सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

भाजपचे लक्ष्य प. बंगाल




भारतीय जनता पक्षाचे सध्या मिशन पश्चिम बंगाल चालू आहे. शनिवार-रविवार दोन दिवस झालेले पक्षांतर आणि रोड शोमधून भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २०० जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. हे कशाच्या जोरावर केलेले विधान आहे? विद्यमान विधानसभेत हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असताना भाजपने केलेले हे वक्तव्य बंगालमधील सत्ता हस्तगत करण्यासाठी केलेले जोरदार प्रयत्न म्हणावे लागतील. अर्थात यावेळी भाजपने घातलेली साद मतदारांना विचार करायला लावणारी आहे. काँग्रेसला, डाव्यांना आणि तृणमूलला संधी देऊन पाहिलीत आता एक संधी फक्त आम्हाला द्या, कसे परिवर्तन होईल हे पहा. हे आवाहन महत्त्वाचे आहे. म्हणजे पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशानेच भाजप प्रयत्नशील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर नेत्यांचे राज्यातील दौरे व तृणमूलमधून होणारी नेत्यांची गळती हा योगायोग मानता येणार नाही.

विधानसभा निवडणूक जेमतेम चार-पाच महिन्यांवर आली असताना, सुरू झालेली नेत्यांची गळती मुख्यमंत्री व पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी नक्कीच काळजीची बाब ठरली आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली. तृणमूलमधून जे बाहेर पडले त्यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भव्य रॅलीही काढली. त्याने ममता दीदींच्या चिंतेत भर पडली आहे. पक्ष सोडणाºयांनी त्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही; पण पक्षात असंतोष माजला आहे आणि त्यातून दुफळी निर्माण होऊ शकते, अशी लक्षणे दिसत आहेत. शुभेंदू अधिकारी यांच्यासारख्या नेत्यांचा पक्ष कार्यकर्ते व त्यांच्या मतदारसंघातील जनतेवर प्रभाव मोठा असतो. हे नेते ज्या पक्षात जातील त्या पक्षाकडे तेथील मतदार वळू शकतात. तो धोका सत्तेतील पक्षाला मोठा असतो. त्यातून ममता बॅनर्जींची थोडी एकाधिकारशाही ही पण याला कारणीभूत आहे.


शुभेंदू यांच्या राजीनाम्यानंतर तृणमूलचे डझनभर आमदार, काही खासदार, पदाधिकारी यांनी पक्ष सोडला आणि भाजपचे कमळ हातात घेतले. त्यामुळे ही लाट अशीच चालत राहिली, तर येत्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचा तृणमूल भाजप होईल. शुभेंदू यांना पक्षात जी वागणूक मिळाली त्यामुळे आम्ही व्यथित आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार विश्वजीत कुंडू यांनी व्यक्त केली, त्यावरून असंतोषाचा अंदाज येऊ शकतो. आणखी ५० आमदारांशी आपला संपर्क आहे, असे ते म्हणाले. त्यावरून दीदींना धोका मोठा आहे, हेही स्पष्ट होते. दोन व्यक्तींमुळे तृणमूलमध्ये असंतोष पसरल्याचे दिसते. ममता यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याचा पक्षात प्रवेश झाल्यावर त्याचे महत्त्व वाढत गेले. त्यामुळे तृणमूलमध्ये गटबाजी तयार झाली. त्याचा फायदा भाजपने उठवण्यास सुरुवात केलेली दिसते.

आणखी एक गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांच्याशी ममतांनी साधलेली जवळीक ही आमदारांनी ममतांना सोडण्यास कारणीभूत ठरलेले आहे. पक्ष स्थापन करण्यात व तो वाढवण्यासाठी आपण श्रम केले; पण आपल्याला धोरणे आखण्यात डावलले जात असल्याचे या नेत्यांचे मत झाले. ममता दीदी यांचा स्वभाव एककल्ली आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या निर्णयास विरोध केलेला त्यांना रूचत नाही. त्यामुळे जुने नेते व त्यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावत गेली व असंतोष वाढत गेला. या असंतोषाचा भाजप फायदा घेणार हे नक्की.


अगदी दोनच वर्षांपूर्वी मुकूल रॉय हे तृणमूलचे अत्यंत महत्त्वाचे नेते होते. त्यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. ते भाजपमध्ये गेले. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे तृणमूल कोसळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली. इथेच ममतांच्या पतनाला सुरुवात झालेली होती.

खरं तर २०११ पासून तृणमूल पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. गेल्या निवडणुकीत तृणमूलने २९४ पैकी २२० जागा जिंकल्या, पण लोकसभा निवडणुकीत भाजपने १८ जागांवर विजय मिळवून धक्का दिला. येत्या निवडणुकीत राज्याची सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदी सरकार विरुद्ध ममता दीदी उघडपणे व आक्रमकतेने टीका करत असतात. त्यामुळे त्यांना सत्तेतून दूर करण्यास भाजपने प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पक्षातील असंतोष भाजपच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे भाजप पश्चिम बंगालमध्ये पाय मजबूत करण्याच्या तयारीत असलेला दिसतो.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर केलेला तृणमूलचा हल्ला आणि त्यामुळे तृणमूलला गुंडगिरी करणारा पक्ष ठरवणे भाजपला अत्यंत सोपे गेले आहे. किंबहुना हा हल्ला करून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच भाजपला पायघड्या घातलेल्या दिसतात. त्याच पायघड्यांवरून अमित शहा यांनी रॅली काढली आणि आपले शक्ती प्रदर्शन केले, पण साधारणपणे मतदार आता कोणत्याही पक्षाला दोन वेळ संधी देते. त्या कालावधीत तुम्ही चांगली कामगिरी करून जनतेचा विश्वास संपादन केला नाही, तर ती तुम्हाला नाकारते. डाव्यांनी २४ वर्ष काढली, पण ममतांना १० वर्षांत हा धोक्याचा कंदील समोर आलेला आहे हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: