मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी बोला हे अमराठी असलेल्या राज्यपालांना सांगावे लागते या इतका दुसरा विनोद तो काय असेल? अर्थात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्याबाबत खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी वेळोवेळी हीच भूमिका घेतलेली आहे. एका विद्यापीठात पदवीदान समारंभातही त्यांनी यापूर्वी भाषण मराठीत का नाही, असा सवाल विचारला होता. ते स्वत: अभिभाषणाच्यावेळी मराठीतून बोलतात. आपल्या राज्याचा, आपल्या भाषेचा सन्मान राज्यपाल राखत आहेत आणि ती जबाबदारी आपली सर्वांची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे प्रादेशिक भाषेपेक्षा हिंदीचा वापर जास्त होतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे हे आम्ही विसरत आहोत. राज्यपालांनी नेमके हेच सांगितले. ते म्हणाले, खुद्द हिंदी भाषिकांपेक्षा महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे फार मोठे कार्य केले आहे. इतकेच बोलून ते थांबले नाहीत, तर हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करावे, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली. ही खरोखरच कौतुकाची बाब म्हणावी लागेल. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलले, पण जे बोलले ते सर्वांना अंजन घालणारे होते.
हे सांगताना राज्यपाल म्हणाले की, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदीचा सर्वत्र प्रचार व प्रसार करण्याचे मोठे कार्य केले आहे. आज हिंदी भाषा सुरीनाम, मॉरिशस, फिजी यांसह अनेक देशांत बोलली व समजली जाते. त्यामुळे हिंदी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे, असे त्यांनी सांगितले. हिंदी भाषेतील प्रसिद्ध हास्य-व्यंग लेखकांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘बता दूँ क्या’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. यानंतर त्यांनी मुख्य मुद्दा सांगितला तो असा की, देशातील सर्व भाषा एकमेकांच्या भगिनी असून हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करावे. हा फार महत्त्वाचा मुद्दा होता.
आम्हाला आमच्या मराठीचा अभिमान आहे का? आमचे नेते त्याची कदर करत नाहीत. मराठीवर फक्त राजकारण करतील, पण ती त्यांच्याकडून अपेक्षा नाही. आपण सामान्य माणसांनीच आता सुधारले पाहिजे. आपण मराठी माणसांनी मराठीतून बोलले पाहिजे. जे लोक अमराठी इथे व्यवसायासाठी, चरितार्थासाठी येतात त्यांच्याशी आपण आपल्या भाषेत बोलूनच मराठी त्यांना शिकवली पाहिजे.
बाकीच्या राज्यात गेल्यावर आपण त्यांची भाषा बोलतो. अन्य राज्यांतील लोक आपण त्यांच्या राज्यात गेल्यावर तुम्हाला त्यांची भाषा येत नाही म्हणून आपल्याशी मराठीत बोलतात का? मग आपण का त्यांच्याशी हिंदी किंवा अन्य भाषेत बोलतो. आज मराठी माणूस फक्त खरेदीदार आहे. ग्राहक आहे. आपल्या खिशातला पैसा त्यांना देण्यासाठी आपण बसलो आहोत. मग आपण जर ग्राहक आहोत, तर त्यांची भाषा का आपण बोलतो आहोत? दूधवाल्या भय्याला मराठीत विचारा किती पैसे झाले? सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड त्याच्याशी मराठीतच बोला. भाजी आणायला गेल्यावर आलू कैसे दिया नका विचारू, बटाटे कसे देणार असे विचारा. आपल्या भाषेत बोला, तरच आपले मराठीपण टिकेल. मराठी भाषा ही काय फक्त फेब्रुवारी महिन्यात एक दिवस मराठी भाषा दिन साजरा करण्यापुरतीच आपल्याला टिकवायची आहे का? या भाषेचा दिवस घालावा लागतो हीच चुकीची बाब आहे. जसा व्हॅलेंटाईन डे, आजकालच्या फॅडप्रमाणे फादर्स डे, मदर्स डे त्याप्रमाणे मराठी भाषा दिन आम्हाला साजरा करावा लागतो हीच खेदाची बाब आहे. आम्ही मराठी आहोत, जगा मराठी, बोला मराठी, व्हा मराठी या बाण्याने पुढे आले पाहिजे. आमचा कोणी वाली नाही म्हणून हातपाय गाळून बसता कामा नये.
विशेष म्हणजे दोन मराठी माणसं, लोकलमध्ये, बसमध्ये, रस्त्याने जाताना कशासाठी हिंदीत बोलतात? आम्हाला आमचे मराठीपण लपवावेसे का वाटते? फक्त मराठी पाटीसाठी तोडफोड करून आग्रह धरून काही होणार नाही, तर दुकानदारांनो, भय्यांनो, गुजरात्यांनो तुम्हीही आमच्याशी मराठीत बोला. अगदी त्या किरीट सोमय्यांसारखे तोडकेमोडके बोला, पण प्रयत्न करा असा आपला आग्रह असला पाहिजे. कोणी हिंदीतून तुमच्याशी बोलला तर तुम्ही मराठी बोला. ही एक मराठी बोलण्याची चळवळ उभी करण्याची वेळ आलेली आहे. आता तर आपल्या राज्यपालांना आपल्याला शिकवायची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत आपण काय बोध घेतला पाहिजे?
आज आमचे प्रत्येक व्यवहार हे परप्रांतीयांवर अवलंबून आहेत. आपण जे खातो तसे विचार होतात असे म्हटले जाते. आपले मराठीपण जपण्यासाठी आपण घरात मराठी बोलले पाहिजेच, पण वागलेही पाहिजे. मराठी जीवनशैली किंवा लाइफस्टाइल जगाला दाखवली पाहिजे. सगळीकडे सकाळी पौवाक पौवाक वाजवत इडलीवाले फिरतात. त्या इडलीवर बहिष्कार टाका आणि आमचे कांदेपोहे विकणारे विक्रेते तयार करायला पाहिजे. आज कोरोनामुळे रोजगार गेला आहे, तर आपल्या मराठी तरुणांनी असे खाद्यपदार्थ विकायला बाहेर पडले पाहिजे. मराठीतून ओरडून सांगा, घ्या कांदेपोहे... अजिबात लाज वाटून घेऊ नका. मराठी आहार घेतला तर आमचा मराठी विहार होईल, आमचा मराठी वावर होईल. आपले राज्यपाल जर मराठीबाबत इतकी जागरूकता दाखवत आहेत, आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने मराठी बोलणे आवश्यक आहे हे सांगतात तर आम्ही का मराठीचा प्रचार आणि प्रसार करत नाही?
मराठीचे प्रेम फक्त राजकारण करताना, निवडणुकांच्या प्रांतात न होता ते व्यवहारात झाले पाहिजे. खळ्ळ् फट्याक् करण्यापेक्षा बोल मराठी म्हणायची वेळ आहे. केवढ्याला देणार असे ठणकावून विचारा सगळ्या विक्रेत्यांना. आपल्या खिशातला पैसा आपण देणार आहोत, तर थोडा मराठीचा मान नाही माज बाळगा. इतकी त्यांना सवय लावा की, कॉलेजच्या मुलींनीही आता वॉव असे न म्हणता इश्य, अय्या असे म्हणावेसे वाटले पाहिजे. ओठांचा चंबू करून वॉव करण्यापेक्षा इश्य, अय्या म्हटल्याने किती रोमांच अंगावर येतात याचीही अनुभूती घ्या. म्हणजे आमच्या सगळ्या प्रतिक्रियाही मराठीतूनच उमटल्या पाहिजेत इतकीच अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा