मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

सतर्कतेची गरज


जगभरात पुन्हा कोरोनाच्या नव्या अवताराचा उद्रेक होऊ नये म्हणून ५ जानेवारीपर्यंत राज्यातील महापालिका क्षेत्रात राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी जाहीर केलेली आहे. तसेच केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणाºया विमानांना ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही गोष्ट आवश्यक होतीच. याचे कारण ब्रिटन आणि इटलीत कोरोना विषाणूचा नवीन अवतार उद्‌भवला आहे. हा विषाणू म्हणे मूळ कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्‍के अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे संपूर्ण युरोपात पुन्हा घबराट उडाली आहे. ऐन ख्रिसमस काळात ब्रिटन आणि इटलीत पुन्हा लॉकडाऊनसदृश स्थिती उद्‌भवली आहे. युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणाºया विमानांना बंदी घालायला सुरुवात केली आहे. नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी या देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भारतातही ही बंदी घातली गेली हे योग्य झाले. परदेशातून येणारे लोक मुख्यत: मुंबईत येत असतात. इथल्या इंटरनॅशल एअरपोर्टवर येतात. म्हणून महाराष्ट्रातही ही बंदी आवश्यक होती, पण एक लक्षात आले की नवीन वर्ष आले तरी कोरोना काही माणसांचा पिच्छा सोडायला तयार नाही.

आज ब्रिटनमधील स्थिती कमालीची धोकादायक बनली आहे. आता ती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे, अशी जाहीर कबुली तिथल्या पंतप्रधानांनीच दिली आहे. त्यामुळे एकतृतीयांश ब्रिटन लॉकडाऊनखाली आणण्यात आला आहे. हा नवीन विषाणू कोरोना विषाणूचीच पुढील आवृत्ती आहे. जशी परिस्थिती बदलते तसे हे विषाणूसुद्धा आपली रचना बदलतात आणि ते स्वत:ला अधिक प्रसारयोग्य बनवतात. तसाच प्रकार ब्रिटनमध्ये आढळून येत असून, कोरोनाच्या या नव्या स्वरूपातील विषाणूंनी ब्रिटनवासीयांना बºयापैकी घेरले आहे. त्यामुळे युरोपातील देशांनी पटापट ब्रिटिश नागरिकांना आणि त्या देशांतून येणाºया विमानांना बंदी घालायला सुरुवात केली आहे. या नवीन परिस्थितीची भारत सरकारलाही जाणीव असल्याने आपल्याकडेही ती बंदी घालण्यात आली.


खरं तर यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबईत परदेशातून आलेल्या लोकांना मुंबई ते पुणे कॅब प्रवासात त्याची लागण झाली आणि पुण्यात पहिले तीन रुग्ण आढळले. त्यापूर्वी केरळला एक आढळला होता. तिथून झालेली सुरुवात पाहता दोन दिवसांपूर्वी आपण १ कोटींचा टप्पा गाठला. भारताची लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच कमी आहे. किंबहुना मृतांचा आकडाही आपल्याकडे दरवर्षी सर्वसामान्यपणे होणाºया मृत्यूच्या प्रमाणेच आहे. आज जेमतेम ३ लाख लोक उपचार घेत आहेत. बरे होणाºयांचे प्रमाणही अधिक आहे. हे सगळे खरे असले, तरी १ चे एक कोटी व्हायला ९ महिने लागले, पण नव्या विषाणूचे प्रमाण जर ७० टक्के अधिक असेल, तर त्याचे दुष्परिणाम जास्त जाणवतील. म्हणूनच ही खबरदारी आवश्यक होती.

याआधी कोरोनाची साथ शेजारच्याच चीनमध्ये निर्माण झाली असतानाही विदेशातून येणाºया विमानांना प्रतिबंध घालण्यात बेफिकिरी दाखवली गेली होती. विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना नीट तपासण्याची तसदीदेखील भारतीय विमानतळांवर घेतली गेली नव्हती, ही बाब एव्हाना जगजाहीर झाली आहे. त्यामुळे आपल्या देशात कोरोना पसरला. आज कोरोनाबाधितांपेक्षा जास्त त्रास सामान्यांना भोगावा लागत आहे. याचे कारण त्यांचे जनजीवन अजून मार्गी लागलेले नाही. शिक्षणाची वाट लागली. रोजगाराची वाट लागली. अपुरे पगार हे कोरोनाचे दुष्परिणाम पाहता आता जर नवा विषाणू आला तर काय होणार, ही भीती आहे. त्यामुळे आज पुन्हा रात्रीची संचारबंदी घातली गेली आहे हे ठिक आहे. अर्थात कोरोनाचा व्हायरस फक्त रात्रीच येऊ न संसर्ग करेल असे कसे म्हणता येईल? लागण काही फक्त रात्रीच होते असे नाही. त्यामुळे फक्त रात्रीच्या संचारबंदीने काय साध्य होणार आहे? तसेही रात्रीचे आजकाल कोणी बाहेर पडत नाहीच, पण ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घातली आहे हे योग्यच म्हणावे लागेल. येत्या दहा-पंधरा दिवसांत युरोपातील स्थिती काय असेल यावर भारताचेही भवितव्य असणार हे यातून स्पष्ट होत आहे.


याचवर्षी कोरोना ऐनभरात असतानाच अहमदाबादला 'नमस्ते ट्रम्प'चा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यासाठी पाच हजार विदेशी नागरिकांची विनातपासणी उपस्थिती ठेवण्यात आली होती व पैज लावून एक कोटी नागरिक तेथे ट्रम्प यांच्या स्वागताला उपस्थित ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता असले कार्यक्रम सरकारने करू नयेत, अशी अपेक्षा आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. त्यांचा येणारा लवाजमा येताना व्हायरस सोबत येणार नाही ना याची खबरदारी सरकार कशी घेणार आहे, याचाही विचार केला पाहिजे. अशा स्वरूपाच्या बेफिकिरीतूनच भारतात कोरोना वेगाने पसरला होता. आता तो कसाबसा आटोक्‍यात आला असतानाही नवीन डोकेदुखी सुरू झाली आहे. म्हणूनच आता आपल्याला पुन्हा एकदा सतर्क राहावे लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: