बुधवार, २ डिसेंबर, २०२०

नैराश्यावर मात करता आली पाहिजे


सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. जे आमटे कुटुंब अत्यंत निस्पृहपणे गेली अनेक दशके या देशात समाजसेवा करत आहे, अशा कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला आत्महत्या करावी लागणे हे निश्चितच क्लेशदायक असे आहे. कुष्टरोग्यांकडे कोणी ढुंकूनही बघत नाही, त्यांना वाळीत टाकले जाते अशांना जगण्याचा आनंद देणाºया या आनंदवनात हा दु:खाचा क्षण आलाच कसा? त्यामुळे प्रश्न पडतो की, आजकाल लोक आत्महत्येचा मार्ग का अवलंबताना दिसत आहेत? गेल्या काही वर्षांत मान्यवर म्हणवल्या जाणाºया आणि सर्वसामान्यांना आधार असणारे अनेक लोक आत्महत्येला कवटाळताना दिसत आहेत. हे सगळे का घडते आहे?


दोन वर्षांपूर्वी राष्टÑसंत किंवा राजकीय गुरू म्हणून ख्याती असलेल्या आणि प्रसन्न चेहºयाच्या भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली होती. ती आत्महत्या म्हणजे राजकीय, सामाजिक क्षेत्राला फार मोठा धक्का होता. अत्यंत शांत, संयमी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व अशी ख्याती असलेल्या एका अध्यात्मिक गुरूने केलेली आत्महत्या हा आध्यात्मिक क्षेत्राला बसलेला फार मोठा हादराच म्हणावा लागेल. इतक्या मोठ्या माणसांना आत्महत्येची बुद्धी कशी काय होते? डॉ. शीतल आमटे, भय्यूजी महाराज हे पराकोटीला गेलेले लोक होते. त्यांच्याकडून असे कृत्य कसे काय घडू शकते?

माणूस अध्यात्माकडे का झुकतो? त्याची काय अपेक्षा असते? प्रत्येकाला सुख, शांती आणि समाधान हवे असते. एवढेच मागण्यासाठी सामान्य माणूस देव, गुरू, बाबा, महाराज यांच्याकडे जात असतो. आपल्या चित्तवृत्ती स्थिर करून मानसिक समाधान लाभावे आणि तणावमुक्त जीवन जगता यावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते, पण आमटे कुटुंब तर वाईटातून आनंद लुटत होते. समाजाने टाकलेल्या वेशीबाहेर काढलेल्या लोकांच्या सेवेत आनंद मानत होते. माणसातील देव शोधत होते. मग ज्यांनी मरावे असे समाजाला वाटत होते, अशा कुष्टरोग्यांना जगण्याचा अधिकार देणारी माणसे आपल्याच कुटुंबातील धडधाकट, हुशार आणि अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती आत्महत्या करेल असा विचारच करू शकत नाही, पण ती झाली हे फार वेदनादायक आहे.


खरं तर कसल्या तरी तणावातून, अपेक्षाभंगातून माणसाच्या मनात नैराश्य उत्पन्न होते. या नैराश्यातून आत्महत्येचे विचार डोकावतात. हे नैराश्य दूर करण्याचे काम गुरू, महाराज करत असतात. अशा परिस्थितीत भय्यूजी महाराजांसारख्या पोहोचलेल्या संतात्म्याने आत्महत्या करावी हे फार मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. सर्वांना तणावमुक्त करण्याची ज्या व्यक्तिमत्त्वात ताकद होती, ज्यांच्या प्रसन्न आणि हसºया चेहºयाने समोरचा मनुष्य संतापलेला असेल, तरी शांत होईल इतकी ताकद होती. तीच व्यक्ती अशी टोकाची भूमिका घेते हे अत्यंत वाईट म्हणावे लागेल. सध्याचे जग हे प्रत्येकाला तणावात ठेवणारे जग आहे. भय्यूजी महाराज, शीतल आमटे, काही पोलीस अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी, असे नामांकित लोक जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा वाईट वाटते.

खरं तर आज प्रत्येकजण कसल्या तरी तणावाखालीच जगतो आहे. सकाळी उठल्यापासून या तणावाचे ओझे घेऊन प्रत्येक जण जगतो आहे. कामावर वेळेवर पोहोचू की नाही? लोकल वेळेवर येईल की नाही? लोकलचा काही घोटाळा होऊन लेटमार्क तर लागणार नाही ना? इथपासून ते पगार वेळेवर होईल की नाही? मिळणाºया पगारात सगळे खर्च भागतील की नाही? कामाचे दिलेले टार्गेट पूर्ण होईल की नाही? पदोन्नती होईल की नाही? कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातील की नाही? मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, त्यांचे करिअर, घराचे बांधकाम, आई-वडिलांची काळजी, या सगळ्या वातावरणात आपण सगळयांना वेळ देऊ शकू की नाही? असे असंख्य टेन्शन माणसे आपल्या मनावर घेऊन जगत असतात. व्यापारी, उद्योजक आपला धंदा व्यवस्थित चालेल की नाही? मार्केटमध्ये स्पर्धकांकडून कोंडी होणार नाही ना? अशा तणावात जगत असतात. शेतकºयांना कायमचीच चिंता असते. पाऊस वेळेवर पडेल का? पीकपाणी चांगले होईल का? भरपूर पीक आले तर भाव पडेल का? कमी आले तर भाव चढेल का? दोन पैसे हातात लागतील का? बँकांचे, सोसायटीचे, सावकाराचे कर्ज फिटेल का? सातबारा कोरा होईल का? सरकारी मदत जाहीर झाली तरी ती आपल्याला मिळेल का? अशा असंख्य चिंता प्रत्येकाच्या मनात तणाव निर्माण करत असतात. या तणावातून मनात नकारात्मक भावना निर्माण होऊन नैराश्य उत्पन्न होते. या नैराश्यातूनच आत्महत्येचे विचार डोकावत असतात.


माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, पण नैराश्यात जातो तेव्हा तो एकटा पडतो. प्रत्येक जण आपापल्या नादात आहेत, कामात गुंतले आहेत, आपल्याकडे बघायलाही कोणाला वेळ नाही, आपण असलो काय नसलो काय कोणाला काही फरक पडत नाही, असे विचार मनात घोंगावू लागतात. त्यातूनच आत्महत्येचे प्रकार घडतात. त्यामुळे घरात एकटेपणाने वावरणाºया माणसांची प्रत्येकाने विचारपूस केली पाहिजे. घरातल्या माणसांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे. एका घरात राहूनही जर स्टेशनवर बसल्याप्रमाणे किंवा प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशाप्रमाणे संवादहीन होत असू, तर त्यातून असेच प्रकार घडत राहणार. माणसाला व्यक्त होता आले पाहिजे. ते व्यक्त होता आले नाही तर माणूस एकाकी पडतो. कुढत बसतो. खूप उच्च पदाला पोहोचलेल्या व्यक्ती या बºयाच वेळा समाजाच्या फाजील अपेक्षांमुळे किंवा पदप्रतिष्ठेसाठी व्यक्त होऊ शकत नाहीत आणि आपल्या भावनांचा कोंडमारा करतात. त्यातून तणाव नैराश्य उत्पन्न होत असते.

माणसाला मन आहे. मन आहे म्हणून तो मानव आहे. मनाला भावना आहेत. त्या भावनांना साठवून न ठेवता त्या योग्य मार्गाने मोकळ्या होणे आवश्यक असते. त्यासाठी त्याला मनापासून खळखळून हसता आले पाहिजे. रडता आले पाहिजे. अध्यात्मात आपल्या भावनांवर विजय मिळवत त्यांना वाट मोकळी करून देण्याचेच शिकवले जाते. भावनेच्या आहारी जायचे नाही, तर भावनांना वाट करून मन भावनाविरहीत करायचे. प्रेमाची भावना निर्माण झाली, तर तुम्ही परमेश्वरावर करा, माणसांवर करा, प्राणिमात्रांवर करा. त्यामुळे मिळणारी प्रतिक्रिया ही तुमचा आनंद द्विगुणीत करते. आनंदातून समाधान प्राप्त होते. हीच ती शृंखला असते. या शृंखलेतून माणसाला जगायचे असते. आपल्याकडे सुभाषितात सांगितले आहे की, आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला। यया बद्धा:प्रधावन्ति मुक्तास्तिष्टन्ति पंगुवत॥ ही जी आशा नावाची बेडी आहे ती आपल्याला गुंतवून ठेवते. त्या बेडीतून मुक्त होणे हे सोपे नसते. त्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड द्यावी लागते. अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, तर कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही ते अध्यात्म. त्यासाठी श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥ या नवविधा भक्तीचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. त्यातून आपल्याला मानसिक समाधान मिळते आणि नैराश्य दूर होते.


ताणतणाव मुक्तीसाठी आत्महत्या हा उपाय नव्हे, तर आत्म्याला, मनाला शांती देणारा असा भक्तीमार्ग निवडणे. ती भक्ती देवाचीच असली पाहिजे असे नाही, तर आपल्या कर्माशी कामाशी असली तरी आपोआप तणाव दूर होतो. तणाव हा संचितामुळे होतो. साचल्यामुळे होतो. नालेसफाई जर वेळीच झाली तर मुंबई तुंबणार नाही. तसेच प्रत्येकाची कामे वेळेवर झाली, तर मनातला गाळ साचणार नाही. हा मनातला गाळ दूर करण्यासाठी कर्म करणे आणि ते कर्म करण्यासाठी भक्तीमार्ग अवलंबणे याला अध्यात्म म्हणतात. यासाठी गुरू लागतो, पण त्या गुरूलाही जर आपण तणावात ठेवत असू, तर त्यांचाही भार हलका करण्याचे काम प्रत्येक समर्थकाने, शिष्याने केले पाहिजे. समाजसेवक म्हणून काम करणाºया लोकांनाही थोडा वेळ त्यांच्यासाठी घालवता आला पाहिजे. आनंदवनात राहताना, कुष्टरोगी, उपेक्षितांबरोबर राहताना आपणही जीवनाचा आनंद घेतला पाहिजे हे लक्षात घेणे जरुरीचे होते. आत्महत्या हा टोकाचा निर्णय इतक्या मोठ्या लोकांनी घेतला, तर सामान्यांनी करायचे तरी काय?


1 टिप्पणी:

Trupti म्हणाले...

खुप छान विश्लेषण केलंय