मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

लग्न टिकवण्याचा संस्कार


मागच्या आठवड्यात तुळशीचे लग्न झाले आणि त्यानंतर माणसांच्या लग्नाचा सिझन सुरू झाला. यावर्षी लग्न समारंभावर कोरोनामुळे मर्यादा असल्या, तरी लग्न होत आहेत. कमी माणसात ती होत आहेत. पण सहा महिन्यांपूर्वी जेव्हा लॉकडाऊनमुळे पुरुष मंडळी घरात होती, तेव्हा सर्वाधिक भांडणे पती-पत्नींची झाल्याचे लक्षात आले होते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच एक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती, त्यात घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते. म्हणूनच लग्न लावणे सोपे आहे, पण ते टिकवण्याचे संस्कार करण्याची गरज आहे. लग्न लावले, मोडले, घटस्फोट झाला पुन्हा लग्न केले. हा प्रकार म्हणजे राजकीय पक्षांसारखा झाला. इच्छेविरोधात किंवा स्वेच्छेने कोणाशीतरी युती करायची, आघाडी करायची, थोडे दिवस रहायचे आणि पुन्हा वेगळे व्हायचे. लग्न हा वेगळा प्रकार आहे म्हणूनच तो टिकवण्याचा संस्कार करण्याची, प्रबोधन करण्याची वेळ आलेली आहे. छोट्या आणि फालतू कारणांनी लग्न मोडल्याची उदाहरणे समाजात दिसून येत आहेत. हे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत हे विशेष.


खरं तर सर्वात पुरोगामी राज्य कोणते? तर महाराष्ट्राचे नेते लगेच अभिमानाने छाती पुढे काढतात, पण पुरोगामी म्हणजे नेमके काय? केवळ दोन-चार लोक महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे आहेत, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पुरोगामी झाला म्हणायचे काय? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, शाम मानव, अशी काही मंडळी महाराष्ट्रात होती आणि त्यांनी वेगळे विचार मांडले म्हणून महाराष्ट्र पुरोगामी म्हणायचा का? इतके पुरोगामी लोक महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, तरीही पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक प्रश्‍नांना तोटा नाही. स्त्रीभ्रूणहत्या, सामाजिक बहिष्कार, स्त्रियांवरील वाढते अत्याचार आदी प्रश्‍नांमध्ये आता वाढत्या घटस्फोटांची भर पडली आहे. याबाबत प्रसिद्ध झालेली आकडेवारी ही अत्यंत धक्कादायक अशी आहे. म्हणजे शिक्षण आणि सुशिक्षितता आली, म्हणजे घटस्फोटाचे लायसन्स मिळाले काय? वयाच्या तिशीतील तरुणांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक गोष्टींवरून मोडीत निघणारे संसार व वाढत्या कौटुंबिक अस्थिरतेचे कोणालाच गांभीर्य नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील कौटुंबिक न्यायालयाच्या एका समुपदेशकाने न्यायालयातील गेल्या १५ वर्षांतील खटल्यांचा अभ्यास केला. त्यानुसार २५ ते ३५ वयोगटातील विवाहितांचे सर्वाधिक घटस्फोट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुटुंब व्यवस्था मोडीस निघणे ही काही चांगली बाब नाही. हा पुरोगामीपणाही नाही. आज शहरी भागात घटस्फोटाचा वेग जास्त आहे. आधुनिकतेचा आग्रह धरणाºया तरुण पिढीतील वाढते घटस्फोट हा सामाजिक चिंतेचा विषय व्हायला हवा. शेती व्यवसायातील जोडप्यांच्या घटस्फोटाचे प्रमाण अवघे २ टक्केच आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. लोकांना वाटते की घटस्फोट फक्त दोघांचा झाला. त्यामुळे नवरा-बायको यांचेच आयुष्य उध्वस्त झाले. पण घटस्फोटामुळे दोन जीव नाही, तर दोन कुटुंबे उध्वस्त होत असतात. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही भविष्याचा प्रश्‍न निर्माण होत असतो. लग्न ही तडजोड असते. सगळंच आपल्या मनासारखे झाले पाहिजे, असा अट्टाहास करून चालत नाही. एवढी समज शिकल्या सवरलेल्या माणसांमध्ये नसते ही दुर्दैवाची बाब आहे.


म्हणजे शिक्षण वाढले, पण शहाणपण पुरेसे वाढले नाही, असाच प्रकार होताना दिसतो. अधिक शिक्षित म्हणजे अधिक अहंकार, असे चित्र दिसू लागले आहे. परिणामी क्षुल्लक कारणांवरून पती-पत्नीत मतभेद वाढले. खटके उडू लागले. प्रेमाऐवजी वैरभावना वाढू लागली, म्हणून घटस्फोटही वाढले. सहमतीने काडीमोड घेणारेही कमी नाहीत. आजकाल प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अधिक मिळवण्याचा हव्यास वाढला आहे. विभक्त कुटुंबे वाढली. पती-पत्नी दोघेही अधिक मिळवण्याच्या आशेने नोकरी व कामधंदा करू लागले. त्यातून कौटुंबिक जीवनात नवे ताणतणाव निर्माण झाले. परस्परांत गैरसमज वाढू लादले. वाढत्या घटस्फोटांनी कौटुंबिक जीवन अस्थिर बनत आहे. कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत, मात्र सर्वत्र आर्थिक प्रगतीला वेग आल्यामुळे कुटुंब व्यवस्थेला बसणाºया हादºयाकडे कुणाचेच लक्ष नाही.

भारतीय संस्कृतीचा उदोउदो करणारे अखंड भारताची स्वप्ने पाहत आहेत. अफगाणिस्तानापासून पाकिस्तान, नेपाळ, ब्रह्मदेश आणि श्रीलंकेसह भारताचा विस्तार करण्याची स्वप्ने दाखवणारे पायाखाली काय जळते आहे, याकडे मात्र सर्वस्वी दुर्लक्ष करत आहेत. अखंड भारताचा गजर करण्यासाठी लाखोंचे मेळावे भरवणाºयांनी समाज स्वास्थ्याच्या विचाराला प्राधान्य दिले नाही, तर कुटुंबसंस्थेचा कडेलोट कदाचित देशाला पाहावा लागेल. कुटुंब टिकले, तर समाज टिकेल. समाज टिकला तर राष्ट्र टिकेल. समाज धुरिणांनी वेळीच वाढत्या विवाहच्छेदांना आळा घालण्याचा विचार गांभीर्याने करावयास हवा. हा धोका टाळण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणाºया सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे.


भारतीय उच्च संस्कृती ही सहजीवनाची आहे. वसुधैव कुटुंबकम पद्धती म्हणता म्हणता आपल्याला आपलेच कुटुंब, लग्न टिकवता येत नसेल, तर कसला अभिमान आपण सांगणार आहोत? कुटुंब, घर, लग्न टिकवता येत नसेल, तर शिक्षणाला तरी अर्थ काय आहे? त्यामुळे वाढते अत्याचार, वाढती व्यसनाधिनता या रोगांना बळी पडण्याचा प्रकार होत आहे. यावर कुठेतरी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन तोडगा काढला पाहिजे. लग्न टिकवण्याचे संस्कार करणारी संस्था निर्माण होण्याची आज गरज आहे.

तुळशीच्या लग्नाप्रमाणे दरवर्षी लग्न करण्याचा प्रकार माणसांवर येऊ नये. कुंडली, जन्मपत्रिका दाखवून चांगल्या जमलेल्या पत्रिका असताना घटस्फोट होतात. ते का होतात, तर इगोमुळे होत असतात. आपल्याकडे मंगलअष्टकात लग्न टिकवण्यासाठी उपदेश केला जातो. भार्येने पतीच्या सुखास जपणे कर्तव्य आहे तिचे, तैसची पतीने तिला सहचरी समजोनी वागायचे, क्रोधा काबूमध्ये सदैव असूद्या होवो सदा मंगलम.... असा संदेश असतो. दोघांनी परस्परांचा आदर केला तर सहजीवन टिकेल, लग्न टिकेल. हे घटस्फोटांचे प्रमाण कमी झाले, तर व्यसनाधिनतेलाही लगाम लागेल, हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी लग्न टिकवण्यासाठी लग्न होण्यापूर्वीच समुपदेशन केले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: