नवीन वर्षात मुंबईची जीवनवाहिनी लोकल सुरू होईल, असे संकेत सरकारकडून मिळत आहेत. पण त्याचे योग्य नियोजन आतापासून करणे गरजेचे आहे. लोकल सुरू झाल्यावर कबूतरखान्यातून बाहेर पडलेल्या पक्षांच्या थव्याप्रमाणे माणसांची गर्दी होणे कसे टाळता येईल, याचा विचार करून आतापासूनच त्याचे नियोजन झाले पाहिजे. लोकल सुरू करण्यापूर्वीच राज्य सरकारने, मुंबई महापालिकेने, रेल्वेने एकत्रित नियमावली तयार करून ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
लोकल कायम बंद ठेवता येणार नाही. भारतीय रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारी मुंबई लोकल आहे. भारतीय रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के इतके उत्पन्न हे मुंबई लोकलपासून मिळते. दररोज कित्येक लाख लोक या लोकलचा फायदा घेत असतात. असे असताना मुंबई लोकलपासून मिळणारे उत्पन्न बंद करणे हे तसे रेल्वेला परवडणारे नाही. अनेक महिने लोकल बंद होती. ती टप्प्याटप्य्याने सुरू केली आहे, परंतु अजूनही सर्वांसाठी ती नसल्यामुळे लोकलची गर्दी दिसत नाही, पण जर नव्या वर्षात लोकल सुरू करण्याचा विचार केला जात असेल, तर त्याची लवकरात लवकर नियमावली तयार केली पाहिजे.
यामध्ये सर्वात प्रथम नेमका कोणी प्रवास केला पाहिजे, हे ठरवले पाहिजे. आवश्यकता असेल तरच बाहेर पडले पाहिजे, हे गृहीत आहेच. पण ज्यांना वर्क फ्रॉम होम करता येणे शक्य आहे त्यांना लोकल प्रवासात अडकवून ठेवण्याची गरज नाही. आज साधारणपणे ३० टक्के लोक वर्क फ्रॉम होम करू शकतात, तर त्यांना तसेच घरातून काम करू द्या. ज्यांना थेट अभ्यागत, ग्राहकांशी संपर्क साधण्याची गरज नाही आणि घरातून काम करता येणे शक्य आहे, त्यांना तेच करू द्या. त्यामुळे हा ३० टक्के लोकांचा लोकलवरचा बोजा कमी होईल. त्याचप्रमाणे त्यांचा कार्यालयीन गर्दीचा प्रश्नही सुटेल. सोशल डिस्टन्स राहण्यास मदत मिळेल.
दुसरी गोष्ट म्हणजे अजून काही दिवस ज्येष्ठ नागरिकांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देऊ नये. कारण या गर्दीत जर कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला, तर त्याचा त्रास त्यांना होईल. पण ज्येष्ठ नागरिकांनी लोकल प्रवास करायचाच नाही का? तर थोडे दिवस महिला स्पेशलप्रमाणे ज्येष्ठांसाठी स्पेशल लोकल दुपारी १२ ते ४ या वेळेत सोडावी किंवा काही डबे पूर्णपणे ज्येष्ठांसाठी राखून ठेवावेत किंवा आठवड्यातून एक दिवस, दोन दिवस असे काही दिवस ज्येष्ठांना प्रवासासाठी ठरवून द्यावेत.
कॉलेज विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी यांना अजून थोडे दिवस लोकल प्रवासापासून थांबवावे. हे सगळे गर्दी कमी करण्यासाठी आहे. फिरायला म्हणून, मुंबई पहायला म्हणून लोकलने फिरणारे लोक थांबवले, तरी बरीच गर्दी कमी होऊ शकते. लहान मुले घेऊन जाणारे लोक, लेकुरवाळ्या महिला यांनी लोकलने प्रवास करू नये. अशा प्रकारे काही निर्बंध घातले, तर अजून काही प्रवाशांना लोकलचा प्रवास करता येईल. अजून काही लोकांचा रोजगार सुरू होईल.
शेवटी लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. ती जगवली पाहिजे, तिचे उत्पन्न वाढवलेच पाहिजे. ती तोट्यात गेली तर पुढच्या विकासाचे स्वप्न आपण कसे पाहणार आहोत? सरकार किती काळ एवढा मोठा महसूल बुडवू शकेल? त्यामुळे ती लवकरात लवकर काही अटींवर, सर्वांसाठी सुरू केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आणि नोकरदारांच्या प्रवासाच्या वेळा ठरवून देऊन ती सर्वांसाठी सुरू करता आली, तर बरे होईल. त्यादृष्टीने तातडीने सरकारने एक नियमावली तयार केली पाहिजे.
विशेष म्हणजे आता सरकारला दंडात्मक कारवाई करून बुडालेले उत्पन्न वसूल करण्याची संधी आहे. ती संधी सरकारने गमावू नये, म्हणजे लोकलने प्रवास करणारे अनेक लोक अजूनही मास्क न बांधता फिरतात. त्यांच्यावर तिथेच पावती फाडणारी यंत्रणा असली पाहिजे. अजूनही थुंकणारे लोक आहेतच. त्यांच्याकडून दंड आकारणी केली पाहिजे. बुडालेले उत्पन्न दंडात्मक कारवाईने वसूल करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वी तिकीट चेकींग करणारे टिसी होते, तसे आता कोणत्या कामासाठी बाहेर पडला आहात याची चौकशी करणारी यंत्रणा प्रत्येक स्थानकात असली पाहिजे. अनावश्यक प्रवास करणाºयांकडून दंड आकारून सरकारचे उत्पन्न वाढवावे. योग्य कारणाशिवाय लोकलने प्रवास करणाºयांवर दंडात्मक कारवाईची तरतूद नव्या नियमावलीत असली, तर आपोआप गर्दी नियंत्रणात येईल आणि मुंबई जी ठप्प झालेली आहे ती मूळपदावर येईल.
शेवटी ही पथ्य आहेत. जीवनवाहिनी म्हटल्यावर जीवनाची पथ्ये पाळावीच लागणार आहेत. ही पथ्य पाळून आपण मुंबई पूर्वपदावर आणू शकतो. मुंबइं पूर्वपदावर आणण्यासाठी लोकल सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याची नियमावली तातडीने जाहीर करून हा ठप्प झालेला कारभार मार्गी लावावा ही अपेक्षा आहे.
मागच्या आठवड्यात मध्य रेल्वेने एसी लोकल सुरू केली. खरं तर त्याची काही आवश्यकता नव्हती. एसी लोकल ही तशी तोट्यात चाललेलीच लोकल आहे. त्यात आता सर्वांसाठी लोकल खुली नसताना त्याला किती प्रतिसाद मिळणार? पण त्याचा विचार न करताच ती सुरू केली. त्यापेक्षा सामान्य लोकलच्या दोन फेºया वाढवल्या असत्या, तर जास्त बरे झाले असते. पण आमचे नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात. मुंबईच्या विकासासाठी, जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार दोघांचाही महसूल वाढण्यासाठी ऊर्जा देणारी ही जीवनवाहिनी आहे. ती गतीमान होणे ही काळाची गरज आहे, पण ती कशा प्रकारे गतीमान करायला पाहिजे याचे चांगले नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने नियमावली तयार करणे आवश्यक आहे. सध्या लहान मुलांना घेऊन जाणाºया महिलांना लोकल प्रवासाला बंदी आहे, पण तरीही अनेक महिला लहान मुलांना घेऊन प्रवास करताना दिसतात. त्यांना कोणीच मज्जाव करत नाही. प्रत्येक स्थानकाच्या फलाटावर असणारे पोलीस, टीसी, रेल्वे कर्मचारी त्यांना का अडवत नाहीत? तर नियमांचे काटेकोर पालन झाले, तर कोरोनावर विजय मिळवता येईल आणि सर्वांना आपले ठप्प झालेले जीवनमान सुधारता येईल. त्यासाठी नियमावली आणि त्याची अंमलबजावणी करणारे नियोजन करण्याची हीच ती वेळ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा