गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधली अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यातच आज प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचा भाग पुढे आला आहे. काँग्रेसमधले एकेकाळचे सर्वोच्च पदाचे नेते, राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेले प्रणव मुखर्जी यांनी २०१४ च्या काँग्रेस पराभवाला सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करणारा एक गट सक्रिय आहे. जे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात अशा गुलाम नवी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, शशी थरुर अशा डझनभर नेत्यांनी जवळजवळ बंडखोरीच केली होती आणि नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तसे पत्रही दिले होते. ही सगळी सततच्या पराभवाने निर्माण झालेली अस्वस्थता आहे.
हे कमी की काय म्हणून गेल्या चार दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली. हे पद शरद पवारांकडे जाणार, अशी चर्चा सुरू केली. त्यामुळे तर काँग्रेसमधले अनेक नेते अस्वस्थ झाले. आपल्या नेतृत्वावर सातत्याने होत असलेली टीका, चर्चा यांमुळे यशोमती ठाकूर, संजय निरुपम यांच्यासारखे नेते उघड नाराजी व्यक्त करत आहेत. असे वातावरण तयार केले जात आहे की, काँग्रेस नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा कोणीतरी प्लॅन करत असल्याचे बोलून दाखवले जात आहे. अर्थात हे कोणीतरी म्हणजे दुसरेतिसरे कोणी नाही, राष्ट्रवादी काँग्रेसवरच त्यांचा राग दिसतो आहे. हा राग स्पष्टपणे आळवता येत नसल्याने काँग्रेसमधली अस्वस्थता वाढत चालली आहे. कारण अशीच हवा राहिली, तर आगामी निवडणुकांमध्येही काँग्रेसचे खच्चीकरण केले जाईल.
राज्यात येत्या काळात महापालिका निवडणुका आहेत. १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या निवडणुका जर महाविकास आघाडी म्हणून लढवल्या गेल्या, तर काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा येत राहणार. त्या मिळणाºया जागाही अवघड असू शकतात. त्यामुळे महापालिका, ग्रामपंचायतींवर काँग्रेसच्या एकहाती सत्तेचे स्वप्न साकारले जाणार नाही. साहजिकच पक्ष संघटना मजबूत होणार नाही. जागावाटपात इच्छुक कार्यकर्त्यांचा मतदारसंघ आघाडीतील घटक पक्षांकडे गेला, तर त्यामुळे बंडखोरी होईल. कोणी थेट भाजप किंवा सेना, राष्ट्रवादीकडे जाऊ न तिकीट घेईल. त्यामुळे पक्ष वाढण्यापेक्षा घटत जाणार ही चिंता काँग्रेसला आहे, पण आता अवस्था अशी झालेली आहे की यांची साथ, सोबत सोडता येत नाही. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था आहे ही. या अवस्थेमुळे काँग्रेस अस्वस्थ झालेली आहे.
आगामी काळात पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. तृणमूलने अगोदरच तिथे आघाडी करून काँग्रेसला संपवले होते. मित्रपक्ष म्हणून हाताला धरले, पण काँग्रेसचा मतांचा गठ्ठा आपल्याकडे वळवण्यापुरता तृणमूलने फायदा करून घेतला. तोच प्रकार महाराष्ट्रातही काँग्रेसबाबत होत आहे. एक काळ असा होता की, महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाने हे काँग्रेस नेत्यांच्या ताब्यात होते. पक्षबांधणीसाठी आणि विधानसभा, लोकसभा मतदारसंघाच्या बांधणीसाठी ही यंत्रणा कामी येत होती. कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती ग्रामपंचायती, पंचायत समितीचे गण, जिल्हा परिषदेचे गट आपल्याकडे आहेत, किती साखर कारखान्यांवर आपली सत्ता आहे, किती जिल्हा बँका आपल्या ताब्यात आहेत यावर उमेदवाराचे भवितव्य ठरत होते. त्यादृष्टीने संस्थात्मक काम करून कार्यकर्त्यांना बांधून ठेवले जात होते. ही संघटनात्मक बांधणीच काँग्रेसच्या हातातून तुटलेली आहे. त्यामुळे न वरच्या पातळीवरचे नेतृत्व आहे ना खालच्या पातळीवरचा कार्यकर्ता संघटित करण्याची यंत्रणा आज काँग्रेसकडे आहे. त्यामुळे एकूणच पक्षात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. जी ग्रामीण भागावर पूर्वी काँग्रेसची पकड होती, काँग्रेसचे बालेकिल्ले होते, ते सगळे राष्ट्रवादीकडे गेले. शुगर लॉबी, सहकारी संस्थांचे जाळे हे सगळं राष्ट्रवादीकडे गेले. त्यामुळे काँग्रेसकडे फक्त मधल्या फळीतले नेतेच शिल्लक आहेत. जे रस्त्यावर उतरू शकत नाहीत, ज्यांना फक्त पदे हवीत, उमेदवारी हवी अशीच फौज काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही सगळी फौज आता नाराज होताना दिसते आहे. हा राग व्यक्त करताना दिसत आहे.
यामध्ये माध्यमे आणि काही नेते तेल टाकण्याचे काम करत आहेत. काँग्रेसचेच खासदार आणि पत्रकार असलेल्या नेत्यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी सातत्याचा अभाव असल्याचे मत प्रकट केले. त्यामुळेही काँग्रेस नेते अस्वस्थ झाले. काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा हा डाव असल्याचे संजय निरुपम यांच्यासारखे ओरिजनल काँग्रेसचे नसलेले नेते बोलून आपल्या निष्ठा दाखवू लागले. त्याला लगेच प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेख लिहून उत्तर दिले. शरद पवारांचे खच्चीकरण केले गेले, ते पंतप्रधान होऊ नयेत म्हणून त्यांना डावलले गेले, असा काँग्रेसवर टेपर त्यांनी ठेवला. या सगळ्या गोष्टी काँग्रेसमधली अस्वस्थता वाढवणाºया आहेत, पण आज काँग्रेस इतकी हतबल झालेली आहे की कोणाचा तरी हात धरून चालण्याशिवाय त्यांना पर्यायही उरलेला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा