बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

उशिरा सुचलेले शहाणपण


अस्ताव्यस्त झालेल्या आणि नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी पुन्हा एकदा गांधी कुटुंबीय सरसावले. काही प्रलंबित निर्णयही गेल्या चार दिवसांत घेतले गेले. त्यापैकी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय मार्गी लागला. आता काँग्रेस अध्यक्षपदाचाही निर्णय होणे अपेक्षित आहे. जरी सर्वांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दाखवली असली, तरी त्याची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय ज्या काही चुका होत आहेत, त्याकडे गांभीर्याने पाहणेही आवश्यक आहे. कालच मध्य प्रदेशात युवक काँग्रेसने नेतेपद जाहीर केले. त्यानंतर तो थट्टेचा विषय बनला, कारण जी व्यक्ती मार्च महिन्यात भारतीय जनता पक्षात, ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबरोबर गेली होती, त्या भाजपमध्ये गेलेल्या नेत्याचे नाव अध्यक्षपदी निवडले गेले होते. अशा चुका आता होता कामा नयेत, हे काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे पत्र लिहिणाºया २३ नेत्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचा पक्षाकडून गांभीर्याने विचार होणार आहे. ही सकारात्मक भूमिका पक्षाची प्रतिमा उंचावण्यास निश्चितपणे मदत करणारी ठरेल, पण यात सातत्य असले पाहिजे. खुद्द शरद पवार यांनीही या सातत्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण उशिरा का होईना हे शहाणपण काँग्रेसला सुचले हेही नसे थोडके.

काही नेत्यांच्या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी खुद्द हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून सर्वसामान्यांनी काँग्रेसकडे पाहायचे असेल, तर संभ्रम आणि अनिश्चितता संपवणे आवश्यक आहे. काँग्रेसला संजीवनी देण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ झटकणारी काहीतरी हालचाल होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत हे ठिक झाले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. संघटनात्मक मुद्यांसह नव्या अध्यक्ष निवडीपर्यंत सर्व विषयांवर ज्येष्ठांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. गुलाम नबी आझाद, शशी थरुर, पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंह हुड्डा, मनीष तिवारी यांसह तेवीस नेत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र सोनिया गांधी यांना आॅगस्टमध्ये पाठवले होते. या पत्रावरून तथाकथित निष्ठावंतांनी या २३ नेत्यांना अक्षरश: आरोपीच्या पिंजºयात उभे केले होते. खरं तर ते कळकळीने बोलत होते. हेच खरे काँग्रेसचे आधारस्तंभ होते. पण त्यांना पक्षातून काढून टाका इथपर्यंत त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. अर्थात तसे झाले नाही हे योग्य झाले, कारण या नेत्यांनीच खºया अर्थाने काँग्रेस जिवंत ठेवली होती. त्यामुळेच उशिरा का होईना सोनिया गांधींनी त्यांच्याशी चर्चा केली हे चांगले म्हणावे लागेल.


या २३ नेत्यांनी पत्र लिहिल्यानंतर प्रथमच झालेली प्रत्यक्ष बैठक, राहुल यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाºया युवा नेत्यांना बैठकीपासून दूर ठेवण्याचा निर्णय, यामुळे मध्यंतरी वाढलेली कटुता आणि मतभेद दूर होऊन पक्ष एकदिलाने उभा राहण्याची शक्यता वाढली आहे. झाले गेले विसरा आणि पक्षासाठी एकत्र या अशी भावनिक साद सोनिया यांनी घातली आहे. राहुल गांधी बैठकीस उपस्थित होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर आपले कोणतेही मतभेद नाहीत, संघर्ष नाही हे त्यांनी स्पष्ट केले आणि त्याचवेळी ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव नेहमीच उपयुक्त पडल्याचेही नमूद केले. अंतर्गत मतभेद दूर केले, तर पक्ष संघटना मजबूत होत असते. भारतीय जनता पार्टीत अंतर्गत मतभेदांना थारा दिली जात नाही. नेत्यांना बाजूला केले जाते, नाकारले जाते, पण ते वाद चव्हाट्यावर आणले जात नाहीत. राज्य पातळीवर खडसेंसारखा अपवाद वगळला, तरी खडसे म्हणजे काही दुभती गाय नव्हती. त्यामुळे ते राष्ट्रवादीत गेल्याने पक्षाला फरक पडेल, पण काँग्रेसने मात्र ज्योतिरादित्य यांच्यासारखे नेते गमावले आहेत. त्यामुळे हे मंथन महत्त्वाचे होते.

पक्षात स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी तरुण नेते तसा प्रयत्न करतात, हे नाराज ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. बैठकीतही ते मांडले गेले. भाजपचे कडवे आव्हान पेलायचे, तर आक्रमक धोरण गरजेचे आहे. सर्व घटकांना आणि प्रवाहांना सामावून घेणारा पक्ष, ही काँग्रेसची ओळख. सर्वसामान्यांच्या मनात ती ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्याही आधी पक्ष संघर्षाला तयार आहे, हा संदेश जावा लागेल. त्यासाठी नाराजांची संख्या वाढणार नाही आणि जे नाराज आहेत, असे सांगितले जाते त्यांच्या नाराजीत भर पडणार नाही, हे पाहावे लागेल. या विषयावर चर्चा झाली हे फार बरे झाले. म्हणजे अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसची खूण गाय-वासरू असल्यापासून काँग्रेसमध्ये फक्त एक गाय आणि बाकीचे मुंडी हालवणारे बैल होते, अशी टीका व्हायची, पण आज मुंडी न हालवता लोकशाही मार्गाने आपले मत मांडण्याचे धाडस काही नेत्यांनी केले आणि त्याला उशिरा का होईना प्रतिसाद दिला. ही गोष्ट आज महत्त्वाची आहे. पक्षाला संजीवनी देण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल. उशिराने सुचलेले हे शहाणपणही पक्षाला तारून नेईल हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: