत मिळत नसेल तर हे फार वेदनादायक असून, ही परिस्थिती अत्यंत खेदनजक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यानिमित्ताने राज्य सरकारचे कान उपटण्याचे काम न्यायालयाने केल्यामुळे सामान्यांना हायसे वाटत आहे.

महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सेलिब्रेटी आणि राजकारण्यांकडून होणाºया कोरोना औषध वाटपासंबंधी माहिती सादर केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी. एस. कुलकर्णी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूदच्या सोनू सूद फाऊंडेशनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, अद्याप त्यांचे उत्तर आले नसल्याची माहिती राज्य सरकारने दिल्यानंतर उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर करत, तुम्ही आतापर्यंत त्यांचे जबाब नोंदवायला हवे होते. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. ही बाब निश्चितच वाईट म्हणावी लागेल. वकील राजेश इनामदार यांनी गेल्या सुनावणीवेळी जेव्हा रुग्णांना औषधे मिळत नाहीत, तेव्हा ते ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूड सेलिब्रेटी आणि राजकारण्यांकडे मदत मागतात, अशी माहिती दिली होती. यानंतर पुरवठा सुरळीत नसून तुटवडा असल्याची तक्रार राज्य करत असताना सेलिब्रेटी आणि राजकीय नेते रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅबसारखी औषधे कसे काय मिळवत आहेत आणि वाटप करत आहेत?, अशी विचारणा महाराष्ट्र सरकारसह केंद्राकडे न्यायालयाने केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाचा गुरुवारचा हा पॉवरफुल डोस सरकारला लागू होतो का हे येत्या काही दिवसांत पहावे लागेल, पण या डोसची गरज होती हे मात्र नक्की.


त्याचप्रमाणे, मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेने आमची घोर निराशा केली, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास मुंबई महानगरपालिका (बीएमसी) तयार आहे, मात्र केंद्र सरकारने त्यासाठी नियमावली जारी करण्याची गरज आहे, अशी भूमिका गुरुवारी मुंबई पालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात मांडण्यात आली. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी त्या प्रमाणात लसींचा साठा सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही, असेही पालिकेने उच्च न्यायालयाला सांगितले. मात्र हे यासाठीचं कारणच असू शकत नाही, कारण लसींचा साठा कमी आहे म्हणून लसीकरणच बंद आहे का?, ते साठ्यानुसार सुरूच आहे, तर मग त्याच प्रमाणात घरोघरी जाऊन काही व्यक्तींना लस द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. यादरम्यान न्यायालयाने ‘नेगवॅक’ला १ जूनपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश देत यासंदर्भातील सुनावणी २ जूनपर्यंत तहकूब केली, पण एकूणच व्यवस्थेला न्यायालयाने दिलेला हा उच्च डोस महत्त्वाचा आहे.

कोल्हटकरी नाटके


मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटकरांनी अतिशय सुंदर अशी नाटके मराठी रंगभूमीला दिली. त्यातील बहुसंख्य नाटके ही तुफान चालली आणि हजारो प्रयोग या नाटकांनी केले, पण बाळ कोल्हटकर म्हटले की सर्वांना प्रथम लक्षात येते हे त्यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे नाटक. त्यांच्या नाट्यसंस्थेचे नावही त्यांनी ‘दुर्वांची जुडी’ असेच ठेवले होते.


महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाट्यसृष्टीतला एक मानबिंदू. भाषेवर असलेले प्रभुत्व आणि भाषेचे सौंदर्य भाषेतील अलंकारांनी सजवणारे शब्दप्रभू नाटककार म्हणजे बाळ कोल्हटकर. बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले, पण लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. यातून त्यांनी समृद्ध नाटककार म्हणून ख्याती मिळवली. अनुभवाची जोड आणि निरीक्षणाची बाजू भक्कम असल्याने त्यांची लेखणी ही सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबीयांना आपली वाटली होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘जोहार’ हे आपले पहिले नाटक लिहिले. आपल्याकडे नाटकात काम करणारा, नाटकाचे वेड असलेला कलाकार म्हणजे टिंगलीचा विषय असतो. पन्नास वर्षांपूर्वी तो जास्तच होता. त्या काळात कसल्याही टीका, टिंगलीची परवा न करता ते कार्यरत राहिले. त्यामुळेच ज्यांना पूर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेक्षकांची नस नेमकी ओळखत असत. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील सुभाष हा आपल्या जवळच कुठेतरी आहे, आसपास वावरत आहे आणि त्याला आपण कुठेतरी पाहिले आहे, असे प्रेक्षकांना वाटण्याइतके जवळचे नाटक त्यांनी लिहिले होते. प्रेक्षकांच्या मनात आणि घरात घुसून नाटक जोडण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नाटकातील प्रसंग हे नाट्यमय असले, शाब्दिक कमाल करणारे असले, तरी ते आपल्या अवतीभोवती घडलेले असे वाटतात. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत, थोडेसे अतिभावनिक असोत, पण सामान्य प्रेक्षकांना अश्रू पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. ब‍ºयाच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती, तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्यं जपली होती.

त्यांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकांचे पंधराशे प्रयोग, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचे चौदाशे प्रयोग, ‘मुंबईची माणसे’ याचे जवळपास दोन हजारांच्या वर, तर ‘एखाद्याचे नशीब’ या नाटकाचे हजारावर प्रयोग झाले. यावरून नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.


‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाने कौटुंबिक नाटकाला एका उंचीवर नेऊन ठेवलेच, पण यातील वास्तव चित्रण उभे करणे यातही त्यांच्यातील दिग्दर्शक आणि निरीक्षण शक्ती अतिशय सुंदर होती. या नाटकाचे सेट किंवा नेपथ्य हे एक बोलके वातावरण तयार करणारे होते. दारात तुळशी वृंदावन, बाहेर टाकलेली खाट, आत येताना पाय धुवून येण्यासाठी केलेली छोटीशी मोरी, कुसवांच्या पलीकडून घराच्या दिशेने येणारी माणसं आणि छोटं फाटक उघडून आत येण्याची सोय हे जुन्या मराठी घरातील वातावरण उभे करणारे होते. दिवाळीतील वातावरण, तुळशी वृंदावनाजवळची पणती यातून अस्सल मराठीपण उभे राहात होते. हे करता करता सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडोचा संदेश देत वाहिलेली दुर्वांची जुडी प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घ्यायची.

‘सीमेवरून परत जा’ या नाटकातून बाळ कोल्हटकरांनी जग जिंकायला आलेल्या अलेक्झांडर आणि पौरस यांच्यातील संघर्ष शब्दांनी इतका सुंदर मांडला आहे की, यातील शब्द हे शस्त्र बनून जातात. पौरसाकडून अलेक्झांडरला घायाळ करण्यास, खच्चीकरण करण्यास कारणीभूत होतात. यातून त्यांनी देशप्रेम, संघटन यावर कटाक्षाने भर दिलेला दिसून येतो.


‘उघडले स्वर्गाचे द्वार’ या नाटकातून वसिष्ठ विश्वामित्र यांच्यातील संघर्ष मांडला आहे. आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे म्हणून चाललेली विश्वामित्राची धडपड आणि वसिष्ठ राजर्षी म्हणतात म्हणून त्या वसिष्ठाला संपवायला निघालेल्या विश्वामित्राचा चिडचिडेपणा या संघर्षातून तयार झालेले नाटक हे उत्तम कलाकृती म्हणून ओळखले जाते. कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक अशा सर्वप्रकारच्या नाटकांमधून लिलया आपल्या भाषेचा प्रवास करणारे नाटककार म्हणून बाळ कोल्टकरांचे स्थान हे फार मोठे आहे.

बाळ कोल्हटकर हे स्वत:ला राम गणेश गडकरींचे शिष्य मानायचे. अर्थात हे शिष्यत्व द्रोणाचार्य एकलव्यासारखेच होते. कारण दोघे प्रत्यक्षात कधी भेटले नव्हते, पण गडकरींची नाटके ही गडकरी पंचाक्षरी म्हणून ओळखली जातात तशी बाळ कोल्हटकरांची नाटके ही नवाक्षरी होती. यामध्ये ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘देणाराचे हात हजार’, ‘ सीमेवरून परत जा’, ‘ देव दिनाघरी धावला’, ‘दुरितांचे तिमिर जाओ’, ‘ वेगळं व्हायचंय मला’, ‘उघडले स्वर्गाचे द्वार’ या नाटकांचा समावेश होतो.


बाळ कोल्हटकरांच्या नाटकांतील गीतेही अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर अशीच आहेत. यातील ‘उठी उठी गोपाळा’, ‘ऋणानुबंधांच्या कुठून पडल्या गाठी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’ ही  गंधर्व, भालचंद्र पेंढारकर, माणिक वर्मा यांनी अजरामर केलेली नाट्यगीतं आहेत.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055

दादांचा संगीतकार


ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचे शनिवारी निधन झाले. मराठी, हिंदी, भोजपुरी अशा असंख्य चित्रपटांना संगीत देऊन राम-लक्ष्मण यांना देशभर ख्याती मिळाली असली, तरी ते आमच्या दादा कोंडकेंचे संगीतकार होते. त्या दादांचे संगीतकार गेले याचे वाईट वाटले, कारण दादा हे रत्न पारखी होते. आपल्या हिट गाण्यांसाठी असा संगीतकार तयार करण्याचे काम दादांनी केले होते. म्हणूनच राम-लक्ष्मण या नावाशी दादा कोंडकेंचे आणि मराठी माणसाचे नाते जोडलेले आहे. आज हे नाते लक्ष्मण यांच्या निधनाने दुरावले आहे. लक्ष्मण यांचे मूळ नाव विजय पाटील. जेव्हा विजय पाटील मुंबईत आले, तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची आॅफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात एजंट विनोदचे काम मिळाले; पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले; पण दादांच्या चित्रपटात राम-लक्ष्मण यांच्या संगीताचा ठसा अगदी स्पष्टपणे जाणवतो. तुमचं आमचं जमलं चित्रपटात झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार मध्ये जी बासरी वाजली आहे ती संगीतकार राम यांची होती, तर ठेका लक्ष्मण यांचा. इथूनच हे सूर जुळले आणि राम-लक्ष्मण हे नाव अजरामर झाले.

अशा या ठेकेबाज गाणी देणाºया संगीतकाराने वयाच्या ७९व्या वर्षी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते मुलाकडे नागपूरमध्येच राहत होते; पण त्यांचे मुंबई आणि बॉलीवूडशी नाते अतूट होते. लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलीवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच; पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही, तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही, तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही, तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.


दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार. तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी राम-लक्ष्मण यांनी दिली. माझ्या कुलपाची चावी हरवली, कोतवाल तुम्ही डायरीत केस न्हाइंलिवली हे गाणं ज्या पद्धतीने राम-लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केले आहे त्याला तोड नाही. दादा कोंडके म्हटल्यावर ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं हे गाणं समोर येतेच. हे अजरामर गीतही राम-लक्ष्मण यांनीच केलेले आहे. दादांच्या सुपरहिट गाण्यांमध्ये राम-लक्ष्मण यांच्या संगीताचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे दादांचा संगीतकार हीच त्यांची खरी ओळख आहे. तुमचं आमचं जमलं मधलं चंदनाच्या पाटावर हे गाणं आणि अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान या गाण्याशिवाय गेल्या ४५ वर्षांत महाराष्ट्रातली एकही हनुमान जयंती साजरी झालेली नाही.

हीच परिस्थिती राजश्री प्रॉडक्शनच्याही बाबतीत. राजश्रीचा सिनेमा म्हटला की, राम-लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही, तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि साँच को आँच नही, तराना, मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं या सिनेमांना त्यांनी संगीत दिले. राजश्रीचे चित्रपट हे नेहमीची संगीतप्रधान चित्रपट असतात. त्यामुळे प्रारंभीच्या काळात त्यांना हिरो-हिरॉईन कोण आहे हे गरजेचे नव्हते. ओठांवर रुळणारी सुंदर सुश्राव्य गाणी असली की, चित्रपट हिट होतो, हा राजश्रीचा फॉर्म्युला. त्यामुळेच हिंदीत सचिन, अरुण गोविल अशा कलाकारांना घेऊन सुपरहिट चित्रपट देण्याचे काम केले, कारण त्यांचे बलस्थान हे राम-लक्ष्मण होते. त्यामुळे बिगस्टार घेतले तेव्हाही त्यांनी या बलस्थानाचा पुरेपूर वापर करून घेतला. त्या जोरावर तर मैने प्यार किया, हम आपके हैं कौन अशा चित्रपटांची धुंदी गेले पंचवीस-तीस वर्षांत ओसरत नाही. ऐकणाºयाला नाचायला लावणारी, गुणगुणायला लावणारी ठेकेबाज गाणी देणे हे राम-लक्ष्मणचे वैशिष्ट्य होते. उषा मंगेशकर, महेंद्र कपूर यांचा जसा दादांच्या चित्रपटांसाठी योग्य वापर करून घेतला तसाच दणकेबाज वापर या संगीतकाराने लता मंगेशकर, एसपी बालसुब्रमण्यम यांचा करून घेतला. सदाबहार गीते देणारा हा संगीतकार आपल्यातून शनिवारी गेला आहे. बॉलीवूडची हानी झाली आहे; पण असा एक सभ्य आणि सुंदर संगीतकार आपल्या बॉलीवूडने गमावलेला आहे. १९८०, १९९०चे दशक ज्यांनी समृद्ध केले त्या संगीतकाराचे संगीत मात्र अजरामर राहील यात शंकाच नाही.

मान्याच्या वाडीत शीएमचा दौरा


‘तं मंडळी, आपल्या गावावर चक्रीवायदुळाचं लई मोटं संकट आलं हुतं. त्या चक्रीवादळानं गावाचं न्येमकं किती नुसकान झालं हाय याची पाहणी करायला राज्याचे शीएम येणार हायत. तवा आपल्या गावात समद्यास्नी वेवस्थीत माहिती सरकारपतुर दिली पायजे.’ सरपंचानं मान्याच्या वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली तसा गावात उत्साह संचारला.


गावात शीएम येणार, शीएम येणार, गावाची पाहणी करणार म्हणून आणि शीएमच्या दौºयानंतर गावाचा कायापालट हुनार. गावाच्या अडीअडचणी शीएम समजून घेणार म्हणून समदे खुश झाले.

चार दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात त्या तोकते चक्रीवादळानं धुमाकूळ घातला. राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झालं. त्यामुळे नुसकानीची पाहणी कराय शीएम चक्क मान्याच्या वाडीत येणार म्हणून परत्येकाच्या तोंडात आचर्यानं बोटंच गेली. मान्याच्या वाडीच्या रिवाजपरमानं सगळीकडं चर्चा सुरू झाली.


नदीच्या काठावर हौसाबाई, पारूबाई, कोंडाबाई कपडे धुता धुता बोलत हुत्या.

‘हुं... समाजलं का? शीएम येणार हायत म्हणं गावात..’ हौसाबाई नाक मुरडत म्हणाली तशी पारूबाईनं इचारलं, ‘पर म्या काय म्हंती? शीएम म्हनजे नक्की कुण येणार हाय? ते हितं यीउनशान कळणार काय हायत?’


तशी हासत कोंडाबाई म्हणाली, ‘आगं शीएम म्हंजी सरपंचाचा साहीब असल कुणीतरी. त्या कलेक्टरनं पाटीवलेला. असलं कसली तरी मोजनी करायची असल, कुणाची तरी जिमीन इकायची असल. नायतर दरवर्षी कसलं ना कसलं संकट येतय, वायदुळ येतय, पावसाचा छळवाद हुतुय पर आजपातुर कदी शीएम आलं नव्हतं. मागं ते शेज का काय आणायचं हुतं तवा गावातल्या जिमीनी हव्या म्हणून अशेच कोण लोक आलते. तशीच कायतरी भानगड असल.’ कोंडाबाईनं अक्कल पाजाळली तशी हौसाबाई म्हणाली, ‘आ बया... आपन न्हाई बाय आपली जमीन इकणार... त्या शीएमना काय हुतय? म्हणं लई मोटा प्रकल्प यील. पोरास्नी नोकºया मिळतील अशा बाता करायला सोपं हाय. पर परकल्प दहा-पंदरा वर्ष येत नाय अन् तवर काय खायाचं अन् काय पियाचं? आपण नाय जमीन द्यायची.’ ‘अगं पर या निसत्या हवेतल्या वावड्या हायत.. काण शीएम येतुय ते तर समजू दे.’ पारूबाईनं मिशेरी पुडं सरकवली अन् तिगी बी घासायला लागल्या.

तिकडं पारावर दत्तुनं तर सबाच भरवली हुती. ‘आपुन तर शीएमला सांगणार हाय... या लाकडाउननं मुंबैची समदी माणसं आमच्या गावात आली. आजपतुर गेली साट वर्स गावातलं घरटी येक माणूस मुंबईत कामाला हुतं. येकानं मुंबईला जाऊन नोकरी करायची अन् दुसºयानं गावाकडं शेती करायची. पर तुमी लॉकडाउन केला. मुबैंतलं समदं कामगार बेकार झालं अन् गावाकडं आलं. वायदुळाचं काय घिऊन बसलात? या लोकांच्या पोटापाण्याचा, मुंबई सुरू करण्याचा काय इचार करणार की न्हाई?’


समद्यांनी माना हालवल्या. तसा परबत्या पाटील म्हणाला, ‘आवं लई लोकांचं नुसकान झालंय. खालच्या आळीतल्या यादवांची आट दुकानं मुंबईत हुती. चार-चार कारागीर ठिऊन ठिकठिकाणी त्यांची सलून हुती. पर वर्सभरात समदी गावाकडं आली अन् फकस्त दुकानचं भाडं भरावं लागतंय. पर ती भायीरून आलेली बिहारी लोकांची दुकानं बिनबोभाट सुरू हायत. मराटी माणसाला भिकंला लावलं अन् बिहारींना जगवलं असं या सरकारचं काम हाय.’

जित्याला आता जोर आला. तो म्हणाला, ‘म्या त शीएमना सांगणार हाय... त्या तुमच्या लोकल अन् बस प्रवासावरची बंदी पयल्यापरथम उटवा. कारखाने चालू ठेवा बोलता, अत्यावश्यक उद्योग चालू ठेवा बोलता; पण मुंबईच्या कानाकोपºयातून येणाºया कामगारांना प्रवासाची काय सोय नाय. लोकलमधून जायला बंदी अन् बसमधून जायला सोय नाय. हे कसलं नियोजन हाय का काय? वायदुळाचं काय घिऊन बसलात, आव तुमच्या नियोजनानं पार राज्याचं मुंबईचं बारा वाजल्यात तिकडं अगुदर लक्ष द्या.’


आता या पारावरच्या गप्पा रंगल्या असताना नामा भाऊ म्हणाले, ‘आता काय बोलावं अन् काय बोलू न्हाय? लाकडाउन केलं. मुंबईतनं माणसं गावाकडं आली. नोकºया, कामधंदे, शाळा सोडून समदी हकडं आली. तेनं गावातला साथीचा रोग वाडला. घरघरात भांडनं वाडली. भाऊबंदकीचा उत आला. चक्रीवादळ यापेक्षा काय येगळं हायं. माणसांची कामाची चाकं थांबली, पैसापानी थांबला अन् ते चाक सुरू करण्याऐवजी आमचं शीएम चक्रीवादळानं हैरान झालं हायत का? येक चाक बंद केलं की दुसरं चाक सुरू होतय. तुमी लोकांचं कामाचं, पोटापान्याचं चाक बंद केलं. मानसांनी चिंतेत ºहावं म्हणून सगळं बंद केलं, पण निसर्गानं आपलं चाक फिरवलं. तवा आता जनतेच्या जिवाशी खेळण्यापलीकडं जाऊन आता रोजगार, कामधंदे कशे सुरू होतील इकडं लक्ष, द्या असं आपण शीएमना सांगायचं.’

ही समदी चर्चा चालली असताना, सरपंच चार माणसांबरोबर पाराच्या दिशेनं लगबगीनं आलं. सरपंच आल्याबरोबर कायतरी नवीन माहिती मिळणार म्हणून गावकरी पाराजवळ जमले. सरपंच बोलू लागले, ‘मान्याच्या वाडीच्या समस्त ग्रामस्थांना मला काई अत्यंत महत्त्वाचं सांगायचं हाय. आपल्या गावात शीएम येणार, असा निरोप मुंबईवरून आला हुता. त्यापरमानं आपण समदी तयारीबी केली. आपल्या गावाला लागलेल्या कोरोनाच्या वादळाची पाहणी करायला शीएम येणार म्हणून आपण जंगी तयारीभी केली. पर आताच फोन आला होता मुंबैवरून. शीएम काय येणार न्हाईत.’


‘पर का येणार न्हाईत?’ जित्यानं चवताळून इचारलं तसं सरपंच म्हणालं, ‘आवं शीएमचा दौरा कोकणातल्या शान्याच्या वाडीत होता; पण त्यांच्या पीएनं चुकून शान्याच्या वाडीचा मेशेज मान्याच्या वाडीत पोचवला अन् गोंदळ झाला. आता आपलं सरकार कसं तीन पक्षांचं हाय. शीएमनं कोकणात पायचं. दुसºया पक्षानं डेपुटी शीएमनं पच्चीम माराष्ट्रात पायचं अन् उरलेल्यांनी जमलं, तर विदर्बमराटवाड्यात पहायचं. असं त्यांचं ठरल्यालं असल्यानं आपल्या गावाकडं काई जालं तरी शीएम ना जमिनीवरून दौरा करणार ना हेलिकॉप्टरमदून जाऊन येकादं पॅकेज जाहीर करणार. तवा आपलं समदं प्रश्न आपल्यालाच सोडवायला हवंत. आता सर्वांनी आपल्या कामाला लागा. सामान्य माणूस, ग्रामीण भागातली जनता यांच्यासाठी शीएम नसतो का सरकार नसतो. म्हणून तर आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल.’

सर्वांनी शीएमच्या नावाचा जयघोष करत मान्याच्या वाडीत शीएमला जय महाराष्ट्र केला.


- प्रफुल्ल फडके/रविवारची कथा

9152448055\\

खतांच्या दरवाढीचे राजकारण

 सध्या देशात आणि राज्यात कोरोनाच्या बरोबरीने खतांचा प्रश्न चर्चेत आहे. ऐन मान्सूनच्या तोंडावर शेतीची कामे सुरू असताना खतांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शेतकरी हैराण झालेला आहे. यावरून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सरकारला पत्रही पाठवले आहे. त्याचप्रमाणे अभिनेते आणि आता नेते असेलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनीही आपल्या पक्षाचे नेते शरद पवारांनी पत्र लिहिले असतानाही वेगळे पत्र लिहिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केंद्र सरकारकडे याबाबत पत्र लिहून शेतकºयांना अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी केली आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती हा राज्यभरातल्या शेतकºयांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. असे असताना दुसरीकडे शेतकºयांना सवलतीच्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत असल्याचं भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विषयावर पडदा पडेल आणि सरकार शेतकरी विरोधी नाही हे दाखवले जाईल यात शंका नाही; पण खतांच्या दरवाढीचे राजकारण म्हणजे राजकारणाला नवे खतपाणी घालण्याचा प्रकार आहे.


शरद पवारांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना खतांची ही दरवाढ म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केंद्र सरकारला पत्र लिहून खतांवर सरकारनं अनुदान जाहीर करावं, अशी मागणी केली आहे. अजूनही काही नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. यात अर्थातच राजू शेट्टी आलेच. खरं तर गेल्या एका वर्षात कोरोना साथ आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशावेळी शेतकºयांना खत खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे. याबाबत सर्वांशी चर्चा करून केंद्रीय मंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असं चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे. एकूणच राज्यातून सर्वपक्षातून केंद्र सरकारवर दबाव येत आहे ही चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वीच शेतकºयांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीच्या २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला आणि त्यानंतर लगेच खतांची दरवाढ शेतकºयांच्या माथी मारली, अशा प्रतिक्रिया आणि नाराजी शेतकरी वर्गातून होत आहे, हे सरकारच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही.

भारतातील सर्वाधिक मोठ्या खत उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या इफ्को कंपनीच्या मार्केटिंग विभागाकडून ७ एप्रिलला एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. या पत्रकात कंपनीनं खतांचे नवे दर जाहीर केले होते आणि हे दर १ एप्रिलपासून लागू होतील, असं म्हटलं होतं. हे दर आधीच्या दरांच्या तुलनेत अधिक होते. त्यानंतर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी याविषयी स्पष्टीकरण देताना ८ एप्रिल रोजी म्हटलं, इफ्कोकडे ११.२६ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध आहेत आणि ते जुन्या दराप्रमाणे विकलं जाईल. नवीन दराची खतं ही विक्रीसाठी नाहीयेत. खरं तर खत उत्पादक कंपन्यांनी खताचे दर वाढवल्याचं जाहीर केल्यानंतर लगेचच केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी खत उत्पाकांसोबत बैठक केली. या बैठकीनंतर ९ एप्रिल रोजी मंडाविया यांनी जाहीर केलं की, भारत सरकारनं खत उत्पादकांसोबत एक उच्चस्तरीय बैठक केली आणि त्यानंतर खतांच्या किमती वाढवण्यात येणार नाही, असं ठरवण्यात आलं. असं असतानाही गेल्या चार दिवसांत असं काय झालं की, एकाएकी सगळे विषय बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते शेतकºयांच्या या प्रश्नावर बोलायला लागले, हे अनाकलनीय असेच आहे. अर्थात जुना स्टॉक सध्या जुन्या किमतीत विकला गेला, तरी नवीन आलेल्या उत्पादनाच्या किमती वाढलेल्या असतील. कारण भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानंही कंपन्यांनी आता ही दरवाढ केल्याचं मान्य केलं आहे. मंत्रालयानं १५ मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात खतासाठी लागणारा कच्चा माल आणि तसंच तयार खताच्याही किमती वाढल्या आहेत. असं असतानाही गेल्या महिन्यापर्यंत खत कंपन्यांनी भारतात किमती वाढवल्या नव्हत्या. आता मात्र काही कंपन्यांनी किमतीत वाढ केली आहे. हे जाहीर केल्यानंतरच शेतकºयांना समजून चुकले की, आता रासायनिक खतांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. त्यानंतर लगेच सर्वपक्षीय ओरड सुरू झाली; पण खरोखरच खतांच्या किमती वाढवणे आवश्यक होते का? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काय करणे अपेक्षित आहे यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग दुखावला गेला हे नक्की. आज जवळपास सगळ्याच खत उत्पादक कंपन्यांनी गोणीमागे ६०० ते ७०० रुपये वाढवले आहेत. खत तयार करण्यासाठी लागणाºया कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहे. तसंच फॉस्फेट आणि पोटॅशच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे मग खतांच्या दरात कंपन्यांनी वाढ केल्याचं सांगितलं जात आहे; पण सरकारने याबाबत ठोस पावले उचलत हा भार उचलला पाहिजे. शेतकºयांना माफक दरात ही खते कशी उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅश, फॉस्फेट आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा भार कमी करण्यासाठी भारत सरकार अनुदानित दर लावून शेतकºयांवरील आर्थिक बोजा कमी करून त्यांना सहाय्य देण्याच्या विचारात आहे; पण हा नुसता विचार करून नाही, तर केंद्र सरकारने कृती करून शेतकºयांचा प्रश्न सोडवावा. शेतकरी आणि शेती हा विषय राजकारण विरहीत हाताळला पाहिजे. म्हणूनच खतांच्या किमतीवरून राजकारण होत असेल, तर ते तातडीने थांबले पाहिजे.

कोण कोणास म्हणाले? माझा होशील ना


माझा होशील ना ही अनिकेत साने दिग्दर्शित झी मराठीवरील मालिका सध्या बºयाच गमती जमती करत आहे. खरं तर या मालिकेचा प्रकार फॅमिली-ड्रामा आहे. या मालिकेचे प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत; पण या मालिकेत पुरुषांच्या रुसव्या फुगव्यांचे जास्तच कौतुक केलेले दिसते. २०१३मध्ये पाच सासवांना सामोरी जाणारी होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी आणि माझा होशील ना मधील सई यात काही फरक नाही. दोघींनीही घर सांभाळण्याची भूमिका केली. फक्त तिकडे पाच सासवा होत्या इथे चार सासरे आहेत. हे चार सासरे म्हणजे चड्डी बनीयन गँग असल्याचाच भास होतो. कारण क्वचितच हे सासरे पूर्ण कपड्यात दिसतात; पण या मालिकेच्या शिर्षकाप्रमाणे माझा होशील ना हे नेमके कोण कोणासाठी म्हणत आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही.


या कार्यक्रमात सई एक स्मार्ट मुलगी दयाळू आदित्यच्या प्रेमात पडते. तिचे आदित्यशी लग्न होते; पण लग्नानंतर गोष्टी बदलतात‌. कारण सईला घरातील सदस्यांशी सामना करावा लागतो. हा सामना मुख्यत: दादा मामाशी आहे. होणार सून मी या घरची मध्ये जसे गोखले कुटुंबाला लग्न न टिकण्याचा शाप आहे, असे भासवले जात होते. प्रत्येकाच्या तोंडून श्री-जान्हवीचे तरी लग्न टिकावे, असे वाटत असते. कारण कुणाचा घटस्फोट तर कुणाचा नवरा सोडून गेलेला, कुणाचा मेलेला तर कुणाचे लग्नच झालेले नाही अशा भागिर्थीबाई गोखल्यांच्या साम्राज्यात नर्मदा, इंद्रायणी, कावेरी, शरयू, सरस्वती या नद्या कधी उथळपणे, तर कधी खोलवर वहात होत्या तशाच प्रकारे माझा होशील नामध्ये चड्डी बनीयन गँगचे चार आखाड सासरे आहेत. त्यात सर्वात धाक दाखवणारा आहे तो दादा मामा. मालिकेचा नायक असलेल्या आदित्य म्हणजे विराजस कुलकर्णीला आई-बापाविना असलेला मुलगा म्हणून या चार मामांनी वाढवला आहे. या चड्डी बनियन गँगमध्ये तो एकमेव समजूतदार आणि पूर्ण कपड्यातला नाजूक बाप्या आणि त्याच्या प्रेमात पडलेली कणखर अशी सई.

गेला आठवडा त्या बंधूमामाच्या म्हणजे सुनील तावडेच्या बायकोला गुलप्रितला घरात ठेवायचे की नाही यावर घालवला आहे. ब्रह्मे कुटुंबातील सर्वात मोठा ब्रह्मे म्हणजे दादा मामा अर्थात विद्याधर जोशी. बाकीचे सगळे बह्मसंबंध आहेत त्यात सुनील तावडे, विनय येडेकर आणि निखिल रत्नपारखी; पण यात दादागिरी चालते ती थोरल्या भावाची. या वातावरणात वाढलेला आदित्य. दादामामाची बायको घरफोडी करणारी आहे म्हणून तीला घरातून बाहेर काढली आहे. त्यामुळे कोणीही लग्न करायचे नाही आणि भावंडात फूट पडू द्यायची नाही, यासाठी चाललेला अट्टाहास हा मानसिक विकृतीचाच प्रकार वाटतो.


ज्योतिष आणि अंधश्रद्धांच्या आहारात गेलेल्या दादा मामाला बंधूमामाने केलेले आणि तब्बल १४ वर्ष लपवून ठेवलेले लग्न मान्य नाही. लग्न झाल्याचे तो १४ वर्ष लपवून ठेवतो आणि त्याच्या पंजाबी बायकोला अचानक घरात घेण्याचे काम सई करते. त्यावरून हा आठवडा काढला. लग्नाचे सर्टिफिकेट आहे; पण दादामामाला ते मान्य नाही. त्यामुळे बंधूमामाशी तो वाद घालतो आहे आणि त्याचे नाते तोडतो आहे. आपली मते अन्य भावांवर लादून बंधूमामा आणि त्याच्या बायकोला वाळीत टाकण्याचा प्रकार तो करतो आहे. यात सगळे भाऊ शिकले सवरलेले आहेत. बंधूमामा तर वकील आहे. त्यामुळे पुरुष असे वागू शकतील का, हा कथेचा भागच न पटणारा आहे. गौतमी देशपांडेने यातील सईची भूमिका चांगली केलेली आहे. दादामामाला ठणकावणारी आणि जाब विचारणारी तीच एकमेव आहे. बाकीचे सगळे शेपूट घालून गप्प बसतात असेच वातावरण दिसते. त्यामुळे मालिकेच्या मूळ शिर्षक माझा होशील ना, हे कोणासाठी आहे हे अनाकलनीय आहे. कारण प्रारंभी सई-आदित्यच्या प्रेमात सुयश पटवर्धनचा अडथळा असल्यामुळे माझा होशील ना असे सईला वाटत असावे; पण आता लग्न होऊन एक वर्ष झालेले आहे.

गुल आणि बंधुमामाचा काडीमोड व्हावा यासाठी दादामामाने केलेला अट्टाहास हा विकृतीच्या टोकाला जातो. दादाच्या प्रेमाखातर बायकोला घटस्फोट देणारा बंधुमामा हे न पटणारे कृत्य कसे काय करू शकतो?; पण या मालिकेची सगळी धडपड ही सर्वांना एकत्रित आणण्यासाठी सई खटाटोप करणार या विषयाशी बांधलेली आहे. सगळ्यांचे मतपरिवर्तन करून कौटुंबिक एकजूट ठेवण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे होणार सूनमधील जान्हवीची आणि सईची भूमिका एकच. फक्त चार सासरे आणि पाच सासवा इतकाच काय तो फरक. यात दीप्ती जोशीने गुलप्रीत कौर या पंजाबी व्यक्तिरेखेत चांगला अभिनय केल्याचे दिसून येते. ती मराठी आहे, असे वाटतच नाही.


लग्न म्हणजे मन जुळणं; पण मन नावाचा अवयव शरीरात नसतो, त्यामुळे आपला त्यावर विश्वासच नाही, असे दादामामा बोलतो. एकत्र राहून संसार करण्याची सवय नाही, प्रेम, लग्न निभावणं सोपं असतं, सगळी लग्न तुटत नाहीत, अशी वाक्य टाकून दादामामाला चिमटे घेण्याचे काम सई चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे चिडलेला दादामामा प्रेम करणं सोपयं; पण संसार करणं सोपं नाही, १४ वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न नाही, असे म्हणून हे लग्न नाकारतो; पण शेवटी सर्वांच्या साक्षीने बंधुमामा डिव्होर्सपेपरवर सही करतो आणि गुलप्रितला पण सही करायला सांगतो. त्यावर या कागदात आमचे लग्न मोडण्याची ताकद नाही; पण भावांपासून तोडायचे नाही म्हणून मी घटस्फोट देते असे सांगून सही करणारी गुलप्रित कुठे पहायला मिळेल का? त्यामुळे पुढचा आठवडा हा गुलप्रितला परत आणण्यात जाईल आणि माझा होशील का हे नक्की कोण कोणाला म्हणाले, असे विचारत बसावे लागेल.

प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा


9152448055\\

रंजना : मराठी चित्रपटसृष्टीतील परिपूर्ण अभिनेत्री


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा आलेख मांडला तर त्यात सुलोचना, जयश्री गडकर, आशा काळे, उमा भेंडेपासून अलका कुबलपर्यंत सात्विक, सोशिक, धार्मिक, सासूचा किंवा सुनेचा छळ सहन करणाºया, रडणाºया, देवाला आळवणी करणाºया, त्यानिमित्ताने अष्टविनायक, साडेतीन पिठे, दत्तस्थाने अशा यात्रा करून नवस फेडणाºया अभिनेत्रींचा एक ग्राफ दिसतो, तर दुसरीकडे बिनधास्तपणा, बोल्ड, लढाऊ अशा आक्रमक अभिनेत्रींमध्ये पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणेसारख्या अभिनेत्रींचा दुसरा ग्राफ दिसून येतो, पण या कसल्याही पठडीत न अडकता आपल्या कारकिर्दीचा उंचच उंच आलेख मांडणारी अभिनेत्री म्हणजे रंजना.


आपल्या अभिनयातून वैविध्य दाखवणे आणि प्रेक्षकांची पुरेपूर करमणूक करणे या विचाराने पछाडलेली दमदार अभिनेत्री म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सोनेरी कोडे होते. अस्सल गावरान मराठमोळ्या नऊवारीतही तितकीच ती चपखल दिसायची, तर बेलबॉटम आणि पाश्चिमात्य वेषभूषेतही ती तितकीच सुंदर दिसत होती. आपल्या समोर कोण हीरो आहे याची तिला कधी चिंता नव्हती की कसले टेन्शन. आपण आपली भूमिका चोख करायची आणि सहकलाकाराला आपल्याबरोबर अभिनयाच्या उंचीवर न्यायचे हे तिला चांगले जमत होते. अशावेळी समोर अशोक सराफसारखा कलाकार असला, तर अभिनयाची जुगलबंदी बघायलाच नको. ‘गोंधळात गोंधळ’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासूवरचढ जावई’ अशा अनेक चित्रपटांमधून दोघांची जुगलबंदी पहायला मिळाली आहे, पण विनोदीपणाचा शिक्का तिने आपल्यावर पडू दिला नाही, तर वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा तिने दाखवल्या.

‘हीच खरी दौलत’ या चित्रपटात श्रीराम लागू, नीळू फुले, यशवंत दत्त, अशोक सराफ, आशा काळे, रवींद्र महाजनी असे दिग्गज कलाकार समोर असताना त्यात तिने साकारलेली खलनायिका ही लक्षात राहणारी होती. इचलकरंजीतील कापड उद्योगातील राजकारणात तिने वर्चस्वासाठी केलेल्या उचापती आणि नवरा रवींद्र महाजनीला प्रेमाच्या मुठीत ठेवून सर्वांना जेरीस आणणारी खलनायिका तिने साकारली तेव्हा हीच ती लोकांना हसवणारी रंजना आहे का, असा प्रश्न पडतो.


सासुरवाशिणमध्ये सासुरवास करणाºया ललिता पवारला वठणीवर आणण्यासाठी आणि रडूबाई आशा काळेला आधार देण्यासाठी रंजनाची आक्रमकता भाव खाऊन जाते.

अनंत मानेंसारखे निर्माते-दिग्दर्शक तर तिच्यासाठी चित्रपट बनवू लागले होते. कोल्हापुरातील चित्रपटगृहावर तिकिटांचा काळाबाजार करणाºया महिलेच्या जीवनावर आधारित ‘सुशिला’ या चित्रपटात तर रंजनाचा अभिनय अफलातून आहे. शाळेत शिकवणारी कडक शिक्षिका ते दारू पिणारी, सिगारेट ओढणारी आणि गुढघ्यापर्यंत पँट घालून तिकिटांचा काळाबाजार करणारी रंजना हा तिचा प्रवास अभिनयाचे विविध पैलू दाखवणारा होता.


‘अरे संसार संसार’ हा चित्रपट म्हणजे तर मराठीतील मदर इंडियाच म्हणावा लागेल. नर्गिसने ज्याप्रमाणे ‘मदर इंडिया’त काम केले आहे तशीच सावकाराशी लढणारी आणि जमीनदारीच्या कर्जाच्या विळख्यातून आपला संसार सावरणारी एकाकी झुंज देणारी मराठमोळी शेतकरी महिला दाखवली आहे. सुपरहिट अशा या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.

‘भुजंग’ या चित्रपटात भस्म्या रोग झालेला आणि खा खा सुटलेल्या निळू फुलेची बायको ती झालेली आहे. एका शापित संसाराचा गाडा ओढताना एकापाठोपाठ संकटं तिच्यावर येतात तरी न डगमगता ती तोंड देते. यातील तिचा अभिनय नेहमीप्रमाणेच चांगला होता. तिशीही पूर्ण केलेली नसताना म्हातारीची भूमिका साकारण्याचे काम रंजनाने ‘भूजंग’, ‘अरे संसार संसार’ या चित्रपटात केले होते. ‘चानी’ चित्रपटात सोनेरी रंगाच्या खारुटीप्रमाणे असलेली चानी ही भूमिका रंजनाने साकारून लहान वयातच आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले होते.


समाजात दिसणारे असे जेवढे पेशे आहेत, जेवढ्या व्यक्तिरेखा आहेत त्या रंजनाने साकारल्या होत्या. ‘झुंज’, ‘सुशिला’ या चित्रपटांत शिक्षिका साकारली आहे. अनंत मानेंच्या ‘लक्ष्मी’, उमा भेंडेच्या ‘भालू’ चित्रपटात तिने वकिलाची भूमिका केलेली आहे. ‘देवघर’ या जगदीश खेबुडकर यांनी अवघ्या २८ दिवसांत पूर्ण केलेल्या चित्रपटात रंजना डॉक्टर आहे. ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासूवरचढ जावई’मध्ये गावरान गंगू साकारली आहे, तर अनेक चित्रपटांत नऊवारी साडीत येऊन खानदानी मराठी सौंदर्य तिने दाखवले आहे. ‘दुनिया करी सलाम’मध्ये अशोक सराफ, रवींद्र महाजनी, रमेश भाटकरबरोबर बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या भोंदुगिरीत साधूही ती झालेली आहे. जखमी वाघीणसारख्या चित्रपटात ती दरोडेखोरही आहे. त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तर आणि थरातील महिलांच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. सुधीर ससे यांच्या बहुरूपीमध्ये अबोल अशी विधवा दाखवली आहे. मुंबईचा फौजदार या चित्रपटात मुंबईच्या फौजदाराशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणारी आणि डिटेक्टीव कथांची आवड असलेली भोळसट महिलेची सुंदर भूमिका साकारली आहे.

रंजनाने राजा गोसावीबरोबर ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटात काम केले. अशोक सराफबरोबर ‘गोंधळात गोंधळ’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासूवरचढ जावई’, ‘सुळावरची पोळी’, ‘चव्हाटा’, ‘खिचडी’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. रवींद्र महाजनीबरोबरची तिची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडायची. ‘झुंज’, ‘हीच खरी दौलत’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावले’, ‘दुनिया करी सलाम’, ‘मुंबईचा फौजदार’ असे अनेक हिट चित्रपट तिचे रवींद्र महाजनीबरोबर आहेत. कुलदीप पवारबरोबर ‘अरे संसार संसार’, ‘गुपचूप गुपचूप’ हे चित्रपट तिने केले आहेत, ‘एक डाव भुताचा’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर बरोबर काम केले आहे. तर ‘सासुरवाशिण’मध्ये कृष्णकांत दळवी तिचा नायक आहे. त्यामुळे समोर कोण नायक आहे याचा विचार न करता अभिनय करणारी हरहुन्नरी आणि परिपूर्ण अभिनेत्री अशी तिची कारकीर्द होती.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055

सरसकट मदत

 संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीशी लढा देत असतानाच तौक्ते या चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला जोरदार धडक दिली. देशातील विविध यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यात व्यस्त असताना नव्याने कोसळलेले हे संकट दुष्काळात तेरावा महिना यासारखेच ठरले. या चक्रीवादळाचा जोर दोन दिवस कायम होता. त्यादरम्यान १८० ते १९० किलोमीटर प्रती तास वेगाने आलेल्या तौक्तेने महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये हाहाकार माजवला. महाराष्ट्रातही त्याने आपले रौद्र रूप दाखविले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ गेल्या २३ वर्षांत धडक देणारे सर्वात शक्तिशाली होते. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात प्रचंड थैमान घातल्यानंतर ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे किनारपट्टीवरील शहरांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस झाला. वाºयाची गती इतकी प्रचंड होती की, तीन प्रवासी जहाज खवळलेल्या समुद्रात अडकले. या तिन्ही जहाजांमध्ये एकूण ७०७ कर्मचारी होते. त्यातील ३१४ जणांना नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी शर्थीने बाहेर काढण्यात यश मिळविले. या राष्ट्रीय आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी ज्या भागात मोठे नुकसान झाले, त्या भागाचा हवाई दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. गुजरातसाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून त्यांनी चक्रीवादळग्रस्तांच्या जखमेवर योग्यवेळी फुंकर घालण्याचे काम केले आहे, मात्र त्याचवेळी महाराष्ट्र, कोकणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. हे नक्की काय आहे? गुजरातला न मागता पॅकेज घोषित केले गेले का? गुजरातने पॅकेजची मागणी केली होती का? तसे असेल तर महाराष्ट्र सरकारने तशी मागणी केंद्राकडे तातडीने का केली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. साधारणपणे अशा परिस्थितीत पॅकेजची मागणी करायची असते ती आपल्याकडून राहिली असेल कदाचित, पण मोदींचे विमान महाराष्ट्रावरूनच गुजरातला गेले तेव्हा त्यांना महाराष्ट्रातल्या नुकसानीची कल्पना आहे. न मागता महाराष्ट्राला गुजरातबरोबर पॅकेज जाहीर केले असते, तर हा दुजाभावाचा आरोप आज त्यांच्यावर झाला नसता हेही तितकेच खरे.


खरं तर या वादळाचा फटका गुजरातबरोबरच महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू या राज्यांना बसला आहे. त्यांनाही मदतीची गरज होती. त्यामुळे कसलाही भेदभाव न करता मोदींनी या सर्व राज्यांना मदत जाहीर करणे आवश्यक आहे. खरं तर या चक्रीवादळाचे अनुमान हवामान खात्याने पूर्वीच काढलेले होते. त्याची तीव्रतादेखील स्पष्ट करण्यात आली होती. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती होणार हे स्पष्ट होते. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्गला चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार, हे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने किनारपट्टीच्या ३८ गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला होता. दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला जाणवू शकतो, हा हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरला. ताशी १८५ किलोमीटर वेगाने आलेले हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले आणि त्याने कोट्यवधी एकरवरील पिकांची नासाडी करून टाकली. राज्यातल्या प्रशासनाच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्रात नुकसान कमी झाले आहे. नागरिकांचे स्थलांतर करणे, सुरक्षा व्यवस्था पाहणे, यामुळे जीवितहानी टळली असली, तरी अपरिमित अशी वित्तहानी झालेली आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे या लोकांना मदत करणे ही नैतिक जबाबदारी असताना फक्त एका राज्याला पॅकेज जाहीर करणे हा या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकारच नव्हे का? या चक्रीवादळाला ‘तौक्ते’ हे नाव म्यानमारकडून देण्यात आले होते, याचा स्थानिक भाषेतील अर्थ गोंधळ घालणारी पाल असा होतो. असे यंदाच्या वर्षात भारताला धडक देणारे हे पहिलेच चक्रीवादळ ठरले आहे. गोवा, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या किनारपट्ट्यांवर थैमान घालून तौक्ते गुजरातच्या दिशेने निघून गेले. राज्यात या चक्रीवादळामुळे हाहाकार माजला. मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे प्रचंड नुकसान झाले. रायगड जिल्ह्यात तीन, जळगावात दोन आणि मुंबईत एकाचा मृत्यू झाला. या चक्रीवादळामुळे रायगडच्या किनारपट्टी भागात अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात किनारपट्टीच्या भागांत प्रचंड नुकसान झाले. झाडे पडणे आणि विजा कोसळणे यांसारख्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्याही बरीच मोठी आहे. १६ हजार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ४० हजारांवर झाडे आणि एक हजारावर विजेचे खांब उन्मळून पडले. दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याने अनुचित घटना टळल्या. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथके मदत आणि बचावकार्यासाठी आधीच तैनात केली गेली होती. तरीपण राज्याला आज मदतीची तातडीने गरज असताना सरसकट सर्व राज्यांना मदत जाहीर करण्याचे काम पंतप्रधानांनी करायला हवे होते.

रायगडमध्ये हवामान खात्याने अतिसतर्कतेचा इशारा दिला होता. या जिल्ह्यातील स्थिती सिंधुदुर्गपेक्षाही भयानक झाली होती. चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत असताना, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही त्याचा परिणाम जाणवला. त्याच्या प्रभावाने समुद्रात उंच लाटा उसळल्या होत्या. प्रचंड वेग असलेल्या वाºयामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात २,०६० घरांचे अंशत:, तर १२ घरांचे संपूर्ण नुकसान झाले. ७८२ विजेचे खांब अंशत: आणि ९८ पूर्णत: पडले आहेत. ३०५ विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले. तीन दिवस काही भागांत विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत मदतीची घोषणा करून जनतेच्या मनात स्थान मिळवण्याची संधी पंतप्रधानांनी गमावली असे वाटते.