मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

सगळ्या कोल्ह्यांना एकदम सर्दी कशी काय होते?


खरं तर आजकाल सर्दी म्हटलं, तर मनात भीतीच उत्पन्न होते. कारण कोरोनाची आणि सर्दीची लक्षणे सारखीच आहेत. पण तरीसुद्धा ही सर्दी आहे का, कोल्ह्यांना झालेला कोरोना आहे याची शहानिशा झालीच पाहिजे. हे सांगण्याचे कारण म्हणजे इसापनीतीतील गोष्ट. जंगलचा राजा सिंह आजारी असतो. त्याच्या अंगाला दुर्गंधी येत असते. सगळ्या जंगलात वास सुटलेला असतो. पण ही अंगाला दुर्गंधी आहे, हे सांगण्याचे धाडस कोण्या प्राण्यामध्ये नसते. एकेदिवशी कोल्हा जंगलात येतो. त्याला सिंह अडवून विचारतो की काय रे? माझ्या अंगाला दुर्गंधी येत आहे का? कोल्हा म्हणतो, साहेब, आपण हे कुणाला तरी विचारा. मला इतकी सर्दी झाली आहे की, कसलाच वास येत नाही. त्याचे उत्तर ऐकून सिंह खूश होतो आणि त्याला जायला सांगतो.


नंतर तिथून एक बैल जात असतो. त्याला सिंह अडवतो. काय रे बैला, माझ्या अंगाला दुर्गंधी येते आहे का? त्याबरोबर बैल म्हणतो. हो महाराज. खूपच दुर्गंधी येते आहे. अगदी इथं उभंही राहवत नाही. त्यामुळे सिंह संतापतो. बैलाशी कसलीही चर्चा न करताच त्याला मारून टाकतो. सिंह असे करणार हे बैलाला माहिती नसते, कारण बैल पडला साधा भोळा. पण या जगात जगायचे असेल, तर लबाड कोल्ह्यासारखे जगावे लागते. नाहीतर धारातीर्थी पडावे लागणारच. त्यामुळे सर्दी झालेल्या कोल्ह्यांची संख्याच आजकाल जास्त दिसून येते.

आज आपल्याकडे जे कृषी कायदे केले गेले, त्यावरून जी आंदोलने उभी राहिली याबाबत शेतकºयांचा बैल केला जातो आहे. कारण संसदेत सगळ्या कोल्ह्यांना एकदम सर्दी झाली असावी. ही एकाएकी आलेली कोरोनाच्या साथीसारखी सर्दी इतकी भयानक होती की त्याचा परिणाम या आंदोलनात शेतकºयांचे बळी जातील, असे कोणालाच वाटले नाही. आम्हाला चर्चा करू दिली नाही आणि राष्ट्रपतींनी लगेच स्वाक्षरी केली, असे विरोधकांचे म्हणणे हे न पटणारे आहे. विरोधक असतील किंवा सरकार पक्षातील सहकारी, घटक पक्ष सगळ्यांनाच एकदम सर्दी झाली होती का? कोणालाच या संकटाची चाहूल लागली नव्हती? नेमके हे कायदे काय आहेत हे विचारण्याचे धाडस एकातही नव्हते. असे का व्हावे?


खरं तर गेल्या काही वर्षांत काही माणसांची एक नवीन आवड लक्षात आली आहे. ती म्हणजे या लोकांना कोणीही कशाही विरुद्ध केलेलं आंदोलन आवडतं. ते स्वत: त्यात सहभागी होत नाहीत. पोलिसांच्या काठ्या, पाण्याचे फवारे, अश्रुधूर याला सामोरं जायची त्यांची स्वत:ची तयारी नसते, म्हणून मग ही मंडळी पाटलाच्या लग्नात सुनेची माया, या म्हणीला अनुसरून, सगळ्या आंदोलनांना बाहेरून, नैतिक, शाब्दिक पाठिंबा देतात. पुरस्कार वापसी सुरू होते. हे करणारे सगळे सुशिक्षित असतात. सरकारवर हिरीरीने टीका करत असतात. सोशल मीडियावर बिनधास्त बोलत असतात, पण हे लोक मतदानाच्या प्रक्रियेतही सहभागी झालेले नसतात. हे तुम्ही करत आहात हे चुकीचे आहे, असे सांगण्याचे धाडसही या लोकांमध्ये नसते. सुशिक्षित असून एखादे वाचकपत्र लिहावे, सरकारला जाब विचारावा, यासाठी पुढे येण्याचे धाडस नसते. फक्त नैतिक पाठिंबा. लांबून बघायचे. घरात बसून मेणबत्त्या लावायच्या. त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात असेच अनेक लोक मेणबत्ती फेºया देशभर काढत होते. डोक्यावर मैं अण्णा हूं अशा टोप्या घालत होते, पण या आंदोलनाचा फायदा घेऊन अण्णांनाच टोपी घालणारे आणि राजकारणात येऊन मुख्यमंत्री बनणारे कोल्हेही होते हे तेव्हाही कळले नाही आजही कळत नाही.

म्हणजे अशा आंदोलनात पाठिंबा देऊन, कोणते तरी कायदे बदललेच पाहिजेत, म्हणून केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतात. ते सरकारनं खरंच बदलले, तर त्या बदला विरुद्ध केलेल्या आंदोलनाला पण पाठिंबा देतात. वास्तविक आंदोलनाचा जो विषय असतो त्याच्या बारकाव्यात जाण्याच्या फंदात ते पडत नाहीत, कारण योग्य-अयोग्य समजलं, तर दिलेल्या पाठिंब्यातला जोर निघून जाण्याचा धोका असतो. त्या विषयातला अभ्यास ते करत नाहीत आणि त्यावर आपलं ठाम मतही मांडत नाहीत, पण दुसºयांनी त्या विषयावर लिहिलेल्या त्यांच्या सोयीच्या पोस्ट ते फडकवतात. स्वत:च मत बिलकुल समजून देण्याचं चातुर्य यांच्याकडं असतं, हे पण सगळे सर्दी झालेले कोल्हेच असतात.


खरं तर आंदोलन हे लोकशाहीनं दिलेलं एक उत्तम हत्यार आहे. यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो आणि त्यामुळं कायम त्या मार्गानं लोकशाही बळकट करायच्या मागं असतात, पण रस्त्यात जमावाकडून मार खात असलेल्या एखाद्या माणसाला आपणही जाऊन चार मुस्काटात मारून हात साफ करून घेणारी माणसं असतात. त्यांना त्या मारामारीचं कारण, कोणाची बाजू योग्य-अयोग्य याच्याशी काही संबंध नसतो. त्यातलाच प्रकार हा पण आहे, असे कधीकधी वाटते.

म्हणजे मोठे नेते जेव्हा काही बोलतात, काही करतात, तेव्हा त्यात अनेकवेळा चुका असतात. पण त्या चुका, ते संदर्भ चुकीचे आहेत, हे सांगण्याचे धाडस कोणी करत नाही. मागच्या बिहार निवडणुकीत तक्षशिला नालंदावरून मोदींनी केलेले भाषण असेच चर्चेत आले होते. विद्यापीठ आता पाकिस्तानात आहे, हेही मोदींना माहिती नाही, म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. इतिहासातील चुकीचे संदर्भ देतात, असे नेहमीच त्यांच्यावर आरोप होत असतात. पण भाजपमध्ये इतके विद्वान लोक आहेत, ते त्याबाबत पक्षाला याची जाणीव देत नाहीत का? या चुका दाखवणारी एकही फळी त्यांच्याकडे नाही का? सिंह जंगलचा राजा का असतो, तर तो सिंहावलोकन करतो. आपल्या मार्गात आपण काही पाऊलखुणा ठेवलेल्या नाहीत ना, हे तो पाहतो आणि पावलांचे ठसे, चुका शिल्लक राहिल्या असतील, तर त्या पुसून येतो. तसे राजकारणी सिंह करत नाहीत. नुसतीच सिंहासारखी आयाळ आहे, अशी समजूत करून घेण्यात काही अडचण नसते.


आता चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस झाला. त्यावेळी त्यांनी महात्मा फुलेंचे विचार आचरणात आणा इतकेच बोलले असते, तरी चालले असते. पण त्यांचा विचार काय आहे हे सांगताना जी जुळवाजुळव केली ती किती गमतीशीर होती की, ते संदर्भ इतिहासाची मोडतोड करणारेच होते. आपल्या भाषणात पंचम जॉर्ज यांना भेटण्यासाठी गेट वे आॅफ इंडियाजवळ एक जण आले, त्यांना पोलीस अडवत होते, पण गाडीतून तो प्रकार पाहून पंचम जॉर्ज खाली उतरले. ते गृहस्थ महात्मा फुले होते हे सांगितले. हे असेलही खरे पण संदर्भ चुकले होते. कारण महात्मा फुले यांचे निधन २८ नोव्हेंबर, १८९० ला झाले तर पंचम जॉर्ज भारतात १९११ ला आले. गेट वे आॅफ इंडिया त्यानंतर कितीतरी वर्षांनी सुरू झाले, पण ही माहिती भाषणापूर्वी कोणीही खरी आहे का, संदर्भ चुकीचे आहेत का, हे ताडून पाहिले नाही. कारण आमच्यात आपल्याच नेत्याला त्याच्या चुका दाखवण्याचे धाडस नसते. उगाचच घाबरून राहायचे आणि आपल्याला सर्दी झालेली आहे, अशी कोल्हेकुई करायची. अशी प्रथा जर राजकारणात रुजली, तर ती वाईट आहे.

सगळे संदर्भ, कायदे, माहिती ही चुकीच्या प्रकारे जाईल, म्हणूनच ना या शेतकरी आंदोलनाची कोणी माहिती घेताना दिसत नाही. ते कायदे चुकीचे आहेत हे सांगण्याचे नेते धाडस करत आहेत, पण शेतकºयांनी खरोखर एकजूट दाखवली आहे, ती दुसरीकडेही दाखवता आली असती. एपीएमसी वाचवण्यासाठी दाखवता आली असती, म्हणजे शेतकºयांनी ही एकजूट दाखवून आम्ही कोणाही उद्योगपतीला माल विकणारच नाही, एपीएमसीलाच विकू असा निर्धार केला असता, तरी हे कायदे मोडून पडले असते. खरोखरच हे कायदे भांडवलदारांच्या फायद्याचे असतील, तर त्यांच्या कमरेत लाथ घालण्यासाठी आम्ही तुम्हाला नाही विकणार, असा निर्धार करून ते मोडता आले असते. कारण सरकार म्हणते आहे, आम्ही एपीएमसी बंद केलेली नाही. म्हणजे यातून दूध का दूध पानी का पानी झाले असते, पण याबाबत सत्य बोलायचे धाडस कोणी करत नाही. प्रत्येकाला आपल्या नेत्यांचे म्हणणे जपायचे असते. अशावेळी दुर्गंधी येत असली, तरी ती सहन करत सर्दी झाल्याचे सोंग करणे हाच मार्ग शिल्लक राहतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: