आज ३१ डिसेंबर. यावर्षीचा अखेरचा दिवस. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या पिढीच्या दृष्टीने सर्वात वाईट वर्ष म्हणून या वर्षाचे वर्णन करावे लागेल. याचे कारण कोरोना महामारीचे महासंकट आणि त्याने यावर्षी अनेक दिग्गज आपल्यातून हिरावून नेले आहेत. म्हणूनच आज हा दिवस गोड व्हावा आणि नवीन वर्षाचे स्वागत हे आनंदाने व्हावे हीच अपेक्षा आहे.
३१ डिसेंबरच्या दिवशी मार्गशीर्षतील गुरुवार आलेला आहे. अनेक जण हा दिवस अत्यंत पावित्र्याने पाळत असतात. मार्गशीर्ष महिना हा विष्णूला सर्वात प्रिय असा महिना आहे. भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायातील ३५व्या श्लोकात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर:।।१०.३५।। म्हणजे भगवंताला आवडणारा असा सर्वात उत्तम असा हा महिना आहे. त्यातील आज गुरुवार आहे. त्यामुळे या दिवशी काहीतरी चांगले घडेल आणि सरकार काही चांगली घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. म्हणजेच शेवटचा दिवस या वर्षीचा गोड होईल हीच अपेक्षा आहे.
कोरोनाचं संकट आहे, पण त्यावर आपण मात करत आता लसीकरण सुरू करत आहोत हे सरकार आज सांगेल आणि शेवटचा दिवस गोड करेल, अशी अपेक्षा आहे. सरकारचा शेतकरी आंदोलकांशी सुसंवाद होईल आणि गोडीने हा संप, हे आंदोलन थांबेल आणि नव्या वर्षात आनंदाने पदार्पण करण्यासाठी हा शेवटचा दिवस गोड होईल ही अपेक्षा आहे. मार्गशीर्ष महिन्यातीत पुण्यकाळात सरकारने कृषीक्षेत्राला खूश करणारे, समाधान करणारे वातावरण निर्माण केले, तर हा देश पुन्हा आनंदी होईल. कोरोनामुळे सगळेजण आर्थिक डबघाईला आले असले, तरी अजूनही सावरले आहेत, सावरत आहेत. सावरत असतानाच सरकारने सर्वसामान्य जनतेला विश्वास देण्याची गरज आहे. नोकरी, रोजगार गेल्याने अनेक जण यावर्षी पुन्हा शेतीकडे वळले. शेतकºयांचे मन मोठे असते. आपल्या घासातील घास देण्याची त्यांची प्रवृत्ती असते. शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या आपल्या स्वकीयांना या शेतकरी बांधवांनी पुन्हा शेतीमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे शेतीवरचा बोजा वाढला आहे. गेल्या चाळीस वर्षांत या देशाची अर्थव्यवस्था कृषीप्रधान असली, तरी आपण सेवा आणि उद्योग क्षेत्रातून रोजगार वाढवण्याचा प्रयत्न केला होता. १९८० च्या दशकात या देशातील ७१ टक्के लोक शेतीवर अवलंबून होते, तर आज ५२ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. हा टक्का कमीतकमी करणे हा विकास आहे, पण कोरोनामुळे पुन्हा सेवा आणि उद्योग क्षेत्रातील लोक शेतीकडे वळाले आणि शेतीवरचा बोजा वाढला आहे. म्हणून सरकारने फक्त आत्मनिर्भर असे न म्हणता शेतीवरचा बोजा कमी करून नव्या रोजगाराची काही तयारी केली पाहिजे. २०२० मध्ये बंद पडलेले उद्योग, ज्यांचा रोजगार गेला आहे. कमी झाला आहे, त्यांना पुन्हा दिलासा देणारे काहीतरी जाहीर करण्याची गरज आहे. कारण हा शेवटचा दिवस तरी गोड झाला पाहिजे ही अपेक्षा आहे.
२०२० हे काळे वर्ष म्हणून आपण आपल्या आयुष्यात नोंदवले आहे. अनेक महनीय व्यक्ती यावर्षी अकाली गेल्या आहेत. नाटक, चित्रपट हा मोठी उलाढाल असणारा सांस्कृतिक उद्योग यावर्षी झोपला आहे. नाटक-चित्रपट ही आपली एक सांस्कृतिक भूक असते. ती भूक यावर्षी भागली नाही. गेल्या वर्षात चित्रपट रिलीज झाले नाहीत, चित्रीकरण झाले नाही, त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अगदी सकाळी उठून घरोघर पेपर विक्री करणाºया पेपरविक्रेत्यापासून ते मोठमोठ्या उद्योगांना फटका बसला आहे. रोजगारावर प्रचंड परिणाम या वर्षात झाला आहे. म्हणूनच आता शेवटच्या दिवशी सरकारने काहीतरी चांगली बातमी देऊन सर्व काही पूर्ववत सुरू होईल, असा दिलासा दिला पाहिजे.
शिक्षणाचे तर यावर्षी मातेरे झाले आहेच. आॅनलाइन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या ज्ञानात काहीही भर पडलेली नाही. मुले फक्त मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये माना खाली घालून बसली आहेत, पण त्यांचा शिक्षकांशी संवाद होताना दिसत नाही. त्यांनी काय केले पाहिजे, काय शिकले पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याबाबत सुसूत्रता कोठेही दिसत नाही. यामध्ये सामान्य, मध्यमवर्गीय माणूस पार चेपला गेला आहे. त्यातच महागाईचा भस्मासूर पेटला आहे. भाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत. त्याबाबत कोणीही काही बोलत नाही. या सगळ्या परिस्थितीत संपूर्ण देशात थोडी अंदाधुंदी माजलेली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सुसंवाद नाही. राजकारणी लोक कसेही वागत आहेत. कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतीला अपमानित झाल्यामुळे रेल्वेखाली आत्महत्या करावी लागली. काय ही अवस्था आहे? एका नेत्याला जर असे मरण येत असेल, तर सामान्य माणसांचे काय? आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. सर्वांना आनंद मिळेल असे शेवटच्या दिवशी सरकारने काहीतरी बोलले पाहिजे. पंतप्रधानांनी मन की बात न बोलता आता जनहिताची बात बोलली पाहिजे आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा